प्रकार

Tuesday, December 12, 2006

मुखवटे

"संपूर्ण जगात तूच सुंदर," असे सांगणारा जादूचा आरसा स्नो व्हाईटच्या गोष्टीतल्या सावत्र आईकडे खरंच होता का असा प्रश्न मला बरेचदा पडतो. म्हणजे विचार करायला लागलं तर नेमकी काय गरज अशा आरशाची? आरसा आपल्याला जे पाहायचे असते तेच दाखवतो म्हणतात. या गृहीतकानुसार प्रत्येकाने आरशात सुंदरच दिसायला हवे. तसं प्रत्येकाने सुंदरच का दिसावे यामागची कारणमीमांसा सोपी आहे, आपले दोष सहज कबूल करणारी, मोठ्या मनाने आपल्या चुका मानणारी माणसे कोठे सापडतात? मी म्हणतो तेच खरे, माझेच इतरांनी ऐकले पाहिजे, माझेच बरोबर आणि "मीच सर्वांत सुंदर!" यांत नेमका फरक तो कोणता? सौंदर्याचा बेगडी मुखवटा धारण करणार्‍यांना आपला खरा चेहरा पाहावासाच वाटत नसेल तर?

मध्यंतरी एके ठिकाणी माणसांचे गुण-दोष, आवड-नावड त्यांच्याच शब्दांत वाचण्याचा योग आला. प्रत्येकाने आपल्या गुणांचे आणि आवडींचे वारेमाप वर्णन केले होते, परंतु जेथे दोष आणि नावडीबद्दल लिहायचे होते तेथे थोडक्यात मला भ्रष्टाचाराचा राग आहे, मला स्वत:ची टिमकी वाजवणार्‍या व्यक्ती आवडत नाहीत, मला अस्वच्छता आवडत नाही, मला भिकार्‍यांचा, राजकारण्यांचा राग येतो असे प्रचारी मुद्देच मांडलेले आढळले. अगदी अभावाने एखाद्याने 'मी नकार पचवू शकत नाही, एखाद्याने माझे मत नाकारले तर माझा संताप अनावर होतो.' असे लिहिले होते. इतरांना आपले म्हणणे इतक्या परखडपणे आणि सुस्पष्टपणे मांडता आले नाही याचे कारण 'इतरांनी मला चांगले म्हणावे, माझे दोष इतरांना दिसू नयेत' अशी भीती असते की 'मी स्वत:ला आहे तसा स्वीकारू शकत नाही, माझे दोष मलाच दिसू नये याची मी काळजी घेतो' असा स्वार्थ असतो कोणास ठाऊक? मला व्यक्तिशः दुसर्‍या विधानावर जास्त विश्वास वाटतो.

यावर पुढील प्रश्न निर्माण झाला की जगात कितीजणांना नकार स्वीकारता येतो? जी उत्तरे मिळाली त्यावरून तो तसा बर्‍याचजणांना पचवता येतो पण तो पचवला जातो याचे खरे कारण त्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो म्हणून. जेथे तो स्वीकारायचा नसतो तेथे समोरच्या माणसाला येन केन प्रकारेण नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्याचा अपमान करणारी, मारहाण करणारी, एखाद्याची बदनामी होईल असे उद्योग करणारी आणि कुटील कारस्थान रचणार्‍या माणसांपासून ते प्रेयसीला जाळणारी माणसे याच प्रकारात मोडतात.

माणसाला जनाची नाहीतरी मनाची लाज हवी असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र माणूस स्वत:चे अंतरंग लपवून समाजात आपली पत, प्रतिष्ठा राखण्यासाठी कोठल्याही प्रकारे चकचकीत मुखवटा लेऊन तयार असतो असे दिसून येते. जनाची लाज बाळगणारे जगात बहुसंख्य आहेत पण मनाची लाज बाळगणारे अगदी कमीच असावेत की काय असे वाटते. या माणसांना आपला चेहरा आरशात सुंदर दिसत असावा का? याचे उत्तर "हो" असेच द्यावे लागेल. चेहर्‍यावरचे मुखवटे, रंग उतरवल्याशिवाय आपलाच चेहरा दिसायचा कसा? इतरांना एखाद्या सुंदर, सोज्वळ, विद्वान चेहर्‍यामागे दडलेला राक्षस दिसणे केवळ अशक्य होऊ शकते, पण माणसाला स्वत:चाच हिडिस चेहरा दिसू नये किंवा पाहायची भीती वाटावी यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय? कदाचित हा रंगवलेला मुखवटाच आपला चेहरा असावा या भ्रमात जगणे ही माणसे पसंत करत असावीत.

मुखवटे चढवणे वाईट असे म्हणता येत नाही, बरेचदा ते चढवणे आपल्या आणि इतरांच्या फायद्याचेच असते, कधीतरी आत्यंतिक गरजेचेही असते. परंतु सतत मुखवटे चढवून मिरवणारी माणसे स्वत:ची आणि इतरांची फसवणूकच करत असतात. माणसाने या मुखवट्यांच्या आणि रंगांच्या गर्दीत स्वतःला विसरून जावे याचे कोठेतरी आश्चर्यही वाटते.

मध्यंतरी वाचनात आले होते की काही सिने नट-नट्या झोपतानाही आपला मेक-अप उतरवत नाहीत. केवळ या भीतीपोटी की सकाळी उठून आपण स्वत:लाच ओळखले नाही तर काय घ्या? भारतीय नट नट्यांचे फारसे माहीत नाही पण मायकेल जॅकसन तोंडाला रंग लावूनच झोपतो असे ऐकले होते. विनोदाचा भाग सोडला तर या कलावंतात आणि सामान्य माणसात फार फरक आहे असे मला वाटत नाही. प्रत्यक्ष जगातही बरेचजण मुखवट्यालाच चेहरा समजून जगत असावेत आणि आरशात स्वत:ला सर्वात सुंदर समजत असावेत याचा मनाला कोठेतरी खेद वाटतो.

Monday, November 27, 2006

वादळ जगणारी माणसे

वर्षातले आठ महिने सप्टेंबर ते मे आम्ही उत्तर अमेरिकेत बंदिस्त जीवन जगतो. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या कामगार दिवसाच्या (लेबर डे) सुट्टीपासून ते मे महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या सैनिक स्मृतिदिनाच्या (मेमोरिअल डे) सुट्टीपर्यंत उत्तर अमेरिकेतील उघड्यावरील बरीचशी प्रेक्षणीय स्थळे व कार्यक्रम बंद ठेवण्यात येतात. काही मोजकी ठिकाणे सुरू असली तरी खराब हवामानामुळे मुलाबाळांसकट प्रवास करणे सहसा शक्य होत नाही. राहता राहिले ४ महिने, या दिवसांत मात्र जिथे जाता येईल त्या सर्व ठिकाणी माणसे फिरून घेतात, प्रवास करतात व आठ महिने घरांत बंदिस्त राहिल्याने आनंदात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढतात.

असे असले तरी खराब हवामान सहसा साथ सोडत नाही. थंडी संपल्याच्या आनंदात आतुरतेने घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या स्वागताला वादळी पाऊस नाहीतर 'टॉर्नेडो' नावाचे वादळ कधी उपटेल हे सांगणे तसे कठीणच. अमेरिकेचे हवामानखाते तसे बऱ्यापैकी विश्वासार्ह असल्याने रोज सकाळी उठून 'वेदर चॅनेल'वर एक नजर बरेचसे लोक टाकतातच, पण रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीनुसार वाईट हवामानामुळे रोजचे कामकाज काही थांबून राहत नाही. घरात किंवा बाहेर, कधीतरी शेवटच्या क्षणापर्यंत वादळाचे निश्चित स्वरूप न कळल्याने वादळाचा जबरदस्त तडाखा अनुभवावा लागतो. प्रवास मात्र या काळात टाळता येण्याजोगा असतो, परंतु येणाऱ्या वादळाची कल्पनाच असेल तरच.

गेली ४-५ वर्षे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागांत राहून अशी बरीच वादळे अनुभवलेली आहेत. एखाद्या जोरदार वादळामुळे घराची पडझड होणे, झाडे पडणे, गाड्या उलट्या पालट्या होणे, विजा पडणे, रस्ते, इमारती यांचे नुकसान होणे हे थोड्याफार प्रमाणात दरवर्षी होतेच. बरेचदा या वादळांच्या दरम्यान घरातील तळघराचा सर्वात सुरक्षित जागा म्हणून आसरा घ्यावा लागतो. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नॉर्थ कॅरोलायना राज्याला या वादळाने तडाखा दिल्याने सुमारे ८ माणसे मृत्युमुखी पडली व अंदाजे ५,००,००० डॉलर्सचे नुकसान झाले. दरवर्षी वादळांचे हे तांडव अनुभवावे लागत असल्याने त्याची भीती मनातून काही प्रमाणात कमी झाली असली तरीही प्रत्यक्ष वादळात अडकल्यावर काय होत असेल ते या वर्षीच्या एप्रिल महिन्यात आम्ही भर हायवेवर अनुभवले. निसर्गाच्या या रुद्रावताराविषयी लिहिण्यापूर्वी टॉर्नेडोबद्दल थोडी अधिक माहिती द्यायला आवडेल.

टॉर्नेडो म्हणजे आकाशातील ढगाला लटकलेला आणि स्वत:भोवती जोरदार गिरक्या घेणाऱ्या वाऱ्याचा स्तंभ. या टॉर्नेडोचे एकंदरीत स्वरूप बरेचदा एखाद्या नरसाळ्याप्रमाणे दिसते. आकाशात निर्माण झालेला हा स्तंभ जमिनीला चिकटला की त्याचे रुपांतर प्रत्यक्ष टॉर्नेडोत होते. कॅनडावरून येणारी थंड हवा व अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागातील उष्ण हवा यांच्या घर्षणामुळे व या वेगाने वाहणाऱ्या हवेसोबत येणाऱ्या प्रचंड ढगांमुळे टॉर्नेडोंचा जन्म होतो. या वादळांच्या दरम्यान बरेचदा ताशी १०० किंवा अधिक मैलांच्या वेगाने वारे वाहतात. अर्थात दरवेळेसच टॉर्नेडो तयार न होता ही वादळे विजा-गडगडाट होण्यापर्यंत सीमित राहतात. अशा वादळांची आम्हाला सवय आहे, सर्रकन ऊन सरून आकाशात ढग येणे, तास दोन तास मुसळधार पाऊस कोसळणे आणि त्यापुढच्या क्षणाला काहीच न घडल्यासारखे स्वच्छ ऊन पडणे या ऊन-पावसाच्या खेळाला आम्ही सरावलो आहोत, पण भर टॉर्नेडोत अडकल्यावर काय परिस्थिती होते ते यापूर्वी अनुभवले नव्हते.

टॉर्नेडोचा खेळ तसा लहानसाच असतो. बरेचदा ८ ते १० मिनिटांतच आटोपतो. परंतु एकापाठोपाठ एक असे अनेक टॉर्नेडो थडकण्याची शक्यताही असते. अशावेळी अनेक प्रकारच्या संपत्तीचे अपरिमित नुकसान व जीवितहानी होण्याची शक्यता असते. अमेरिकेच्या काही भागांत दरवर्षी सुमारे १,००० टॉर्नेडो अनुभवण्यास मिळतात. ही वादळे आपल्यासोबत प्रचंड वेगाने वाहणारे वारे, विजा, पाऊस व बरेचदा गारा घेऊन येतात. टॉर्नेडोची रुंदी सुमारे १ मैलाचा परिसर व्यापू शकते. ज्या भागावरून टॉर्नेडो सरकतो तिथे घरांची पडझड होणे, वृक्ष उन्मळून पडणे, गाड्या उलट्यापालट्या होऊन फेकल्या जाणे हे सहज होते.

या वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आम्ही फिरायला केंटकी राज्यातील केवसिटी येथे जाण्याचा बेत आखला होता. मुलीला 'स्प्रिंगब्रेक' (वसंत ऋतूत येणारी सुट्टी) होता. ५-६ महिने घरांत बसून जीव विटला होता. तापमानही जरा वर चढले होते, आणि मुख्य म्हणजे केवसिटीला असणारी सर्व आकर्षणे पर्यटकांसाठी सुरू ठेवण्यात आली होती. निवांतपणे प्रवास व्हावा या हेतूने माझ्या नवऱ्याने शुक्रवारी सुट्टी काढली होती व त्यानुसार आम्ही शुक्रवारी पहाटेच घराबाहेर पडलो. निघण्यापूर्वी केवसिटीला हवामान कसे असावे याचा अंदाज अर्थातच घेतला होता. वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती परंतु अशी वादळे नित्याचीच असल्याने त्यात वावगे वाटण्यासारखे काहीच नव्हते व त्यावेळेपर्यंत धोक्याची सूचनाही देण्यात आली नव्हती. आमच्या समोर नेमके काय वाढून ठेवले आहे त्याची फारशी कल्पना आली नाही.

केवसिटीला जमिनीखाली प्रचंड आकाराच्या नैसर्गिक गुहा आहेत. येणाऱ्या पर्यटकांना त्यांचे मुख्य आकर्षण वाटते. याशिवाय तेथील डोंगरदऱ्यांतील उंचसखल भागांत घोडेस्वारी करता येते. उघड्या झोपाळ्यांतून डोंगरमाथ्यावर नेणाऱ्या स्कायलिफ्ट्स आणि तिथून एका छोट्याशा गाडीत बसून खाली घसरता येईल अशा अल्पाइन स्लाइड्स नावाच्या घसरगुंड्या, डायनॉसोर्सच्या प्रचंड प्रतिकृती असलेले उद्यान अशा विविध आकर्षणांनी हे ठिकाण नटलेले आहे. घरापासून केवसिटीला पोहचण्यासाठी आम्हाला सुमारे २२० मैलांचा पल्ला गाठायचा होता. २२० मैल म्हणजे सुमारे ४ तास प्रवास या हिशेबाने आम्ही सकाळीच निघालो होतो. पहिल्या दिवशी त्या परिसरातील सर्व आकर्षणांची मजा लुटायची आणि दुसऱ्या दिवशी आरामात केवसिटीच्या "मॅमथ केव" नावाच्या नैसर्गिक गुहा पाहायला जायचे असा बेत होता. या परिसरापासून ५ मैलावर असणाऱ्या 'हॉर्स केव' या ठिकाणी हॉटेलात आम्ही आमची राहण्याची सोयही केली होती.

सकाळी १०च्या सुमारास आम्ही केवसिटीला पोहोचलो तेव्हा कोवळे ऊन पडले होते. वातावरणही चांगले उबदार होते. आम्ही आमचे स्वेटर्स काढूनच गाडीच्या बाहेर पडलो आणि डायनॉसोर उद्यानात शिरलो. उद्यानातून फेरफटका झाल्यावर स्कायलिफ्टमध्ये बसायचे ठरले. स्कायलिफ्टमधून वर जाऊन अल्पाइन स्लाइड्सवरून घसरण्याचा हा खेळ माझ्या मुलीने यापूर्वीही कधीतरी खेळून पाहिला असल्याने तिला तिथे जाण्याची उत्सुकता अधिक होती. त्याप्रमाणे सुमारे १२ - १२॥च्या सुमारास आम्ही स्कायलिफ्टमधून डोंगरमाथ्यावर पोहोचलो. आकाशात ढग जमून आले होते. वाऱ्याचा वेगही वाढला होता. अल्पाइन स्लाइडवरून घसरत खाली येताना पाण्याचे हलके थेंब अंगावर पडू लागले. पावसाच्या तुरळक सरी आल्या तर त्यात काय मोठेसे असा विचार करून आम्ही दुसऱ्या फेरीतून पुन्हा डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी स्कायलिफ्टमध्ये बसलो. वर जाताना पाण्याचे टपोरे थेंब वर्षायला लागले. आकाशात अचानक नेहमीपेक्षा वेगळेच दिसणारे काळेभोर ढग भरून आले. विजा चमकायला लागून गडगडाट व्हायला लागला तर उगीच या डोंगरावर अडकून पडायला नको म्हणून आम्ही ठरवले, 'आता इथून निघू, जेवून घेऊ आणि दुपारी दोनच्या सुमारास हॉटेलवर जाऊन आराम करू. संध्याकाळी पाऊस ओसरला की येऊ पुन्हा.' आमची कन्यका थोडीशी नाराज झाली खरी, पण येणाऱ्या संकटाची चाहूल कधीकधी नकळत लागते म्हणतात ती अशी. आमचा खेळ जर बंद केला नसता तर पुढे काय वाढून ठेवले होते याची कल्पना न केलेलीच बरी.

जवळच एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन आम्ही जेवून घेतले. तेथून बाहेर पडलो तसा पाऊस कोसळतच होता, विजांचा चकचकाट सुरू झाला होता. 'बरं झालं आपण शहाण्यासारखं हॉटेलमध्ये परतायचं ठरवलं' असे म्हणत आम्ही गाडीत बसलो आणि गाडी हायवेवर घेतली. पाऊस बेधुंद कोसळत होता. हायवेवर इतर वेळी साधारणत: ७५-८० मैलांच्या वेगाने जाणाऱ्या गाड्या आता ३०-४० मैलांच्या वेगाने जात होत्या. आम्ही अंदाजे मैला-दोन मैलांचे अंतर कापले असावे. अचानक, "थाड!" गाडीवर काहीतरी आदळल्यासारखे वाटले. "काहीतरी आदळलं गाडीवर बहुतेक," मी नवऱ्याला म्हटले. "दगड असेल, रस्त्यावर पडलेला असेल आणि बाजूच्या गाडीमुळे उडून आपल्या गाडीला लागला असेल. गाडीवर कुठे पोचा (डेन्ट) पडला नसला म्हणजे मिळवलं," गाडीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या नवऱ्याने हळहळून म्हटले.

आणि पुढच्या क्षणाला "थाड... थाड... थाड..." गाडीवर कोणीतरी जबरदस्त दगडफेक केल्यासारखे काहीतरी आदळायला लागले. नक्की काय होतं आहे हे लक्षात यायला थोडा वेळ लागला आणि जे दिसले त्यावरून लक्षात आले की रस्त्याच्या बाजूला टेनिस किंवा बेसबॉलच्या चेंडूइतक्या मोठ्या गारांचा खच पडत होता. याच गारा आपल्या गाडीवर आदळत आहेत हे कळल्यावर सर्वात प्रथम माझ्या मुलीने तोंड उघडले, "डॅडी! या गारा गाडीच्या काचा फोडून आत येणार. मला एकटीला पाठी बसून भीती वाटते. आपण हॉटेलात कधी पोहोचणार?" तिला उत्तर देण्यापूर्वीच आमची गाडी प्रचंड धुक्यात शिरली आणि समोरचे काहीही दिसेनासे झाले. या परिस्थितीत गाडी चालवणे निव्वळ अशक्य होते. नवऱ्याने अंदाजाने कशीबशी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली.गारा आता आणखीनच वेगाने आदळत होत्या. इतक्या मोठ्या गारा पाहायची ही आमची पहिलीच वेळ; अशावेळी आपला जीव वाचवायला नेमके काय करायचे असते याची आम्हाला काही कल्पनाच येत नव्हती. धुक्याच्या जाड पडद्यामुळे गाडीच्या बाहेर एक फुटापलीकडचेही दिसेनासे झाले होते. काचा फुटल्या तर काय करायचे? या गारा अंगावर बरसल्या तर काय होईल याची कल्पनाही करवत नव्हती. डोके खाली घालून शांत बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. "घाबरू नकोस. आम्ही आहोत ना इथेच तुझ्याबरोबर, आपण गाडीच्या आत सुरक्षित आहोत," माझा नवरा मुलीला शांत करण्यासाठी हे सांगत असतानाच गाडीला जोरात हादरा बसला. एव्हाना आपण भर टॉर्नेडोत अडकलो आहोत याची जाणीव आम्हाला झाली होती. अशाच एका वादळात काही वर्षांपूर्वी संपूर्ण स्कूलबस आणि ट्रक्स उलटेपालटे झाल्याची क्षणचित्रे डोळ्यासमोरून तरळून गेली. गाडी पुन्हा एकदा हादरली तशी आमची कन्या रडायच्या बेतात म्हणाली, "आपण मरणार आता इथेच. डॅडी, काहीतरी कर प्लीज!!" निसर्गाच्या हाती सापडल्यावर आपण किती अगतिक होऊ शकतो ते आम्हाला पुन्हा एकवार कळून येत होते. "बेटा! आपण काहीही करू शकत नाही. माझा हात हातात घे तुला तेवढंच बरं वाटेल. वादळ १० मिनिटांत पुढे सरकेल. तोपर्यंत शांतपणे वाट पाहणं इतकंच आपण सगळे करू शकतो, तेव्हा रडू नकोस, शांत राहा." मी माझा हात पाठीमागे केला. मुलांसमोर मोठ्यांना घाबरून चालत नाही याचीही पुन्हा एकवार जाणीव होत होती. पुन्हा जोराचा हादरा बसला, गाडी सरकल्यासारखी वाटली.

पुढची आठ-दहा मिनिटे गाडीला सतत हादरे बसत होते. आदळणाऱ्या गारा काचा फोडून आपल्यापर्यंत पोहोचतील की काय या विचाराने जिवाचा थरकाप उडत होता. आठ-दहा मिनिटांचा तो अवधीही प्रचंड भासत होता, आणि एक वादळ गेल्यावर लगेच दुसरे मागून आले तर? या जर-तरसाठी आमच्याकडे उत्तरच नव्हते. आमच्या सुदैवाने तसे झाले नाही, काही वेळाने धुक्याचा पडदा हळू हळू ओसरू लागला. गारा मंदावल्या. वाऱ्याचा जोरही कमी झाला. आमच्यासारख्याच अनेक गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत हे आम्हाला आता दिसू लागले. त्यापैकी कोणीतरी हळूच आपली गाडी पुन्हा रस्त्यावर आणली आणि एक-एक करून पुन्हा रहदारी सुरू झाली.

आम्ही आमच्या मुक्कामाला हॉर्स केवला पोहोचलो तसे हॉटेलची स्वागतिका म्हणाली, "इथे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे आम्ही लिफ्ट्स बंद ठेवल्या आहेत. या भागात बऱ्याचशा घरांच्या काचा फुटल्या म्हणून आम्ही आमच्या हॉटेलात राहणाऱ्या सर्वांना इथे तळमजल्यावर सुरक्षित जागी बसायला सांगितले आहे. काही नवीन वादळे तयार होत आहेत. पुन्हा येतील की काय याची खात्री नाही. तेव्हा तुम्ही बॅगा घेऊन इथेच तळमजल्यावर थांबा. कुठेही जाऊ नका, विजेच्या उपकरणांना हात लावू नका." त्यानुसार पुढचे तास-दीड तास आम्ही शांतपणे इतरांसोबत तळमजल्यावर बसून काढले. त्यानंतर सर्व काही सुरळीत झाले.

संध्याकाळी पुन्हा आम्ही केवसिटीला फिरायला गेलो तेव्हा दुपारी या भागावरून वादळ घोंघावत गेले असावे असे क्षणभर वाटलेही नाही, नंतर एक एक गोष्टी कळल्या तेव्हा प्रसंगातील गंभीरपणा लक्षात येऊ लागला. ज्या वादळाने आम्हाला गाठले होते त्याने अमेरिकेच्या टेनिसी आणि केंटकी राज्यांच्या काही भागांत खूपच नुकसान केले होते. मालमत्तेची प्रचंड हानी झाली होती आणि सुमारे १०-१२ माणसे मृत्युमुखी पडली होती. केवसिटीच्या भागात कोठे पाणी साचले होते, बऱ्याच ठिकाणी खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. वीजपुरवठा खंडित झाला होता. काही पर्यटकांना गारांचा फटका बसल्याने वैद्यकीय मदत घ्यावी लागली होती. आमचे नुकसान पाहायला गेले तर आमच्या गाडीची अवस्था तुळशीबागेत मिळणाऱ्या ठोक्याच्या भांड्यांसारखी झाली होती. एका पोच्यावरून हळहळणारा माझा नवरा मात्र "जान बची लाखों पाये।.... हे काय कमी आहे? होतं असं आयुष्यात कधीतरी, ती वेळ आपली नव्हती इतकंच." असे म्हणून स्वस्थ होता.

त्यानंतर दोन दिवस केवसिटीला राहून आम्ही 'मॅमथ केव' त्या परिसरातील संरक्षित वनोद्यान व बाकीच्या सर्व आकर्षणांचा आनंद लुटला.


गारेचे चित्र www.gluttonsess.com या संकेतस्थळावरून घेतले आहे. टोर्नेडोची सर्व चित्रे विकिपिडियाच्या सहाय्याने घेतली आहेत.

Friday, November 03, 2006

डोळ्यांत वाच माझ्या...

रन-अवे ज्युरी हा चित्रपट अनेकदा पाहिला आहे काल पुन्हा एकदा पाहिला. काही क्षण, काही प्रसंग कारण नसताना मनात भरून राहतात तसा या चित्रपटात एक वेधक प्रसंग आहे.

एका मोठ्या बंदुकीच्या कंपनीविरुद्ध खटला हातात घेतलेल्या एका अत्यंत तत्त्वनिष्ठ वकिलाला मार्ली नावाची एक तरूण मुलगी खटल्यातले ज्युरी आपल्या मुठीत आहेत असे सांगून ब्लॅकमेल करत असते. अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि कायद्याशी खेळणार्‍या या मुलीचा राग आल्यावाचून आपल्याला राहवत नाही. पुढे एका प्रसंगात या वकिलाची आणि मार्लीची समोरासमोर भेट होते, बोलणं होतं आणि आपले साधे, शांत आणि थोडेसे शामळू डोळे तिच्या निर्ढावलेल्या डोळ्यांवर रोखून तो वकील तिला विचारतो, 'कोणी दुखावलंय का गं तुला, म्हणून तू हे सर्व करत्येस?' आणि संपूर्ण कथानक त्या एका वाक्यावर उलट फिरते. अनपेक्षित प्रश्नाने मार्लीच्या डोळ्यांत एक अस्पष्ट दुखरी रेषा उमटते आणि काहीतरी विलक्षण दु:ख ती मनाशी बाळगून आहे याचा अंदाज प्रेक्षकांना येतो आणि मार्लीबद्दल अचानक ओलावा निर्माण होतो.

Eyes are the windows to the soul, असं कोणीतरी म्हणून गेले आहे. आपल्या डोळ्यांतून प्रत्येक मानवी भावना व्यक्त होते. राग- लोभ- काम- मत्सर, यासारख्या आणि इतर अनेक गुणावगुणांनी भरलेले डोळे माणसाचे चारित्र्य सहज सांगून जातात.

नुकतेच जन्माला आलेले बाळ या जगाचा पहिला आस्वाद बहुधा डोळ्यांनीच घेत असावे. लहान बाळांचे डोळे फार स्वच्छ आणि नितळ असतात आणि लहान बाळांना काही फुटापर्यंतचेच दिसते म्हणतात. बहुधा लबाडी, मत्सर, राग यांनी त्या डोळ्यांत शिरकाव केलेला नसतो म्हणूनही असेल. बराच काळ आई हेच त्यांचे जग असते; म्हणूनच की काय त्यांची नजर निर्व्याज आणि निरागस असते. पण माणूस जसजसा मोठा होत जातो तसतशी त्याची दृष्टी व्यापक होते आणि चांगल्या वाईट सर्वच गोष्टी त्याच्या नजरेत भरायला लागतात आणि माणसाची नजर हळूहळू बदलत जाते, व्यापक होत जाते.

ही व्यापक झालेली नजर तरी किती प्रकारची; प्रेमळ नजर, रागीट नजर, दु:खी नजर, जरबेची नजर, लबाड नजर, अधाशी नजर, लाजाळू नजर, भेदरलेली- घाबरलेली नजर, अवखळ नजर, मादक नजर, बेफिकिर नजर, सोज्वळ नजर, आणि ही अनेक प्रकार असतीलच.

जिथे बोलताना शब्द अपुरे पडतात तिथेही डोळे बरंच काही सांगून जातात. डोळ्यांनी हसणे, रागावणे तर आलेच; पण डोळे मारणे, नेत्रपल्लवी करणे, नयनसुख घेणे या डोळ्यांच्या नशिबी येणार्‍या काहीशा वेगळ्याप्रकारच्या भावना. डोळे लक्ष ठेवून असतात, वटारलेले असतात, मिटलेले असतात, टक्क उघडे असतात, डोळ्यांत धूळ फेकता येते, डोळ्यांनी मागोवा घेतला जातो आणि पाठलागही केला जातो.

एखाद्याच्या डोळ्यांना डोळे भिडतात आणि माणसे प्रेमात पडतात. प्रेमात पडण्याचा यापेक्षा सोयिस्कर आणि सरळ मार्ग दुसरा नसावा. डोळे सरळ हृदयालाच हात घालतात म्हणे. डोळ्यांतून जे व्यक्त करता येते ते बरेचदा शब्दांतून करता येत नाही आणि तरीही डोळ्यांतील भाव व्यक्त करण्यावर अनेक वाक्प्रचार, कविता आणि गाणी लिहिली जातात.

या नजरेतलं मला जे आवडतं ते लहान मुलाच्या नजरेत असणारी निरागसता, आप्तांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा विश्वास, आपुलकी, स्नेह आणि जगातले सर्व शोध या डोळ्यांपाशी येऊन संपल्याची भावना. ती व्यक्त करायला ब्रायन ऍडम्सच्या या गीतापेक्षा सुंदर शब्द नसावेत ---


Look into my eyes - you will see
What you mean to me
Search your heart - search your soul
And when you find me there you'll search no more .....

Friday, October 27, 2006

पाहुणा

गेल्या वर्षीची गोष्ट, ऑक्टोबरचा महिना संपत आला होता. बाहेर थंडी मी म्हणत होती, जोराच वारंही सुटलं होतं. खिडकीच्या फटीतून आत शिरू पाहणारा वारा घुबडासारखे घुत्कार करत नकोस वाटणारं पार्श्वसंगीत ऐकवत होता. संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत पण बाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता. फायर प्लेस मधल्या जळणार्‍या लाकडांचा एक जळकट वास घरात पसरला होता. ब्रॅम स्टोकरचं पुस्तक वाचतावाचता सोफ्यावरच माझा डोळा कधी लागला होता कळण्यास मार्ग नाही.

दरवाज्यावर ठकठक ऐकू आली तसे मी चटकन डोळे उघडले. वार्‍यामुळे दरवाजा थरथरला असावा की काय असा विचार मनात आला न आला तोच पुन्हा एकदा ठक ठक ऐकू आली. या वेळेस थोडी जोरात. 'कोण आले असेल या वेळेस?' तशी या वेळेस कोणी यावं ही अपेक्षाच नव्हती. 'कोणीतरी गरीबांसाठी पैसे गोळा करायला, नाहीतर आसपासची पोरं वात्रटपणा तर करत नसावीत? पाहूया कोण आहे ते,' असा विचार करून मी उठले तसा स्टोकरचा ड्रॅक्युला धाडकन माझ्या पायावर पडला.

"आई गं! कोण मरायला कडमडलंय या वेळी?" असं पुटपुटत पुस्तक उचलून मेजावर आदळलेच आणि मी दरवाज्यापाशी आले. प्रथम पीपहोलला डोळा लावला. बाहेर कुणीच दिसत नव्हते. 'उघडावा की न उघडावा दरवाजा??' या गहन विचारांत असतानाच हात आपोआप हळूच कडीवर कधी गेला आणि दरवाजा कसा उघडला गेला ते कळलंच नाही.

दरवाजा उघडता क्षणीच वार्‍याचा थंडगार झोत अंगावर आला आणि त्याबरोबर एक उग्र दर्प नाकात भिनला. बाहेरच्या काळोखात एक संपूर्ण काळ्या पोशाखातील सहा फुटांहून अधिक उंचीची आकृती पाठमोरी उभी होती. मी दरवाजा उघडताक्षणीच ती गर्रकन वळली. समोर हातात छडी घेतलेला एक अत्यंत देखणा पुरुष उभा होता. चटकन डोक्यात आलं, 'गॉन विद द विंड' मध्ये क्लार्क गेबल प्रत्यक्षात असाच दिसत असावा बहुधा. फरक फक्त एक होता. क्लार्क गेबलच्या खोडकर डोळ्यांऐवजी समोरच्या व्यक्तीचे लालबुंद डोळे माझ्यावर रोखलेले होते.

"येस, प्लीज??" मी थोडं दबकतच विचारले.

"नमस्कार. मी आपला नवा शेजारी. कालच मला इथे आणलं." त्याने आपली ओळख करून देताना एक तोंड भरून हास्य फेकलं. हास्य कसलं? अंधारात त्याने पांढरे शुभ्र दात विचकल्यासारखं वाटलं.

"नमस्कार. आ..आणलं म्हणजे? तुम्ही कालच इथे आलात असं म्हणायचं आहे का तुम्हाला?" मी चाचरत प्रश्न केला.

"म्हणजे पोहोचवले हो, ईप्सित स्थळापर्यंत." असे म्हणून त्याने उगीचच गडगडाटी हास्य केले, "बरं! तर मी आत येऊ का?" त्याचा आवाज अगदी मृदू होता, "आमंत्रणाशिवाय तसा मी कुणाकडे जात नाही म्हणा; पण तुम्ही सख्खे शेजारी, या म्हणाल याची खात्री होती म्हणून आलो."

आता एखाद्याने गळ्यातच पडायचं म्हटल्यावर मलाही "या" म्हणण्यावाचून पर्यायच राहिला नव्हता. "या आत या."

महाशयांचे डोळे लुच्चे हसले. जसं काही त्या लाल भडक डोळ्यांमागे काहीतरी गुपित दडवलेलं आहे. ते ताडताड पावलं टाकत आत आले तरी त्यांचे हावभाव पाहून हा माणूस बराच काळ आपल्या पायांवर उभा नसावा की काय असे वाटत होते. कुठेतरी काळजात चर्र झाले आणि कुठेतरी त्यांचा तो आवेश पाहून त्याही परिस्थितीत हसू आले.

"त्याचं काय आहे की घरातलं सामान अजून उघडायचं आहे. सहा सहा फुटी पेटारे आहेत, उघडून स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणारच नाही का? बरं माझी ओळख करून देतो," महाशयांनी हातातली काठी फिरवली. त्या काठीच्या मुठीवर दोन हिरे चमचमल्याचा भास झाला, "मी द्वाड. म्हणजे माझ्या गुणांकडे पाहून माझं नांव माझ्या आई वडिलांनी 'द्वाड' असंच ठेवलं." 'बाप रे! आई-वडील हे असंही करतात?' मला जरा नवलच वाटलं.

काय बोलावं हे न सुचून मी "हम्म!" म्हटलं आणि नजर खाली वळवली, तसा ड्रॅक्युलाच्या पुस्तकावरचा 'बेला लगोसी' माझ्याकडे पाहून छद्मी हसल्याचा भास झाला. ड्रॅक्युलाचे खरे नांव "व्लाड" होते म्हणे, या द्वाडशी किती जुळतंय नाही, असं उगीचच मनात येऊन गेलं. शेवटी शब्दांची जुळणी करून मी तोंड उघडलं, "वा! वा!" आता त्यात 'वा!' म्हणण्यासारखं काय होतं कुणास ठाऊक पण बोलायचं म्हणून पुढे विचारलं," कसं काय येणं केलंत?"

"त्याचं असं आहे," हलकेच हसून द्वाडसाहेब मधाळ शब्द बोलू लागले,"आम्ही पडलो सरदार घराण्यातले. पूर्वजांपासून ऐशोआरामाची सवय, जहागिरी गेल्या, जमीनजुमले गेले तरी जुन्या सवयी काही सुटल्या नाहीत."

"हो का?" काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत होते, डोक्यात वेगळ्यांचं विचारांनी फेर धरला होता. ड्रॅक्युला पण म्हणे सरदार घराण्यातलाच होता नाही का?

"दिवस उतरणीला लागला, म्हणजे माझा दिवस सुरू होतो." द्वाडराव आपल्याच नादात बोलत होते, "काहीतरी प्यायला मिळावं अशी इच्छा होती पण घरातलं सामान उघडलेलं नाही आणि या अनोळखी गावांत कुठे फिरत बसणार?" बोलता बोलता साहेबांनी आपल्या ओठांवरून उगीचच जीभ फिरवली. "क.. क.. काय पिणार तुम्ही?" द्वाड साहेब आता झेप घेऊन माझ्या मानेला डसतील की काय असा विचार मनात आला.

"आता या वेळेला काय पितात माणसं? माझं 'त्या' शिवाय चालत नाही हो. तुमच्याकडे एखादी बाटली उधार असेल तर घेऊन जातो म्हणतो, " मी म्हणजे कोणितरी बावळट व्यक्ती आहे अशा तोर्‍यात द्वाडरावांनी मला सुनावलं.

"नाही हो! आमच्याकडे "त्या" बाटल्या नाहीत. नाही म्हणायला रेड वाइन आहे. चालेल?" मला प्रथमच जीवांत जीव आल्यासारखं वाटलं.

"हम्म्म! गडद रंगाच कुठलंही पेय चालतं मला. संध्याकाळी रेड वाइन ही काही माझी पहिली पसंती नाही पण नेईन निभावून," माझ्याकडे आशाळभूत नजरेने पाहत द्वाड साहेब उद्गारले. मी त्वरेने बाटली काढून द्वाड साहेबांच्या हाती सुपूर्त केली. "असं करा, आख्खी बाटलीच घेऊन जा. आम्हाला नको आहे." ही ब्याद कधी टळते आहे असं मला झालं होतं.

"बरं तर निघतो. तुमचा अधिक वेळ घेत नाही. तुम्हाला भेटून फार आनंद झाला."
"बरंय द्वाड साहेब तुम्हालाही भेटून आनंद झाला."
अचानक द्वाडसाहेब माझ्याकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणाले, "वेल देन! लेट्स किस,"

"काय?" मी जवळ जवळ किंचाळलेच. हा माणूस नक्की मला डसणार याची खात्री झाली.
"अहो ओरडताय काय अशा, कधीपासून पाहतो आहे, तुम्ही अशा बावचळल्यासारख्या का वागत आहात? मी म्हणजे काय भूत आहे का कोणी?" द्वाडराव माझ्यावर डाफरले आणि अचानक आवाज नरम करून म्हणाले, "लेट्स किस म्हणजे "Let us Keep It Simple and Straight!!!" मला कधी रेड वाइन हवी झाली तर येईन तुमच्याकडे सरळ. शेवटी शेजारी कधी कामाला येतात? तसा मी शांतताप्रिय प्राणी असल्याने तुम्हाला माझ्यापासून काही इतर त्रास होणार नाही. बाकी, तुम्ही मला द्वाड साहेब म्हणू नका, माझे इतर मित्र मला ज्या नावाने संबोधतात तेच नाव वापरत जा."

"कुठलं नाव?" या माझ्या इवल्याश्या जीवाने तरी किती वेळा भांड्यात पडावं?

"काऊंट ड्रंक्युला!," असे म्हणून साहेब गोड हसले व वळून चालू पडले

Thursday, October 12, 2006

चकवा

थंडीच्या दिवसांतली एक ढगाळ संध्याकाळ. बाहेर दाटून आलंय पण दिवसभरात पाऊस काही पडलेला नाही, हवा कोंदट झाली आहे. तुम्ही घरात बसून कंटाळता. जरा बाहेर जाऊन पाय मोकळे करून यावं असा विचार तुमच्या मनात येतो आणि काखोटीला छत्री आणि हातात विजेरी घेऊन तुम्ही बाहेर पडता. हवेत गारवा जाणवतो. तुम्ही नेहमीची पायवाट धरता. चालता चालता गावाबाहेरच्या आडरानाजवळ येता. कितीवेळा या रानातून एक चक्कर मारावी असा विचार मनात येऊन गेला असला तरी तुम्ही यापूर्वी तसं धाडस केलेलं नसतं. आज मात्र तुमची पावलं अचानक रानात शिरतात.

अंधार पडू लागला आहे. झाडांच्या सावल्या लांब लांब होत आहेत. पर्णविरहित फांद्या आपले हात पसरून मिठी मारायच्या बेतात आहेत जशा. आपण रस्ता चुकतोय की काय असा विचार तुमच्या मनात येतो. तुम्ही आजू बाजूला पाहता. चहूकडे फक्त नीरव शांतता असते, नाही म्हणायला मध्येच कुठेतरी एखादा रातकिडा किरकिरतो. वाळक्या पानांवरून तुमच्या पावलांची करकर शांततेचा भंग करते. तुम्ही वेगाने पावले उचलता. यापेक्षा जास्त अंधार पडण्यापूर्वी इथून बाहेर पडायला पाहिजे! अचानक मागून वाळक्या पाने आणि काटक्या मोडल्याचा 'कट्! कट्!' आवाज येतो. कुणीतरी त्या वाळक्या पानांवरून काटक्यांवरून सरपटत येतंय की काय हा विचार तुमच्या मनाला शिवतो. घशाला कोरड पडते. चटचट पावलं उचलत तुम्ही हातातली छत्री आणि विजेरी घट्ट धरता. मागची सळसळ जवळ आल्यागत भासते, आता धूमच ठोकायला हवी - पण कुठे आणि कशी? अशा विचारांत तुम्ही क्षणभर थबकता, आणि तुमच्या पायाला विळखा पडतो. एक अस्फुट किंकाळी तुमच्या घशातून निघते. त्याही स्थितीत तुम्ही थरथरत्या हाताने विजेरी पेटवता.

विजेरीच्या मंद प्रकाशात कुठेतरी उरलीसुरली कातडी लोंबते आहे असा एक मांस झडलेला सांगाडा तुमच्या पायाला गच्च पकडून दात विचकताना तुम्हाला दिसतो. तुमचे हातपाय लटपटतात, त्या थंडीतही दरदरून घाम फुटतो. जिवाच्या निकरानं तुम्ही हातातली छत्री त्या सांगाड्यावर हाणता. पकड थोडीशी ढिली होते; ते पाहून तुम्ही जिवाच्या आकांतानं धूम ठोकता. आपण किती वेळ धावलो याचा तुम्हाला अंदाज लागत नाही, रान अधिकच दाट झालंय. दूरवर एक दिवा लुकलुकताना दिसतो. तुम्ही सगळं त्राण एकवटून दिव्याच्या दिशेनं धावू लागता.

समोर एक पडकी हवेली दिसते. आत प्रकाश आहे. तुम्ही दार ठोठावता. क्षणा दोन क्षणांनी दरवाजा उघडतो. दरवाज्यामागे एक सत्तरीची म्हातारी तुमच्याकडे आश्चर्याने पाहते आहे. 'काय पाहिजे?' म्हणून विचारते. तुम्ही घाईघाईतच तिला आपला किस्सा सांगता. ती दरवाजा उघडून तुम्हाला आत घेते. 'कशाला बाबा या आडरानात फिरायला जायचं, रात्री बेरात्री हे असं निर्जन ठिकाणी जाऊच नये. त्यात खरं काही नसतं, चकवे असतात ते; पण अनुभव घेणारा तिथेच ढेर होतो कधीतरी.' असं म्हणून म्हातारी चहाचा आग्रह करते.

म्हातारीच्या हातचा चहा अमृतासारखा भासतो. चहा पितापिता तुम्ही तिची चौकशी करता. म्हातारी सालसपणे आपली कर्मकहाणी सांगते. 'आडरानातली बापाची इस्टेट आणि म्हातारी, पोरांना नको झाली तशी पोरांनी म्हातारीला मागे ठेवून आपापल्या वाटा पकडल्या.' म्हातारी डोळ्यात पाणी आणून सांगते. 'बर्‍याच दिवसांनी घरात कुणीतरी आलं, रात्र इथेच काढ कुठे जाशील त्या चकव्यात बाहेर? जेवणाचं पाहते, तुझ्या निमित्तानं माझ्याही पोटात चार सुखाचे घास पडतील,' असं म्हणून म्हातारी उठते.

गरमागरम चहाने तुम्हाला हुशारी येते. रानातला प्रकार डोक्यातून मागे पडतो. आडरानात राहणार्‍या म्हातारीबद्दल चुकार विचार मनात येतात. रात्री बेरात्री अनोळखी माणसाला घरात घेणारी म्हातारी मूर्खच दिसते; जीवाची पर्वा नाही की काय हिला? की अगदी एकाकी पडली आहे, कुणास ठाऊक? या वयात अक्कल साथ देत नसावी बहुधा. तुमचे डोळे लबाड स्मित करतात. म्हातारीचा गळा दाबून टाकला तर कुणाला वर्षे न वर्षे कळायचेही नाही! 'आज्जे, तुझ्याशी गप्पा मारायला येऊ का गं आत?' तुम्ही घरात शिरकाव करण्याची संधी शोधता. म्हातारीही आतूनच आत ये हो म्हणून सुचवते.

बाहेरच्या खोलीच्या मानानं स्वयंपाकघरातला उजेड थोडा मंदच वाटतो. समोर चुलीतल्या जाळात एक मोठा हंडा आहे आणि त्यात काहीतरी खदखदतंय. त्याच्या खमंग वासानं तुमच्या पोटात कावळे कोकलतात. तुम्ही आत शिरता. पाय थोडेसे भेलकांडल्यासारखे वाटतात. म्हातारी पाठमोरी आहे; तुमची चाहूल लागते तशी तुम्हाला खुर्चीत बसायची सूचना करते. बसताबसता डोळ्यांपुढे अंधारल्यासारखं वाटतं. तुम्ही डोळे किलकिले करून समोर बघता. म्हातारी मन लावून एका भल्या मोठ्ठ्या सुर्‍याला धार लावते आहे.

'आजे असं चक्करल्यासारखं का वाटतंय?' तुम्ही तिला विचारता. म्हातारी मागे वळते, चुलीच्या प्रकाशात तिचे पांढरे केस आणि सुरकुतलेला चेहरा भयाण दिसतो. 'काही नाही रे बाळा, चहात थोडंसं गुंगीचं औषध घातलं होतं. बर्‍याच दिवसांत मेजवानी झाली नाही बघ. घाबरू नकोस, तुला काहीही त्रास होणार नाही, कळणारही नाही सुरी कशी फिरते ते.'

समोरचा रश्शानं खदखदणारा हंडा आणि सुरीची धार हे सगळं आपल्यासाठी होतं हे तुमच्या लक्षात येतं आणि तुम्ही तिथेच कोसळता.

Monday, October 02, 2006

विश्वासाचे पानिपत

अशीच एक इ-मेल साखळीतून आलेली गोष्ट आठवली.

एक वडील व मुलगी जंगलातून जात असतात. अंधार पडतो, वाट अरुंद असते, पुढे पाणथळ जागा लागते. वडील मुलीला सांगतात की तू माझा हात घट्ट पकड, आपण हा रस्ता पार करून जाऊ. ती लहान मुलगी वडिलांना म्हणते, 'नको बाबा, तुम्ही माझा हात पकडा आणि आपण हा रस्ता पार करून जाऊ.'

वडील आश्चर्याने विचारतात, 'तुझ्या माझ्या बोलण्यात फरक तो काय बेटा?'

तशी मुलगी म्हणते, 'बाबा मी तुमचा हात पकडला आणि पुढे संकट आलं तर मी कदाचित तुमचा हात सोडून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीन. पण तुम्ही माझा हात पकडला आणि संकट आलं तर तुम्ही माझा हात सोडणार नाही. आधी मला वाचवाल मग स्वत:ला.'

अशी छानशी गोष्ट असायला हरकत काहीच नाही, तशी ती मला विश्वासार्हही वाटते. मनुष्याचे आपल्या मुला बाळांवर आपल्या आई वडिलांपेक्षा अधिक प्रेम असते हे सत्यच त्यातून पुढे येते. परंतु त्यापुढे जाऊन अकबर बिरबलाची माकडिणीची गोष्ट आठवते आणि वरील गोष्टीचा पाया काहीसा डळमळीत होतो.

हौदात आपल्या पिलासमवेत एका माकडिणीला उभं करून त्यात बिरबल पाणी भरायला लावतो. माकडीण पिलाला घट्ट धरून कावरीबावरी होऊन उभी राहते. पाणी चढत जातं तशी तिची पिलाला कसं वाचवावं अशी घालमेल होते. शेवटी पाणी नाकापर्यंत चढतं तशी मात्र ती पिलाला पायाखाली टाकून त्यावर उभं राहून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाला स्वत:चा जीव सर्वात प्रिय असतो हे बिरबलाचे म्हणणे खरे ठरते.

माझ्या मनात या दोन्ही गोष्टींवरून फक्त एकच प्रश्न उठतो; वरील गोष्टीतल्या मुलीने वडिलांवर जेवढा विश्वास टाकला तितकाच विश्वास त्या माकडिणीच्या पिलानेही आपल्या आईवर टाकला असेल का?

विश्वास हे मला दुधारी शस्त्र वाटतं. दुसर्‍यावर अती विश्वास ठेवला तरी फसवणूक होऊ शकते आणि सतत अविश्वास दाखवत गेलं तरी नुकसान संभवण्याची शक्यता असते. कधीतरी आपण ठरवतो की विश्वास उत्पन्न व्हायला खूप वेळ लागतो आणि कधीतरी पर्याय नाही म्हणून एखाद्यावर चटकन विश्वास ठेवतो.

या विश्वासाचं आणि माझं 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं काहीतरी विचित्र नातं आहे. या शब्दावर विचार करायला बसलं तर दरवेळेस वेग वेगळे विचार डोक्यात येतात आणि विचार न करता कुणावरतरी विश्वास टाकून मोकळं व्हावं असं वाटतं. 'Utter confusion' यालाच म्हणत असावे. विश्वास आणि विश्वासाशी साधर्म्य सांगणार्‍या शब्दांची उकल अशी करता येईल:

१) धारणा (belief): मनुष्याची एखाद्या विषयाबाबत एखादी ठाम धारणा (किंवा पक्का समज) असू शकते. ती पाळणे, तिचे संवर्धन करणे हे त्या मनुष्याच्या इच्छेनुसार होत असते. बरेचदा धारणा खरी की खोटी या कडे फारसे लक्ष दिले जात नाही. ती आहे तशीच कुरवाळत बसण्यात माणसाला आनंद मिळत असावा. इतर प्रकारांच्या मानाने धारणा ही फारशी कडवी नसावी असे वाटते.

२) विश्वास (trust, confidence): हा धारणेचा पुढचा टप्पा असावा. सहसा विश्वास या शब्दाचा वापर अतिशय सकारात्मक तर्‍हेने केला जातो. एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर आपण किती अवलंबून आहोत यावरून आपण त्यांच्यावर किती विश्वास टाकतो हे परिमाण बहुधा ठरत असावे. वर म्हटल्याप्रमाणे कधीतरी इतरांवर किती विश्वास टाकावा हे ही कळेनासे होते. तरीही विश्वास हा डोळस वाटतो.

एखाद्या व्यक्तीचा विश्वास जिंकणे किंवा संपादन करणे, एखाद्यावर विश्वास दर्शवणे हे सुखदायक आणि फायदेशीर ठरू शकते तर विश्वासाचे तुटणे, विश्वास खोटा पडणे, विश्वासघात होणे हे दु:खदायक असण्याची किंवा नुकसानदायी ठरण्याची शक्यता वाटते. अशा मोडलेल्या विश्वासाचे किंवा विश्वासघाताचे सल मनातून जायला फार वेळ लागत असावा.


३) श्रद्धा (faith): श्रद्धा हा शब्द बहुतेकवेळा देवाशी निगडित असतो. देवाशी नसला तर आयुष्यातील अधिकारी व्यक्तींशी असतो त्यात आई-वडील, गुरू, जोडीदार यांचा समावेश होऊ शकतो. श्रद्धा हे दृढ विश्वासाचे रूप वाटते. बरेचसे धर्म श्रद्धेला व श्रद्धेच्या बळाला महत्त्व देतात असे दिसते. श्रद्धेची व्याख्या कुठेतरी 'कसलाही पुरावा दाखवण्याची गरज नसलेली धारणा' अशी केल्याची वाचलेले आठवते. दुसर्‍या शब्दांत श्रद्धा ही आंधळी असते असेही म्हणता येईल आणि असं म्हणायला गेलं तर सर्वच श्रद्धा अंधश्रद्धा ठरतील; तरी श्रद्धा कधी खोटी पडू नये, तुटणार्‍या श्रद्धेतून सावरणे प्रत्येकालाच शक्य असते असे वाटत नाही.

विश्वासाचं असं पानिपत केल्यावरही एखाद्यावर किती, कसा आणि कधी विश्वास ठेवायचा हे मला अजूनही ठरवता आलेलं नाही, कदाचित ते त्या त्या वेळेवरील त्या त्या परिस्थितीवरच अवलंबून असावे आणि माणसाने हेच सत्य स्वीकारून 'आलीया भोगासी' म्हणावे.

Thursday, September 28, 2006

मी, गूगल आणि चंगीझ

They rode the fastest horses
left the wind behind
thousand men
and one man led the way
the others followed blind
Genghis Khan.
They galloped over mountains and desert sands
they carried desolation throughout the land
and nothing there could stop them in this world.



Phew!!! साध्याच ओळी काहीही विशेष नसलेल्या. विशेष फक्त एकच नाव गेंगिझ खान किंवा चंगीझ खान. इतिहासातला क्रूरकर्मा अशी सहसा ओळख करून दिला जाणारा बाराव्या शतकातील मंगोल शासनकर्ता.

फारा वर्षांपूर्वी शाळेत असताना कुणीतरी माहीती पुरवली, "खान या शब्दाचा अर्थ 'राजा' असा होतो माहीत्ये?"
"कुठल्या भाषेत, उर्दु?" "उर्दुत नाही पण बहुधा मंगोलियन मध्ये असावे."
"हॅ! हॅ! काहीतरीच काय?"
"काहीतरीच नाही काय, मुघल हा शब्द पण मंगोल या शब्दाचीच व्युत्पत्ती आहे. चंगीझ खानही मंगोलियन होता."
"आता हा कोण चंगीझ? तो प्रेमनाथ आणि बीना रॉयच्या सिनेमात होता तो? लांब लोंबणार्‍या मिशांचा आणि पिचक्या डोळ्यांचा मनुष्य? तो सगळ्या खानांचा 'बाप' आहे की काय? मजाच आहे म्हणायची."
तशी त्याकाळात फक्त कुर्बानी फेम फिरोझखान आणि शोले फेम अमजदखान आणि कधीतरी कादरखान एवढेच प्रसिद्ध होते.

चंगीझची पहिली ओळख तिथे झाली. नंतर कधीतरी ऐतिहासिक पुस्तकांतून ओझरतं चंगीझ दर्शन व्हायचं तितकंच. त्यानंतर कुणा शेजार्‍यांच्या घरांत Dschingiz Khan या जर्मन ग्रुपचं गाणं ऐकलं. आता ७०-८० च्या दशकांतल्या डिस्को गाण्यांत चपखल बसेल असे पेहराव, वेशभूषा आणि हावभाव दाखवणारे चित्र आणि गाणे. त्यातले 'हे रायडर, हो रायडर, चेंग चेंग चेंगीझ खान' फारच मजेशीर वाटायचं. Whoa!! हा माझा आवडता शब्द कदाचित मी यांच गाण्यातून शिकले. त्यावेळी काही या गाण्यांचे व्हिडिओ निघायचे नाहीत. निघाले तरी ते भारतात पोहोचायचे नाहीत.

गेल्या काही दिवसांत सहज गूगल व्हिडिओवर गुगलताना मला हे गाणं चटकन मिळून गेलं. आता इतक्या वर्षांनी त्याचा व्हिडिओ पाहणे म्हणजे फारच विनोदी प्रकार; तरी हे गाणं पुन्हा इतक्या वर्षांनी ऐकायला आणि पाहायला मिळाल्याचा आनंदही झाला. कर्म धर्म संयोगाने त्याच दिवसांत NGC वर चंगीझ खानबद्दल डॉक्युमेंटरी दाखवली गेली. माझ्या मनात चंगीझ घोटाळत राहायला यापेक्षा अधिक काय हवं?


तसंही अलेक्झांडर द ग्रेट वाचून झालेला आहे तेंव्हा चंगीझ सुरू करायला हरकतच नव्हती. दोघेही अफाट कर्तृत्वाचे; पण अलेक्झांडर एवढा मान चंगीझच्या वाट्याला न यायचे कारण त्याचे मंगोलियन पठारावरील रानटी समजल्या जाणार्‍या टोळ्यांतून येणे व एरिअन आणि प्लुटार्क सारखे इतिहासकार न लाभणे असू शकेल. यानंतर चंगीझची माहीती गुगलून काढली, काढते आहे, काम सुरू आहे. फक्त वाचनाबरोबरच लिहून काढायचे मनात आले.... आणि मराठी विकीवर चंगीझने पुनश्च जन्म घेतला.

Saturday, September 23, 2006

परफ्युमेनिएक

हे परफ्युम्जच वेड कधी लागलं ते आठवणं फार कठीण नाही. अबुधाबीला ऑफिसमध्ये दर उन्हाळ्याच्या आधी नोटीस लागायची, 'उन्हाळा सुरू होत आहे तरी प्रत्येकाने चांगल्या प्रतीची परफ्युम्ज लावून येणे.' आज्ञा शिरसावंद्य या नात्याने वेगवेगळ्या आकाराच्या, नक्षीच्या आणि अर्थातच वासांच्या बाटल्यांची वर्णी घरात लागायची. नंतर डिओडरन्ट्स, EDP, EDT आणि EDC असं शेपूट वाढतच गेलं.

आवडीच्या वस्तूंचं व्यसन लागायला वेळ लागत नाही म्हणतात, तसं हे व्यसन गेली बरेच वर्षे माझ्या बोकांडी बसले आहे. सुगंधाची आवड कुणाला नसते म्हणा. त्या अनुषंगाने अत्तरांचा उगम शोधायचा थोडासा प्रयत्न केला.

पुरातन काळातही अत्तराच्या कुप्या आढळून आल्याचे पुरावे सापडतात. अर्थातच याचा पहिला रोख जातो इजिप्तकडे. तेथील पिरॅमिड्समध्ये अत्तराच्या कुप्या सापडलेले आहेत. अत्तरे मृतांची शरीरे राखून ठेवण्याच्या कामी वापरली जायची. इतर धार्मिक कार्यातही अत्तरांचा वापर होत असे. ही अत्तरे माती किंवा लाकडाच्या सुबक बाटल्यांमध्ये साठवली जात. काचेच्या बाटल्यांत अत्तरे साठवण्याची सुरुवात अर्थातच ग्रीक किंवा रोमन संस्कृतीत सुरू झाली. प्राचीन अत्तरांच्या काचेच्या कुप्या अजूनही उत्खननातून सापडल्या आहेत. सॉक्रेटीसला म्हणे अत्तरांच्या वापरावर आक्षेप होता. त्याच कारण अगदी साधं सरळ होतं. अत्तराच्या वापराने गरीब कोण व श्रीमंत कोण याची वर्गवारी करणे कठीण होईल असे त्याला वाटायचे. गरीबांच्या अंगाला फक्त घामाचाच वास आला पाहिजे अत्तरांचा नाही. श्रीमंत ग्रीक मौल्यवान रत्ने कोरून त्यात अत्तरे साठवायचे असा उल्लेखही वाचनात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर भारताच्या पुरातन इतिहासात अत्तरांचे संदर्भ मिळतात का तेही शोधले तेंव्हा सिंधू नदीच्या संस्कृतींमध्ये मातीच्या भाजलेल्या (Terra-Cotta) कुप्यांमध्ये अत्तरे साठवली जात.

आपल्या देवांनाही या सुगंधाचे (fragrance) किती वेड. (देवांना की भक्तांना तो वेगळा विषय.) चंदन, फुलांचे हार, अगरबत्ती, धूप, तूप यांच्या सुवासातच आपले देव सदा माखलेले. सुवासाने चित्त उल्हासित राहते. मन शांत राहते. आनंद द्विगुणित होतो याच त्या मागच्या खऱ्या भावना असाव्यात.

पंचेंद्रियातील एक इंद्रिय म्हणजे गंध. माणसाच्या नाकाशी संबंधित. सुगंध बरंच सांगून जातो म्हणतात. दुसऱ्याला आकर्षित करणे, आपल्याजवळ येण्यास भाग पाडणे, दुसऱ्याच्या मनात चटकन आपल्याबद्दल आवड उत्पन्न करणे अशा अनेक गोष्टींसाठी सुवासाचा वापर होतो. विशेषत: पुरातन काळापासून बायका डोक्यात फुले माळणे, गळ्यांत फुलांचे हार किंवा केसांत वेणी माळणे हे याच कारणास्तव करायच्या.


सुगंधाची निर्मिती माणसाने निसर्गातील अनेक सुगंधी वस्तूंचा वापर केल्याचे जाणवते, त्यात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश होतो. जसे विविध फुले, पाने (नीलगीरी, लव्हेंडर, रोझमेरी), झाडांची मुळे (आले), खोडे (चंदन, पाईन, रोझवूड), झाडांची साले (दालचिनी), बिया (कोको, वेलची, नट्मेग), फळे, डिंक, मध, कस्तुरी अशा अनेक गोष्टींपासून सुगंध निर्मिती होते. यांच्यापासून अर्क काढून ते पाण्यात मिसळल्यावर अर्काच्या पाण्यातील प्रमाणावरून परफ्युम की EDP, EDT आणि EDC ते ठरवले जाते.

आता सुगंधावरून कुठला परफ्युम बाई की पुरुषासाठी, कुठला सकाळ/ संध्याकाळसाठी, कुठला परफ्युम कुठल्या समारंभासाठी हे ठरवले जाते. इतकंच नव्हे तर हल्ली माणसाच्या मनोवृत्तीला साजेसे परफ्युम्ज बनवले जातात. म्हणजे एखाद्याला आपला trade mark त्यावरून सहज ठरवता यावा.

हे सर्व लिहिण्याचं मनात आलं कारण एक लेख वाचत होते. 'When to buy perfumes?' आता माझ्यासारख्या परफ्युमेनिएकला खरेदीसाठी काळ वेळ थोडाच लागतो. अमेरिकेला परफ्युमेनिआ नावाची दुकाने आहेत. या दुकाना समोरून रिकाम्या हाताने कधी गेल्याचे आठवत नाही. (नाही म्हणजे या दुकानासमोर उभं राहण्याची संधी माझा नवरा फार वेळा देतो अशातलाही भाग नाही. :) ) जेव्हा संधी मिळेल तेंव्हा या दुकानात घुसून खरेदी करते. आता एक एक किंमती पाहता नक्की काय परवडत हा वेगळा विचार करण्याजोगा विषय.

जिथे जायचं तिथे परफ्युम वापरण्याचा आणि कुठेही जायचे नसेल तरी ह्या परफ्युम वापरण्याच्या माझ्या वेडामुळे घरच्या माणसांनी परफ्युमेनिएक असं माझं बारसं करून टाकलं आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या पाच आवडत्या परफ्युम्जची यादी येथे देत आहे. सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत. या यादीत भर पडावी अशीच इच्छा.

POISON by Christian Dior
AMARIGE by Givenchy
ORGANZA by Givenchy
POEME by Lancome
BEAUTIFUL by Estee Lauder

Sunday, September 10, 2006

किंमत

कसा काय हा शब्द डोक्यात आला त्याचा विचार करताना जाणवलं की काल काहीतरी भयंकर महाग वस्तू आपण इकडचा तिकडचा जराही विचार न करता विकत घेतली आहे. त्यावरून किंमत या शब्दाची किंमत ठरवता येईल काय अशी तार छेडली गेली.

आपण हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो. जसे -

  • तुला माझ्या कष्टांची किंमतच नाही.
  • तुला माझ्या प्रेमाची किंमत नाही.
  • तुला नाते संबंधांची किंमत नाही.
  • मी जगाला अजिबात किंमत देत नाही.
  • इतकी काही किंमत द्यायची गरज नाही त्याला.आणि असेच काही...

बरेचदा आपण आपली आणि इतरांची किंमत ठरवत असतो जसे --

  • वायफळ बोलणाऱ्या माणसाला लोक फारशी किंमत देत नाहीत.
  • लोक त्याची किंमत करतात म्हणून त्याच्या मागे मागे धावतात.

मला स्वत:ला हा "किंमती" प्रश्न बरेचदा पडतो. म्हणजे लिहिताना, बोलताना, निवेदन करताना नेमके कुठले शब्द वापरले पाहिजेत जेणे करून लोक आपली किंमत करतील? (अर्थात चांगली किंमत) किंवा मी अतीच बोलून गेले की काय आणि या समोरच्या माणसाने माझी नको ती किंमत केली की काय इ. इ.

या सर्वावरून एक मजेची गोष्ट ध्यानात आली की नाती, प्रेम, कष्ट, भावना या सर्वांची जर किंमत आहे तर दुसऱ्या शब्दांत या सर्व गोष्टी विकाऊ आहेत. म्हणजे योग्य किमतीवर आपण या गोष्टी खरेदी करू शकतो. कष्ट तर पैशांत खरेदी होतातच. एखाद्याला जर प्रेमाची, मैत्रीची किंमत नसेल तर त्याच्यापेक्षा चांगला खरेदीदार मिळू शकेल? पण प्रेम, नाती, मैत्री, भावना या गोष्टी खरेदी करायचं परिमाण कुठलं? शेवटी गाडी पैशांवरच येऊन थडकणार की काय? कुठेतरी हा विचार नकोसा वाटतो पण टाळता येत नाही. माणसं कळत नकळत का प्रत्येक गोष्टीची किंमत करतात, काही गोष्टी अगदी मोफत मिळू शकतात हे स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते की त्या दुसऱ्याला मोफत द्यायची तयारी नसते?


कुठेतरी वाचल्याचं आठवतं की प्रेम करावं तर with no strings attached. असं करायला गेलं म्हणजे प्रेम फक्त साधू संतांचीच मक्तेदारी होऊन राहील. सामान्य माणूस जितकं प्रेम दुसऱ्यावर करतो, तितक्याच प्रेमाच्या परतफेडीची दुसऱ्याकडून अपेक्षा करतो. आला पुन्हा व्यापार; देण्या घेण्याचा, किंमत ठरवण्याचा. माणूस माणसाला आहे तसा स्वीकारू शकत नाही हे त्यातलं एक सत्य आणि बघायला गेलं तर माणूस स्वत:ला तरी आहे तसा कुठे स्वीकारतो?


अवांतर: काही लोक किंमत या शब्दा ऐवजी कींमत असा शब्द वापरतात. तेंव्हा नेमका शब्द कोणता हे निश्चित करण्यासाठी पुस्तक उघडून पाहिला. काही म्हटलं तरी मराठी लिहिताना शुद्धलेखनाला "किंमत" द्यावी लागतेच नाही का?

Friday, September 01, 2006

स्विमिंगचा क्लास

हल्ली मी माझ्यावरच जाम खूश आहे; म्हणजे तशी कधी नव्हते? पण हा नवा आनंद थोडा वेगळाच आहे. अर्ध आयुष्य निघून गेल्यावर अचानक कसली तरी उपरती झाल्यासारखं एका दिवसांत पोहायला शिकायचं ठरवलं. कर्म धर्म संयोगाने युनिव्हर्सिटी मध्ये Adult Swimming Classes आहेत हे कळलं आणि अस्मादिक पैसे भरून लगेच तयार.

युनिव्हर्सिटी तशी जवळ नाही जाऊन येऊन ६० मैलांचा पल्ला. अर्थात, एकदा जायचंच ठरवल्यावर ६० काय आणि १०० काय? तरी डाऊन टाऊन मध्ये गाडी घालायला अजूनही थोडीशी भिती वाटते कुठेतरी. आणि संध्याकाळच्या वेळी सगळं आवरून पोरीला कारमध्ये शिकवत शिकवत घेऊन जायचं म्हणजे थोडीश्शी सर्कसच. पण पोहायची इच्छा दांडगी होती. तशी ती लहानपणापासूनच होती पण का कुणास ठाऊक मुहूर्तच लाभला नाही कधी.

पहिल्या दिवशी आमच्या swimming instructor (इ-ताई) ने 'पोहण्यात नक्की काय काय येतं तुम्हाला?' हा प्रश्न टाकला. माझ्याबरोबरच्या बाकीच्यांना काही ना काही येत होतं. माझं उत्तर मात्र, "३-४ फूट पाण्यात कडेला हात न धरता उभं राहता येतं." हे ऐकून इ-ताई पाण्यात गार झाल्या बहुधा.

"पाच फूट पाण्यात उभं राहता येईल का?" त्यांनी प्रश्न टाकला.

"अं.... माहीत नाही. प्रयत्न करते. तशी माझ्या नवऱ्याला एकच बायको आणि मुलीला एकच आई आहे. तेंव्हा सांभाळून घ्या."

"हरकत नाही. मी बाजूला उभी आहे. करा सुरुवात. प्रथम श्वासाने सुरुवात करू."

ठीक! हे सहज जमण्यासारखं होतं. मुलीबरोबर करून पाहिलं होतं बरेचदा.

"आता दोन्ही पाय उचलून पाण्यात तरंगता येतं का ते पाहा."

मी मेरी झांसी नहीं दूंगीच्या पावित्र्यात पाय रोवून उभी. "हे काय आपल्याच्याने जमणार नाही. उचलले पाय आणि तरंगलो पाण्यात असं कधी केलं नाही." असा जोरदार विचार फक्त एकदा मनातल्या मनात केला आणि दिलं झोकून आरामात. तसे ही एकदा फी भरल्यावर आणि नवरा (छडी शिवाय) समोर बसून पाहत असल्यावर माझ्याकडे इतर फार मोठे पर्याय होते यातला भाग नाही.

त्यानंतर गेल्या काही दिवसांत तरण तलावांतलं बरंचसं पाणी पिऊन घेतलं आहे. दोन चार वेळा बुड बुड घागरीही करून पाहिलं. नाका तोंडात पाणी गेल्यावर खोकून जीव ही बेजार करून घेतला. पण दरवेळेला दिलं झोकून बिनधास्त.

तेंव्हा पासून चार क्लास झाले. गेल्या १-२ क्लासेस पासून मला आपण गेल्या जन्मी कुठल्यातरी देवमाशाच्या जन्मात होतो की काय असं वाटायला लागलं आहे. (आता साइझने मला देवमासाच म्हणायला लागेल) कालच्या क्लासला ८ फ्री स्टाइलच्या perfect फेऱ्या मारल्या. बाकीचे अजून फ्लोट लावून तरंगताहेत आणि अस्मादिक पाण्यात जलपरी गत सूर मारताहेत. जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. गोष्ट खूश होण्यासारखीच आहे नाही का? आमची इ-ताई ही जाम खूश आहे चेलीवर. काल संध्याकाळी म्हणाली, "असं करा, तलावाच्या मध्यापर्यंत पोहत जा."

बरं केलं मी तसं. तशा इ-ताई ओरडून म्हणाल्या,"Now shout loudly and say, YEAAHHHH.... I AM THE BEST."

मी तिथल्या तिथे संकोचाने ... डुबुक!

Saturday, August 12, 2006

स्पर्श

छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा
बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा


किशोर कुमार बाजूला हळुवार आवाजात हे गाणं म्हणतोय आणि त्या स्पर्शाने मोहरून गेलेलं माझं मन वेड्या वा-यासारख धावतंय.

माणसाला अमूल्य ठेवा म्हणून मिळालेल्या पंचेंद्रियातील एक इंद्रिय; स्पर्श. शरीराला होणारी एक वेगळीच अनुभूती. स्पर्शाचे प्रकार तरी किती? स्पर्श दुसऱ्या शरीराचा, स्पर्श पाण्याचा, वाऱ्याचा, स्पर्श आगीचा, मृदू स्पर्श, खरखरीत स्पर्श, झोंबरा स्पर्श, सुखद स्पर्श, गरम स्पर्श, थंड स्पर्श, किळसवाणा स्पर्श, गुदगुल्या, मार, .... आहेत ना अनेक?

या शारीरिक स्पर्शापेक्षा एक वेगळा स्पर्श म्हणजे मनाला आणि हृदयाला होणारा स्पर्श. मानवी संवेदनांशी निगडित. सहजपणे आपण ज्याच वर्णन "हृदयस्पर्शी", "मनाला चाटून जाणारे" असे करतो, एखाद्या गोष्टीच वाईट वाटून गेलं सांगताना "मनाला लागलं" म्हणतो या वेळी आपण कळत नकळत स्पर्शाची अनुभूती देत असतो.

माणसाला सगळ्यात पहिला स्पर्श कुठला आठवत असावा. नक्कीच आईच्या शरीराचा. तान्हे बाळ आईला स्पर्शावरून ओळखते म्हणतात. त्या स्पर्शात ओथंबलेले प्रेम मूल सर्वप्रथम अनुभवते. पण आईच काय?? ती ही त्या तान्हुल्याला स्पर्शावरून ओळखते का? मला आठवत की मी माझ्या बाळाला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा मनात खूप काही झालं नाही. त्या इवल्याशा जीवाला हात लावला मात्र, आणि जी अनुभूती घेतली ती मला क्षणात "आई" करून गेली.

प्रियकराने किंवा प्रेयसीने केलेल्या सर्वप्रथम स्पर्शाचेही असेच कौतुक अनेक गाण्यांतून ऐकायला मिळते. "छू लेने दो नाजूक होठों को" म्हणत आसुसलेला प्रियकर प्रेयसीकडे अशाच स्पर्शाची मागणी करतो. हा पहिला वहीला स्पर्श जगावेगळाच असल्याचंही अनेकजण सांगतील. आशीर्वाद देतानाही डोक्यावरून हात फिरवला जातो. मिठी, अवघ्राण, चुंबन, कवटाळणे, पदस्पर्श हे सर्व शब्द स्पर्शाची महती वाढवणारे आहेत. तर आवळणे, खेचणे, ढकलणे, मारणे या स्पर्शाच्या नकारात्मक बाजू ठरतील. एकंदरीतच स्पर्शातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो असं म्हणता येईल.

आता या स्पर्शांचंही एक वेगळंच गणित असतं, वेगळे नियम असतात. जसं की कचेरी मधे साहेबांनी नोकरवर्गाला केलेला सहज स्पर्श चालून जाण्यासारखा असतो पण उलट प्रक्रिया मात्र आक्षेपार्ह समजली जाते. साहेबांनी येऊन एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्यात काहीच वावगं वाटत नाही परंतु एखादा कर्मचारी हेच वर्तन साहेबांशी करू शकत नाही. हस्तांदोलन हे सभ्यपणाचे लक्षण असते तर तळव्या व्यतिरिक्त हाताचा कुठलाही दुसरा भाग हातात घेणे हे मैत्रीपासून शत्रुत्वा पर्यंत कसलेही लक्षण ठरू शकते.

एखादा स्पर्श आक्षेपार्ह ठरू शकतो. अर्थातच तो कुठे, कसा व कुणी केला यावर अवलंबून आहे. नको असलेल्या स्पर्शाचा राग, किळस किंवा घृणा वाटणे अतिशय स्वाभाविक आहे. अगदी अशा स्पर्शाची मनात भिती ही बसू शकते. तसाच दुसरा एखादा स्पर्श हवाहवासा असू शकतो. रात्री गादीचा स्पर्श, उन्हाळ्यात थंड पाण्याचा स्पर्श, मोरपिसाचा स्पर्श वगैरे.

प्रत्येक समाजाचेही स्पर्शाचे एक गणित असते. जसे, ग्रीस, इटली आणि काही अरब देशांतही पुरुषाने पुरुषाला चेहऱ्यावर चुंबन देणे हे आतथ्याचे लक्षण मानले जाते तर जगात इतर ठिकाणी ते नक्कीच आक्षेपार्ह समजले जाते. मध्यंतरी एका कार्यक्रमात भारतात एक पुरुष बाई ऐवजी दुसऱ्या पुरुषाच्या खांद्यावर हात ठेवू शकतो यावर आश्चर्य व्यक्त केल्याचे पाहिले आहे कारण पाश्चिमात्य जगात पुरुषाने पुरुषाच्या अंगचटीला जाणे स्वाभाविक नाही.

एकूणच माणसाच्या जीवनात स्पर्शाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पंचेंद्रियांचे वर्गीकरण सर्वप्रथम ऍरिस्टॉटलने केले असे म्हटले जाते. या लेखाच्या निमित्ताने त्यात माझ्याकडून थोडाशी भर घालणारा हा स्पर्श महिमा.

Tuesday, July 25, 2006

मुंबईचा महापूर (एक आठवण)

गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच मी आणि माझी मुलगी मुंबईला गेलो होतो. चांगले दोन महिने राहण्याचा बेत होता. घरात भावाच्या बाळाचा जन्म झाल्याने काही कार्यक्रम होते. माझी सात वर्षांची मुलगी यापूर्वी न कळत्या वयात मुंबईला येऊन गेल्याने निदान या वर्षीतरी तिला मुंबई दाखवावी असा बेत होता. काही ठिकाणी जाण झालं, पण मुंबई शहराच्या बाजूस फारसं जाण झालं नाही. शेवटचे १०-१५ दिवस राहिले तसे मी ठरवले काही झाले तरी गेट वे ऑफ इंडिया व नेहरू तारांगणाला भेट द्यायची, काय बुद्धी झाली कुणास ठाऊक पण जायचा दिवस ठरवला तो, २६ जुलै २००५ चा.

सकाळीच उठून घराबाहेर पडायचे, टॅक्सीने सगळीकडे फिरायचे, बाहेरचे जेवायचे असा झक्कास बेत होता. दोघींनीच काय जायचं म्हणून मी माझ्या आई बाबांनाही तयार केले. बाबा यायला तयार नव्हते पण बऱ्याच आग्रहानंतर ते तयार झाले. दिवस थोडा फार ढगाळ होता(partly cloudy). आकाशात ढग होते पण पाऊस पडत नव्हता, वाराही नव्हता. घरातून निघता निघता फोन वाजला. फोनवर मावसबहीण होती. तिच घर दादर चौपाटीला लागूनच आहे. जुजबी बोलण्यानंतर तिला आमचा बेत कळवला तशी ती म्हणाली, "कशाला बाहेर पडता आज? बाहेर समुद्रावरचं आकाश अगदी भरून आलंय, एकंदरीत रंग अगदीच वेगळा दिसतोय. उद्या जा पाहिजेतर."

"काहीतरीच काय? इथे तर आकाश बऱ्यापैकी स्वच्छ आहे आणि आमची तयारी सुद्धा झाली आहे. घरातून बाहेर पडायच्याच बेतात होतो, आता बदल कशाला? असं करतो की परत येताना वेळ मिळाला तर तुझ्याकडेही चक्कर मारतो," असं सांगून मी फोन बंद केला आणि घराबाहेर पडले.

सुमारे साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास आम्ही गोरेगाव ते गेट वे प्रवास करून मुंबईच्या एका टोकाला पोहोचलो. आकाश इथे जरा जास्तच ढगाळलेलं होतं पण पाऊस पडत नव्हता. माझ्या मुलीने आजी आजोबांबरोबर फोटो काढून घेतले. मनसोक्त हुंदडूनही घेतले. हळू हळू थेंब थेंब पावसाला सुरुवात झाली. अंगाला लागेल न लागेल असा पाऊस. आम्हाला छत्री उघडण्याचीही गरज वाटली नाही. साडे बाराच्या सुमारास दुसरी टॅक्सी करून आम्ही चर्चगेटला पोहोचलो. स्टेशनजवळच एका रेस्टॉरंट मधे जेवून सुमारे तासाभराने बाहेर पडलो तर पावसाची मध्यम सर आली होती. आता नेहरू तारांगण गाठायचं होत.
तारांगणाला पोहोचलो तसा तिथे काही शाळांच्या सहली आल्याने गर्दी होती म्हणून तारांगणाला नंतर येऊ आधी महालक्ष्मी जवळ असलेल्या नेहरू सायन्स सेंटरला जाऊ असं ठरवून पुन्हा टॅक्सीत बसलो आणि सायन्स सेंटरला पोहोचलो.

तो पर्यंत पावसाने जोर धरला होता. बरंच झालं आपलं पाहून होईपर्यंत पाऊस ओसरेल असा विचार करून आम्ही आत शिरलो आणि बाहेरच्या जगाशी आमचा संबंध तुटला. सुमारे चारच्या दरम्यान आम्ही बाहेर आलो. बघतो तर काय? पाऊस वेडा वाकडा कोसळत होता. विजांचा चकचकाट, कानठळ्या बसवणारा गडगडाट, झाडांना वाकविणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा भर्रभर्राट भितीत भर घालत होता. नेहरू सेंटरच्या प्रवेशद्वारातून पाण्याचे लोटच्या लोट आत शिरत होते.

"पाऊस थोडा कमी झाला ना की आता सरळ घरीच जाऊया," आईने सुचवलं.वीस पंचवीस मिनिटे आम्ही थांबून वाट पाहिली पण पाऊस ओसरण्याच चिन्ह दिसत नव्हतं. आता अजून किती वेळ एका जागी थांबून राहायचे त्यापेक्षा बाहेर टॅक्सी मिळते का पाहावं म्हणून छत्र्या सावरत आम्ही बाहेर पडलो आणि त्याच क्षणी भिजून ओलेचिंब झालो. बाहेर एकही रिकामी टॅक्सी दिसत नव्हती. रस्त्यावर घोट्यापर्यंत पाणी साचलं होत. काही वेळाने एक रिकामी टॅक्सी दिसली तशी मी धावत जाऊन त्याला विचारलं, "गोरेगाव चलोगे?" माझ्याकडे मख्ख चेहऱ्याने पाहत त्याने मान वळवली आणि आपली टॅक्सी पुढे दामटली. मग दुसरा, तिसरा अशा अनेक टॅक्सीवाल्यांनी या ना त्या प्रकारे नकार दिला. शेवटी गोरेगावचा हट्ट सोडून निदान प्रभादेवीला मावस बहिणीकडे जायचं ठरवलं. तरीही सर्वांकडून नकारच. आता पुढे काय? असा विचार करत आम्ही भर पावसात कुडकुडत उभे होतो आणि तितक्यात एक टॅक्सीवाला समोर येऊन उभा राहिला.

"कहॉं जाना है?", "प्रभादेवी, चलोगे?"

"लेकिन आगे सब रस्ते बंद है। पानी भर गया है। चाहो तो टॅक्सीमें बैठ जाना, जब बारीश कम होगी तब छोड दूंगा।... वैसे भी छोटी बच्ची के साथ कहां भिगते रहोगे?"

चला बुडत्याला गाडीचा आधार असं म्हणून आम्ही टॅक्सीत बसलो. निदान जितकं होईल तितकं तरी पुढे जाऊया असा विचार करून ड्रायव्हरने टॅक्सी पुढे दामटली. थोडं फार पुढे जातो तोच पाण्याची पातळी अचानक वाढायला लागली. टॅक्सी ड्रायव्हर आता पुढे जायला नाही म्हणू लागला, "अभी पानी में तो टॅक्सी नहीं ना डाल सकता, नुकसान होगा, एलफिस्टन में मेरा सेठ रहता हैं वहां जायेंगे। टॅक्सी बंद पड गयी तो लेने के देने पडेंगे।" आमच्याकडे त्याचं ऐकण्याशिवाय काही पर्यायही नव्हता. पाऊस धो धो कोसळतच होता. कुठल्यातरी गल्ली बोळांतून रस्ता काढत त्याच्या मालकाची इमारत थोडी उंचवट्यावर होती त्या आवारात त्याने टॅक्सी स्थानापन्न केली आणि तो आत निघून गेला.

रस्त्यावर तोपर्यंत गुडघाभर पाणी साचले होते, वाहनांची वर्दळ थांबली होती. सगळीकडे शुकशुकाट होता. संध्याकाळचे साडे पाच वाजायला आले होते. मधे एक दोन वेळा ड्रायव्हर आणि त्याचा मालक येऊन चौकशी करून गेले. आम्ही मुकाटपणे टॅक्सीत बसून होतो. हात पाय आखडून गेले होते. ओल्या कपड्यात थंडी वाजत होती. टॅक्सीच्या काचा खाली करण्याचीही सोय नव्हती. करणार काय? वाट पाहत राहण्याखेरीज दुसरा पर्यायही नव्हता. साडे सहाच्या सुमारास वारा थांबला, हळू हळू विजा, गडगडाट, पाऊसही थांबला. टॅक्सी ड्रायव्हर पुन्हा एकदा चक्कर टाकून गेला, "बैठे रहो, जब भाटा आयेगा तब पानी उतर जायेगा, फिर प्रभादेवी पहुंचा दूंगा। आपको चाय पीनी हो तो बाजू में ही दुकान है।"

आता पाणी ओसरेल नंतर ओसरेल असं म्हणता म्हणता सात... आठ... नऊ वाजले. पाऊस थांबला होता. रस्त्यावरचे पाणी मात्र तसूभर घटले नव्हते. वाहनं दिसत नव्हती पण लोक रस्त्यावरून हळूहळू चालत होते. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच बोलणं ऐकून येत होतं.... रेल्वे, बसेस, इतर वाहतूक ठप्प होती. कुठे घरं पाण्याखाली गेली होती, शहरातली बऱ्याच ठिकाणची वीज बंद होती, कुणीतरी वाहून जाणाऱ्या जीवाला हात देऊन आलं होतं तर कुणीतरी वाहून जाणाऱ्यांकडे असहाय नजरेने पाहत हळहळून आलं होतं. एक एक गोष्ट ऐकून जीवात धडकी भरत होती. कसही करून या संकटातून सुटका कशी होईल ही एकच ओढ लागली होती. गोरेगाव गाठणं केवळ अशक्य होतं निदान प्रभादेवीला मावसबहिणीकडे जाता येईल का पाहावं म्हणून तिला फोन करायचं ठरवलं. माझ्याकडे सेल फोन नसल्याने इमारतीतील एकांकडून ताईला फोन लावला आणि झाला प्रकार सांगितला. कसही करून आणि कितीही उशीर झाला तरी तुझ्या घरी पोहोचतो असं सांगून मी तिला सहजच विचारलं की, 'समुद्राला ओहोटी लागली का? पाणी का ओसरत नाहीये?'

'ओहोटी तर कधीच लागली, दोन तास होऊन गेले असतील,' तिने सांगितलं आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा प्रकार काहीतरी वेगळा आहे. ओहोटी बरोबर जर हे पाणी ओसरणार नसेल तर संपूर्ण रात्र, उद्याच्या दिवसात तरी ते उतरेल की नाही कुणास ठाऊक आणि इतक्या पाण्यातून टॅक्सी जाणे केवळ अशक्य होते. म्हणजे संपूर्ण रात्र रस्त्यावर काढायची की काय या विचाराने जीवाचा थरकाप उडाला. आपल्या बरोबर एक लहान मूल आणि दोन वयस्क माणसं आहेत आणि त्यांची जबाबदारी आपल्यावर याची प्रकर्षाने जाणीव झाली.

'असं करा तुम्ही जिथे आहात तिथपासून माझं घर फार लांब नसावं, तुम्ही चालत का येत नाही? प्रयत्न तर करून पाहा,' ताईने सुचवलं. पण हे करणं तितकंसं सोपं नव्हत. अनोळखी जागा, रात्रीची वेळ, साचलेले पाणी, परिसराची वीज गेल्याने सर्वत्र अंधार, त्यातून बाबांचा पाय वयोमानाने दुखरा, भरलेल्या पाण्यात मुलीला कडेवर उचलून घ्यावे लागणार होते. कुठे पाय घसरला, खड्डा असला, पाण्यातून शॉक लागला तर काय करायचं? सारच कठीण वाटत होतं. कुणाच्यातरी सोबतीची गरज होती.

टॅक्सीवाल्याला विचारलं तसा तो रस्ता दाखवायला तयार झाला. दोन अडीच किलोमीटर चालावं लागेल म्हणाला. आई बाबा घाबरत होते पण करणार काय म्हणून चालायचं ठरवलं. टॅक्सीवाल्याला बाबांचा हात धरण्याची विनंती केली. थोडं पुढे जातो न जातो तोच पाणी वाढू लागले. मुलीला मी कडेवर उचलून घेतले आणि आम्ही जवळ जवळ छातीभर पाण्यातून आम्ही रस्ता काढू लागलो. पंधरा वीस मिनिटे पाणी तुडवल्यावर कूर्मगतीने दादरच्या दिशेने जाणारी एक बस दिसली. 'चला बरं झालं, बस निदान आपल्याला पुढे तरी नेईल या विचाराने आम्ही धावत पळत बसच्या दिशेने जाऊ लागलो, बसही आमच्यासाठी थांबली आणि आम्ही आत जाऊन बसलो. पण कसंच काय, आमच्यासाठी थांबलेली बस काही केल्या सुरू होईना.. तिथेच ढेर झाली आणि आमची परिस्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली.

रात्रीचे दहा वाजून गेले होते. बसमध्ये १०-१२ माणसे होती. सर्वांच्या डोळ्यात काळजी दिसत होती. संपूर्ण परिसरात अजूनही वीज नव्हती. पाणी कमरेवर होतेच. बसच्या दुसऱ्या तिसऱ्या पायरीपर्यंत पोहचत होते. त्या पाण्यातूनही बरेचजण रस्ता काढत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या एकाने खालनच बसमध्ये डोकावून पाहिले. पटकन आपल्या बॅगमधून बिस्किटांचा पुडा काढून माझ्या हातात कोंबला,"तुमच्या मुलीला द्या. भूक लागली असेल हो तिला," असं म्हणून तो अंधारात दिसेनासाही झाला. त्याचा चेहराही दिसला नाही. धन्यवाद मानायचे दूरच राहिले. घरातून निघाल्याला आता बारा तास उलटून गेले होते. बसमध्ये तरी कितीवेळ बसून राहणार पण जायचं म्हटलं तर इतक्या अडचणी. डोळे मिटून शांत बसून राहाण्याखेरीज दुसरा कसलाही मार्ग दिसत नव्हता.

होता होता मध्यरात्र उलटून गेली. दिवस बदलला आणि चमत्कार व्हावा तशी ४-५ तरुण पोरं बसमध्ये घुसली. त्यांच्या हातात पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे पुडे होते. त्यातल्या एक दोघांकडे सेल फोनही होते, "कुणाला घरी फोन करायचे आहेत का? त्यातल्या एकाने विचारले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी माझ्या बहिणीला फोन लावला आणि बसमध्ये आम्ही कसे अडकून पडले आहोत त्याची कल्पना दिली. आमच्यात जे बोलणं सुरू होत ते ऐकून त्यातला एक मुलगा म्हणाला, 'प्रभादेवी काही इथून फार दूर नाही. इथून १०-१५ मिनिटांच्या अंतराच्या रस्त्यावर पाणी आहे पण पुढे सैतान चौकीच्या आसपास रस्ता कोरडा आहे. तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर आम्ही येतो तुमच्याबरोबर. घाबरू नका आपण सावकाश जाऊ. द्या तो फोन माझ्याकडे मी बोलतो तुमच्या ताईंशी.' फोनवरून त्याने भाऊजींना जिथे पाणी नाही तिथपर्यंत कार घेऊन या म्हणून सुचवले.

बसमधल्या बायकांची सोय या मुलांनी त्यांच्या इमारतीतील एका रिकाम्या फ्लॅटमध्ये केली. पुरुषांना काहीतरी खायला आणून देतो असं सांगून त्यातले चारजण आमच्याबरोबर यायला निघाले. बसमधून उतरून पुन्हा आम्ही छातीभर पाण्यातून हळू हळू चालू लागलो. रस्ता त्यांच्या पायाखालचा असल्याने काळोखातही ते सहज वाट काढत होते.आई बाबांच्या सोबत राहून, त्यांना व्यवस्थित सावरत, मध्येच माझ्या मुलीला माझ्या कडेवरून काढून स्वत:कडे घेऊन त्या मुलांनी आम्हाला सुखरूप ठरवलेल्या ठिकाणी पोहचवले. समोरचा रस्ता आता स्वच्छ होता आणि रस्त्याच्या कडेला भाऊजी कार पार्क करून वाट पाहत होते. त्यांना पाहून इतकं हायसं वाटलं की ते शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य.

त्या मुलांचे आभार मानून त्यांना पैसे हवे का म्हणून विचारले तर त्यांनी ठाम नकार दिला. निदान लोकांना मदत करताय म्हणून पैसे घ्या त्या पैशांनी थोडीफार मदत करा, फोनचे पैसे तरी घ्या म्हणून सांगितल्यावर त्यातला एकजण म्हणाला, 'ताई आमच्या घरची माणसं अजूनही घरी परतलेली नाहीत. माझा मोठा भाऊ अंधेरीला कामानिमित्त जातो त्याचा पत्ता नाही. ते जिथे अडकून पडले आहेत तिथे त्यांना कोणीतरी मदत करत असेलच ना. आम्ही जर तुमच्या घराजवळ असेच अडकलो असतो तर तुम्ही मदत केली असतीच ना... आणि पैसे घेतले असते का आमच्याकडून?' मी निरुत्तर झाले तसेही शब्दांनी आणि पैशांनी भरून निघण्यासारखे उपकार नव्हतेच त्यांचे.

पुढचे दोन दिवस आम्हाला ताईकडेच काढावे लागले. मुंबईतले पाणी ओसरले नव्हते आणि ओसरले तेंव्हा घरी वीज, पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते म्हणून जिथे होतो तिथेच राहायचे ठरवले. निदान ताईकडे सुखरूप पोहचलो ते काय कमी होते?

-----

Saturday, July 01, 2006

वय

माणसाचं वय आणि अक्कल या गोष्टी सम प्रमाणात असाव्यात अशी उगीचच माझी भ्रामक कल्पना आहे. वेगळ्या शब्दांत सांगायच झालं तर माणसाच जस वय वाढत तशी त्याची शैक्षणिक, बौद्धिक पात्रता वाढत जाते. त्याच्या अनुभवांच गाठोडं मोठठ होत जातं, तो अधिक शहाणा होत जातो असा सर्वसाधारण समज असतो. अस असताना माणसाला आपल वय लपवून ठेवण्याची अनिवार इच्छा का बुवा असते? तस हे न सुटणारं कोड नाही. या कोड्याच उत्तर मला माहितही आहे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने प्रत्येक व्यक्तिकडे आपल म्हणून काय कारण असेल हे जाणून घ्यायच कुतूहल मला असतं.

उगीच खडा टाकून पहावा तसा "लोकांना आपलं वय लपवायला का आवडत?" हा प्रश्न मी याहू आन्सर्सवर टाकला. अपेक्षेपेक्षा जास्त आणि अतिशय प्रामाणिक उत्तरे मिळाली. मिळालेल्या उत्तरांवरुन काढलेला निष्कर्ष असा --

लहानांना लवकर मोठ्ठ होण्यासाठी आणि मोठ्यांना कायम लहान रहाण्यासाठी आपलं वय लपवावसं वाटत. तसेच भिन्नलिंगी व्यक्तींवर आपला प्रभाव पडावा व आपल्या वयांतील तफावत झाकून रहावी म्हणून वय लपवले जाते.

अर्थातच, मला हा निष्कर्ष मनापासून पटला. त्याच्याकडे न्यूनगंड, स्वार्थ, फसवणूक अशा अनेक नजरेने पहाता येईल किंवा "सगळेच लपवतात म्हणून मी ही लपवतो" ही सर्वमान्य पद्धत म्हणूनही. सहज म्हणून काही संकेत स्थळांवर ओळखीच्या आणि अनोळखी लोकांची व्यक्तिगत माहिती तपासली. रहाण्याच गाव, व्यवसाय, आवडी निवडी, स्वभाव सांगायला उत्सुक असणारी बहुतांश माणसे वयाच्या खात्याकडे साफ दुर्लक्ष करत होती. त्यातल्या त्यात २५ च्या दरम्यानच्या बऱ्याच माणसांनी (की इच्छूकांनी?) आपलं वय दिल्याचही लक्षात आलं पण २७-२८ वया नंतर सर्वत्र चिडिचूप होती. असं का याच उत्तर मला "न्यूनगंड" असंच वाटत. असो. प्रत्येकाकडे आपल कारण असेलच.

सहजच हा विचार डोक्यात घोळवत असताना काहि वर्षांपूर्वीचा एक किस्सा आठवला. एका वाहिनीवर एलिझाबेथ टेलरची मुलाखत चालली होती. त्यावेळी लिझ बाई पासष्टीच्या आसपास होत्या. वाहिनीचे नाव व मुलाखतकर्त्याचे नाव आता आठवत नाही.

मुलाखतकर्ता प्रश्न विचारता विचारता सहज विचारुन गेला,"तर मग तुम्हाला या वयात......"

त्याबरोबर लिझ बाई अशा उसळल्या, "या वयात म्हणजे? तुम्हाला म्हणायच आहे तरी काय?"

आता साक्षात एलिझाबेथ टेलर ती. मुलाखतकर्त्याला तरी भान नको कुणाला कसले प्रश्न विचारावे ते? क्षणभर त्याची भंबेरी उडली. त्याने कशीबशी वेळ सावरुन नेली खरी पण नंतरच्या सर्व मुलाखतीत लिझ बाईंचा मूड खराब झाल्याच कळून येत होतं.

म्हणजे लोकांना आपल वय सांगायला आवडत नाही तसं नकळत त्यावर चर्चा झालेली किंवा ते सहजच विचारलेलही आवडत नाही.

लहानांच सोडा पण मोठयांना आपण म्हातारे होत चाललो आहोत की काय या भीतीने वय लपवावस वाटत, हेच खरं. जे आकड्यांत आपल वय लपवू शकत नाहीत ते दिसण्यात आणि वागण्यात आपलं वय लपवायचा प्रयत्न करतात. एलिझाबेथ टेलरचं आठव लग्न यातलाच प्रकार होता की काय न जाणे?

हल्ली मला अमिताभच्या खारके सारख्या शरीरावर काळ्या केसांच टोपलं पहाण्याचा भारी वैताग आला आहे. आता त्याला "Grow up!!” सांगायच की आपल्या प्रेक्षकांना "Grow up!!” सांगायच हा आणखी एक वेगळा प्रश्न. पण टकलातला शॉन कॉनरी या वयातही फार देखणा दिसतो ही वस्तुस्थिती.

बायकांना वय विचारु नये, खरं उत्तर कधीच मिळणार नाही याची ग्वाही देणाऱ्या मंडळींसाठी एक किस्सा मी नेहमी राखून ठेवते.

काही वर्षांपूर्वी माझ्या कार्यालयातील एका मध्यमवयाच्या गृहस्थांना मला वय विचारण भाग पडल. आता त्यांच वय जाणून घेण्यासाठी HR ला भेट देण कठीण नव्हत पण काखेत कळसा गावाला वळसा कशाला म्हणून सरळ त्यांनाच वय विचारल. स्वारी काही उत्तर द्यायला तयार होईना. खूप टाळाटाळ केल्यावर त्यांनी एकदाच उत्तर दिले वर पुस्ती जोडली, "मी ४० वर्षांचा आहे यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. बरेच लोक अजूनही त्यांच्या मुलींसाठी मला विचारतात."

यावर काय बोलणार आपण? शेवटी हेच म्हणायच, व्यक्ती तितक्या प्रकृती.

Saturday, June 24, 2006

डायव्हिंगचा क्लास

"आपल्या हायस्कूल मधे डायव्हिंग शिकवणार आहेत. तू जाशील?" मी माझ्या मुलीला सहज विचारल.

"डायव्हिंग म्हणजे ते ऑलिम्पिक्स मधे दाखवतात ते?"

"हो तेच."

"नाही. मी नाही जाणार. मला भीती वाटते. दुसरं काही नाहिये का? डायव्हिंगच का विचारलस?"

"तू जावस असं मला मनापासून वाटत म्हणून."

"पण मी सांगितलना कि मला भीती वाटते."

"कसली भीती वाटते ते सांगशील का? खोल पाण्यात पोहण्याची? पण तुला १० फूट पाण्यात पोहोता येत १६ फूट पाण्यातही येईलच."

"पोहोण्याची भीती नाही वाटत. मला पोहायला आवडत."

"मग उंचीची भीती वाटते का? विमान, सिअर्स टॉवर, CN टॉवर वर भीती नाही वाटली? CN टॉवरच्या काचेच्या जमिनीवर उभं रहायला नाही का वाटली भीती?"

"नाही. उंचीची भीती नाही वाटत ग मम्मा. त्या टॉवर्स वर आणि विमानात आपण सुरक्षित असतो ना. उंचीवरुन खाली झोकून द्यायची भीती वाटते."

"सरळ पाण्यात पडणार हे माहित असूनही? तर मग एक सांग तुझ्यासारखीच इतर लहान मुलं, कदाचित तुझ्यापेक्षा लहानही जेव्हा न घाबरता पाण्यात झेप घेतील तेव्हा आपण त्यांच्यापेक्षा कमी पडतो आहोत ही भीतीही तुला वाटेल नाही का?"

"ह्म्म्म्म!!!!"

"भीती आहे तुझ्या मनात आहे. तू ती मनातून काढून टाकलीस तर फूटबोर्डवरुन उडी मारायला अजिबात भीती वाटणार नाही, उलट मज्जाच येईल बघ. जो माणूस भीत रहातो ना तो मिळालेली संधी गमवत असतो. खरतरं भीती कमी व्हावी म्हणूनच तू डायव्हिंग शिकावस अस मला वाटत."

"तुला नाही कसली भीती वाटत का ग मम्मा?"

"वाटते ना. प्रत्येकाला कसली ना कसली भीती वाटते. बिशेषत: अज्ञाताची. तशी मलाही वाटते पण भीतीला मारतो विश्वास. तूही मला डायव्हिंग सहज जमेल असा विश्वास मनात निर्माण कर आणि बघ भीती कशी पळून जाते ती. माणसाने आपल्या एकेका भीतीला असच मारुन टाकायच असत."

"खरचं मग कशाची भीती रहाणार नाही? Not even death?"

"Not even death! आता जाऊन झोप. उद्या सकाळी मला सांग की तुला जायचय कि नाही ते. तू जायलाच हवस अशी माझी जबरदस्ती अजिबात नाही. तुझ्या मनात भीती असेल तर न गेलेल उत्तम असं मला वाटत."

-----

(दुसऱ्या दिवशीची सकाळ)

"मम्मा मी जाईन डायव्हिंग शिकायला?"

"खरचं? हे तू माझी इच्छा आहे म्हणून मला घाबरुन तर नाही ना म्हणते आहेस?"

"नाही ग मम्मा! मला नाही भीती वाटत. पण तुला वाटत की मला डायव्हींग जमेल?"

"हो! माझा तसा विश्वास आहे."

-----------

काल डायव्हिंगचा पहिला लेसन झाला. पूर्ण संध्याकाळ उंचावरुन पाण्यात झेप घ्यायला कशी मज्जा येते ह्या चिवचिवाटात कशी निघून गेली ते कळलेच नाही.

Sunday, June 18, 2006

माझे मूषकप्रेम

संपूर्ण जगात जिथे जिथे मनुष्यवस्ती आहे तिथे तिथे आढळणारा दुसरा सस्तन प्राणी म्हणजे उंदीर. माणसाच्या खालोखाल याचाच नंबर लागतो आणि तरीही, मला उंदीर आवडतो असं म्हणणारी फार कमी माणसं भेटतील. उंदीर म्हणजे नासाडी करणारा, मिळेल ती गोष्ट कुरतडून ठेवणारा, इथून तिथून धावाधाव करुन नाकी नऊ आणणारा आणि वेळप्रसंगी चावा घेण्यास मागे पुढे न पहाणारा महाउपद्व्यापी प्राणी.

कल्पना करा की, आपण अंधारात थिएटर मधे बसून छानसा सिनेमा पाहण्यात गुंग आहोत. चित्रपटात काहीतरी महत्त्वाचा प्रसंग घडतोय, जसा की नायक कसले तरी रहस्य जाणून घेण्याच्या बेतात आहे आपण आतुरतेने पुढे काय होणार त्याची वाट पहात आहोत आणि तेवढयातच आपल्या पायाशी अचानक काहीतरी हुळहुळत. "अय्य्या ईईई!!!!" किंचाळून जितक्या बायका पाय वर घेऊन भेदरट नजरेने इकडे तिकडे बघतील तेवढेच पुरुषही यात सामिल होतात असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. तशी मी स्वत:ला उंदीर प्रेमी म्हणणार नाही आणि तरीही तीन-चार उंदीर मला फार आवडतात. अशा तीन उंदरांबद्दल सांगायला फार आवडेल.

उंदीर पहिला : गणेश वाहन

गणपती हे मराठी माणसाचे आराध्य दैवत. मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक. अशा तुंदिल तनु देवाला आरुढ होण्यास एक लहानसा उंदीर पुरेसा आहे ही कल्पनाच फार मजेशीर आहे.

गणपतीच्या उंदीरा बाबत अनेक आख्यायिका आहेत. काहींच्या मते उंदीर हे बुद्धीमत्ता आणि चातुर्याचे लक्षण. त्यामुळे गणपती त्यावर आरुढ होणे क्रमप्राप्त. काहींच्या मते हा उंदीर अहंकाराचे तर कधी षडरिपूंचे लक्षण म्हणून गणेश त्यावर स्वार. अहंकारावर, दुष्ट प्रवृत्तींवर स्वार होऊन गणेश त्यांना आपल्या काबूत ठेवतो. त्यांचा गुलाम न बनता अधिपती बनतो. जे काही असेल ते. मला हा उंदीर आवडतो कारण कुठल्याही देवळात प्रत्यक्ष भगवंता समोर बसून आपल्या शरीरा एवढया आकाराचा मोदक गट्टम करण्यास ही मूर्ती सदैव तयार. याला पाहिल की आईच्या हातच्या लुसलुशीत उकडीच्या मोदकांची आठवण आवर्जून होते.

उंदीर दुसरा : संगणकाचा उंदीर

ज्या व्यक्तींनी DOS (किंवा तत्सम) संगणक प्रणालीवर काम केल आहे त्यांना या उंदीराची महती नक्कीच ठाऊक आहे. जगात असा एकच प्रकारचा उंदीर असावा जो सहज आपल्या हाती लागतो आणि मनात येईल तसा फिरवता येतो. याच्या शेपटीवरुन व संगणकाच्या पडद्यावर लिलयेने पळण्याच्या याच्या कलेने "स्टॅनफोर्ड रिसर्च इंस्टिटयूट" ने या यंत्राला "माऊस" असे नाव दिल्याचे वाचनात आले आहे. हल्ली त्याच्या शेपटीला चाट मिळाला आहे तो भाग वेगळा. अनेक प्रकारांत (मेकॅनिकल, ऑप्टिकल, लेझर इ.), अनेक आकारांत (ट्रॅकबॉल, टचपॅड, फूटमाऊस) आणि अनेक रंगांत उपलब्ध असणारा हा उंदीर आपल्या सर्वांचाच लाडका असावा.

उंदीर तिसरा : अर्थातच मिकी माऊस.

७८ वर्षांच्या या चिरतरुण उंदरावर माझ अतोनात प्रेम आहे. १८ नोव्हेम्बर १९२८ हा त्याचा जन्म दिवस. १९२८ ते ४६ सालांपर्यंत स्वत: वॉल्ट डिस्नींचा आवाज लाभण्याचे भाग्य या पठठ्याच्या नशिबात होते. इतक सालस, सद्गुणी आणि मनमिळाऊ पात्र कार्टून्सच्या जगात शोधून सापडायच नाही. अजूनही याला टीव्हीवर पहायचा योग आला तर मी पापणी न लवता मनसोक्त मजा घेते.

नुकताच आम्हाला मिकीची याची देही याची डोळा भेट घ्यायचा योग आला. त्याला मारलेली घटट मिठी जन्मभर आठवत राहिल. त्याचे ते मोठे मोठे गोलाकार कान, पाणीदार डोळे, चेहयावरचे स्मितहास्य मनात घर करुन राहिले आहे.

मनातली गोष्ट सांगायची झाली तर "लहानपण देगा देवा" अशी देवाची आळवणी न करताही त्या दिवशी लहानपण उपभोगायला मिळाले.

विशेष टीप : या तिन्ही उंदीरांसह त्यांच्या अधिपतींवर, अनुक्रमे गणेश, संगणक आणि वॉल्ट डिस्नी यांच्यावर ही माझे अतोनात प्रेम आहे.

Friday, June 16, 2006

नावात काय आहे?

काल मुलीला पार्क मधे घेऊन गेले होते, थोडया वेळाने एक अमेरिकन बाई बाजूला येऊन बसल्या. या अमेरिकनांना बोलण भारी पटकन सुरु करता येत, फार कौतुकास्पद गोष्ट आहे. अगदी साता जन्मापासूनची ओळख असल्यासारख्या गप्पा मारतील हे लोक. पण बाकावर असे पर्यंतच, एकदा का बाक सोडला की आत्ताचा जन्म ही तिथेच विसरायचा.

असो. थोडयावेळाने त्यांनी बोलण काढलं. मग बोलण्या बोलण्यात आम्हा सगळ्यांची नावं विचारुन घेतली. नंतर म्हणाल्या, "तुम्हा भारतीयांना अर्थपूर्ण नाव ठेवायची सवय असते नाही. मी मला भेटणाया प्रत्येक भारतीयाला त्याच्या नावाचा अर्थ विचारते. नाहीतर आमची नाव बघा, James, George, Nancy कसल्याही अर्थाचा पत्ता नाही. आजी, आजोबा, आत्या, काकांची नाव होती तिच फिरुन फिरुन पुन्हा लावतो."

"खरयं तुमचं," म्हणून मी हसले.

व्यक्तिशः माझ मत अस की ऐकायला गोड वाटणारी निरर्थक नावे ठेवायला हरकत नसावी पण अर्थाचा अनर्थ नको. मनात विचित्र नावांचे किस्से येऊन गेले.

किस्सा पहिला:

मला मुलगी झाली तेव्हा हॉस्पिटल मधे असताना बाजूच्या खोलीत एक गुजराथी बाई भरती झाली होती. दुसऱ्या दिवशी तिलाही मुलगी झाली. तिची सासू आनंदाने आम्हाला बातमी सांगायला आली. काही कारणास्तव तिच्या पाठोपाठ नव्याने बाप झालेला तिचा मुलगाही घुसला. बोलता बोलता कळल की त्यांना मुलीच नाव राशीवरुन ठेवायच होत आणि अक्षर आल होतं "य". तेव्हा "य" वरुन सुरु होणारी काही नाव सुचताहेत का अशी माय-लेकांनी पृच्छा केली.

माझ्या आईने त्यांना लागोलाग "यशदा" नाव सुचवलं. त्याबरोबर हे फार मराठी नाव झाल, आम्हा गुजराथ्यांत खपणार नाही असं त्या बाई म्हणाल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा मिठाई घेऊन आला. स्वारी खुशीत होती...म्हणाला नाव ठरवल. मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही अतिशय आवडलं.

"अस का? काय नाव ठेवणार मग तुम्ही," मी उत्सुकतेने विचारलं.

"याशिका," तो उत्तरला.

"काय? अहो ते जपानी कंपनीच नाव आहे," मी किंचाळायची बाकी होते.

"तर काय झाल? ऐकायला गोड वाटत की नाही?" त्याने आम्हाला साफ थंड करुन सोडले. "तुम्ही तुमच्या मुलीच नाव काय ठेवणार?"

"अजून ठरवलं नाही. पण शिकागो ठेवावस वाटतय," मीही माझा स्वर खाली आणून थंड उत्तर दिले.

किस्सा दुसरा:

ही थोडी पूर्वीची गोष्ट. अदमासे १९८० च्या दरम्यानची. आमच्या एका ओळखीच्या कुटुंबात मुलाचा जन्म झाला. कुटूंबातील गृहस्थ क्रिकेटचे भारी शौकिन, तेव्हा मुलाचे नाव क्रिकेटपटू वरुन ठेवण्याचा त्यांचा मनोदय होता. अर्थातच सुनिल, दिलीप, कपिल ई. नावांचा विचार झाला. परंतु सदा हरणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूचे नाव नको म्हणून आपल्या मुलाचे नाव त्यांनी "व्हीव्ह रिचर्डस" ठेवले. म्हणजे "व्हिव्हरिचर्डस दाभोळकर" (आडनाव बदलले आहे). पुढे दोन-तीन वर्षांनी त्यांना कसलीशी उपरती झाली आणि शाळेत जाण्या पूर्वी मुलाचे नाव बदलून त्यांनी "रवी" केले. (पुढे "शास्त्री" लावले नाही)

किस्सा तिसराः
अबूधाबीला असताना माझ्या ऑफिसमधे एक मल्याळी ख्रिश्चन सहकारी होत्या. त्यांच पाठच नाव दोन अक्षरी त्यामुळे होणाऱ्या बाळासाठी त्यांना लांबलचक ४-५ अक्षरी नाव हवे होते. भारतीय नाव ठेवण्याकडे त्यांचा कल असल्याने आम्ही त्यांना "अपराजीता", "परिणिता" सारखी नाव सुचवली होती. (मुलगा झाल्यास वेगळी होती, अर्थातच).

मूल झाल्यावर हॉस्पिटलमधे लगेच नाव विचारतात. यांना मुलगी झाली तेव्हा यांच्या नवऱ्याने सांगून टाकले "महानिर्वाणा".

Sunday, May 07, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी (डाव माझा)

नंदन कडून टयुलिपकडे आणि तिच्याकडून माझ्यापर्यंत पोहोचलेली साखळी. टयुलिप, "तेरुओ" बद्दल जे लिहिलं आहेस ते "प्रगल्भ" नाहीतर काय आहे? फारच आवडलं, शक्य होईल तेव्हा जरुर वाचेन.

मराठी पुस्तक हा माझ्यासाठी थोडासा हळवं करुन जाणारा प्रकार आहे. लग्नापासून माझ्या घरात फारशी मराठी पुस्तकं येत नाहीत. नवरा कन्नड आणि मुलीला आपण कोण हे अजून ठरवायच असल्याने सामाईक आवडीची पुस्तकच घरी येतात. एकंदरीत मराठी साहित्याची साथ सुटल्यातच जमा आहे. मी हल्ली, काय गमावलं या पेक्षा काय जमवलं याचा विचार जास्त करते, त्यामुळे इंग्रजी पुस्तकांची साथही तितकीच आवडते.

मी अगदी पहिल्यांदा वाचायला लागले तेव्हा माझ्या पुस्तकांचा खजिना एका पत्र्याच्या छोट्याशा बॅगेत मावायचा. माझ्या माहेरी, आज त्यांची संख्या चार सहा कपाटं भरुन आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीची पुस्तकं घेऊन यायचा, बाबांनी मग पुस्तकांसाठी वेगळी कपाटच बनवायला सुरुवात केली. नवीन पुस्तक घरात आणणे हा आमच्या दॄष्टीने एक सोहळा असे. सुटटी लागली की दादर पार्ला किंवा इतर बुक डेपोतून नवीन पुस्तक आणायची. घरी आणून त्यांना प्लॅस्टिकच कव्हर घालायच आणि सुवाच्य अक्षरांत त्याच्या पहिल्या पानावर नाव, तारीख, दिवस घालायचा. भेट-वस्तू म्हणून मिळाले असल्यास तेही विशेष टाकायचे आणि कपाटात त्याच्यासाठी योग्य जागा निवडायची. आमच्या घरात अजूनही आम्ही एक अलिखित नियम पाळतो, तो म्हणजे, "हे पुस्तक दुमडणार नाही, त्याची पाने अलगद उलटायची आणि हे पुस्तक कुठल्याही अयोग्य व्यक्तीच्या हातात पडणार नाहीत याची काळजी घ्यायची." घरातली पुस्तकं आज इतक्या वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत हे सांगायला खूप बरं वाटत.

१. शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक - इस्तंबुल ते कैरो - निळू दामले.

गेल्या मुंबई भेटीत वाचण्याचा योग आला. "पूर्वरंगाची अपूर्वाई" की काय माहित नाही पण प्रवासवर्णने मलाही आवडतात. काही महिन्यांपूर्वी एका लेखकाने ग्रीस पासून भारतापर्यंत ऍलेक्झांडर द ग्रेट च्या मार्गावरुन पायी प्रवास केल्याच वर्णन वाचलं होत. फार सुंदर छायचित्रे आणि वर्णन होत, पण नाव विसरले बुवा.

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती - इस्तंबुल आणि तुर्कस्थान बद्दल तसं मला पहिल्यापासून आकर्षण होतच. दोन महाखंडांच्या उंबरठयावर वसलेले ऐतिहासिक शहर, इस्तंबुल. इस्लाम धर्म पाळत असले तरी लोक पाश्चिमात्य रहाणीमानाला सरावलेले. शहराचा काही भाग युरोपमधे तर काही आशिया खंडात होता, आता पूर्णच युरोपमधे. 'केमाल पाशा' सारख्या ध्येयवेडयाने या इस्लामिक राष्ट्राचा जो कायापालट केला ते एकंदरीतच नवलपूर्ण. दामल्यांचा प्रवास, त्यांच व्यक्ती, स्थळचित्रण, इजिप्त आणि तुर्कस्थान यांची राजकिय स्थिती हे नक्कीच वाचण्याजोगं. अधिक माहिती येथे मिळेल.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके

श्रीमान योगी - रणजीत देसाई
मृत्युंजय - शिवाजी सावंत
अधांतरी - जयवंत दळवी
पिंगळावेळ - जी. ए. कुलकर्णी
आकाशाशी जडले नाते - जयंत नारळीकर

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-

हृदयस्थ - अलका मांडके
झाडाझडती - विश्वास पाटील
संभाजी - विश्वास पाटील
आंधळ्याच्या गाई - मेघना पेठे
पिंगळावेळ - जी. ए. कुलकर्णी *

* पिंगळावेळ ज्या वयांत वाचल तेव्हा पूर्ण कळलं नव्हतं, आता बरचं विसरायलाही झालय म्हणून पुन्हा नाव इथे लिहिलं.

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे - प्रिय पुस्तक एक नसल्याने मला कुठल्या एकाची निवड करणं फार कठीण वाटतय. पण माझ्या संग्रही असलेल आणि इतरांनीही संग्रही ठेवाव अस संजीवनी वाडेकरांच, शोध सुखाचा.

'सुख' कुठे सापडेल? हा भाबडा प्रश्न आपल्या मनाला बरेचदा चाटून जातो. रक्ताची नाती, जुळलेली नाती आणि जुळवलेली नाती यांतून अनेक समस्या निर्माण होतात. दिवसें दिवस वाढत चाललेल्या आत्मकेंद्री वृत्तीमुळे कुटुंब व्यवस्था आणि समाज या दोहोंनाही तडे जाऊ लागले आहेत. अशा प्रत्येक नात्यातला समस्यांचा उहापोह आणि त्यातून विचारात घेतलेला, "शोध सुखाचा" नक्कीच संग्रही ठेवण्याजोगे आहे.

आता पुढच्या अनुदिनीकारांना खो देते. (सुमेधा खो छान वाटतं.)

Thursday, May 04, 2006

नवा ब्लॉग

नवा ब्लॉग टाकला आहे "विखुरलेले मोती" या नावाने. मराठी ब्लॉग वर येईलच, पण ही लिंक प्रेमाने माझ्या शब्दांची तोड फोड वाचणाऱ्या माझ्या आईसाठी.

click below:

विखुरलेले मोती

Tuesday, May 02, 2006

आठवणींचे झरोके

आज मुंबईच्या उकाडयाची खूप आठवण येतेये. या आमच्या नॉर्थ अमेरिकेला उकाडा जाणवेल तर शपथ. नाही तसं ३-४ महिने चांगलं गरम होतं पण दिमतीला एसी असल्यावर त्या बिच्चाऱ्या उकाडयाची काही किंमतच रहात नाही आणि या इथल्या उन्हाळ्याला मुंबईच्या उन्हाळ्याची तसूभर सर नाही. तसंही एप्रिल मेच्या महिन्यात इथे स्प्रिंग असतो उन्हाळा नाही. एक चांगली गोष्ट म्हणजे इथे मी छातीठोकपणे 'मला उन्हाळा आवडतो' असं म्हणू शकते. हेच वाक्य जेव्हा जेव्हा मुंबईला उच्चारलय तेव्हा तेव्हा लोकांनी विचीत्र नजरेने माझ्याकडे पाहिलय.

एप्रिलच्या महिन्यात शाळेच्या परिक्षा सुरु झाल्या की शाळेच्या आवारात एक भय्या लाल-केशरी चिनमीन बोरांची, आवळे, गाभूळलेल्या चिंचांची गाडी लावायचा. 'परीक्षांच्या दिवसांत त्या गाडीकडे ढूंकूनही बघायच नाही' अशी आईची सक्त ताकिद असायची. आशाळभूत नजरेने त्या गाडी समोरुन जाताना आमच्या बालमनावर किती अत्याचार होत असतील याची आमच्या मातोश्रींना कल्पनाही नसावी. बरं तो भय्या तरी असला दुष्ट की परीक्षा संपल्या की लागोलाग हा ही शाळेच्या आवारातून गायब. मग त्याच्या शोधात आम्ही बाजाराच्या चकरा मारायचो.

सुटट्या लागल्या की आम्ही आमचं वेळापत्रक ठरवायचो. खरं म्हणजे सकाळी सकाळी बाबांनी 'दिवस वर आला तरी गाढवा सारखे लोळत काय पडलाहेत?' या वाक्याने सुरुवात करायला नको म्हणून आम्हा मैत्रीणींचा ग्रुप भल्या पहाटे उठून आरे कॉलनीत morning walk ला जायचा. पहाटेच्या वेळेला आरे कॉलनीत असणं हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. ती घनदाट वनराई, मंद थंड वारा, पक्षांचा मुक्त किलबिलाट, पहाटेच्या दंवाने शिंपलेल्या लालभडक पायवाटा, आसमंतात दरवळणारा ओल्या मातीचा सुगंध, गोठयांमधली लगबग, गायींच हंबरणं, गावदेवीच्या जुन्या देवळातील पहाटेची पूजा, तो अखंड घंटानाद, मुंबईत राहून हे सर्व वाटयाला यायला भाग्य लागतं. 'वेळेवर परत या,' हा आईचा सल्ला हीच काय त्यातली negative side.

परत आल्यावर थंडगार पाण्याने मनसोक्त आंघोळ करायची. आईने, "वरच्या टांकीतलं पाणी संपेल आता, पुरे झालं" अस ओरडून सांगेपर्यंत. तिच्या आग्रहाखातर पोटांत काहीतरी ढकलून आम्ही पुन्हा एकमेकांची दारं ठोठवायला मोकळे.
जेवताना हापूसचे आंबे, पायरीचा आमरस, गऱ्या गोट्याची फणसाची भाजी हे बाकीच्या दिवसांत कुठे मिळते? आई फणसाची ठेचून भाजी करते. त्यात बारीक कोलंबी किंवा करंदीही घातली तर मी पंचपक्वान्नही फटक्यात बाजूला सारिन. त्या भाजीसाठी मी आजही वेडी आहे. दुपारच्या जेवणानंतर 'इकडे तिकडे उनाडक्या करत बसण्यापेक्षा गच्चीवर घातलेल्या वाळवणाजवळ बसा' या आईच्या आज्ञेला मात्र आम्ही शिरसावंद्य मानायचो.

भर दुपारच्या कडक उन्हातही गच्चीमधे वा-याच्या सुखद झुळुक असायची. टांकीखाली सतरंजी घालून लोळत पुस्तक वाचायला खूप मज्जा यायची. काही दिवसांपूर्वी फास्टर फेणेवरचा सुरेख ब्लॉग वाचला होता. त्याच्या जोडीला गोटया, चिंगी, जयदीपची जंगलयात्रा, ओसाडवाडीचे देव, किशोर, चांदोबाचे अंकही असायचे. काही वर्षांनी या पुस्तकांची जागा चंद्रावर स्वारी, प्रेषित, यक्षाची देणगी अशा नारळीकर, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे सारख्या लेखकांनी घेतली. दुपारच्या निरव वेळी रत्नाकर मतकरींचं "खेकडा" वाचून अंगावर उभा राहिलेला शहारा अजूनही आठवतो. पुस्तकांच्या सोबतीला तोंडात चघळायला गच्चीवरच्या वाळवणातल्याच खारवलेल्या कैऱ्या, चिंचा असायच्या. मिटक्या मारत पुस्तक वाचायची मजा काही औरच असायची.

संध्याकाळ झाली की पुन्हा उनाडक्या करायला मोकळे. टीव्हीच्या भस्मासुराने आम्हाला तेव्हा गिळलं नव्हत त्यामुळे ईमारतीच्या आवारांत चोर पोलिस, डब्बा ऐसपैस सारखे खेळ रंगायचे.

"दिवे लागले...चला घरी आता," असं आईने निदान १० वेळा कंठशोष केला की मगच आम्ही आज्ञावंत मुलं आपापल्या घरी नाईलाजाने परतायचो. रात्री झोपताना "चला सुट्टीतला आणखी एक दिवस गेला. कधी जून उजाडतोय आणि ही पोरं पुन्हा शाळेत जातायत अस झालय मला," अशी आईची कुजबुज हमखास ऐकू यायची.

----

या सर्वांची इतकी प्रकर्षाने आठवण व्हायच कारण म्हणजे मुलीला पुढच्या महिन्यापासून सुट्टी पडत्ये आणि मला आत्तापासूनच टेन्शन आलय की हे दोन महिने कसे घालवायचे?
-----
सुमेधा, तुझ्या शिर्षकाचा वापर केला हं!

Thursday, April 27, 2006

बघू कसं जमतय ते

काही दिवसांपासून एक नवीन ब्लॉग लिहावा असा मनात विचार होता. मनातलं शब्दांत उतरवण्यासाठी "मनात आलं.." पुरेसा आहे पण माझ्या भन्नाट वाचनांत अनेक चित्रविचित्र गोष्टी येत असतात.... आणि त्या माझ्या भाषेत लिहून काढायची अतीव उर्मी मला काही दिवसांपासून होत आहे.

काही दिवसांपूर्वी सहजच मला भोसल्यांच्या तंजावूर शाखेबद्दल वाचायला मिळालं. सरफोजी राजांच साहित्य प्रेम, पुस्तक प्रेम, त्यांच आरोग्य शाखेबद्दलच्या अफाट कुतुहलाबद्दल वाचलं. डोक्यात खूप गोष्टी आहेत. विचारांना भाषेचे बंध नसतात. भाषेला शब्दांचे बंध नसतात. इतिहासाला काळाची तमा नसते. सरफोजी राजे, सरस्वती महाल लायब्ररी, महाबलीपुरम, सरस्वती नदी, ऍंगकोरच्या हिंदू राजांची वंशावळ, त्यांचे कलाप्रेम, चैत्रालची कलाश जमात वगैरे वगैरे. तसा एकाचा दुसऱ्याशी संबंध नाही पण हे सर्व माझ्या शब्दांत, माझ्या भाषेत निबंधरुपाने जमवून ठेवायला मला आवडेल. माझ्या भटकत्या मनातल्या आणि काळाच्या ओघात विसरुन गेलेल्या गोष्टी संकलीत करायच ठरवलं आहे.

ब्लॉगला नाव काय द्याव ते अजून ठरवायचय. "भूले बिसरे", "भूले भटके" ... डोक्यात हिंदीच का येतय कुणास ठाऊक?...बघू कसं जमतय ते.

Saturday, April 22, 2006

म्हींग्लीश

मराठीशी माझा संबंध सुटत चाललाय का अशी भीती बऱ्याच वर्षांपासून वाटायची. काही वर्ष गल्फमधे काढली. अमेरिकेला यायला तसा उशीरच झाला पण इथे राहूनही आता काही वर्षे उलटून गेलीच आहेत. विंचवाच्या पाठीवरच्या बिऱ्हाडाप्रमाणे इथून तिथून फिरण्याने मराठीपासून दूर जाऊन बराच काळ गेलाय. घरातली गोष्ट सांगायची झाली तर मी सोडून घरात कुणीच मराठी नाही त्यामुळे इथेही मराठी चालत नाही. मराठी पुस्तकं, सिनेमा, साहित्य या सर्वांचा संबंध हळूहळू सुटत चाललाय. आमची घरगुती भाषा हिंग्लीश....मुलीशी मधे मधे मराठी बोलते म्हणून "म्हींग्लीश".

कधी कधी माझे तिचे संवाद रंगतात. तिला नवीन शब्द शिकवायला, तिच्या फिरक्या घ्यायला खूप मजा येते. अर्थात ती ही काही कमी नाही. तिलाही ही शब्दमिसळ फार आवडते.

"मॉम , गिव्ह मी सोने को चादर",

"मुझे बॅक पे सोप लाव के दे ना" वगैरे.

आजकाल माझ्या डोक्यात तिला जुने हिंदी सिनेमा, जुने फोटो, जुन्या फॅशन्स दाखवायच खूळ घुसलं आहे. काही दिवसांपूर्वी तिला "चलती का नाम गाडी" दाखवला तेव्हापासून ती किशोरकुमार भक्त झाली आहे. एक आवडला म्हणून मग हाफ टिकिट, पडोसन, मि. मिसेस ५५, CID दाखवले. काही जुन्या फॅशन्स, जुने कलाकार पाहून मीही तिच्याबरोबर माझी करमणूक करुन घेतली.

अचानक तिला जुने फोटो हवे झाले, "मम्मा, शो मी तुझ्या लहानपणके फोटो ना प्लीज."

काल आम्ही दोघी अल्बम काढून बसलो होतो. माझ्या वाढदिवसांचे, जुन्या घरातले, माझ्या आई बाबांच्या तरुणपणीचे फोटो बघता बघता ती एकदम गप्प झाली, कसल्यातरी गहन विचारांत गढून गेल्यासारखी. आमच्या म्हिंग्लीश सारखी तिच्या डोक्यात विचारांची काहीतरी गल्लत होत होती बहुतेक.

काय झाल म्हणून विचारल तसं म्हणाली,

"As a child, did you find world a very boring place? "

अस का ग म्हणतेस म्हणून विचारल तर परत म्हींग्लीशच भूत स्वार. पण तरीही अतिशय गंभीरपणे तिने मला प्रश्न केला,

"तुझ्या लहानपणी वर्ल्ड में सबकुछ ब्लॅक ऍन्ड व्हाईट होत ना. कलर्स नसलेली दुनिया बोरींगच असणार ना?"

Saturday, April 15, 2006

तुझ्यासाठी हज्जारदा

"काईट रनर" म्हणून एका अफगाणी अमेरिकन लेखकाची एक चांगली कादंबरी वाचनात आली. अतिशय सरळ, साधी गोष्ट. दोन मित्रांची, वडिल-मुलाच्या प्रेमाची... खूपसं अफगाणिस्तान, थोडसं तालिबान, बरचसं वास्तव, काहिसं विस्थापित जीवन, थोडेसे न पटणारे योगायोग यात कथा गुरफटून गेली आहे. पण वाचताना बरं वाटलं, पाश्चिमात्य जगात अवचितच काहीतरी खरखुरं पौर्वात्य मिळून गेल्यासारख.

कथेतली काही वाक्य उगीचच आवडून गेली. ज्या वाक्याभोवती संपूर्ण कथा घोटाळत रहाते ते खूपच छान आहे, "For you thousand times over."

आयुष्याच्या वाटेवर आपण कितीतरी लोकांना सहज भेटत असतो. बालपणीचे सोबती, शाळा मित्र, आजूबाजूचे संबधीत, नातेवाईक. सर्वांकडून आपल्याला काही ना काही अपेक्षित असत. मी इतक करतो म्हणून दुसऱ्याने माझ्यासाठी एवढ कराव, उपकारांची परतफेड, केलेल्याची जाणिव वगैरे सारख्या वाक्यांतून आपण आपल्या आयुष्यात इतरांकडून केवळ अपेक्षांच आणि अपेक्षाभंगांच ओझं वाढवत असतो. अशी फार कमी माणसं असतात की ज्यांच्यासाठी आपण निर्व्याजपणे काहीतरी करतो. आपली नाती, मैत्री, ओळखी या किती स्वार्थी असतात नाही? एक प्रकारचा सौदा किंवा trade. फार फार तर जितकं दुसरा करतो तेवढीच आपण परतफेड करत असतो.

बहुतेकदा मैत्री ही फक्त गरजे पुरती असते. Friendship of convinience.

कुणासाठीतरी झोकून द्याव. कसलीही अपेक्षा न करता निर्व्याज प्रेम करावं. दुसऱ्याला आपल्यासाठी desirable बनवण्यापेक्षा त्याला आहे त्या स्थितीत, परिस्थितीत स्विकाराव. कुठलीही फारशी अपेक्षा न ठेवता एखाद्यासाठी आपल्याला शक्य आहे तेवढे मनापासून करत रहावे आणि म्हणावे, "तुझ्यासाठी हज्जारदा".

Tuesday, April 11, 2006

चिरनिद्रा

काल रात्री Tuesdays With Morrie वाचायला घेतले. मला वाचायला आवडतं असं कळल्यावर मेलिसाने, (माझी gym partner) मोठया प्रेमाने स्वत:ची काही पुस्तकं आणून माझ्या सुपूर्त केली होती. पुस्तकाची फक्त पहिली ४० पानं वाचली असल्याने त्याच्या बद्दल नाही बोलायचय पण त्याच्या अनुषंगाने काही पूर्वीच्या गोष्टी आठवल्या. मरणाच्या, मृत्युच्या. प्रत्येकाने त्याला वेगळ्या रुपात पाहिल्याच्या.

शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात पानिपतच्या लढाईवर एक धडा होता. त्यात दत्ताजी शिंद्यांच्या तोंडचे एक सुरेख वाक्य होते. मला ते पूर्ण आठवत नाही पण "आप मेला जग बुडाले....." असंच काहीतरी होते. अर्थ असा की आपण मेलो की जग आपल्यासाठी संपून जाते, मागे काय आणि कोण राहिलं याचा विचार व्यर्थ आहे.

दुसरं एक विचीत्र उदाहरण म्हणजे लहान मुलांच बडबड गीत Ring a Ring O Roses. लहान मुलांच्या तोंडात सहज बसणारे हे गाणे प्लेग, मृत्यु, शेवटचा श्वास याबद्दल आहे हे पटकन लक्षातही येत नाही. लहान मुलांना अशी गाणी का शिकवावी ही न कळण्याजोगी बाब आहे.

मॉरी वाचताना असेच काहीतरी विचार मनात भरकटून गेले. मरताना काहीतरी मागे सोडून जातोय याची चुटपुट लागेल का मनाला? आणि ती सर्वात जास्त कुठल्या गोष्टिची? माझ्या मुलीची? नवऱ्याची? आणखी कोणाची?...... माझ्या घराची? ऑफिसची, मित्र मैत्रिणींच्या कोंडाळ्याची, माझ्या जन्मभर नेटीने गोळा केलेल्या वस्तूंची? या गावाची? अशी काय एक गोष्ट आहे की मी ती सगळ्यात जास्त miss करेन?

पलंगावर अंग टेकल आणि प्रश्नाच उत्तर माझ्या समोर उभं राहिलं. मरणाच्या चिरनीद्रेत एकदा प्रवेश केला की जी गोष्ट सर्वात miss होईल ती या पलंगावरच्या उबदार, सुखद झोपेतून जागं होण्याची. नव्या दिवसाची नवलाई miss केल्याची. साखर झोपेतून जागं होऊन सगळ्या चेतना जागवण्याची, जागं होताना आपण कोण, आपली माणसं, आपली कामं, कर्तव्य कुठली याची जाणीव होण्याची.

दत्ताजी शिंद्यांच बरोबर आहे नाही, जिथे चेतनाच संपेल तिथे आपण कोण आणि आपल कोण?

Sunday, March 19, 2006

अस्तित्व

का कुणास ठाऊक पण मला सांगायचा आशय आधी गोष्टरुपाने सांगून नंतर explain करायला मला नेहमीच आवडत, म्हणून आधी गोष्ट, नंतर explaination.
---------

सकाळचे साडे आठ वाजले होते. मनोहरने घडयाळात पाहिलं आणि तो ताडकन उठला. अरे बाप रे! सॉलिड उशीर झाला की आज. सकाळी सकाळी मीटींग होती. चुकणार च्यायला आता.

"मनाली ए मनाली, उठवलं का नाहीस मला. काल सांगितलं होतं ना की लवकर जायचयं," मनोहरच्या त्राग्याला पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. म्हणजे मनाली ऑफिसला निघून गेली होती. भांडण तर झालं नव्हतं काल मग अशी कशी निघून गेली मला न उठवताच? पण मनोहरला यापेक्षा जास्त विचार करायला वेळ नव्हता. ताबडतोब निघणं आवश्यक होतं नाहीतर बॉसकडून चांगली हजेरी घेतली जाणार होती.

त्याने भराभर तोंड धुतलं, कपडे बदलले आणि सरळ दरवाज्याच्या दिशेने धाव ठोकली. गाडी भरधाव सोडून कसाबसा मनोहर एकदाचा ऑफिसला पोहचला. मीटींगला खात्रीने उशीर झाला होता पण जितकं पदरात पडेल तितकं घ्याव या विचारात त्याने ऑफिसमधे प्रवेश केला.

"हाय जेनी,"
जेनी म्हणजे रिसेप्शनीस्ट. हसतमुख आणि बोलभांड. आल्या गेल्याची इत्यंभूत माहिती ठेवणार. आज मात्र जेनीने मान वर करुन सुद्धा पाहिलं नाही. मनोहरला तरी थांबायला वेळ कुठे होता. तो ताड ताड कॉन्फरन्स रुमच्या दिशेने गेला आणि सरळ आत घुसला. मीटींग अर्ध्यावर आली होती. सगळेजण इतके बिझी होते की मनोहरच्या येण्याची दखलही कोणी घेतली नाही. साधं हाय, हलो पण नाही. मनोहरने मधेच आपलं तोंड खुपसलं पण काही फरक नाही, जसे काही आज त्याचे सर्व गुन्हे माफ होते. झालयं तरी काय या सर्वांना? मला वाळीत बिळीत टाकलय की काय आज? मनोहर या विचाराने स्वत:शीच हसला.

नंतरचा पूर्ण दिवस मनोहरशी कोणीच बोललं नाही. कॅन्टिनमधून नेहमी सारखा चहाही नाही. मनोहरने स्वत:हून लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकजण मनोहर त्यांच्या जगात नसल्यासारखाच वावरत होता. दिवस जसा पुढे सरकायला लागला तसं मनोहरला गरगरायला लागलं. तोंडावर थंड पाणी तरी मारावं असं ठरवून तो वॉश रुम मधे गेला आणि आरशासमोर उभा राहिला.... समोर कुणीच नव्हतं. आरसाही मनोहरच प्रतिबिंब दाखवत नव्हता.

"अरे बाप रे! मी मेलोय की काय?" पाया खालची जमीन सरकल्याचा भास मनोहरला झाला, "पण मेलो असतो, तर सकाळी मनाली ऑफिसला नसती गेली, घरातही गडबड असती आणि इथे ऑफिसात निदान दखलतरी घेतली गेली असती. मग काय घडलं असाव," मनोहर आपल्याच विचारांत बाहेर पडला, गाडीत बसला आणि घरी निघाला. पण घरी जायची इच्छा नव्हती म्हणून मग घरा समोरच्या पार्कमधे थोडा वेळ बसून डोकं शांत कराव असं त्याने ठरवलं.

बेंचवर म्हातारे नेने काका बसले होते. नेने काका म्हणजे अगदी निरुपद्रवी प्राणी. मनोहरला बऱ्याच वर्षांत त्याच्याशी बोलल्याचं आठवत नव्हतं....निदान या नेन्यांना तरी मी दिसतोय का?

"नमस्कार काका? काय म्हणता? कसे आहात?" मनोहरने खडा टाकला.

"मी बराय रे. पण तू का असा मलूल दिसतोयस? बरं नाही का?" आज संपूर्ण दिवसांत प्रथमच मनोहरशी कोणीतरी बोललं होतं.

"म्हणजे मी तुम्हाला दिसतोय काका? मी मेलो नाहीये तर. काका, बाकीच्यांना मी अचानक दिसेनासा झालोय हो."

"हो तर मला दिसतो आहेस ना तू पण बाकीच्यांना दिसत नाहीयेस. मी आणि तू एकाच बोटीत बसलोय रे म्हणून एकमेकांना दिसतोय. नाहीतर काल पर्यंत मी तरी तुला कुठे दिसत होतो?"

"हे असं काय बोलताय? काका खरं सांगा..आपण मेलो आहोत का हो?"

"नाही रे मन्या, अगदी मेलोच आहोत असं नाही म्हणता येणार..पण मी रिटायर झालो आणि या सर्वाला सुरुवात झाली..तुझं कारण काय मला माहित नाही पण एवढं सांगतो, जग रितीने आपण अजून मेलो नाही आहोत...आपण फक्त आपलं अस्तित्व गमावलयं."
--------------

(बाप रे! काय भयंकर गोष्ट बनली आहे. मला वाटत या पेक्षा चांगली लिहिता आली असती. बघू पुढे मागे बदलेन.)

आपण ज्या ज्या वेळी राहती जागा बदलतो, शाळा कॉलेजातून बाहेर पडतो, नोकरी बदलतो, देश सोडतो त्या त्या वेळी आपण आपल अस्तित्व त्या ठिकाणातून पुसून टाकत असतो. कधी कधी माणसाची गरज संपून गेली की त्याच्या अस्तित्वाची दखल घेण्याच कारणच उरत नाही.

माणसाचं अस्तित्व किती परावलंबी आहे, नाही? नुसतं परावलंबी नाही तर तकलादू ही. दुसऱ्याने मान्य केल तर आपल अस्तित्व आहे नाहीतर नाही. लोक ओळखतात म्हणून अस्तित्व आहे, आरसा दाखवतो म्हणून अस्तित्व आहे. माणूस प्रत्येक ठिकाणी आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवू पहात असतो. अगदी लहान मूल रडते ते ही आपण असल्याचा दाखला देत असते. एखादा गुणी कलावंत केवळ लोकांनी दखल घेतली नाही म्हणून काळाच्या पडद्याआड जातो. शौर्याने युद्ध लढलेल्या अनेक सैनिकांचं केवळ नोंद नसल्याने अस्तित्व पुसलं जातं. आपल्या वागण्यातून, कामातून, जगण्यातून आपण आपलं अस्तित्व जगवत असतो.

Wednesday, March 15, 2006

ग्रहण

काल आमचं नव्याने सुरु झालेल मंदिर बंद होतं. एक दोघांनी मला संध्याकाळी घरातून बाहेर वगैरे न पडण्याचा सल्ला देखील दिला होता, माझ्या मुलीची मैत्रीण ही खेळायला आली नाही कारण काय तर काल चंद्रग्रहण होतं. ते ही कसलं तर, penumbral lunar eclipse ,ज्यात चंद्रात फारसा फरक पडलेला दिसत नाही.

मला मजा फक्त या कारणासाठी वाटते की ज्या अमेरिकेने चंद्रावर आपला झेंडा रोवला त्याच अमेरिकेत रहाणारे सुशिक्षीत, सुसंस्कृत भारतीय राहू केतू गरीब बिच्चाऱ्या चंद्राला गिळायला टपले आहेत या भ्रामक कल्पनेवर अजूनही विश्वास ठेवतात.

माझ्या मुलीने प्रश्न विचारुन जीव हैराण केला होता, चंद्र ग्रहण म्हणजे काय? किती प्रकारचं असतं? किती वेळ असतं? आपले इंडियन्स त्याला घाबरतात का? आपण आता जर बाहेर गेलो तर आपल्याला काहीतरी होईल का? तू सांगतेस की काही होणार नाही मग आंटी (मैत्रीणीची आई) का घराबाहेर पडायचं नाही म्हणाली?

तिला सांगितलं चल बाहेर लॉनवर जाऊन ग्रहण बघू, तुझ्या कॅमेराने फोटो ही काढ आणि तिथून स्टोर्स मधे जाऊया आणि बघूया आपल्याला काही होतयं का ते? मला वाटत तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळाली.
पण माझ्या प्रश्नाच उत्तर? हे ग्रहण कोणावरचं? चंद्रावरच की आपण स्वत:ला जखडून ठेवलेल्या भ्रामक रुढी कल्पनांवरचं? आणि ते सुटणार कधी?

Tuesday, March 14, 2006

सल


आज कित्येक वर्षांनी मला ती दिसली. सिद्धिविनायकाच्या बस स्टॉपवर आपल्याच विचारांत उभी होती. माझी टॅक्सी भुरकन निघून सुद्धा गेली तिच्या समोरुन, पण तिला पाहिलं आणि कितीतरी आठवणी दाटून आल्या, मनात आणि डोळ्यातही. मागेही एकदा अशीच दिसली होती. त्यामानाने आज बरी वाटली पण तिची कृश मूर्ती, विस्कटलेले केस, अंगावरचे साधे कपडे पाहून तिच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नसावा असं दिसत होतं. नकळत एक अपराधी भावना मनात येऊन गेली.

तिला मधुमीता म्हणू की माहताब. मला वाटत सुरुवात मधुमीतानेच करावी. मधुमीता दत्त. इंजीनिअरींगच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला भेटली. आमच्या मराठी मुला मुलींचा ग्रुप जमून येत होता, ओळख सुरु होती आणि जवळच एका बाकावर बसून एक उंच, नाजूक, निमगोरी, केसांची घट्ट वेणी घातलेली, शेलाटी मुलगी चेहऱ्यावर स्मितहास्य आणून आमच्याकडे पहात होती. थोडयाच वेळात कोणीतरी तिला आमच्यात बोलावल आणि तिची चौकशी सुरु केली.

"मॉधुमिता दत्त. मी अंधेरीला रहाते."

"बंगाली वाटत? हे बघ, आपल्याला मॉधु बिधु जमणार नाही. आम्ही तुला मीता म्हणू. चालेल?" कोणीतरी सुचवलं आणि ती आमची "मीता" झाली ती कायमचीच.

मीताच्या चेहऱ्यावर नेहमी शांत, विचारी भाव असायचे. तिच बोलणं वागणं सुसंस्कृत होत. तिला कधी मोठ मोठयाने बोलताना, खदखदून हसताना पाहिल्याच आठवत नाही. तरीही ती स्मार्ट होती. अभ्यासात, बोलण्यात, वागण्यात तिची सफाई सर्वांनाच आवडून जायची. एक होतं मात्र, ती आमच्यात असूनही आमच्यात नसायची. कॉलेजमधे आम्ही एकत्रच असायचो पण एकदा कॉलेजच्या बाहेर पडलो की मीता कधीच आम्हाला जॉईन व्हायची नाही. ती आमच्यापैकी कोणाच्या कधी घरी आली नाही, सिनेमाला नाही, पिकनीकला नाही. स्वत:च्या घरीही कधी तिने आम्हाला बोलावलं नाही. काही काम असेल तरच ती मला घरी फोन करायची. मीही २-४ वेळाच तिच्या घरी फोन केला होता. तिच्या आईशीही बोलले होते. तिची आई माफक चौकशी करायची. थोडंफार बोलणं व्हायच.

मीता घरात सर्वांत मोठी होती. तिच्यामागे अकरावीत एक भाऊ होता आणि शाळेत जाणारी धाकटी बहिण. मीताचे वडिल बॅंकेत ऑफिसर होते, आई घरातच असायची. अंधेरी इस्टला त्यांचं दोन बेडरुमच घर होतं. मीताचे वडिल कडक शिस्तिचे होते. शिकत्या मुलांनी फॅशन, सिनेमा, पिकनिक्समधे वेळ घातला की त्यांच अभ्यासावरचं लक्ष उडतं या मताचे होते. आई मात्र मृदुभाषी होती. मीता सारखीच. बस! या व्यतिरिक्त आम्हाला मीताची फारशी माहिती नव्हती आणि त्याची गरजही नव्हती.

बघता बघता तीन वर्ष निघून गेली. आमच्यात आणि मीता मधे घट्ट नातं तयार झालं होतं पण फक्त कॉलेजमधे. शेवटच्या वर्षाला नुकतीच सुरुवात झाली होती. लेक्चरला मीता माझ्या शेजारी बसली होती. लेक्चर चालू असताना मधेच मी मीताला काहीतरी गुणगुणताना ऐकल. मी तिच्याकडे पाहिल तर ती आपल्याच नादात पेपरवर बंगालीत काहीतरी खरडत होती.

"ए मीता, काय लिहित्येस?" मी तिला उत्सुकतेने विचारलं.

"काही नाही..असचं आपलं काहीतरी," असं म्हणून ती गोडशी हसली.

"ए तू प्रेमा बीमात तर नाही ना पडलीस? बॉयफ्रेंड तर नाहीना गाठलास?" मला तिची फिरकी घ्यायची लहर आली. त्यावरही मीताने मला फक्त एक गोडंस स्मितहास्य फेकलं. मीताला बॉयफ्रेंड असायला माझी काहीच हरकत नव्हती. या वयांत नाही तर मग केव्हा असणार? पण मीताचा बॉयफ्रेंड कोण असेल? बंगाली कि बिन-बंगाली, हॅंडसम, मीता सारखा उंच, देखणा? आणि तो काय करत असेल म्हणजे नोकरी की कोणी बिझनेस मन? अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली.

"ए मीता कॅन्टीन मधे चल ना. सांग ना मला सगळ. कुठे भेटला? काय करतो? कुठे रहातो?" मी प्रश्नांच्या फैरी झाडल्या.

"किती प्रश्न विचारतेस? त्या पेक्षा असं कर तू स्वत:च त्याला भेट. तो आज येणार आहे कॉलेज सुटल्यावर मला घेऊन जायला. तू भेटणार?" मीताने विचारल.

"भेटणार म्हणजे काय? भेटणारच," मी म्हटल आणि मीता गोडशी लाजली.

संध्याकाळी मी आणि मीता कॉलेजच्या गेट जवळ उभे होतो. काळोख व्हायला आला होता. थोडयावेळाने मीता म्हणाली, "तो बघ, येतोय समोरुन, ओळख कोण?"

मी समोरच्या गर्दीतून येणारे चेहरे न्याहाळू लागले. माझ्या कल्पनेतला उंच, देखणा तरुण कुठेच दिसत नव्हता. जो तरुण समोर येऊन उभा राहिला तो मीतापेक्षा अंमळ बुटका होता. त्याचे दात पुढे आलेले होते, नाकावर एक बऱ्यापैकी मस होता. त्याचे कपडे यथातथा होते. शर्ट बाहेर आलेला, ढगळ पॅन्ट, कुठल्याही अंगाने तो मीताच्या बरोबरीचा नव्हता. त्याला पाहून मी आ वासला नाही हेच काय त्यातल्या त्यात बरं म्हणायच.

"मीट रियाझ, रियाझ शेख," हा दुसरा शॉक इतका जबरदस्त होता की मी हाय हॅलो झाल्यावर तिथून काढता पाय घेतला.

घरी परतताना मी विचार केला की दिसण्यावर का जाव? आणि धर्मावरुन माणसाची परीक्षा करणाऱ्यातील मी नव्हे. पण एकंदरीत रंग चांगले नव्हते. मीताच्या घरी हे नक्कीच चालण्यासारख नव्हतं. हा प्रकार काय आहे याचा आपण शहानिशा करायचाच अस ठरवूनच मी त्या दिवशी झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या एकाही लेक्चरला मीता हजर नव्हती. दुपारी प्रॅक्टीकलला ती आली पण आपल्याच विचारांत हरवलेली होती.

"मीता, मला बोलायचय तुझ्याशी, आपण नंतर कॅन्टीन मधे भेटू."
ठरवल्याप्रमाणे मीता कॅन्टीन मधे आली. मी तिला रियाझ बद्दल छेडलं. कुठे भेटला, काय करतो, हे घरी चालणार आहे का? अनेक प्रश्न विचारले.

मीता नेहमी सारखीच शांत दिसली पण तिच्या शांतपणात एक प्रकारची बेफिकिरी होती.

"बस स्टॉपवर भेटला. अंधेरीला पार्ट टाइम जॉब करतो. बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे. गोवंडीला त्याच्या मोठया भावाबरोबर रहातो. बाकीच कुटुंब उत्तर प्रदेशात असतं. फार चांगला मुलगा आहे. माझी खात्री आहे की ग्रॅज्युएट झाल्यावर त्याला चांगली नोकरी लागेल आणि मलाही, मग दोघे मिळून आमच चांगलं चालेल."

"आणि घरच्यांच काय? तुझ्या डॅडना चालेल का?"

"हं," मीताचा चेहरा क्षणभर पालटला. "नाही चालणार. मला माहित्ये पण धोका पत्करायला मी तयार आहे आणि पुढे मागे सर्व एकत्र होतात."

वाटलं हिला गदागदा हलवाव आणि म्हणाव, जागी हो. कसलं स्वप्न बघत्येस? फ्लॅट मधे वाढलेली तुझ्यासारखी मुलगी गोवंडीच्या चाळीत रहाणार आहे का? काय माहिती आहे त्याच्या कुटुंबाची, माणसांची की तू खुशाल पुढच्या आयुष्याची चित्रं रंगवत्येस. मीतासारखी मुलगी असला वेडेपणा करु शकते यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण मी गप्प राहिले. फक्त एवढचं म्हंटल की, "घाई करु नकोस. शेवटचं वर्ष आहे, अभ्यासात लक्ष ठेव."
त्यानंतर मीता पार बदलून गेली, कधी लेक्चरनां दांडी, कधी प्रॅक्टीकल्सना. हजर असली तरी आपल्याच नादात. संध्याकाळ होण्याची वाट पहात. रोज संध्याकाळी रियाझ तिला घ्यायला यायचा. एव्हाना ही गोष्ट ग्रुप मध्ये सर्वांच्या लक्षात आली होती, माझा ग्रुपच नाही तर प्रोफेसर, लेक्चरर यांनाही कुणकुण लागली होती. कधी कधी मीताचा प्रचंड संताप यायचा. माणसाने इतक वेड व्हाव की चांगल्या वाईटाचा विचारच सोडून द्यावा, अनेकदा तिच्या वागण्याच आश्चर्यही वाटायच.

असच एकदा रागाच्या भरात मी तिला म्हंटल, "मीता, काय लावल आहेस हे तू? अक्कल गहाण टाकली आहेस का? मला वाटतय की एक दिवस सरळ तुझ्या मा ला फोन करावा आणि सांगाव तुझ्या बद्दल. त्या दोघांना कल्पनाही नसेल की तू कॉलेजचा वेळ कसा घालवतेस याची."

"नको नको असलं काहीतरी नको करुस. माझं घरातून बाहेर पडणं बंद होऊन जाईल. काय आनंद आहे तुला त्यात. माझ खूप प्रेम आहे रियाझवर पण देईन अभ्यासावरही लक्ष," मीताने मनधरणी केली.

त्यादिवसा नंतर ती आमच्या पासून दूर दूर राहू लागली. वर्गात लांब बसायची, कॅन्टीनमधे भेटणं नाही, दिलखुलास बोलणं नाही आणि आठवडया दोन आठवडयात पुन्हा ये रे माझ्या मागल्या. मीताची गैरहजेरी वाढतच चालली होती. त्यातच सेमिस्टर परीक्षा आल्या...मीताची गैरहजेरी इतकी जास्त झाली होती की तिला परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात आली.
आपल्याला नसत्या भानगडीत पडायचं काही कारण नाही अशी ग्रुपमधे प्रत्येकाची भावना होती. राहून राहून मला आश्चर्य वाटत होतं की आता काय होणार? किती दिवस घरच्यांपासून ही गोष्ट लपून रहाणार?
परीक्षा संपल्या, शेवटचं सेमिस्टर सुरु झालं, मीताचा काही पत्ता नव्हता. तिच्या घरी फोन करुन उगीच आपल्याला नको त्या चौकशीला समोर जायला नको म्हणून कधी फोनही केला नाही...आणि मग एके दिवशी अवचितच मीता आणि रियाझ कॉलेजमधे भेटायला आले.

अंगावर साडी, गळ्यात एक काळा पोत आणि तोंडभर हसू घेऊन मीता उभी होती, "आम्ही निका केला..दोन दिवसांपूर्वी. तुम्हा सगळ्यांना भेटून सांगावसं वाटलं."

"पण घरी कधी सांगितलस?"

"घरी कुठे सांगितलय? पळून जाऊन केलं. मा ला चिठ्ठी ठेवली होती, त्यांना नक्कीच कळलं असणार. आज जाऊ घरी असं रियाझ म्हणतोय पण डॅड घरात घेणार नाहीत हे मला माहित्ये."

"अगं पण मीता...."

"मीता नाही माहताब. निका पढण्यापूर्वी धर्म बदलला." मीता म्हणाली.

मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. मीताचं इतक्या दिवसांपासूनच वागण पाहिलं तर हे सर्व अपेक्षितच होतं. यापुढे तिला फार काही विचारण्यात अर्थ आहे असही मला वाटत नव्हतं. फक्त "कॉलेजच काय करणार?" एवढं मात्र विचारुन घेतल. पण त्यावरही अजून काही ठरवलेलं नाही असं बेफिकिर उत्तर मीताने दिलं.

त्यानंतर कित्येक महिने, वर्षे मीताची भेट झाली नाही. मी माझ्या आयुष्यात व्यस्त झाले होत. लग्न, नोकरी, घर यासगळ्यात मीताची आठवणही काढायलाही वेळ नव्हता आणि मग एक दिवस अचानक माझी तिची भेट अंधेरी स्टेशनवर झाली. जुना पंजाबी ड्रेस, विस्कटलेले केस, खांद्यावर शबनम आणि कडेवर एक दिड वर्षांच बाळ.

"कित्ती बदलली आहेस तू मीता. ओळखलच नाही बघ तुला. कशी आहेस? काय करतेस? आणि हे बाळ कोण? मुलगा की मुलगी? कुठे निघाली आहेस? आणि रियाझ काय म्हणतो?" मी एका दमात सगळे प्रश्न विचारुन घेतले.

मीताने नेहमीसारख स्मितहास्य केलं पण त्यात एक प्रकारचा विशाद होता. मला कससच वाटून गेल.

"ही सारा. सव्वा वर्षांची आहे. रियाझ दुबईला असतो. तिथे नोकरी करतो."

"बरं झालं ना. तू का नाही गेलीस? की जाणार आहेस लवकरच?"

"नाही गं. तलाक देऊन गेला. आपलं जमतं नाही, तू आणि मी भिन्न परिस्थितीतून आलो आहोत असं म्हणायला लागला. मी तयार होते गं जमवून घ्यायला. सारा फक्त चार महिन्यांची होती. तेव्हापासून मा कडे असतो आम्ही दोघी. डॅड बोलतही नाहीत कधी बोललेच तर म्हणतात, तुझ्यामुळे आमची लाज गेली. धाकटया बहिणीच्या लग्नात अडथळे येतील. सगळीकडे छी थू झाली. आता आणि हे आणखी एक लोढणं गळ्यात बांधून घेतलं आहेस," मीताच्या डोळ्यात पाणी तरळत होतं.

समोरच्या प्लॅटफॉर्मवरुन ट्रेन धडधडत गेली की मीताच्या गोष्टीने पायाखालची जमीन थरथरली ते नाही सांगता यायचं.

"तू काही करतेस का मीता? म्हणजे नोकरी वगैरे?"

"हो. हल्लीच एके ठिकाणी असेंब्लरचा जॉब लागला आहे."

"असेंब्लर?"

"मी कुठे ग्रॅज्युएशन केलं? जी मिळाली ती नोकरी धरलीये गं. जगणं नकोस झालयं. मा कडे फार दिवस नाही राहू शकत. पायावर उभ रहायच म्हंटल तर कुठुन तरी सुरुवात करायला हवीच ना," मीता मंद हसत म्हणाली.

माझी ट्रेन येत होती, "मीता मला निघायला हवं, मीटींग आहे ऑफिसात महत्वाची, चुकवून चालणार नाही." घाई घाईत पर्स मधे हात घातला आणि पाचशेची एक नोट साराच्या हातात कोंबली आणि ट्रेनमधे घुसले.

"तुझा नंबर दे ना गं," मीता खालून ओरडली. गडबडीत लक्षातच आलं नव्हतं माझ्या आणि आता इतक्या गर्दीतून देणं अशक्यच होतं. त्यानंतर पुन्हा मीताची भेट झालीच नाही. दिसली ती आज. सिद्धिविनायकाच्या बस स्टॉपपाशी.

पण मनाला एक गोष्ट जरुर सलते. एक फोन कॉल मीताच्या इच्छेविरुद्ध मी तिच्या मा ला करायला हवा होता का? आपल्याला काय घेणं देणं? नसतं लफडं आपल्या मागे नको म्हणून मी नामानिराळे राहून तिच्या अधोगतीला जबाबदार आहे का? मैत्रीण तर तशीही गमावणारच होते, पण अचूक निर्णय घ्यायला मी कचरले होते हा सल अजूनही मनात कायम आहे.

marathi blogs