प्रकार

Friday, December 28, 2007

भाकरीचा चंद्र

"जगण्यासाठी खाणे की खाण्यासाठी जगणे" हा प्रश्न माझ्यासारख्या खवय्यांना विचारला तर उत्तर कोणते मिळेल ते वेगळ्याने सांगायची गरज वाटत नाही. गरीबाची भूक असो वा श्रीमंताची भूक किंवा सुर्व्यांच्या कवितेतील अगतिकताही शेवटी भाकरीपर्यंत येऊन विसावते. ज्या भाकरीपायी जगण्याला अर्थ लाभतो ती भाकरी, पोळी, चपाती हा आपल्या रोजच्या आहारातील, गरीबांपासून श्रीमंतांना परवडणारा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. इंग्रजीत अशा अन्नाला स्टेपल फूड असे म्हणतात. उपलब्ध धान्याच्या पिठापासून तयार केलेल्या पाव (ब्रेड) आणि चपाती (फ्लॅटब्रेड) जगातील अनेक देशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. या ब्रेड आणि चपातीची ओळख जगाला नेमकी कधी पटली हे शोधणे तसे कठिण आहे परंतु माणसाने अन्न शिजवायला सुरुवात केल्यावर लवकरच त्याने पाव आणि चपाती बनवायला सुरुवात केली असावी असे मत मांडले जाते. जगातील बहुतांश देशांत (अतिपूर्वेकडील काही देश वगळता, चू. भू. दे.घे) पाव आणि त्याचे विविध प्रकार मुख्य आहारात घेतले जातात. या लेखात जगभरातील काही प्रसिद्ध चपात्यांची (फ्लॅटब्रेड्स) ओळख करून घेता येईल.

गव्हाचे पीठ करून (आणि मैद्यापासून ) प्रामुख्याने चपातीची निर्मिती होते हे सर्वांना माहीत असावे. याचबरोबर प्रादेशिक धान्यापासूनही चपाती बनवली जाते. जसे तांदूळ, ज्वारी, बाजरी, बार्ली, ओट, राय, मका इ. च्या पिठांपासूनही जगातील विविध भागांत चपाती बनवली जाते. जगभरात चपाती ही विविध पद्धतींनी खाल्ली जाते.

गहू हे मूळचे वायव्य आशियातील धान्य आहे. इ.स.पू. ५००० च्या सुमारास ते भारतात आल्याचे सांगितले जाते. पाव आणि चपातीही त्याच सुमारास भारतात आली असावी आणि पश्चिमेकडील इतर देशांतही उदा. इजिप्तमध्ये गेली असावी. इजिप्तमधून ग्रीस आणि ग्रीसमधून युरोपात तिचे मार्गक्रमण झाले असावे. तत्कालीन लोक आधी गहू फक्त चावून खात असत. कालांतराने ते चेचले असता आणि त्याचे पाण्यातील मिश्रण विस्तवावर शेकले असता तयार होणारा पदार्थ अधिक चवदार आणि टिकाऊ असतो याचे त्यांना आकलन झाले. नंतर त्यात यीस्ट मिसळून फुगणारे पाव किंवा यीस्ट न मिसळता चपाती बनवण्यात येऊ लागली. इजिप्तच्या प्राचीन पिरॅमिड्समधून पाव सापडल्याची नोंद होते.

ख्रिश्चन आणि यहुदी धर्मांत या चपातीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. काही विधींत चपातीचे तुकडे भक्तांना भरवण्याची प्रथा या धर्मांत दिसते. भारतात पुरणपोळीसारखे पदार्थ नैवेद्याला दाखवले गेले तरी चपातीला धार्मिक महत्त्व नाही असे वाटते. (चू. भू. दे. घे.)



१. पातळ रश्श्यात बुडवून किंवा भाजीचा घास भाकरीने उचलून (स्कूपिंग). उदा. भाकरी, पोळी, पुरी
२. भाजी/ सारण चपातीवर पसरवून उदा. पिझ्झा
३. भाजी/ सारण चपातीत गुंडाळून उदा. मेक्सिकन बरिटो, इटालियन स्ट्रॉम्बोली किंवा कॅलझोन
४. भाजी किंवा सारण चपातीच्या आत भरून उदा. आलू पराठा, पनीर पराठा, पुरणपोळी, पिटा.


यापैकी लेखिकेला प्रिय असणार्‍या काही प्रमुख चपात्यांचा परामर्श या लेखात घेतला आहे.

पुरी, पोळी, पराठा, रोटी आणि इतर भारतीय चपात्या

भारतीय जेवण हे चपात्यांशिवाय अपूर्ण आहे. उत्तरेकडे रोटी, पराठे, भटुरे. महाराष्ट्र, गुजराथ आणि इतर प्रदेशांतील भाकरी, पोळी, पुरी, फुलके. दाक्षिणात्यांचे तांदूळ किंवा कडधान्यांचे डोसे आणि बंगाल, ओरिसात पुरी आणि लुची. भारतात इतरही अनेक चपात्या बनवल्या जातात.

उत्तरेत तंदूर भट्टीत चपात्या भाजण्यात येतात. भारताखेरीज पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणपर्यंतच्या प्रांतातही नान किंवा रोटी भाजण्यासाठी तंदूरचा वापर करतात. ही भट्टी मोहेंजेदाडो आणि हडप्पाच्या उत्खननातही सापडल्याचे (तेवढी जुनी प्रथा असल्याचे) सांगितले जाते. यापैकी नान हा पदार्थ मूळचा इराणी. भारतात, मुघल काळात तो अतिशय प्रसिद्ध झाला. यासह, मुघल काळापासून प्रसिद्ध अशी आख्यायिका असणारी दिल्लीला चांदनी चौकाजवळ परांठेवाली गली आहे. अनेक प्रकारच्या भाज्या, डाळी, पनीर आणि मसाले वापरून बनवलेले सुमारे ४०-५० प्रकारचे तेलात तळलेले किंवा तंदूरमध्ये भाजलेले आणि दही आणि लोणच्यासोबत वाढले जाणारे परांठे या गल्लीत मिळतात.

पं नेहरू, विजयालक्ष्मी आणि इंदिरा परांठेवाली गलीत खाताना


महाराष्ट्र, गुजराथ आणि कर्नाटकात हाताने थापल्या जाणार्‍या भाकर्‍या आणि त्यासोबत खाल्ला जाणारा कच्चा कांदा, ठेचा, पिठले आणि झुणक्याचा स्वाद वाचकांना नव्याने वर्णन करायला नको. गुजराथी रोटल्या किंवा विस्तवावर फुलवलेले फुलकेही पश्चिम भारतात विशेष प्रसिद्ध आहेत.

हाताने थापल्या जाणार्‍या भाकर्‍या आणि पोळपाटावर लाटण्याने लाटल्या जाणार्‍या पोळ्यांपेक्षा दाक्षिणात्यांचे डोसे (किंवा दोसे) किंचित वेगळे वाटतात पण या डोशांचे विविध प्रकार ऐकून तोंडाला पाणी सुटेल. तांदूळ आणि उडदाची डाळ वाटून डोसे बनतात. याखेरीज रवाडोसा, मूगडाळीचा डोसा, मैद्याचा डोसाही बनवला जातो. या डोशांपासून बनलेले मसाला डोसा, उत्तप्पा, ओनिअन डोसा, चीज डोसा विशेष प्रसिद्ध आहेत. कुरकुरीत डोशासोबत सांबार, चटणी, कोंबडी किंवा मटणाचा रस्सा वाढला जातो.

पापड ही देखील भारतात बनणारी सुप्रसिद्ध चपाती गणता येईल.

इटलीचा पिझ्झा

पिझ्झा ही जगातिकीकरणाच्या युगात अल्पावधीत प्रसिद्ध झालेली मूळ इटलीतील चपाती. पिझ्झ्याचा शोध कसा लागला असावा याविषयी काही मजेशीर अटकळी बांधल्या जातात. काही चिनी रहिवाशांच्या मते, इटलीचा प्रसिद्ध मुसाफिर मार्को पोलो चीनला राहून इटलीत परतला तेव्हा त्याला चीनमधील कांदापोळीची राहून राहून आठवण येत असे. तो प्रकार इटलीत करून पाहताना त्याला पिझ्झ्याची पाककृती सुचल्याची आख्यायिका सांगितली जाते परंतु तज्ज्ञांच्या मते ही गोष्ट खरी नसावी.

सांगितले जाते की रोमन, ग्रीक आणि पर्शियन सैनिक आपल्या भाकरीवर कांदा, लसूण आणि तेल पसरवून ती खात. बहुधा, युद्धातील धामधुमीत असे अन्न खाणे त्यांना सोयिस्कर पडत असावे. पिझ्झ्याचे मूळ या पदार्थात असणे शक्य आहे. तसेच, भूमध्य सागरी देशांत फोकाचिया नावाची एक भाकरी अतिशय प्राचीन समजली जाते. तिच्यावर कांदा, लसूण आणि ऑलिवच्या फळांचे तुकडे पसरवून ती भट्टीत भाजली जाते. तिलाही पिझ्झ्याची प्राचीन पाककृती मानता येईल. १६व्या शतकांत टॉमेटो द. अमेरिकेतून युरोपात आल्यावर १८ व्या शतकाच्या अखेरीस टॉमेटोची पेस्ट भाकरीवर पसरवून खाण्याची प्रथा इटलीतील गरीब जनतेत मूळ धरू लागली. आज जो पिझ्झा खाल्ला जातो तो अशाप्रकारे अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते.

आज जगभरात अनेक प्रकारे पिझ्झा बनवला जातो. कोंबडी आणि इतर लाल मांसाचे तुकडे, कांदा, भोपळी मिरची, ऑलिवची फळे, आंचोविज मासे, अननसाच्या, सफरचंदाच्या फोडी, मक्याचे दाणे, पनीर, यांनी पिझ्झा सजवला जातो तरी पिझ्झ्यावर पसरवले जाणारे प्रमुख पदार्थ टॉमेटोचा सॉस आणि चीज हे होत. इटलीतील दोन प्रमुख प्रकारचे पिझ्झा हे मूळचे समजले जातात...

१. मरिनारा - हे विशेष करून मासे पकडणार्‍या कोळ्यांचे खाद्य (गरीबांची भाकर) म्हणून मरिनारा हे नाव पडले.

२. मार्गारेटा - चपातीवर पसरवलेले मोझरेला चीज, टॉमेटो सॉस आणि बेसिलची पाने यापासून बनलेला पिझ्झा इटलीची राणी मार्गारेट हिला भेट देण्यात आला होता. इटालियन झेंड्याशी जवळीक साधणारा हा पिझ्झा राणीचा आवडता ठरला आणि पुढे तिच्या नावाने ओळखला जाऊ लागला.


पिझ्झ्याची चपाती करंजीप्रमाणे बंद करून तयार होणारा कॅलझोन आणि चपातीत चीज आणि इतर पदार्थ गुंडाळून तयार होणारी इटालियन गुंडाळी स्ट्रांबोलीही प्रसिद्ध आहेत.

ग्रीक पिटा आणि अरबी खबूस

ग्रीक पिटा आणि त्यासदृश असणारी खबूस नावाची जाड अरबी चपाती मूळ इराणची पण अरबस्तानात अतिशय प्रसिद्ध आहे. रोजच्या खाण्यातील एक महत्त्वाचा घटक समजली जाते. ग्रीस आणि आजूबाजूचे भूमध्यसागरी प्रदेश, इराण, अरबस्तान, अफगाणिस्तान अशा अनेक देशांत ही "पिटा" चपाती खाल्ली जाते.

ही चपाती दिसताना चपट दिसली तरी यीस्ट घालून थोडीशी फुगवलेली असते. खाताना तिचे पापुद्रे फाडून खिसा तयार केला जातो आणि त्यात मांस, भाज्या, फलाफल, कबाब, अरबी हामूस इ. भरले जाते. ग्रीसमध्ये ही चपाती वापरून तयार केलेले गायरोज आणि अरबस्तानात हामूस, ताहिनी आणि मांस भरून तयार केलेले शवर्मा (किंवा श्वर्मा) अतिशय प्रसिद्ध आहेत.
श्वर्मा कॉर्नर


भारतात गल्लोगल्ली जशा चाटच्या गाड्या उभ्या दिसतात तशा अरबस्तानात श्वर्माचे कोनाडे आणि गाड्या दिसतात. बाजूला जे श्वर्मा कॉर्नरचे चित्र आहे त्यात आचारी, सुरीने शिजवलेले मांसाच्या थप्पीतून थोडे मांस कापून घेताना दिसत आहे. हे मांस खबूसमध्ये भरून त्यासह हामूस (काबूली चण्याची पेस्ट), ताहिनी (तिळाची पेस्ट), काकडी, खारवलेली विनेगरमधील लोणची, फ्रेंच फ्राईज इ. भरतो. ग्रीसमध्ये मिळणार्‍या गायरोजची पाककृती थोड्याफार प्रमाणात अशीच. फक्त चपातीत भरलेले पदार्थ, मसाले बदलतात. अतिशय चविष्ट लागणारा हा पदार्थ भूमध्य सागरी प्रदेश आणि अरबस्तानातील सुप्रसिद्ध फास्टफूड गणले जाते.

अमेरिका रहिवाशांना हे दोन्ही पदार्थ थोड्याफार चौकशीने आजूबाजूच्या परिसरांत मिळण्याची शक्यता आहे. चाखून पाहाल तर प्रेमात पडाल याची खात्री देता येईल.



मेक्सिकन टॉर्टिया

मेक्सिकन आहार हा मला भारतीय आहाराशी बराचसा मिळता जुळता भासतो. चेपलेल्या राजम्याची आणि इतर कडधान्यांची उसळ, ऍवोकॅडोची हिरवीगार चटणी, टॉमेटो-कांद्याची कोशिंबीर, आंबवलेले घट्ट दही, मांस पेरून केलेली किंवा फक्त कांदा, भोपळी मिरची, टॉमेटो चिरून परतलेली मुख्य भाजी , वाफाळणारा मेक्सिकन पुलाव आणि मऊसूत मेक्सिकन चपात्या- टॉर्टिया.

मूळ द. अमेरिकेतील पण संपूर्ण अमेरिका खंडात प्रसिद्ध असणारी टॉर्टिया ही चपाती मका आणि गहू यांच्या पिठापासून आणि मैद्यापासून बनवली जाते. स्पॅनिश लोक द. अमेरिकेत आल्यावर त्यांनी या मूळ मेक्सिकन चपातीला टॉर्टिया असे नाव दिले. द. अमेरिकेतील वेगवेगळ्या देशांत अशा चपात्या कधी भाजून तर कधी तळून बनवल्या जातात.
टॉर्टिया बनवणारी मेक्सिकन स्त्री


अमेरिकेत किडोबा, चिपोट्ले अशा मेक्सिकन ग्रिल्स किंवा पारंपरिक मेक्सिकन उपहारगृहांत, बायका स्वयंपाक करतानाचे एखादे पारंपरिक मेक्सिकन भित्तिचित्र नजरेस पडले तर पोळपाट, लाटण्याने चपात्या लाटणार्‍या बाया, लसूण आणि कांद्याच्या गड्ड्या, टॉमेटो, मिरच्या अशा भाज्या आणि चुल्हाणावर भाजल्या जाणार्‍या चपात्या हे सर्व हमखास नजरेस पडेल.

या चपात्यांत सारण भरून त्याची गुंडाळी केली असता त्यांना बरिटो, टॅको आणि विविध नावांनी ओळखले जाते. अमेरिकेत प्रसिद्ध असणारा बरिटो मात्र मेक्सिकोवासियांचे आवडते अन्न नाही. इतर अनेक खाद्यपदार्थांप्रमाणे अमेरिकन सोपस्कार होऊन हा पदार्थ पक्का अमेरिकी बनला आहे.

जगभरात मुख्य अन्न समजल्या जाणार्‍या अनेक पद्धतीच्या चपात्या बनतात. आंबोळी किंवा दोश्यांप्रमाणे दिसणार्‍या इथोपियन चपात्या इंजेरा, सिरिया आणि लेबनानची मार्कूक, चीनमधील बिंग, भारतातील तळून खाण्याची चपाती - पापड आणि त्यासारखेच मेक्सिकोत बनणारे टॉर्टिया चिप्स असे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. या लेखात लेखिकेने आपल्या आवडत्या चपात्यांची माहिती थोडक्यात दिली आहे. तुमच्या आवडत्या चपात्यांची माहितीही करून घ्यायला आवडेल.





१ यहुदी प्रथेबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.
२ राणी मार्गेरिटाबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.


  1. नेहरूंचे परांठेवाली गलीतील चित्र www.tribuneindia.com येथून आणि बाकीची चित्रे विकिवरून घेतली आहेत.

  2. देश-परदेशांतील चपात्यांविषयी अधिक माहिती येथे मिळेल.

  3. परांठेवाली गलीविषयी एक हौशी चलचित्र येथे मिळेल.

Tuesday, December 18, 2007

कुठे गायब झालीयेस?

हा प्रश्न या अनुदिनीवर येऊन विचारणार्‍या आणि इतरत्र विचारणार्‍या सर्वांचे आभार. आपण एकमेकांची आठवण काढतो, विचारपूस करतो, आपुलकीने चौकशी करतो - त्या सर्वांसाठी मी इथेच आहे, आयुष्यात काही सुखद बदल झाल्याने कामांतून डोकं काढायला वेळ मिळत नाही इतकेच.

गेली काही वर्षे मी एकाच जागेवर उभी होते आणि आयुष्य झपाट्याने पुढे जात होते. त्यावेळेस बरेचदा ’मी कुठे आहे?’ हा प्रश्न स्वत:ला विचारावा लागे. जग आपल्याला सोडून निघून जाते आहे ही भावना माणसाला वेड लावेल इतकी निराश करू शकते. परंतु निराश व्हायचे की त्यातून उत्तर शोधायचे हे निवडण्याचा हक्क आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

काही वर्षांपूर्वी इतरांपेक्षा थोड्या उशीरा कुटुंबासह अमेरिकेत आलो. इथे आलो तेव्हा भारतात बस्तान बसले होते. उच्च पदावरची नोकरी सोडून कुटुंब आणि लहान मुलीसाठी कायम घरी राहणे याला फार मोठा त्याग वगैरे म्हणणार नाही, कुटुंबासाठी इतके तर करता येणे सर्वांनाच शक्य असते पण ९/११ त्यानंतर आलेले अस्थिरतेचे वातावरण, आऊटसोर्सिंग या सर्वांमुळे अमेरिकेचे कायम रहिवासी होण्याच्या स्वप्नाला जागोजागी खीळ बसत होती.

अनोळखी जागा, एकटेपण, हातातल्या गोष्टी सोडून देण्याने आलेले रिकामेपण, घरात बसण्याखेरीज काहीही करता न येण्याच्या कायद्याने आलेली निराशा यांतून असुरक्षिततेची भावना न बळावती तर नवल होते. या काळांत खंबीर राहण्यासाठी जर मला कोणाची मदत झाली असेल तर या अनुदिनीची.

मागे वळून पाहिले तर पहिले काही लेख मीच माझ्या मनातील भीती, असुरक्षितता घालवण्यासाठी लिहिले आहेत असे दिसून येते. पुढे मात्र कल बदलला. लिहिण्याची आवड उत्पन्न झाली. काहीतरी खरडलेले लोक वाचतात तर मग मी चांगले लिहायचा प्रयत्न का करू नये ही आशा मनात डोकावली. मनोगत, विकिपीडिया, उपक्रम या माध्यमांतून लिखाण फुलत गेले. त्याला प्रोत्साहन लाभले ते वाचकांचे. माझी आठवण काढणार्‍या सर्वांचे. माझ्या लेखांचे कौतुक करणार्‍या, पटले -नाही पटले ते आवर्जून सांगणार्‍या रसिकांचे. पुढे जाणार्‍या जगासोबत पावले उचलायला या अनुदिनीने आणि तिच्या वाचकांनी मला पायांत बळ दिले.


आज इतक्या वर्षांनी परिस्थिती अचानक बदलली. कायद्याने मला इतर अमेरिकी नागरीकांप्रमाणे हक्क आणि सुविधा घेण्याची परवानगी मिळाली. पण या शर्यतीत पळण्याएवढे बळ पायांत आहे का याची कल्पना नव्हती. मनात बळ मात्र कायम होते. ’जे काही गमवण्यासारखं होतं ते आधीच गमवून बसली आहेस ना, मग आता काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न कर.’ असे मन बजावून सांगत होते. जिथे मागे हटायला जागाच नाही तिथे पुढे जाण्यावाचून गत्यंतर नसते बहुधा. किंवा....

आयुष्य खरंच खूप सोपं असतं, आपणच त्याला कठिण करून ठेवतो - आपल्या मनातल्या भीतीने, असुरक्षिततेच्या भावनेने. जी स्वप्नं अपुरी राहिली होती ती पूर्ण करण्याची संधी चालून आली आणि आलेली संधी मी सोडली नाही.

आयुष्य आता बदललं आहे. अचानक जे हवं होतं ते मिळून गेलं आहे. आयुष्याच्या गतीने धावणं आता भाग आहे. हेच तर हवं होतं इतक्या वर्षांपासून. पण या चक्रात मला हल्ली लिहायला वेळ होत नाही. धावण्याची गती सापडली की तो वेळही मिळेल. तेव्हा पुन्हा लिहिनच. गेली २ वर्षे ही अनुदिनी लिहिते आहे. तिने आणि वाचकांनी मला भरभरून दिले, या कौतुकाचा त्याग नाही करायचा. या प्रेरणास्थानाला सोडायचे नाही आहे.

मी इथेच आहे, इथेच राहणार आहे. सध्या थोडी व्यग्र आहे इतकंच, ती व्यग्रता दूर झाली की मनात आलेलं...लिहून काढायला इथेच विसावणार.

Tuesday, October 30, 2007

भयोत्सव

ऑक्टोबरच्या महिन्यापासूनच अमेरिकेत एकेका सणाला सुरुवात होते. ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, नोव्हेंबरमध्ये थॅंक्स गिव्हिंग आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस. भयकथांच्या विलक्षण आवडीमुळे हॅलोवीनबद्दल फार पूर्वी पासूनच वाचले, ऐकले होते. त्यावेळी असा कसा हा सण? यामुळे समाजात आणि विशेषत: लहान मुलांत भीती वाढत असावी की काय असे वाटत असे, परंतु अमेरिकेला आल्यावर या विचारांतला फोलपणा कळून आला. घाबरण्याचा आणि घाबरवण्याचा हा सण अतिशय लोकप्रिय असल्याचे अनुभवास आले. लहान थोरांना आवडणाऱ्या आणि या महिन्यात येणाऱ्या हॅलोवीनच्या सणाचे औचित्य साधून हा लेख उपक्रमावर देत आहे.

हॅलोवीनचा इतिहास: हॅलोवीनची पाळेमुळे प्राचीन ब्रिटन व आयर्लंड मधील केल्टिक संस्कृतीत सापडतात. नोव्हेंबरची पहिली तारीख हा नूतन वर्षारंभाचा दिवस मानला जाई. तसेच, तो त्या काळी उन्हाळ्याचा शेवटचा दिवस मानला जाई. त्यानुसार या दिवसापर्यंत पशुपालन व शेतीची बरीचशी कामे उरकली जात. या दिवसानंतर काळोखी आणि गारठवून टाकणार्‍या थंडीचा ऋतू सुरु होई. नेमकी हीच वेळ गेल्या वर्षभरात जे कोणी मरण पावले त्यांचे मृतात्मे घरी परतण्याची समजली जाई.

आख्यायिकेनुसार मृतात्म्यांना या दिवशी नवी शरीरे शोधायची संधी मिळत असे, त्यामुळे ते सर्व शरीरांच्या शोधात गावांत येत. हा दिवस वर्षातला असा दिवस मानला जाई (जातो) ज्यादिवशी आत्मे आपले जग सोडून मर्त्य मानवाच्या जगात सहज प्रवेश करू शकत (शकतात).

या दिवशी मृतात्म्यांनी आपल्या शरीराचा ताबा घेऊ नये म्हणून त्यांना भिवविण्यासाठी गावकरी गावाजवळील टेकड्यांवर किंवा घराबाहेर मोठा जाळ करत. जनावरांचा बळीही त्याठीकाणी दिला जाई. याचबरोबर ते भयानक मुखवटे व भीतिदायक वेष धारण करत; यामुळे नव्या शरीरांच्या शोधात येणाऱ्या मृतात्म्यांना खरी माणसे कोण व मृतात्मे कोण हे समजणे कठीण होईल अशी गावकऱ्यांची धारणा असे. इसवी सनानंतर पहिल्या शतकात रोमन साम्राज्याने ब्रिटन आणि आयर्लंडवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यावर "पोमोना" या फळा-झाडांच्या रोमन देवतेची पूजा करण्याचा सणही याच दिवशी साजरा होऊ लागला. ऍपल बॉबिंग (एका मोठ्या बादलीतील किंवा हौदातील पाण्यात सफरचंदे सोडून, ती हात मागे बांधून तोंडाने पकडणे) हा हॅलोवीनचा प्रसिद्ध खेळ पोमोनाला समर्पित आहे. यानंतर सुमारे सातव्या शतकात १ नोव्हेंबर हा संतांचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी चर्चकडून संतपद मिळालेल्या किंवा न मिळालेल्या सर्व संतांचे स्मरण केले जाते, यालाच ऑल हॉलोज डे किंवा होली डे किंवा होलीमस (holy day = 'पवित्र दिवस') मानले जाऊ लागले व या दिवसाची पूर्वसंध्या हॅलोवीन म्हणून साजरी केली जाऊ लागली.

DSC00560
पोहोण्याच्या तलावात सफरचंदे पकडणारी मुले



आर्यलंडमधून विस्थापित होऊन अमेरिकेत स्थिरावलेल्या आयरिश लोकांनी हॅलोवीनचा सण अमेरिकेत आणला. हॅलोवीनचा सण प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, पोर्टो रिको (प्वेर्तो रिको), आयर्लंड व ब्रिटन मध्ये साजरा केला जातो. अमेरिकेत १९व्या शतकात या सणाने मूळ धरल्याचे उल्लेख वाचायला मिळतात.

हॅलोवीनच्या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जॅक-ओ'-लॅन्टर्न नावाचा भला मोठा भोपळा कोरून केलेला कंदील. अमेरिकेत भोपळ्याचे पीक चांगले घेता येते आणि हॅलोवीनच्या हंगामात ते तयारही होते. भोपळ्याला मानवी डोक्याचा आकार देऊन त्यावर डोळे, नाक, तोंड कोरणे दिसतेही भीतीदायक. ३१ तारखेपर्यंत या भोपळ्यांवर मुखवटे कोरले जातात. रात्री या भोपळ्यांत मेणबत्ती पेटवली जाते. दिवाळीत आपल्याकडे जसा कंदील बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी लावला जातो तसाच हा जॅक-ओ'-लॅन्टर्न प्रज्वलित करून बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी ठेवला जातो. या जॅक-ओ'-लॅन्टर्नची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे.

कथा जॅक-ओ'-लॅन्टर्नची: या कथेची विविध रूपे आहेत, तरी बऱ्याच कथांतील एक कथा उचलून येथे थोडक्यात देत आहे.

जॅक नावाच्या एका अत्यंत हुशार परंतु तितक्याच आळशी आयरिश इसमाने आयुष्यभर काहीही केले नाही. त्याने कधी कुठले चांगले काम केले नाही की कधी कुठले वाईट काम केले नाही. त्याच्या मृत्यूची वेळ जशी जवळ आली तसे त्याला आणायला सैतान आला, परंतु आपल्या हुशारीने त्याने सैतानाला चकवून आपले आयुष्य वाढवून घेतले. असे दोन-तीन वेळा झाल्याने सैतान त्याच्यावर रुष्ट झाला व तुला आणायला परत येणार नाही असे वैतागून सांगून निघून गेला.


जॅक’ओ लॅन्टर्न


तरीही एके दिवशी अचानक नकळतच जॅकला मृत्यू आला व आपण स्वर्गाच्या मोतिया रंगाच्या फाटकापाशी उभे आहोत हे त्याला जाणवले. स्वर्गाच्या दारात उभ्या असणार्‍या सेंट पीटरने जॅकला सांगितले, 'तू आयुष्यात एकही चांगले काम केले नाहीस. तुला स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाही. तेंव्हा तुला बहुधा नरकात जावे लागेल.'

जॅक यानंतर सैतानासमोर गेला. सैतानाच्या मनात जॅकला अद्दल घडवायची असल्याने त्याने जॅकला सांगितले, 'तुला नरकातही प्रवेश मिळू शकत नाही कारण आयुष्यभरात तू कोणाचेही वाईट केलेले नाहीस.'

यावर हिरमुसला होऊन जॅकने विचारले, 'तर मग मी या अंधारात जाऊ तरी कोठे?' यावर सैतानाने जवळ पडलेल्या एका कोरलेल्या पोकळ भोपळ्यात नरकातला पेटता कोळसा घातला व सांगितले, 'जेथून आलास तेथेच परत जा आणि कायमचा अंधारात हा कंदील घेऊन भटकत राहा.'

कधी कधी हॅलोवीनच्या रात्री दूरवर अंधारात अजूनही जॅक दिवा घेऊन भटकताना दिसतो म्हणतात.

अमेरिकेतील हॅलोवीन: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील दुकाने हॅलोवीनच्या विविध साहित्यसामुग्रीने भरलेली असतात. यांत नानाविध आकारांचे भोपळे, भोपळ्याच्या आकाराचे प्लॅस्टिकचे कंदील, भयानक मुखवटे व वेष, हॅलोवीनची शुभेच्छापत्रे, आणि या सणाला साजेशा वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया यांचा समावेश असतो. तसेच घराच्या सुशोभीकरणासाठी बनावट वटवाघुळे, काळ्या मांजरी, कोळी आणि कोळिष्टके, हाडांचे सापळे अशा अनेक भयप्रद गोष्टी विकायला ठेवतात. या सर्व गोष्टींचे रंग शिशिर ऋतूच्या रंगांशी मिळतेजुळते असतात. जसे, काळा, केशरी, जांभळा, लाल व हिरवा. या काळात घराघरांतून भोपळ्यांची खरेदी होते. 'पंपकिन पीकिंग' म्हणजे भोपळ्याच्या शेतात जाऊन आपल्याला हव्या त्या आकाराचे भोपळेही खरेदी करता येतात. कुटुंबातील सर्व व्यक्ती मिळून लहान भोपळे रंगवतात तर मोठे भोपळे कोरून पोकळ करतात. अमेरिकेत या सणाला धार्मिक महत्त्व नाही.

ट्रिक ऑर ट्रिटींगसाठी सज्ज बालकंपनी




३१ तारखेच्या संध्याकाळी ड्रॅक्युला, फ्रॅन्केस्टाईन, ईजिप्शियन ममीज, गॉबलिन्स या खलनायकांप्रमाणे किंवा पर्‍या, राजकुमार्‍या, परीकथांतील नायक इ. प्रमाणे वेषांतर केलेली लहान मुले जवळपासच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावतात व "ट्रिक ऑर ट्रीट" असे ओरडतात. यजमानांनी सहसा "ट्रीट" असे म्हणून या मुलांजवळ असलेल्या छोट्या प्लॅस्टिकच्या बादल्यांमध्ये मिठाया टाकायचा रिवाज आहे.(ट्रिक म्हटले असता मुले यजमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात.) गोड खाल्याने मनाला लागणारी हुरहुर, काळजी, चिंता आणि भीती तात्पुरती दूर होते असे सांगितले जाते. ट्रिक ऑर ट्रीटला मिठाई वाटण्याची परंपरा यांतूनच सुरु झाली असावी का काय कोण जाणे.

अमेरिकन कुटुंबात या दिवशीची संध्याकाळ एखादा भयप्रद सिनेमा पाहण्यात, भयकथांचे मोठ्याने वाचन करण्यात किंवा एकमेकांना भयप्रद किस्से सांगण्यात व्यतीत करण्यात येते. या दिवसांत झपाटलेले वाडे, भूतबंगले, स्मशाने यांची सफर या सारख्या भयप्रद मनोरंजनाच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. सर्व कुटुंबीय मिळून अशा कार्यक्रमाचा आस्वाद लुटतात.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या भारतीय सणांबरोबरच या अमेरिकन सणांची मजा लुटण्याचा आनंद आम्ही घेत आहोत. या मागची भावना इतकीच की आपल्या सभोवतीचे जग आनंदी असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावे.


अमेरिकेतील सर्वांना हॅलोवीनच्या अनेक शुभेच्छा!

Monday, October 01, 2007

गूढ, थरार आणि रहस्यांचा बादशहा

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कधीनाकधी काही बंद दरवाजांसमोर उभे राहावे लागते. या दरवाजांच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असे वाटणे; किमानपक्षी, या दरवाजांमागे काय दडले आहे ते जाणून घेण्याची इच्छा माणसाला होतेच होते. गूढ, थरार आणि रहस्य यांचे सुप्त आकर्षण फार पूर्वीपासून मानवी मनाला वाटत आले आहे. रहस्य उकलण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळेच अनेक शोध लागले आणि संशोधने केली गेली.

गूढ आणि रहस्य हे शब्दांचा भीतीशीही अतिशय घनिष्ठ संबंध आहे. केवळ गूढ या शब्दाचा आयाम पाहिला तर अज्ञात, अनैसर्गिक, अमानवी, अथांग, गहिरे असे अनेक शब्दार्थ डोळ्यासमोर तरळतात. एक प्रसिद्ध वाक्प्रचार म्हणून असं म्हणता येईल की जगात दोन प्रकारची माणसं असतात -- एक, ज्यांना गूढाची उकल करायला आवडते आणि दुसरे, जे या अज्ञातापासून चार हात दूर राहणे पसंत करतात आणि या दोहोंचा संबंध भीतीशी जोडता येतो. पहिल्या प्रकारची माणसे आपली आणि आप्तांची भीतीपासून मुक्तता व्हावी म्हणून रहस्याची उकल करायला धजतात तर दुसर्‍या प्रकारची माणसे अज्ञाताच्या भीतीने रहस्यापासून लांब राहायचे ठरवतात.

गूढकथा लिहिताना मला नेहमी जाणवते की वाचक कथेतून अगदी सहजपणे एका अनैसर्गिक, अमानवी घटकाची अपेक्षा करतात. बर्‍याच लेखकांतर्फे रहस्य, थरार आणि गूढ हे ओंगळ, हिडीस आणि बटबटीत स्वरुपात समोर ठेवले जाते आणि वाचकही प्रत्येक कथासूत्रातून अशाच गोष्टींची अपेक्षा ठेवू लागतो. खरे पाहायला गेले तर भीती ही आपल्याच मनाचा एक भाग असते. तिचा अनुभव घ्यायला पडक्या हवेल्या, स्मशाने, धुक्याने आच्छादलेले रान गाठण्याची काही एक गरज नसते. भीती ही माणसाच्या मनातच वसलेली असते आणि आयुष्यात कधीतरी अचानक ती दत्त म्हणून समोर उभी ठाकते. माणसाला वाटणारी भीती किती प्रकारची असते बघा -- उंचीची भीती, पाण्यात बुडण्याची भीती, अंधाराची भीती, कोंडून घातल्याची भीती, गर्दीची भीती तर कधी एकांताची भीती. एखाद्या लहानशा प्राण्याची किंवा किटकांची भीती तर आपण सर्वच अनुभवून असतो. कधीतरी हे भय मूर्त स्वरुप घेऊन समोर येते आणि त्यातून थरार, रहस्य निर्माण होत जाते.

गूढपटांचा विचार करताना एक ठळक नाव डोळ्यासमोर उभे राहते ते आल्फ्रेड हिचकॉकचे. अतिशय संयत, ओंगळ होऊ न देणारे, क्लासिक चित्रपट निर्माण करणारा सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून हिचकॉक आजही सर्वश्रेष्ठ गणला जातो. प्रणय, रहस्य आणि विनोद यांचे अप्रतिम मिश्रण हिचकॉकच्या चित्रपटांतून उभे राहते. सर्वसामान्य थरारपटांतून येणारे धक्कातंत्र हिचकॉकच्या चित्रपटात सहसा दिसत नाही. अंगावर काटा उभा राहणे, डोळे गप्पकन बंद करावेसे वाटणे, किळस आणि बीभत्स या अनुभूती हिचकॉकपटांत सहसा अनुभवायला मिळत नाहीत. उलटपक्षी, या रहस्यपटांत प्रेक्षक हे केवळ प्रेक्षक न राहता चित्रपटाचा हिस्सा बनतात. त्यांना चित्रपटात काय शोधायचे याची जाणीव करून दिली जाते. बरेचदा चित्रपटातील रहस्य पात्रांना लक्षात येणार नाही परंतु प्रेक्षकांना सहज दिसेल असे मांडले जाते आणि पात्रांकडून रहस्याची उकल कशी होणार या उत्कंठेवर संपूर्ण चित्रपट तरून जातो.

आल्फ्रेड हिचकॉक


स्वत:च्या बायकोच्या खुनाचा कट रचणारे "डायल एम फॉर मर्डर" आणि "स्ट्रेंजर्स ऑन अ ट्रेन"मधील नवरे. चुकीची ओळख पटल्याने गोत्यात आलेले "द रॉंग मॅन" आणि "नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट" मधील कथानायक. स्मृतीभ्रंश झालेल्या गुन्हेगाराच्या प्रेमात पडून त्याला मदत करणारी "स्पेलबाऊंड"मधील मानसोपचारतज्ज्ञ. आपल्याच मित्रांवर हेरगिरी करताना गोत्यात आलेली "नटोरिअस"मधील स्त्रीहेर. उंचावर जाण्यास भिणारा आणि प्रेमात फसवला गेलेला "वर्टिगो"मधील निवृत्त पोलिस अधिकारी, पक्ष्यांच्या भयंकर हल्ल्याने भयचकित झालेले "द बर्डस"मधील कॅलिफोर्नियातील रहिवासी अशा अनेक हिचकॉकिअन अस्सल कथाबीजांवर अगणित हॉलिवूड आणि बॉलिवूडपट येऊन गेलेले आहेत, येतात आणि येत राहतील.

सशक्त कथासूत्रांवर निर्माण केलेले हे चित्रपट आजही मनाला भुरळ घालतात. ज्यांना क्लासिक किंवा मास्टरपीसेस म्हणावं अशा मला आवडणार्‍या काही खास हिचकॉकपटांबद्दल या लेखात थोडी माहिती पुरवायला आवडेल.

१. रिबेक्का: अचानक एका धनाढ्य बिजवराच्या प्रेमात पडून त्वरित लग्न करून मोकळी झालेली एक गरीब, अल्लड युवती आपल्याला या नव्या ऐश्वर्यसंपन्न आयुष्यात सामावता येईल का या शंकेने भयग्रस्त असते. नवरा पहिल्या बायकोला विसरू शकत नाही, नोकरचाकर या पहिल्या पत्नीची अद्याप मनात पूजा करतात आणि संपूर्ण घरावर या मृत स्त्रीचा छाप आहे, एक विलक्षण पगडा आहे हे लक्षात आल्याने ही युवती आपल्या वैवाहिक आयुष्यात दु:खी होऊ लागते आणि त्यात तिला या प्रथमपत्नीचा खून झाल्याचा उलगडा होतो आणि एका दु:खद रहस्याला सुरुवात होते.

१९४० सालच्या या चित्रपटाला ऑस्कर पुरस्काराने मानांकित केले होते. आजही हा चित्रपट एका जागी बसून पाहावासा वाटतो. या चित्रपटावर हेमंतदांनी विश्वजीत आणि वहिदा यांना घेऊन "कोहरा" हा चित्रपट निर्माण केला होता.

२. द मॅन हू न्यू टू मच: सुट्टी घालवायला आफ्रिकेचा वारीवर निघालेल्या कथानायकाच्या कुटुंबाला बसमध्ये एक अनोळखी माणूस भेटतो आणि त्यांची मैत्री जमते. दुसर्‍या दिवशी भर बाजारात या माणसाचा खून होतो आणि त्याला माहित असलेले रहस्य त्याने नायकाकडे उघड केले असावे या समजूतीतून नायकाच्या मुलाचे अपहरण केले जाते. मुलाला वाचवायला धडपडणारे आणि त्याचवेळी रहस्याचा उलगडा करायचा प्रयत्न करणार्‍या आई-वडिलांची ही कथा अतिशय उत्कंठावर्धक आहे. डोरिस डेच्या खणखणीत आवाजातील "के सेरा सेरा" हे गाणे या चित्रपटाची शान वाढवते.

३. रिअर विंडो: तार्किकदृष्ट्या हा भयपट नाही पण तरीही भीतीशी निगडीत आहे. अतिशय सुस्वरूप प्रेयसी (ग्रेस केली) असणारा आणि तात्पुरते अपंगत्व आलेला एक छायाचित्रकार लग्नाला आणि त्यातून येणार्‍या जबाबदारीला मनातून घाबरत असतो. पाय फ्रॅक्चर झाल्याने दिवसभर खिडकीशेजारी बसून इमारतीतील इतर व्यक्तींना न्याहळण्याची त्याला सवय लागते आणि त्यांचे प्रेमआयुष्य किंवा वैवाहिक आयुष्य कसे कंटाळवाणे आहे यावर तो विचार करत बसतो. लोकांना न्याहाळण्याच्या वेडातून इमारतीतील एका इसमाने आपल्या बायकोचा खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे असा त्याचा ग्रह होतो आणि तो आपला आणि आपल्या प्रेयसीचा जीव धोक्यात घालतो.

या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे प्रसंग मुख्य पात्रांवर चालला असला तरी पार्श्वभूमीवर इमारतीतील दृष्ये प्रेक्षकांना दिसतात आणि नायकासह प्रेक्षक रहस्य शोधण्यात गुंततात, किंबहुना रहस्य उलगडण्यात नायकापेक्षा आपण दोन पायर्‍या वर आहोत ही अनुभूती नक्कीच मिळते.

४. सायको: या चित्रपटाशिवाय हिचकॉकविषयीचा लेख पूर्ण करणे केवळ अशक्य आहे. १९६० साली बनलेला हा चित्रपट आजही पाहताना हृदयाची धडधड वाढते.
सायकोमधील प्रसिद्ध दृश्य


कार्यालयात अफरातफर करून पळालेल्या एक युवतीला एका अंधार्‍या पावसाळी रात्री एक जुनाट मोटेल दिसते. रात्रीपुरता आसरा मिळावा म्हणून ती तेथे एक खोली घेते आणि तिची ओळख नॉर्मनशी, मोटेलच्या मालकाशी होते. नॉर्मनचे या युवतीकडे लक्ष पुरवणे त्याच्या आजारी आईला खपत नाही आणि त्यातून चमत्कारीकरित्या या युवतीचा खून होतो. हा खून आपल्या आईने केल्याचे नॉर्मनच्या लक्षात येते आणि तो खुनाचे पुरावे नष्ट करतो. पुढे या युवतीचा तिच्या कुटुंबीयांकडून शोध सुरु होतो आणि आईला घाबरणारा नॉर्मन गूढात गुरफटत जातो. यातून खून, रहस्याचा अप्रतिम थरार प्रेक्षकांसमोर उभा ठाकतो.

आईच्या संपूर्ण कह्यात असलेल्या आणि सतत तिला भिऊन जगणार्‍या मुलाची ही कथा आणि विशेषत: या चित्रपटातील युवतीचा शॉवर घेताना केला गेलेला खून हा भविष्यातील अगणित चित्रपटांचा भाग बनून राहिला आहे.

स्वत: हिचकॉकबद्दल असं सांगितले जाते की लहानपणी एकदा त्याच्या वडिलांनी त्याला एक पत्र घेऊन पोलिसस्टेशनला पाठवले. ते पत्र वाचून तेथील अधिकार्‍याने त्याला १० मिनिटांसाठी तुरुंगात डांबले आणि त्यानंतर सोडून दिले आणि सांगितले की "वाईट कामांची परिणिती ही अशी होते.” या प्रसंगाचा त्याच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की आयुष्यभर पोलिसांची त्याला भयंकर भीती वाटत असे. या खेरीज, एक विचित्र भीती त्याच्या मनात कायम राहिली आणि ती होती अंड्याची भीती. हिचकॉकच्या शब्दात सांगायचे तर "गुळगुळीत, वर्तुळाकार अंड्यांची मला अतिशय किळस वाटते. रक्त तरी लाल दिसतं पण अंड्याच्या पिवळ्या बलकाची मला इतकी किळस वाटते की मी आयुष्यात तो कधी चाखला ही नाही."

आपल्या गरोदर पत्नीच्या वाढलेल्या पोटाचीही त्याला किळस वाटत असे. हिचकॉकला अंड्याची भीती होती की गुळगुळीत, चकचकीत गोलाकारांची ते कळण्यास मार्ग नाही. या ठीकाणी हिचकॉकचे तुळतुळीत टक्कल डोळ्यासमोर उभे राहते.

रहस्यपटांच्या बादशहाचा शिक्का आपल्या कपाळावरून हिचकॉकला कधीही पुसता आला नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले तर "मी सिंड्रेला चित्रपट निर्माण केला तरी प्रेक्षक कोचावर मृतदेह दिसतो का ते धुंडाळतील.” युद्ध, दहशतवाद आणि प्रगतीच्या वाटेवरील प्रचंड स्पर्धा या सर्वांनी बोथट झालेल्या आजच्या युगातील मानवी संवेदनांना हिचकॉकचे "क्लासिक मास्टरपीसेस" भुरळ पाडतील का हा प्रश्न या चित्रपटांच्या आजवर होणारी नकलेने निकालात निघतो. सर्वश्रेष्ठ गणल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्काराचा मानकरीही हिचकॉक कधी ठरला नाही पण रहस्यपटांचा बादशहा म्हणून आजही तो जनमानसांच्या हृदयात स्थानापन्न आहे.

Tuesday, September 25, 2007

भूलनगरी

सूर्यप्रकाशाची तिरिप डोळ्यांवर पडली तशी सीमाने डोळे किलकिले केले. सकाळ झाली आहे हे क्षणभर तिला कळलेच नाही. शेजारी रवी अजूनही ढाराढूर घोरत होता. ती गादीवर उठून बसली आणि बेडरूमच्या भिंतीकडे भकास नजरेने पाहू लागली. का कोणास ठाऊक, तिला थोडसं कलकल्यासारखं वाटलं. समोरच्या भिंतीवर लटकणारा त्यांच्या लग्नातला फोटो गायब होता.

’अं?’ मनाशी आश्वर्य करत सीमाने सभोवार नजर फिरवली. तिचे ड्रेसिंग टेबल, त्यावरील क्रिस्टलची फुलदाणी, तिच्याबाजूचा दोघांचा फोटो, उजव्या कोपर्‍यातलं कपाट, खिडकीला तिने लावलेले नवे सिल्कचे पडदे सगळेच नाहीसे झाले होते.

’आई गं!’ तिच्या मस्तकात तीव्र कळ उठली तसा तिने हात कपाळावर नेला. कपाळावर रुपयाच्या नाण्याएवढं टेंगूळ आलं होतं. क्षणभर ती विचारात पडली आणि त्यानंतर तिने रवीला गदगदा हलवायला सुरुवात केली.

“उठ रवी! हे बघ काय आहे? आपण बघ कुठे आहोत? अरे उठ, आपण आपल्या घरात नाही आहोत. भलतीकडेच कुठेतरी आहोत.” रवी उठला तो डोकं गच्च धरूनच. "कशाला बोंबलते आहेस? आधीच डोकं जाम चढलंय माझं.” तो सीमावर डाफरला.

“चढेल नाहीतर काय? इतकं प्यायची गरज होती का पार्टीत काल? अरे पण बघ ना! आपण कुठे आहोत नक्की? हे आपलं घरंच नाहीये.” सीमाच्या नजरेत काळजी दिसत होती. रवीनेही खोलीवरून नजर फिरवली. त्याच्या ओळखीचे त्या खोलीत काहीच नव्हते पण खोली छान प्रशस्त होती. तो ताडकन उठला आणि त्याने आपल्या विस्कटलेल्या केसांतून बोटे फिरवली.

“ऑं! असं कसं झालं?" सभोवार नजर फिरवून रवी म्हणाला, "काल रात्री कार तू चालवत होतीस. तूच कुठेतरी घेऊन आलीस. कोणाच्या घरात आहोत आपण? चल या खोलीच्या बाहेर पडू. घरात कोणी असेल त्यांना विचारू इथे कसे पोहोचलो ते.”

रवी आणि सीमाच्या एका मित्राने, मोहनने नुकतेच खंडाळ्याच्या जवळ एक फार्म हाऊस घेतलं होतं. काल त्याने सर्वांना पार्टी ठेवली होती. बरेच दिवसांनी मित्र-मित्र जमल्याने रवीने नेहमीपेक्षा थोडी जास्तच घेतली होती. रात्री गाडी चालवणं अशक्य झालं तसं सीमाने ड्रायविंग करण्याचं ठरलं. मोहनने आणि त्याच्या बायकोने; नीताने, रवी आणि सीमाला फार्म हाऊसवरच राहण्याचा आग्रहही केला होता. शनिवारची रात्र होती, दुसर्‍या दिवशी रविवार होता पण रवीला काही कामं निपटायची होती त्यामुळे परत येणं भाग होतं.




---

रवी आणि सीमा दोघे त्या खोलीच्या बाहेर पडले तसे त्यांना जाणवलं की त्यांची बेडरूम पहिल्या माळ्यावर होती. जिना उतरून खाली येताना रवीने मोठ्याने विचारलं, “अहो कोणी आहे का इथे? हलो!!” घरातली शांतता अजिबात बिघडली नाही. कोणी नव्हतंच बहुधा घरात. तळमजल्यावर लिविंगरुमला लागून स्वयंपाकघर दिसत होते. तिथे कोणी असेल तर म्हणून रवी आणि सीमा स्वयंपाकघराच्या दिशेने गेले. यावेळेस सीमाने हाक दिली, “कोणी आहे का घरात? इथे कसे पोहोचलो आम्ही?” घर तरीही शांतच राहिले. त्या दोघांनी आणखी दोन चार हाका मारल्या पण घरातून कोणतीही हालचाल झाली नाही.

"मला वाटतं रवी की काहीतरी घोटाळा आहे. आपण स्वत:हून इथे आलो नाही, आपल्याला इथे कोणीतरी घेऊन आलं आहे.” सीमा हळूच म्हणाली.

“हो? मग तू आठव ना, तू ड्रायविंग करत होतीस. तुला आठवायला हवं की आपण इथे कसे आलो? आपल्याला इथे कोणी आणलं?.”
“मी ड्रायविंग करत होते आणि तू मागच्या सीटवर अस्ताव्यस्त पसरला होतास. मला इथे कसे आलो ते काही आठवतच नाही.” सीमा वैतागून म्हणाली.
“काल तू कोक पीत होतीस त्यात काही घातलं होतंस का गं हळूच!” रवीच्या चेहर्‍यावर मिश्किल झाक होती.
“मस्करी करू नकोस रे! मला ना जरा भीती वाटायला लागली आहे.”
“बरं! बरं! असं करू, मोहनला फोन करू. तो फार्महाऊसवरून येईल इथे आणि घेऊन जाईल आपल्याला.” असं म्हणून रवी आपले खिसे चाचपडू लागला. “अरेच्चा! माझा सेलफोन आणि पाकिट गाडीत राहि्लं वाटतं”.
“गाडीत राहिलं की कोणी लंपास केलं?” सीमाचा चेहरा उतरला होता.“लंपास करणारे माझ्या हाताचं रिस्टवॉच, तुझं मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी तसंच टाकून जातील का? ... बाहेर लिविंगरुममध्ये फोन आहे तिथून फोन करतो.”

रवीने बाहेरच्या खोलीत जाऊन फोन उचलला आणि कानाला लावला. पलीकडून काहीच आवाज नव्हता. त्याने वायर तपासली. वायर हवेत लोंबकळत होती. स्वयंपाकघराच्या दारात सीमा उभी होती तिला त्याने ती वायर दाखवली. “कोणीतरी फोन डिसकनेक्ट करून ठेवला आहे.”

“रवी इथून बाहेर पडूया. आपली गाडी आहे का बाहेर ते पाहू.” सीमा पुटपुटली.“अगं पण माझं डोकं जाम दुखतंय. थोडा चहा करतेस का? घरात ज्याने झोपायला दिलं तो आपण कपभर चहा प्यायला म्हणून काही म्हणणार नाही.”

सीमाने नाखुशीने फडताळातले शिस्तीत लावून ठेवलेले डबे उघडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व डबे रिकामे होते. सीमाने स्वयंपाकघरातली लाकडी कपाटे उघडायला सुरुवात केली परंतु ती कपाटे इतकी घट्ट बसली होती की तिच्याच्याने ती उघडेनात. “ए रवी! हे कपाट दे ना रे उघडून. त्यात खायला काही सापडते का ते पाहते.”

रवीनेही नेटाने प्रयत्न केला पण दार घट्ट बसले होते. त्याने असेल नसेल तो सर्व जोर काढून दार खेचलं तसा दाराचा नॉब त्याच्या हातात आला. “ऑं! हा काय प्रकार आहे? हे दार कोणीतरी घट्ट चिकटवून बंद केले आहे की काय?” रवी आश्चर्याने मागे सरकला. त्याने झटदिशी सीमाचा हात पकडला आणि तो तिच्या कानापाशी पुटपुटला, “इथून बाहेर जाऊया! काहीतरी घोटाळा दिसतो.” घाईतच ते दोघे घराबाहेर पडले.

सकाळचे १० वाजले असावेत. रस्त्यावर शुकशुकाट होता. रस्त्याच्या दुतर्फा घरं होती, दुकानं होती मात्र कोठेही चिटपाखरू दिसत नव्हतं. रवी आणि सीमाने नजर फिरवून सर्वत्र पाहिलं पण कोणतीही हालचाल त्यांच्या नजरेने टिपली नाही.

“सीमा! चल शेजारच्या घराची बेल वाजवूया. कोणीतरी असेल तर पाहू. विचारू काय प्रकार आहे तो.” रवीने सीमाचा हात धरून तिला ओढतच शेजारच्या घराकडे नेलं. दाराची बेल वाजवली तशी ती वाजल्याचा आवाजच आला नाही म्हणून त्यांनी दरवाजा ठोठवला, पण आतून कोणतीही चाहूल लागली नाही तशी ती दोघं पुन्हा रस्त्यावर आली.

“ हे रे कुठे आलो भलतीकडे आपण? इथे सर्वत्र स्मशानशांतता आहे. मला भीती वाटायला लागली आहे. सगळी घरं कशी बंद दिसताहेत. त्यांत कोणीतरी लपून आपल्याला पाहात असेल तर? आपल्यावर पाळत ठेवून असेल तर?”

“घाबरतेस काय? मस्त कोवळं ऊन पडलंय. कोण खायला येतंय सकाळच्या वेळी? आपली कार असती तर बसून सरळ हायवेला लागलो असतो पण तुला आठवतच नाही कार कुठे गायब झाली ते.” रवीचा टोमणा सीमाला फारसा आवडला नसावा.

“रवी, मला वाटतं की काल आपण रस्ता चुकलो होतो. मी काल ड्राईव करत होते ना तेव्हा हायवेवर मध्येच रस्त्यावर दिवेच नव्हते. एकेठिकाणी मला रस्ता थोडा अरुंद झाल्यासारखा वाटला. ओळखीचा वाटत नव्हता, आणि मग नंतर काय झाले ते नाही आठवत.... तुला कित्तींदा सांगितलं की इतकी पित जाऊ नकोस. मला रात्रीबेरात्री गाडी चालवण्याची सवय नाही हे माहित होतं तुला.” सीमाने बोलता बोलता आवाज चढवला.

“मला आता कळेनासं झालंय की प्यायलं कोण होतं? मी प्यायलो होतो म्हणून मला आठवत नाही पण तुलाही कसं आठवत नाही की पुढे काय झालं ते? आर यू शुअर की तू एखादा पेग मारला नाहीस?”

“पुरे हं रवी! वाट्टेल ते विनोद करू नकोस.” सीमाने त्याला तिथेच तोडलं. “आता आपण काय करायचं ते सांग. या रस्त्यावरून सरळ चालत जाऊया. हाका मारूया लोकांना. सकाळची वेळ आहे. कामासाठी घरातून बाहेर पडणारी माणसं, शाळेला जाणारी पोरं तरी दिसायला हवी होती. रवी, आपण एखाद्या ग्रेव्हटाऊनमध्ये नाही ना आलो.”

“म्हणजे ते इंग्रजी चित्रपटात दाखवतात तसं? गावातले सगळे मृत असतात आणि ते झोंबी का काय बनून जिवंत माणसांच्या मागे जातात...” रवीने दोन हात हवेत पसरले आणि सीमाकडे पाहून दात विचकले.

“प्लीज बी सिरिअस रवी! तुला काहीच वाटत नाहीये का रे? आपण कुठेतरी येऊन फसलोय हे नक्की. चल ना त्या समोरच्या दुकानात जाऊ. ते उघडलंय म्हणजे कोणीतरी असणार आत.”

ते दोघे दुकानासमोर उभे राहिले. दुकानात अनेक गोष्टी मांडून ठेवलेल्या दिसत होत्या. त्यांनी बराचवेळ हाका मारल्या तरी कोणी बाहेर आले नाही. रवीने सीमाकडे पाहून डोळा मारला आणि दुकानात समोर ठेवलेला बिस्किटांचा पुडा हळूच आपल्या खिशात सरकवला. सीमाने रागाने त्याच्याकडे पाहिले तसे तो चटकन दुकानाबाहेर पडला. “हे काय केलंस?” सीमा मागोमाग येत खेकसली.

“अगं, काहीतरी पोटात नको का ढकलायला? बिस्किटं तर बिस्किटं!” म्हणत रवीने पुड्याचे वेष्टन फोडले आणि आ वासून तो पुड्याकडे पाहात राहिला. “अरेच्चा! पुडा चक्क रिकामा आहे की...असा रिकामा पुडा का ठेवला असावा त्या दुकानात?” रवीने डोळे विस्फारले आणि पुडा भिरकावून दिला. "विक्षिप्तच प्रकार आहे सगळा.” असे म्हणून तो रस्त्यावरून पुढे जाऊ लागला तसे सीमाने त्याला धावतच गाठले. रस्ता अद्यापही निर्मनुष्य होता.

“ए रवी तू एक पाहिलंस या ओसाडवाडीत पक्षांचा किलबिलाटही नाही, झाडंही किती तुरळक आहेत आणि कशी बावलेली, मृतवत दिसताहेत. एखादं भटकं कुत्रंही नाही.” सीमा पडेल आवाजात म्हणाली.

रवीलाही गावातला वेगळेपणा जाणवू लागला होता. सीमासारखं आपल्याला भिऊन चालणार नाही हे त्याला कळत होतं. त्याचं डोकं अजूनही ठणकत होतं. “थोडसं पाणी मिळेल तर बरं होईल, तहान लागली आहे.” त्याची नजर सभोवार फिरत होती. काही अंतराने रस्ता सोडून डावीकडे एक विहिर त्याच्या नजरेला पडली तसं दोघांनी विहिरीकडे जाणारा रस्ता पकडला. विहिरीवर आडाला बांधलेला पोहरा रवीने घाईघाईने आत सोडला.

’टण्ण!!’ आश्चर्याने रवीने विहिरीत डोकावून पाहिले. विहिर साफ सुकी होती. आत पाण्याचा टिपूसही नव्हता. पोहरा जोरात जमिनीवर आदळल्याचा आवाज झाला होता. रवीने भुवया आक्रसल्या, “सीमा, खरंच घोटाळा आहे काहीतरी इथे. विचित्रच गाव आहे. एकही सजीव गोष्ट दिसली नाही आपल्याला आतापर्यंत. काल आपला ऍक्सिडेंट झाला का गं? म्हणजे आपण मेलो असलो तर?”
“रवी अरे काहीतरीच काय बडबडतो आहेस?”
“काहीतरीच कसं? आपण मेलो असलो आणि हा नरक असला.. आपल्या पापांची शिक्षा अशाप्रकारे दिली असेल तर? अनंतापर्यंत आपण याच गावात राहायचं.. फक्त मी आणि तू.”
“पापांची शिक्षा? आपण कोणती पापं केली आहेत? आणि नरक काय असा असतो?” रवी चिडवतो आहे की गंभीर आहे ते न कळल्यानं सीमा तडकून म्हणाली, “हे बघ! मी इथे जास्त वेळ काढू शकत नाही. तू येतो आहेस ना? मी मुख्य रस्त्याने चालायला सुरुवात करणार आहे. गावाबाहेर हायवे मिळेल नाहीतर एखादा मोठा रस्ता. तिथे काही ट्रान्सपोर्ट मिळतो का पाहू.”

रवीने निमूटपणे तिच्याबरोबर चालायला सुरुवात केली तरी नजरेने तो सतत हालचाल शोधत होता. मुख्य रस्त्यावर दूरवर त्यांना एक देऊळ दिसले तसे रवीने चेहर्‍यावरच्या रेषा सरळ करत सीमाचे लक्ष देवळाकडे वेधले.

“आहा! सीमा, म्हणजे आपण नरकात नसणार. ते बघ देऊळ दिसतंय. त्यात पुजारी भेटतो का पाहू.” असं म्हणून रवीने पुन्हा सीमाचा हात पकडला आणि तिला ओढतच तो देवळाच्या दिशेने जाऊ लागला. देवळाच्या मोजक्या पायर्‍या चढून त्या दोघांनी चौथर्‍यावर प्रवेश केला. देवळातही शुकशुकाट होता. गाभार्‍याच्या दिशेने जात त्यांनी पुजार्‍याला हाका मारायला सुरुवात केली. कडक उन्हातून गाभार्‍यात प्रवेश केला तशी दोघांच्याही डोळ्यासमोर अंधारी आली. काही क्षणांनी डोळे किलकिले केल्यावर सीमाला देवळाचा गाभारा रिकामा दिसला. मूर्ती, समया, दिवे, कलश कशाकशाचाही त्या गर्भगृहात पत्ता नव्हता. भरला होता केवळ अंधार.

“हे काय अभद्र?” सीमा चित्कारली. हे एखादे मृतांचे गाव असावे अशी कल्पना गेला काही वेळ तिच्या डोक्यात घोळत होती ती खरीच असावी असे तिला पुन्हा एकदा वाटून गेले. धावतच ती बाहेर आली आणि देवळाच्या पायर्‍यांवर डोकं धरून बसली.

खांद्यावर रवीचा हात पडला तशी ती मुसमुसू लागली. “इथून बाहेर पडू रवी. आता इतर कुठे थांबायचं नाही, सरळ रस्त्याला लागूया. आपल्याला फसवून कोणीतरी इथे आणलं आहे. मगासपासून आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवून असल्यासारखं वाटतंय.”

“बरं चल!” रवीला प्रकरणातील गांभीर्याची कल्पना आली होती. त्याने सीमाला उठायला मदत केली. दोघांनी पुन्हा मुख्य रस्ता धरला. सूर्य डोक्यावर तळपायला लागला होता. किती चालायचं, कुठे जायचं, कसं जायचं या सर्व प्रश्नांनी डोक्यात फेर धरला होता पण एका जागी वाट बघत बसण्यापेक्षा कुठेतरी गेलेलं बरं असं म्हणून दोघे पावले ओढत निघाले. अदमासे अर्धा मैल चालणे झाले असावे. समोर धुळीचा लोट उडताना दिसला. त्या लोटातून एक मळकट एसटी येत होती.

“सीमा पळ! ही एसटी आपल्याला पकडायलाच हवी.” असं म्हणत रवी वेड्यासारखा धावत सुटला आणि त्याच्यामागे सीमाही. एसटी मंदगतीने जात होती. रवीने चालत्या एसटीत झटकन उडी मारली आणि मागून येणा‍र्‍या सीमासाठी हात पुढे केला, “हात दे!” असे म्हणून त्याने सीमालाही आत घेतले.
धापा टाकत दोघे दरवाजाशेजारच्या सीटवर कोसळले. “रवी! वाचलो रे, सुटलो एकदा या विचित्र जागेतून.” असं म्हणत सीमाने आपले डोके रवीच्या खांद्यावर टाकले. रवीनेही डोळे बंद करून आपले डोके सीमाच्या डोक्यावर टेकवले. क्षणभराने रवीने डोळे उघडले तसे एसटीत कोणीही चिटपाखरू नजरेस पडले नाही. एसटीचा वेग अचानक वाढल्यासारखा वाटला. सीमानेही डोळे उघडून इथेतिथे नजर फिरवली.
“सीमा, एसटीत कोणी नाहीये. फक्त आपण दोघेच!” रवी कुजबुजला. सीमाने हे अपेक्षितच असल्याच्या आविर्भावात फक्त मान डोलवली. ती आश्चर्याने खिडकीतून बाहेर पाहत होती. रवीने खिडकीबाहेर नजर टाकली आणि काहीच क्षणात त्याला काय घडतं आहे याचा अंदाज आला. एसटी त्या माळरानावर गोल गोल चकरा मारत होती. एकाच ठीकाणी!

“मी..मी पुढे जाऊन ड्रायव्हरला विचारतो की हे काय चाललय?” रवी पुन्हा कुजबुजला तसा सीमाने त्याचा हात घट्ट पकडला, “रवी! मला नाही वाटत आपली यातून सुटका आहे असं.” तिला हुंदका अनावर झाला.“वेडी का? समोर ड्रायव्हर दिसतो आहे. मी विचारतो त्याला.” म्हणून रवी जागेवरून उठला.“सांभाळून रे!” चालत्या एसटीत ताडताड पावलं टाकत रवी ड्रायव्हरच्या जवळ उभा राहिला. "थांबवा! ही एसटी थांबव इथेच नाहीतर..." सर्व त्राण एकवटून त्याच्या तोंडातून शब्द बाहेर आले... नाहीतर आपण काय करणार याची त्याला कल्पनाही नव्हती.

करकच्चून ब्रेक्स दाबून एसटी थांबली तशी रवी उभ्या जागेवरच कोलमडला. फाटक्या अंगाचा, पोरगेलासा ड्रायवर, गालावर दाढीचे खुंट खाजवत तरवीकडे आश्चर्याने पाहात होता.

“ओ सायेब! वरडताय कशापाय? काय जालं बोंबलायला? ह्ये घ्या थांबवली यश्टी!” त्याने उलटा आवाज काढला. रवी धडपडत उभा राहिला. सीमाही मागच्या सीटवरून धावत त्याच्यापाशी आली.“कुठे जाते आहे ही एसटी? कोणत्या गावाला?” सीमाने तोंड उघडले.
“कोन्त्या बी गावाला जात न्हाय. हितंच फेर्‍या मारती हाय.” ड्रायवरने आपले तंबाखू खाऊन पिवळे झालेले दात उचकटले.
“रवी, चल आपण उतरूया आधी.” सीमाने काकुळतीला येऊन म्हटले. रवी आपल्या पायांवर स्थिरस्थावर झाला होता, त्याने पुढे सरून ड्रायवरची बकोट पकडली, “साल्या! काय प्रकर आहे तो सांग नाहीतर देतो तुला सटकावून.” अचानक हल्ल्याने ड्रायवर जागीच सटपटला, “ओ सायेब! कालची उतरली न्हाय वाटतं, च्यामारी! या लोकास्नी मदत करा आनी यांचा मार बी खा.. तुमा सायब लोकांची तराच न्यारी.”
“आं!” रवीने त्याची बकोट सोडली, “कसली मदत?”
“कसली मदत काय इचारता राव? काल तुमी दोगं तर्र हून गाडी हाकत व्हता. या बाईंनी गाडी रस्ता सोडून आन्ली आनी झाडाला ठोकली. दोगंबी तितंच ढेर जालं व्हतं. मी आनि रफिकचाचानं पायल म्हून बरं! तुमा दोगांना आन गाडीला फार काय जालं नवतं. तिचातूनच आनलं काल रातच्याला तुमाला हितं, आनी बंगलीत झोपवलं.”
“दोघंही तर्र होतो?” रवीने संशयाने सीमाकडे पाहिलं.
“नीता म्हणत होती की वाईन जुनी आहे, मुरलेली. थोडी चव बघ.” सीमा खजील होऊन म्हणाली.
“वा! आणि पिऊन तर्र झालो म्हणून शिव्या खायला मी,” रवी चरफडला.

एव्हाना रवी, सीमा आणि ड्रायवरचे त्रिकुट एसटीमधून खाली उतरले. “आणि आमची गाडी कुठे आहे?” रवीच्या आवाजातला संशय कायम होता.“हेडलाईट फुटलाना वं. रफिकचाचा रिपेअर करायला गेला हाय. सक्काळी धा वाजताच. यील थोड्यायेळानं. मग जा तुमी तुमच्या गावाला.”
“हं! आणि तुम्ही दोघे कोण? या गावातले वेताळ आणि संमंध?”
“आं!” ड्रायवरला काही समजलं नसावं, “मी चंदू. मी आनी रफिकचाचा हितलं केयरटेकर हाय.”
“केअरटेकर? साल्यानो या स्मशानालाही केअरटेकर लागतो होय.” रवीला अजूनही काहीतरी घोटाळा असल्यासारखे वाटले.
“ओ सायेब! शिव्या कशापाय देता? ह्ये समशान दिसतं का तुमाला?”
“नाही स्मशान नाही हे नंदनवन आहे. सकाळपासून गावात फिरून दमलो. एक जिवंत प्राणी नजरेला नाही आला. घरांत माणसं नाहीत, विहिर सुकी, दुकान रिकामं, देवळात देव नाही, या तुझ्या एसटीत प्रवासी नाहीत.” रवी घुश्श्यात म्हणाला.
“चला सायेब! चा पिऊ.” चंदूला हसण्याची उबळ आवरली नाही. “शामू शर्माच्या चित्रपटाचा स्येट हाय ह्यो. जंगी पिच्चर हाय म्हनतात. गेला म्हयनाभर समदं हितंच व्हतं, त्ये शूटींग चालू होतं. पन त्या हिरोचं आनी शामू सायबांच मधीच कायतरी बिनसलं बगा. गेले धा दिस शूटींग बंद व्हतं. उंद्यापास्न पुन्यांदा चालू व्हईल, म्हून काल खरेदीसाटी मी आन रफिकचाचा गेलो व्हतो. रातच्याला परत यीताना तुमची गाडी आमच्या फुडं, येकदम भन्नाट जात व्हती. धाडकन आपटली तशी आम्ही उतरलो आनि तुमा दोगांना भायेर काडलं आनी हितं आनलं. मला वाटलं दुपारपातुर उटनार न्हाय तुमी दोगं म्हून मी माजं काम करत व्हतो. या येश्टीची टेश्ट घ्यायची व्हती पर तुमी येवड्या गुश्श्यात याल आसं वाटलं न्हाय...”

रवीचा चेहरा गोरामोरा झाला होता. त्याने मान वळवून सीमाकडे पाहिले तशी तिने नजर खाली वळवली. रवीच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटली, आता सर्व घोळ त्याच्या ध्यानात येत होता. त्याने चंदूच्या पाठीवर थाप मारली. “चंद्या! लेका चुकलो यार! तू आणि रफिकचाचा होता म्हणून आम्ही ठीकठाक आहोत. चल चहा पाज. डोकं अजून भणाणतंय आणि घशालाही कोरड पडलीये.” असं म्हणत त्याने आपला हात सीमाच्या खांद्यावर ठेवून त्तिला जवळ ओढलं आणि तोंड तिच्याजवळ नेऊन तो कुजबुजला, “झेपत नसेल तर पिऊ नये माणसाने आणि प्यायली तरी गाडी कधीच चालवू नये. चल! आता चंदूच्या हातचा चहा पिऊ.”

Friday, July 27, 2007

असा म्हसोबा, जन्मभरचा नवरोबा असतो

मनोगतावरील एका कवितेवरून हे विडंबन सुचले. याला विडंबन म्हणावे की प्रेरणा याबाबत मनात थोडा संदेह आहे.

सांभाळत ढेरी टकलावरचे केस चार विंचरतो
आरशामध्ये चोरून शतदा स्वतःला बघतो
अजूनही चाळीशीची बायको परी दिसावी म्हणतो
असा म्हसोबा, जन्मभरचा नवरोबा असतो


रोज सकाळी टॉमी*ला हा हमखास विचारतो
"फेरफटका मारायला का तू म्हशीस सोबत नेतो?"
सुडौल बांधा माझा याला कधी न जाणवतो
असा म्हसोबा....


हादडताना मचमच आवाज कशाला करतो?
भाजीआमटी भुरका मारून हा ओरपतो
घासाघासाला अपुल्या आईला आठवतो
असा म्हसोबा...


ऐकते जेव्हा मध्यरात्री याला घोरताना
शेजारणीला स्वप्नात पाहूनीया हसताना
पाठीमध्ये दणका याच्या घालावा वाटतो
असा म्हसोबा...


* टॉमीने येथे घरातला पाळीव कुत्रा असणे क्रमप्राप्त आहे.

----
माफीपत्र:


कवयित्रीला (खरंतर लेखिकेला) काव्य कसे करतात याची अजिबात कल्पना नाही. वृत्त, मात्रा, छंद हे शब्द तिला केवळ लिहिता येतात, त्यातले काही कळत नाही याची जाणीव ठेवून आणि हा तिचा पहिलाच प्रयत्न असल्याने तिला मोठ्या मनाने माफ करावे.

Monday, July 09, 2007

वाळवंटातील हिरवळ - लास वेगास

लास वेगासला विमान उतरायला लागले तत्क्षणी समोर दिसणार्‍या सुप्रसिद्ध वेगास स्ट्रिपने मनाला भुरळ घातली. स्पॅनिश भाषेत लास वेगासचा अर्थ वाळवंटातील हिरवळ (कुरण) असा सांगितला जातो. नजरेच्या टप्प्यात येणार्‍या मंडाले बे हॉटेलच्या सोनेरी झळाळणार्‍या इमारती, त्याच्या शेजारी लक्सरच्या काळ्याभोर पिरॅमिडसमोर विसावलेला शुभ्र स्फिन्क्स, त्यापुढे दिसणारा एक्सकॅलिबरचा परीकथेतील प्रशस्त राजवाडा, न्यूयॉर्क न्यूयॉर्कचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, पुढे नजरेच्या टप्प्यात येणारा आयफेल टॉवर पाहून प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला होता. एकाच लास वेगासला हे सर्व आहे. सुट्टीचा आनंद घेणे, खरेदी करणे, रात्रीची खास करमणूक आणि जुगार यांच्याबद्दल प्रसिद्ध असलेले अमेरिकेतील हे सुप्रसिद्ध स्थळ जणू डोळे मिचकावून खुणावत होते.

लास वेगास एअरपोर्टला उतरले की स्लॉट मशीन्सचा खणखणाट ऐकू येतो असे पूर्वी मनोगतावरील एका लेखात वाचले होते. माणसाला जुगाराची आवड तरी किती असावी हे सांगणे अशक्य असावे. आयुष्यच जेथे एक जुगार आहे तेथे प्रत्येक माणूस जुगारीच ठरेल असे वाटते. लास वेगासला उतरल्यावर स्लॉट मशीन्सवर बसलेल्या बाया, पुरूष, म्हातारे कोतारे पाहून त्याची प्रचीती आली.

एअरपोर्टच्या बाहेर शटल बस पकडून आम्हाला एक्सकॅलिबरला जायचे होते. वातानुकूलित दरवाज्यातून बाहेर पडलो तसा भपकन ऊनाचा आणि उष्ण हवेचा झोत अंगावर आला. 'बापरे कित्ती गरम आहे इथे?' असा उद्गार तोंडातून बाहेर काढला तसा समोरचा अटेंडंट म्हणाला, 'ओह! उद्या दुपारी ११० डी फॅ. जाईल तेव्हा तुम्हाला खरा उन्हाळा भासेल.'

लास वेगासला कोठे कोठे फिरायचे याची यादी आम्ही पूर्वीच तयार केली होती. दोन दिवस लास वेगासला काढले की पुढचे दोन दिवस ग्रॅंड कॅनयन पाहायला जायचे आणि पुन्हा परतून दोन दिवस लास वेगासला राहायचे असा बेत होता. काही नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनी लास वेगास एक-दोन दिवसांत बघून होतं, इतके दिवस काय करणार? असे निघण्यापूर्वी विचारले होते. 'काही नसेलच तर आराम करू. ते काय कमी आनंददायी आहे?' असे त्यावर आमचे उत्तर होते.



DSC00129
एक्सकॅलिबर



पहिले दोन दिवस अर्थातच एक्सकॅलिबरला राहायचे होते. त्या हॉटेलात प्रवेश केला, आजूबाजूला नजर फिरवली तशी छाती दडपली. याला हॉटेल म्हणावे की एखादे लहानसे स्वयंपूर्ण नगर असा प्रश्न पडला. रेस्टॉरंट्स, लहान-मोठ्या गोष्टींची दुकाने, बेकरी, गाड्या भाड्याने देण्याघेण्याचे स्थान, सहलींसाठी आरक्षण केंद्रे, चित्रपटगृह, जलतरण तलाव, स्पा आणि त्यांच्या दरम्यान पसरलेला अवाढव्य कसीनो. या मायानगरीत एकदा पाऊल टाकले की दिवस आहे की रात्र याचे भान राहत नाही. दिव्यांचा चकचकाट, स्लॉट मशीन्सचे खटके दाबणारे लोक, पोकर टेबलवर बसून बोली लावणारे ग्राहक, त्यांच्या बोली लावणारे झगमगीत कपड्यांतले सेवक, मध्येच विद्युतवेगाने भटकणार्‍या आणि 'कॉकटेल्स' म्हणून ग्राहकांच्या मागण्या पुरवणार्‍या तंग कपड्यांतल्या नटव्या सेविका डोळे दिपवून टाकतात.

लास वेगासचे एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर येथे जागोजागी शृंगाररस वाहताना दिसतो परंतु तो बीभत्स होऊ नये याची पुरेपुर काळजी बाळगलेली आढळते.

दोन दिवस या हॉटेलचा पाहुणचार घेऊन, वेगासच्या १२ महिने दिवाळी असलेल्या रस्त्यांवरून फेरफटका मारला, करमणुकींचे काही कार्यक्रम पाहिले, कसीनोमध्ये वेळ काढला, खाद्यपदार्थांची लयलूट असणार्‍या बफे जेवणपद्धतीचा आस्वाद लुटला आणि आम्ही ग्रॅंड कॅनयनच्या भेटीला गेलो.



DSC01034
कसिनो



तेथून परत आल्यावर वेगास स्ट्रिपच्या बाहेर ऑर्लियन्स या हॉटेलमध्ये राहिलो. यावेळेस बाहेर फारसे फिरायचे नसल्याने स्विमिंगपूल, कसीनो, चित्रपट आणि लास वेगासच्या जवळपास असणार्‍या मोजक्या आकर्षणांना भेट दिली.

या निमित्ताने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणार्‍या या नगरीबद्दल एक लेख लिहावा असे मनात आले. अमेरिकेतील आपले बहुसंख्य सदस्य यापूर्वीच या नगरीला भेट देऊन आले असतील, तरीही नव्याने जाणार्‍या पर्यटकांना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते. लास वेगासला भेट देऊन आलेल्या सदस्यांनीही यथाशक्ती आपल्याकडील माहिती पुरवावी.



DSC01058
बेलाजियोचे नाचते कारंजे



लास वेगासची सहल कशी ठरवावी?

सहल ठरवण्याच्या ६ ते ४ महिने पूर्वीपासूनच लास वेगासची डील्स तपासावीत. नेटावर माहिती मुबलक असल्याने आपल्याला हवी ती एअरलाईन्स, हॉटेल, भाड्याची कार यांची सोय करता येईल. सहलीपूर्वी अर्थातच लास वेगासचे तापमान बघून घ्यावे. वसंत आणि शरद ऋतूत लास वेगासची सहल ठरवणे सर्वात उत्तम. लास वेगासचा उन्हाळा अतिशय कडक असतो. बाहेर फिरून कातडी भाजण्याची शक्यता असते. अशावेळी पाठीच्या पिशवीत पाणी आणि उत्साहवर्धक पेयाच्या बाटल्या, डोक्यावर टोप्या, डोळ्यांवर सूर्यचष्मे आणि अंगाला सनस्क्रीन लोशन (सूर्याच्या तापापासून संरक्षण देणारे मलम) चोपडायला विसरू नये.

याचबरोबर आपल्याला कसीनो आणि रात्रीच्या कार्यक्रमांवर किती डॉलर्स खर्च करायचे याचा अंदाज आधीच घेऊन ठेवावा. वाळवंटातील ही हिरवळ बर्‍याचजणांसाठी वाळवंटातील मृगजळ ठरल्याचे अनुभव ऐकू येतात म्हणून हा सावधगिरीचा इशारा.

कोठे राहावे?

लास वेगास स्ट्रिपवर राहणे सर्वात उत्तम, लास वेगासमधील चांगली हॉटेल्स येथेच असून या रस्त्यावर फिरणे सुकर होते. लास वेगासला कारने गेला असाल तर त्या कारला तुमच्या हॉटेलच्या पार्किंग लॉटमध्ये विश्रांती देणे उत्तम. या रस्त्यावर पहाटेपर्यंत प्रचंड रहदारी असते आणि एका ठिकाणापासून दुसर्‍या ठिकाणी जाण्यास प्रचंड वेळ लागतो. या रस्त्यावर दुमजली बसेस सतत पळत असतात. प्रत्येकी ५ डॉ. मध्ये २४ तासांचा पास विकत घेता येतो. या पासामुळे तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या बसेसमधून हवे तितके वेळा प्रवास करू शकता.
लास वेगास स्ट्रिपवरील हॉटेल्स त्यामानाने बरीच महागडी आणि दाटीवाटीची आहेत. या हॉटेल्सच्या खोल्याही लहान असतात. त्यामानाने या रस्त्याच्या बाहेर इतरत्र राहिल्यास कमी खर्चात मोठ्या खोल्या, अधिक सोयीसुविधा मिळतात.



DSC00133
न्यूयॉर्क, न्यूयॉर्क



काय पाहावे आणि करावे?

येथील सर्वच पाहण्यासारखे आहे. एकेक हॉटेल पाहायचे झाले तर अर्धा दिवस लागतो. इंटरनेटवरून निघण्यापूर्वीच तुम्हाला पाहायचे जे कार्यक्रम आहेत त्यांचे बुकिंग करता येईल. त्यामुळे ऐनवेळेस तिकिटे मिळाली नाहीत असा हिरमोड होणार नाही.

लहान मुले बरोबर असतील तर रात्रीचे जीवन पाहणे दुरापास्त होईल परंतु तरीही इतर अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत. बर्‍याच हॉटेल्सच्या समोर पर्यटकांसाठी फुकट कार्यक्रम आयोजीत केलेले असतात. यांत ट्रेजर आयलंडच्या सायरन या सुंदरींचा कार्यक्रम, मिराजमधील ज्वालामुखी धबधबा आणि बेलाजियो या हॉटेल समोरील सरोवरातील नाचत्या कारंज्यांचा कार्यक्रम विशेष उल्लेखनीय आहेत.

हॉटेल्सच्या बाहेर अनेक प्रकारे केलेली झगमगती रोषणाई हा ही पाहण्यासारखा प्रकार असतो. तसेच काही हॉटेल्समध्ये ठेवलेले वाघ-सिंह, डॉल्फिन शो, मत्स्यालये, लेजर शो असे अनेक कार्यक्रम तिकिटे विकत घेऊन पाहता येतात. सीझर्स पॅलेसमधील देखावे, वेनेशियनमधील वेनिस शहराची प्रतिकृती आणि गंडोला सफर, आयफेल टॉवरच्या माथ्यावरून दिसणारी जादुई नगरी. इ. इ.

मोठ्यांसाठी अनेक प्रकारचे बहुरंगी करमणुकींचे कार्यक्रम असतात. यात स्ट्रिप शोजपासून मोठमोठ्या गायकांचे, जादूगारांचे कार्यक्रम, प्रसिद्ध अभिनेते, कलावंतांचे एकपात्री कार्यक्रम, बॉक्सिंग आणि इतर खेळ यांचा समावेश असतो.

काहीच करायचे नसेल आणि हॉटेलमध्येच वेळ काढायचा असेल तर तुमच्या राहत्या हॉटेलमध्ये असणार्‍या सिनेगृहात एक मस्तसा "पिच्चर" टाकता येतो. तलावात अंग चिंब करता येते. कसीनो तर असतोच.

मुलांना घेऊन जावे का?

लास वेगासला मुलांना सहसा बरोबर नेले जात नाही कारण तेथील आनंद फक्त मोठ्यांनाच लुटता येतो, हा थोड्याप्रमाणात गैरसमज म्हणावा लागेल. मोठ्यांसाठी अधिक आकर्षणे येथे नक्कीच आहेत परंतु लहानांना आवडतील अशी गेम आर्केड्स, कार्यक्रमही येथे भरपूर आहेत. कसीनोमध्ये मुलांना प्रवेश नसला तरी त्यातून त्यांना वाटचाल करता येते. एके ठिकाणी थांबून राहता येत नाही.

काही हॉटेल्स 'किड्स फ्रेंडली' म्हणून ओळखली जातात. या हॉटेल्समध्ये सहसा स्ट्रिप शोज ठेवलेले नसतात. तसेच मुलांना सांभाळण्यासाठी प्रशस्त पाळणाघरे असतात. मुलांना त्या पाळणाघरात ठेवून तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये वेळ घालवू शकता परंतु हॉटेलच्या बाहेर जाऊ शकत नाही.

तसे करायचे असल्यास वेगासला तुमच्या खोलीत तुम्ही नॅनी (दाई) बोलवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या दाया मुलांना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित असून त्यांच्याकडे तसा परवाना असतो. आम्ही ही सुविधा वापरून पाहिली नाही. ऑरलियन्समध्ये असणारी पाळणाघराची सुविधा मात्र वापरली आणि ती मुलांना अतिशय आवडते असा अनुभव आला. १३ वर्षांवरील मुलांना खोलीत एकटे राहता येते.

काय आणि कोठे खावे?

राहत्या हॉटेलमध्ये खाण्याची अनेक ठिकाणे मिळतील. सर्वान्न खाणार्‍या खवय्यांची वेगासला चंगळ असते. प्रत्येक हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर बफे असतो. यांत देशोदेशीचे चमचमीत पदार्थ पर्यटकांसमोर मांडले जातात. अमेरिकन, इटालियन, मेक्सिकन, चायनीज, मंगोलियन, जॅपनीज तसेच बार्बेक्यू, पिझ्झा, सॅलड्स, सूप असे अनेक प्रकार तुमच्या समोर मांडले जातात. जेवणानंतर खाण्यात येणार्‍या गोड पदार्थांचे नानाविध प्रकारही येथे मिळतात. वेगासला गेलेल्या प्रत्येकाने या बफेचा आनंद घ्यावा.

याखेरीज, अनेक सुशोभित आणि महागडी रेस्टॉरंट्स या हॉटेलांत असतात. यांत दाखल होण्यापूर्वी इवनिंग ड्रेस आणि गलेलठ्ठ पाकीट (किंवा क्रेडिट कार्डस) सोबत आहे याची खातरजमा करून घ्यावी.

फास्टफूडचे पर्यायही अशा हॉटेलांत भरपूर असतात. सबसँडविचेस, पिझ्झा आणि चायनीज रेस्टॉरंट्समुळे शाकाहारी लोकांचेही सहज निभावून जाते.
बाहेर स्ट्रिपवर आणि स्ट्रिपच्या बाहेर भारतीय रेस्टॉरंट्सही दिसतात.

आसपास पाहण्यासारखी ठिकाणे

बौल्डर सिटी कसीनो वगैरेसारखी वेगासच्या आसपास असणारी हॉटेल्स आणि त्यातील कार्यक्रमही तुम्हाला पाहता येतील. यांतील काही ठिकाणी शहरातील बसेस जातात तसेच तेथे कार घेऊनही जाता येईल.

सॅम्स टाऊन
वेगास स्ट्रिपच्या पूर्वेला काही हॉटेल्स आहेत त्यातील सॅम्स टाऊन कसीनो हे स्थळ उत्तम आहे. बेलाजियोप्रमाणेच परंतु बंदिस्त जागेत येथे कारंज्यांचा आणि लेजर लाईट्सचा कार्यक्रम फुकट दाखवला जातो. तो अप्रतिम आहे.



DSC00181
फ्रेमाँट स्ट्रीट लाइट्स


फ्रेमाँट स्ट्रीट

वेगास स्ट्रिपवरून डाऊनटाऊनला जाणारी बस पकडली तर ती तुम्हाला फ्रेमाँट स्ट्रीटला घेऊन जाईल. येथे फुकट लाइट शो पाहण्यास मिळतो. या रस्त्याचे छत एका प्रचंड पडद्याने बंदिस्त केले असून त्यावर काही लाखांच्या घरांत लाइट्स आहेत. ते प्रज्वलित करून येथे एक अनोखा कार्यक्रम सादर केला जातो. याचबरोबर नृत्य गायनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले असतात.

हूवर धरण


DSC01138
हूवर डॅम


ऍरिझोना आणि नेवाडा राज्याच्या सीमेवर वसलेले आणि कोलोरॅडो नदीवर बांधलेले हूवर धरण लास वेगासपासून सुमारे ३० मैलांवर आहे. धरणाची उंची सुमारे ७२६.४ फूट आहे. या धरणाचे पाणी अडवून तयार केलेले लेक मीड हे सरोवरही नयनरम्य आहे. लास वेगासहून हूवर डॅमला जाण्यासाठी सहल-बसचे आयोजीत केलेल्या असतात.






डिस्नी वर्ल्ड, डिस्नी लँड आणि लास वेगास ही अमेरिकेतील अतिशय अप्रतिम अशी मानवनिर्मित पर्यटनस्थळे आहेत. इच्छुकांना तेथे जाण्याची संधी लवकरच चालून येवो ही सदिच्छा.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांचा उपयोग होईलः

लास वेगासमधील आकर्षणे
हूवर डॅम
लास वेगासचे बारमाही तापमान

---
१. लेख लिहिताना त्याचा उद्देश या पर्यटनस्थळाची माहिती पुरवणे हा आहे. सदस्यांच्या प्रतिसादातूनही तिच अपेक्षा कायम राखली जावी.
२. या लेखातून अनेक शंका निर्माण होतील, मूळ लेखाशी प्रत्यक्ष संबंधित नसलेल्या शंकांसाठी इतरत्र वेगळी चर्चा सुरू करावी. लेखासंबंधित चर्चांचे स्वागत आहे.
३. लेख परिपूर्ण आहे असा लेखिकेचा दावा नाही. चुका आढळल्यास प्रतिसादातून त्यांच्याविषयी लिहून लेखाला हातभार लावावा.
४. चित्रांवर टिचकी मारली असता ती मोठी करून पाहता येतील.

Friday, June 15, 2007

इच्छा

लेखनप्रकार : गूढकथा

राधेच्या पायांतील शक्ती क्षीण होत चालली होती. आपण रस्ता चुकलो हे तिला जाणवत होते तरी काट्याकुट्यांची पर्वा न करता जिवाच्या आकांताने ती पाय नेतील तिथे धावत होती. अंग ठणकत होतं, डोळ्यांतील अश्रूंची संततधार थांबत नव्हती, कपाळातून रक्तही ठिबकत होतं. पायांत पेटके येत होते. काळोखात आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचे भानही तिला राहिले नव्हते. श्वास फुलला, उर फुटायची पाळी आली आणि पुढे एकही पाऊल टाकणं अशक्य झालं तशी रानातल्या एका मोठ्याशा दगडावर तिने बसकण मारली.

धाय मोकलून रडावं अशी इच्छा अनावर होत होती पण त्याहूनही प्रबळ इच्छा घरी परतायची होती. घरी म्हणजे तिच्या हक्काच्या घरी, तिच्या आई-बाबाच्या. राधेच्या डोळ्यासमोरून गेल्या काही महिन्यांतल्या घटना तरळून गेल्या.

राधाची बारावी झाली तशी बाबांना आपल्या लाडाकोडात वाढलेल्या पोरीच्या लग्नाचे वेध लागले होते. पुढे शिकायची राधाची इच्छा होती पण आईबाबांना तिला एकटीला लांब तालुक्याच्या गावी पाठवायचे नव्हते. फार पुढे शिकून करायचे तरी काय होते म्हणा, चांगल्या भरल्या घरात पोरीला दिली की घरदार, जमीनजुमला हेच सांभाळायचं होतं. सहा महिन्यांपूर्वी साखरगावच्या सावंतांच्या मुलाशी, राजा सावंताशी तिचं लग्न ठरलं तेव्हा आई-बाबा किती आनंदात होते. थाटामाटात त्यांनी आपल्या एकुलत्या एका लेकीचं लग्न लावून दिलं होतं. सावंतांची भरपूर शेतीवाडी होती. पोरीला कशाची ददात पडणार नाही असं बाबांना वाटत होतं. लेकीला लग्नात चांगले ठसठशीत दागिने केले होते, जावयाला नवी मोटरसायकलही घेऊन दिली होती. सासू सासरे, नणंद, सासरची इतर मंडळी सर्वांचा मान ठेवला होता. काही करायचं म्हणून कमी ठेवलं नव्हतं. राधाही आनंदात होती. नवरा देखणा होता, शिकलेला होता. सासरचा वाडाही चांगला ऐसपैस होता. नणंद तिच्याच वयाची होती.

लग्नानंतर दोन महिने कसे भुर्रदिशी उडून गेले ते राधाला जाणवलंही नाही. घरात सासू-सासरे तिला प्रेमाने वागवत होते. नवराही लाड करत होता. नणंदेशी चांगली मैत्री जमली होती. 'आपली दृष्ट तर लागणार नाही ना या आनंदाला?' असे चुकार विचार राधेच्या मनात येत. एके दिवशी रात्र होऊ लागली तरी नवरा घरी परतलाच नाही. रात्र पडली तशी राधेने सासूकडे विचारणा केली पण तिने ताकास तूर लागू दिली नाही. इतरवेळेस दिलखुलास गप्पा मारणार्‍या नणंदेनेही 'दादा शेतावरच झोपला असेल.' असे म्हणून वहिनीची बोळवण केली. त्या रात्री राधेच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसर्‍या दिवशी सकाळीच नवरा परतला. राधेने त्याला विचारणा केली तशी त्याने तिला उडवून लावले. 'शेतावर काम होते, परतायला उशीर झाला' असे काहीतरी त्रोटक उत्तर दिले.

त्यानंतर हा प्रकार नेहमीच होऊ लागला. आठवड्यातून दोन-चारदा नवरा गायब होत असे. घरातल्या गडीमाणसांकडून राधेच्या कानावर हळूहळू एकएक गोष्टी येऊ लागल्या. खालच्या आळीत नवर्‍याचे प्रकरण होते म्हणे. घरातल्या कोणालाही ते पसंत नव्हते पण करतात काय? लग्नानंतर पोरगं ताळ्यावर येईल असे सर्वांना वाटायचे. राधेला या प्रकाराची कुणकुण लागली तशी तिने सासूला स्पष्टच विचारले. सासूने कोणतेही आढेवेढे न घेता गोष्ट कबूल केली. एक मूल झालं की सगळं बरं होईल. राजा मनाने चांगला आहे. तो ताळ्यावर यावा असंच आम्हाला वाटतं. संसारात पडला की जबाबदारी येईल. सासर्‍यांनीही सुचवलं की वंशाला दिवा लवकर येऊ दे. राधेला थोडा धीर वाटला. सासू-सासरे म्हणतात तोही उपाय करून पाहायला तिची हरकत नव्हतीच. दरम्यान नवरा राधाला घेऊन तिच्या आईबाबांना भेटून आला. राधेने या प्रकाराची त्यांना कल्पना दिली नाही. उगीच त्यांच्या जिवाला घोर का म्हणून ती गप्प राहिली.

पुढचे काही महिने असेच निघून गेले. सहा आठ महिन्यांत काही नवीन घडलं नाही तशी सासर्‍यांनी तालुक्याला जाऊन तपासणी करून घ्यावी असे सुचवले. राधाला घेऊन नवरा तालुक्याला जाऊनही आला. तपासणीत राजात दोष असल्याचे आढळले. वैवाहिक जीवनात तशी बाधा नव्हतीच, हा दोषही योग्य औषधोपचाराने दूर होण्यासारखा होता. राजाला मात्र हे काही केल्या पटेना. "डॉक्टर लेकाचे काही बाही सांगतात. मी पूर्ण पुरुष आहे. तुलाच नाही आणि ४ बायकांना नांदवेन मी. मला कोणत्या औषधोपचारांची गरज नाही."आणि तेव्हापासून घरातली सगळी चक्रं उलटीपालटी फिरायला लागली. सासर्‍यांनी राधेशी बोलणं सोडलं. सासू तिला कोणत्याही कामाला हात लावू देईना. बोलली तर घालून पाडून काहीतरी बोलत असे. नणंदही दूर दूर राहत असे. राजा तर तिचा जणू दुःस्वासच करत होता. सरळ शब्दांत बोलणं त्याने सोडून दिलं होतं. रोज काही ना काही कारण काढून भांडण सुरू करे. एक दोनदा तिच्यावर हातही उगारला होता. राधेचं जगणं कठिण होऊ लागलं होतं. तिला आई-बाबांची आठवण वारंवार येत असे. एकवार त्यांना भेटून यावं अशी इच्छा होत होती.

असेच एकेदिवशी राजा रात्र बाहेर काढून सकाळी परतला तसा राधेने त्याला जाब विचारला. 'नांदवायचं नसेल तर घरी सोडून या. आईबापाला मी जड नाही.' म्हणून सांगितलं. शब्दाला शब्द वाढत गेला. राधाही हट्टावर आली होती. राजाने हात उगारला, "घरी जायचंय? जाऊन त्यांना माझ्याबद्दल सांगायचंय? गावात आमच्या घराचं नाव बद्दू करायचंय? थांब! घराबाहेर पडता येणार नाही अशी दशा करेन तुझी." सट्टदिशी थोबाडीत ठेवून दिली तशी "आई गं!" म्हणत राधा खाली बसली. राजाच्या अंगात जसा राक्षस शिरला होता. त्याने लाथा बुक्क्यांनी तिला बडवायला सुरुवात केली. राधा बेंबीच्या देठापासून ओरडत होती पण सासू तिच्या वाटेला फिरकली देखील नाही. राजाने तिचा हात धरला आणि तिला फरफटवत तो गोठ्याच्या दिशेने घेऊन गेला. गोठ्याच्या मागच्या बाजूला धान्य साठवायची खोली होती. त्यात त्याने राधाला ढकलले.

"घरी जाऊन बापाला काय सांगशील? नवरा, नवरा नाही म्हणून? माहेरी कशी जातेस बघू. जीव घेईन माहेरचं नाव पुन्हा काढलंस तर. याद राख. राहा पडून या अंधारवाड्यात. डोकं ताळ्यावर येतं का ते बघ."
दरवाज्याला बाहेरून कडी घालून राजा चालता झाला. त्या अंधार्‍या खोलीत राधाचा जीव घाबरा झाला. मार खाऊन अंग आणि डोकं दोन्ही बधिर झाले होते. त्या अंधारसाम्राज्यात उंदीर घुशींचे साम्राज्य असते या विचाराने तिचा थरकाप उडत होता. अंगाचं मुटकुळं करून ती तिथेच पडून राहिली. पायावरून चुकचुकत काहीतरी गेल्यासारखं वाटलं तसे तिने पाय छातीशी गच्च धरले.

थोड्यावेळाने उठून ती दारापाशी गेली आणि तिने दरवाजा ठोठावायला सुरुवात केली. 'मला सोडवा इथून. मला माझ्या घरी जाऊ दे. दार उघडा.' बराच वेळ असा धोशा लावूनही कोणी आले नाही तशी ती थकून ढोपरांत डोकं खुपसून मुसमुसत खाली बसली. किती वेळ निघून गेला असावा कोणास ठाऊक, अचानक दरवाजापाशी कोणीतरी असल्याची चाहूल तिला लागली.

दरवाजा करकरत उघडला. बाहेर अंधारून आले होते. नणंदेने येऊन दरवाजा उघडला होता. राधेने तिला गच्च मिठी मारली आणि ती रडू लागली.

"वहिनी, मी दरवाजा उघडला हे घरात कोणाला माहित नाही. तू इथून पळून जा." नणंद तिच्या कानात कुजबुजली तसे राधेने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. "दादा आणि आई बोलत होते. त्यांना या गोष्टीचा बोभाटा नकोय. तुझ्या बायकोला परत धाडली तर आपली अब्रू जाईल, त्यापेक्षा तिची विल्हेवाट लावू, असं म्हणत होती आई."
"काय?" राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
"गावात बभ्रा नको. स्टोव फुटला आणि आग लागली असं सांगता येईल."
"नाही, नाही. मला मरायचं नाही. मला माझ्या आईबाबांकडे जायचंय."
"तू जा वहिनी. इथे थांबू नकोस. दादा परत यायची वेळ झालीये. तो इथे आला तर काहीच करता येणार नाही.""या वेळेला कुठे जाऊ? पैसे कुठे आहेत?""मला नाही माहित, पण तू जा. मी नाही थांबू शकत अधिक वेळ इथे कोणीतरी यायचं." असं नणंद म्हणायला आणि....

"बाहेर कशी आली ही बया?" राजाचा करडा आवाज कानावर यायला एकच वेळ साधली. राजा तरातरा धावत आला आणि त्याने राधेचा हात पकडला. "चल, तुला आज इंगा दाखवतो." म्हणून तो राधाला खेचायला लागला. राधा अचानक झालेल्या हल्ल्याने गळपटून गेली होती.

"नको दादा, सोड तिला, जाऊ दे तिला. सोड," नणंदेने आरडाओरडा सुरू केला तशी राधा भानावर आली. राजा बहिणीशी हुज्जत घालत होता ती संधी साधून तिने त्याच्या हाताला जोरात झटका दिला आणि ती अंगात वारं भरल्यागत धावू लागली.

आपण कोठे धावतो आहोत, कोठे जात आहोत याचा तिला अंदाज येत नव्हता. राजा आपल्यामागून येत असणार याची तिला खात्री होती परंतु ती खात्री करून घ्यायला क्षणभरही थांबली नाही. गाव संपून झाडी सुरू झाली तशी आपण रस्ता चुकलो आहोत याची जाणीव तिला झाली. अंधार चांगलाच दाटून आला होता. आपण चुकीच्या दिशेने धावत आलो, एस्टी स्टॅंडच्या दिशेने गेलो असतो तर एस्टी पकडता आली असती असा विचार तिच्या डोक्यात आला. पण राजा तेथे पोहोचला असता. एस्टी पकडायच्या आधीच राजाने तिला ताब्यात घेतलं असतं. तिचे पाय आता बोलत होते, श्वास फुलला होता. ती क्षणभर थांबली आणि तिने मागे वळून पाहिले. मागून कसलीही चाहूल लागत नव्हती.


'काय झालं आपला पाठलाग नवर्‍याने थांबवला का असावा?' असा विचार करताना तिला अंधुक प्रकाशात तो दगड दिसला. पुढे जाणं अशक्य झालं होतं म्हणून राधा शेवटी त्या दगडावर विसावली. 'मला मरायचं नाही. मला घरी जायचं आहे. आईकडे.' तिच्या मनात पुन्हा इच्छा दाटून आली पण एकही पाऊल टाकण्याची शक्ती तिच्यात उरली नव्हती. तिला हुंदका फुटला. आपला पदर तिने तोंडावर कोंबला आणि त्या दगडावर आपलं डोकं ठेवून ती निपचीत पडली.

*--*

मध्यरात्र उलटून गेली होती. चंद्र आकाशात चांगला वर आला होता. दोन दिवसांपूर्वीच पौर्णिमा होऊन गेली होती. चंद्राचा मंद प्रकाश रानाला न्हाऊ घालत होता. हवेची थंडगार झुळुक आली तसे राधेने आपले अंग आक्रसून घेतले. थोड्यावेळाने तिने हळूहळू डोळे उघडले. बहुधा अतिश्रमाने डोळा लागला होता. घडल्या घटनेची आठवण झाली तशी ती खाडकन उठून बसली आणि कावरीबावरी होऊन इथे तिथे पाहू लागली. रानात सगळं कसं शांत होतं. मध्येच रातकिडे ओरडत होते आणि हवेच्या मंद झुळुकीबरोबर पानांची सळसळ ऐकू येत होती तेवढीच.

'मला घरी जायचंय. आई आणि बाबांना भेटायचंय.' राधाच्या मनात पुन्हा इच्छा उचंबळून आली. 'जायचं तरी कुठे या रानात? रस्ताच माहित नाही. तांबडं फुटलं की कळेल कोठे आलो ते.' तिने बसलेल्या दगडाकडे निरखून पाहिलं. शुभ्र चंद्रप्रकाशात तो पाषाण उठून दिसत होता. राधेला त्या काळ्या फत्तरावर हाताचा शुभ्र पंजा चमकताना दिसला.

'चेटकिणीचा दगड.'

ती धडपडून उभी राहिली. आता फक्त ब्रह्मांड आठवायचे बाकी होते. 'हे आपण कुठे आलो?' गावाबाहेरच्या रानात चेटकीण राहते अशी वदंता तिने ऐकली होती. एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री तिचा मृत्यू या पाषाणावर झाला. तिने आपला तळवा त्या पाषाणावर जेथे टेकवला होता तेथे गावकर्‍यांना तो पंजा पाषाणावर उमटल्याचे दिसून आले. आजही रात्रीबेरात्री हिरवी साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली, मळवट भरलेली ती चेटकीण लोकांना धरते असा समज होता. अंधार पडल्यावर रानाच्या दिशेने कधी कोणी गेल्याचं ऐकलं नव्हतं. राजा आपल्यामागे का आला नाही याचा उलगडा तिला होऊ लागला आणि जीव मुठीत घेऊन ती वेड्यासारखी पुन्हा धावायला लागली.

समोरून कोणीतरी कंदील घेऊन येत होते. पुढचा मागचा कोणताही विचार न करता राधा त्या दिशेने धावत सुटली.

"कोन हाय?" कंदील धरलेल्या व्यक्तीने राधाच्या चेहर्‍यासमोर कंदील धरला. राधाच्या तोंडातून एक अस्फुट किंकाळी फुटली. समोर धारदार नाकाची, कमरेत वाकलेली, सुतरफेणीसारखे चंदेरी केस झालेली म्हातारी उभी होती.

"कोन म्हनायचं? एवड्या रातच्याला या रानात कुटुन आलसा?" म्हातारीने खणखणीत आवाजात विचारले.
भीतीने राधाची बोबडी वळली होती. तिच्या तोंडून आवाज फुटेना. "पोरी! ह्या आडरानात रातीची काय करतीस? काय इचारते हाये म्या तुला? बोल की."

"र..र..रस्ता चुकले. मला घरी जायचंय. प..पण तुम्ही कोण?"

"म्या हितं रानाच्या भायेरच र्‍हाते. गंगाक्का नाव माजं. रातच्याला येक शेळी या रानात शिरली माजी. तिला हुडकायला निगाले तर तुज्यावर नजर पडली."

"इ...इ..इतक्या रात्री शेळी शोधायला?"

"त्यात काय मोटं? किती वर्स जाली हितं र्‍हाऊन, रानाची भीती न्हाई वाटत आता." म्हातारी ठसक्यात म्हणाली.

"आणि ती चेटकीण... हे चेटकिणीचं रान आहे ना?"म्हातारीने डोळे बारीक करून राधेकडे निरखून पाहिलं. "व्हयं! ह्ये चेटकिनीचं रान हाय, पर त्यात चेटकीन न्हाय... वावडी हाय फकस्त. पर तू हितं रातच्याला काय करतीस? आसा कसा रस्ता चुकली?"

राधेला थोडा धीर आला. "खरंच रस्ता चुकल्ये हो. मला माझ्या घरी जायचं आहे. माहेरी. माझ्या आईबाबांकडे, भिवपूरला."

"भिवपूरची कोन गं? कोन्च्या घरातली? आन रानातून पायी पायी कुटं भिवपूर गाठाया निगालीस?"
म्हातारीच्या प्रश्नांना आता सविस्तर उत्तरे देणे भाग होते. राधेची भीड चेपली होती. म्हातारीचा आवाजही मऊ झाल्यासारखा वाटला.

"तुम्हाला भिवपूरची माहिती आहे?"

"म्हाईत हाय मंजी? म्या पन भिवपूरातलीच हाय. सदा पाटलाला वळखतीस? मी त्याची धाकली आत्या हाय. दादा व्हता तेवा जानं व्हायचं, दादा गेला माजं पन वय जालं, सत्तरी उलटली. कोन जातया कोनाकडं उटून आता? पर सदा भेटला तर त्याला सांग की आत्याने आठवन काडली. बरं आता हितं उबं राहन्यापरीस तुला बाजूच्या गावात पोचवते, तितं एश्टी पकड पहाटेची, ती नेईल तुला भिवपूरला."

"तुम्ही सदाकाकाच्या आत्या? सदाकाकाची माझ्या बाबांशी चांगली ओळख आहे." राधाला हायसं वाटलं. चालता चालता तिने आपल्यावर गुदरलेल्या सर्व गोष्टींबद्दल म्हातारीला सांगायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशात म्हातारीच्या डोळ्यांतील करुणा दाटत आलेली दिसत होती. राधेने आपली कहाणी संपवली तशी म्हातारी म्हणाली,

"बाय माजी धीराची. या चेटकिनीच्या रानात रातची र्‍हायलीस तवाचं आलं ध्यानात की कायतरी घोटाला हाय. तुज्या घरची मानसं तुज्यामागं आली पन नाईत या रानात. आस्सा दरारा हाय चेटकिनीचा. चल म्या सोडते तुला."

"पण तुमची शेळी?"

"आगं या शेळीपुडं ती शेळी मोटी न्हाय. ती येईल घरला. या रानात कोन लांडगा न्हाई येत."

"आणि ती चेटकीण?" राधाने चाचरत विचारलं.

"कोन्ची चेटकीन? कोन चेटकीन बिटकीन न्हाय हितं."

"पण मी दगडावर पंजा पाहिला. चेटकिणीचा पंजा." त्या आठवणीने राधाला पुन्हा शहारून आले.

"हां! दगडावर पंजा हाय खरा पर तो भाऊ मोहित्याची बायकोचा आन ती प्वार चेटकीन नवती."

"भाऊ मोहिते? म्हणजे आमच्या साखरगावचे? त्यांची बायको? म्हणजे?" राधेला फारसे काही कळले नाही.

"पावलं उचल झटाझट. सांगते वाटेवर." गंगाक्का म्हणाली, "भाऊ मोहित्याचं लग्न झालं, बायको घरात आली. सारं कसं आलबेल व्हतं. पर दुर्दैव त्या पोरीचं. म्हैन्याभरात जावेचं तान्हं पोर गेलं. पांडर्‍या पायाची अवदसा घरात आली म्हनून जावेने शिमगा केला.... आन पोरीचं नशीब आसं फुटकं की गावात कसलीशी साथ आली आन दोन-चार ल्हान पोरं दगावली. भाऊ मोहित्याची बाय चेटकीन हाय म्हनून कोनी वावडी उटवली म्हाईत न्हाय पर थंडीच्या एका रातीला गावातली मान्सं वाड्यावर चालून आली. ती पोरगी वाट मिळलं तशी धावत सुटली आनी या रानात आली. आक्षी तुज्यावानी." म्हातारीने राधेवर नजर रोखून म्हटले.

"तिला बी तिच्या घरला जायचं आसलं पर रस्ता नाय गावला बिचारीला. थंडीचं दिवस व्हतं. रातच्याला कडाक्याची थंडी पडायची. नाजूक प्वार ती, गारठून गेली त्या दगडावर. सकाळी लोकांना गावली, शरीर बरफावानी कडक जालं व्हतं आनी व्हय! पंजा उमटला व्हता त्या दगडावर. कसा तो न्हाई म्हाईत, पन अजून सुदीक हाय तसाच हाय. त्या रानातच क्रियाकरम केलं तिचं. गावात पन नाय आनली तिला. तवापासून कदीतरी रातच्याला दिसते म्हनतात."

"तुम्हाला दिसली का हो कधी गंगाक्का ती?" राधेने कुतूहलाने विचारले.

"मला तू दिसलीस. तुला पन तिच्यावानी घरला जायचं हाय. तू पन रातच्याला त्याच गावातून येतीस, त्याच दगुडावर बसतीस. मग काय म्हनू म्या?" तोंडाचं बोळकं उघडून म्हातारी जोरात हसली.

"मला कुठे जायचं ते कळलं नाही अंधारात. या रानात कशी आले तेही कळलंच नाही. डोक्यात एकच होतं की माहेर गाठायचं. मीच ती चेटकीण आहे असं नाही ना वाटलं गंगाक्का तुम्हाला."

"न्हाई, कोन चेटकीन न्हाई. तू न्हाईस आन ती पन न्हाई, गरीब प्वार होती बिचारी, कदी कोनाला तरास दिला नवता तिनं, नशीब तिचं.... आडवं आलं...पन तू घरला जाशील." लांबून कोंबडा आरवल्याचा आवाज ऐकू येत होता. "गाव आलं, पहाट पन व्ह्यायला आली. चल, झटाझट... पारावर पैली एश्टी मिळंल." अंधार ओसरायला लागला होता. आकाशातले तारे मंद होत होते. क्षितिजावर कोठेतरी केशरी छटा येऊ लागल्या होत्या.

लांबून पार दिसू लागला तसा म्हातारीने राधाचा निरोप घेतला. "निगते आता. मला घरला परतायला हवं.. . मोप काम बाकी हाय.""गंगाक्का तुमचे उपकार विसरणार नाही जन्मभर. देवासारख्या आलात धावत, काय झालं असतं त्या रानात भीतीने माझं?" राधेच्या डोळ्यांत पाणी तरारलं."व्हयं पन मी व्हते तितं आन आले तुज्या मदतीला. माजं येक काम कर पोरी. तुज्या सदाकाकाला सांग गंगाक्का भेटली व्हती म्हनून. किती वर्सांत भेट न्हाई जाली. त्याला खुशाली सांग, या म्हातारीची इत्की इच्चा पुरी कर."
"घरी गेले की लगेच निरोप धाडते सदाकाकाला," राधा हसली. दूरवरून मातीचा लोट उडताना दिसला. एस टी येत आहे हे ध्यानात आलं तशी राधा पारापाशी धावली. एसटीत बसल्यावर खिडकीतून तिने नजर फिरवून सभोवार पाहिले पण गंगाक्का कधीच निघून गेली होती.

दुपारच्या वेळी राधाला दारात उभी पाहून आईला धस्स झालं. राधेने तिला आपली कर्मकहाणी ऐकवली तशी आईने तिला कुशीत घेतलं. बाबांना शेतावर निरोप धाडला होताच. बाबा हातातली कामं सोडून धावत आले. राधेला पाहून त्यांना भडभडून आलं, "सावंतांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. पोरीच्या जिवाचं बरं वाईट झालं असतं तर गोळ्या घातल्या असत्या एकेकाला. सोडणार नाही." चिडून बाबा बोलत होते. राधेच्या आईने आणि राधेने खूप वेळ समजूत घातल्यावर ते शांत झाले.

ऊन उतरले तशी राधेने बाबांना म्हातारीचा निरोप सदाकाकाला पोहचवण्याविषयी सांगितले. बाबांनी तोपर्यंत म्हातारीकडे विशेष लक्ष दिलेच नव्हते. राधेने गळ घातली तशी त्यांनी विचारले, "काय नाव म्हणालीस, सदाच्या आतेचे?"

"गंगाक्का, सदाकाकाची धाकटी आत्या आहे असं म्हणत होती."

"सदाची धाकटी आत्या?" बाबांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. "तू चल माझ्याबरोबर सदाकाकाकडे. गंगाक्काचा निरोप तूच सांग."

राधेने तोंड धुतले, साडी बदलली, केस विंचरले आणि ती बाबांसोबत सदाकाकाकडे निघाली. सदाकाका ओसरीतल्या झोपाळ्यावर आराम करत बसले होते. डावा पाय जमिनीवर रेटून झोपाळ्याला सावकाश झोका देत होते. राधेला आणि तिच्या बाबांना बघून ते उभे राहिले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले.
राधेच्या बाबांनी त्यांना थोडक्यात घडला वृत्तांत सांगितला. तो ऐकताना सदाकाकांच्या चेहर्‍यावरील रेषा सरासर बदलत होत्या. "वाचलीस पोरी! नाहीतर, काय वाढून ठेवलं होतं तुझ्या नशिबात ते देवाला माहित... पण तुला गंगाक्का दिसली हे खरं मानायचं?"

"अहो काका, दिसली म्हणजे? दिसली, बोलली, तिच्याबरोबरच एस्टी स्टॅंडकडे आले मी. तुमची आठवण काढत होती. सदाकाकाला निरोप दे म्हणत होती." सदाकाकांच्या प्रश्नातली गोम राधेला कळेना.
सदाकाकांनी राधेच्या डोक्यावर हात फिरवला, "गंगाक्काच्या लग्नात ४ वर्षांचा होतो मी. तिचा चेहराही आठवत नाही. साखरगावच्या मोहित्यांच्या घरी दिली होती तिला. पुढे काय झालं कळण्याचं वय नव्हतं पण एक दिवस बा धाय मोकलून रडत होता. गंगाक्काचं काय केलं त्या मोहित्यांनी ते कळायलाही मार्ग नव्हता. अचानक सांगावा धाडला की गंगाक्का गेली.

नंतर आजा, काका आणि बा विचारपूस करायला गेले होते, त्यांना मोहित्यांनी आमच्या गळ्यात धोंड बांधलीत असं सांगून बखेडा उभा केला. गावात गंगाक्का चेटकीण आहे असा आधीच बोभाटा झाला होता. आज्याने निमूटपणे तिथून पाय काढला. गंगाक्का गेली होती आणि त्या गावात काही बोलायची सोय राहिली नव्हती. त्या दिवसापासून गंगाक्काचा विषय घरात कोणी काढला नाही पण आम्हाला माहित होतं की गंगाक्का चेटकीण नाही. साधीसरळ होती आमची आत्या." सदाकाकांचा आवाज कापरा झाला होता.
राधेच्या अंगावर काटा फुलला होता, "म्हणजे मला भेटली ती गंगाक्का.... रानातली च..." तिला पुढे काय बोलावे ते सुचत नव्हते. "नाय पोरी! तुला भेटली ती इच्छा. तुझी इच्छा आणि तिची इच्छा. त्या इच्छेने तुला घरी आणलं. तुझ्यावाणी गंगाक्काही जीव वाचवायला घरच्या आसेने रानात धावत सुटली... पण नशीब तिचं, जे तिच्याने झालं नाही ती घरी परतायची तिची अपुरी इच्छा आज पुरी झाली."

Tuesday, June 05, 2007

सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा: एक कोडे

सम्राट चंद्रगुप्ताला (राज्यकाळ इ.स.पूर्व ३२०-२९८) गादीवर बसल्यापासूनच आपल्या जिवाची भीती वाटत असे. अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. चंद्रगुप्तावर विषप्रयोगाचे प्रयत्न झाल्याने तो नेहमी सतर्कही असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे. आपल्या विहिरी, जलसंचय इ. मध्ये कोणी विष तर कालवले नाही ना याबाबत तो काळजी घेत होता.

मगधाच्या गादीला तसे अनेक विश्वसनीय दूत व सरदार मिळाले होते. त्यांच्यासोबत शिकारीस जाणे हा चंद्रगुप्ताचा आवडता छंद. कधी कधी चंद्रगुप्त अनेक आठवड्यांच्या शिकारीवर जात असे.

खरा इतिहास येथे संपवून आता कोडे सुरू करू.


एकदा चंद्रगुप्ताच्या मनात शिकारीस जाण्याचे आले. मगधाच्या सीमेबाहेर घनदाट अरण्य होतेच. आपल्या विश्वासातील निवडक २४ सरदारांना घेऊन चंद्रगुप्त शिकारीस निघाला. निघण्यापूर्वी चाणक्याने अर्थातच जिवाला अपाय होऊ नये म्हणून सोय कशी करावी याची मसलत चंद्रगुप्ताशी केली होती. त्यानुसार या वेळेस त्याच्या स्त्रीअंगरक्षक त्याच्या समवेत न जाता या २४ सरदारांवरच चंद्रगुप्ताच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडली. अरण्यात चंद्रगुप्ताच्या वास्तव्यासाठी एक लहानसा महाल बांधलेला होताच. या महालास एकूण ९ खोल्या होत्या. त्यातील मध्यभागी चंद्रगुप्ताचे शयनगृह होते. चंद्रगुप्ताने २४ सरदारांची सोय त्या सभोवतीच्या खोल्यांत अशी केली की महालाच्या प्रत्येक दिशेला ९ सरदार असतील. हे शब्दांत सांगून स्पष्ट होत नसेल तर पुढील चित्र पाहा.


















3
3
3
3
चं.
3
3
3
3




चं=चंद्रगुप्त आणि प्रत्येक खोलीतील सरदार ३.

सरदारांना मात्र या संरचनेमुळे कैद्यासारखे वाटू लागले. त्यांनी चंद्रगुप्ताची परवानगी काढली की आम्हाला संध्याकाळी/ रात्री निदान एकमेकांच्या खोलीत जाऊन गप्पा गोष्टी करण्याची मुभा असावी. चंद्रगुप्ताने अर्थातच परवानगी दिली परंतु अट घातली की प्रत्येक दिशेला ९ सरदार असणे भाग आहे.

असो. तर पहिल्या रात्री :

चंद्रगुप्ताने झोपायला जाण्यापूर्वी सर्व खोल्यांतून फेरी मारली आणि सरदारांची मोजणी केली. त्याचा हेतू हा की आपली आज्ञा पाळली जाते की नाही हे पाहणे आणि काही सरदार जवळपासच्या खेड्यांतून चालणारे नृत्य-गायनाचे आणि लोककथांचे कार्यक्रम पाहायला तर गेले नसतील याची शहानिशा करणे. चंद्रगुप्ताला प्रत्येक दिशेला ९ सरदार दिसल्याने तो समाधानाने झोपायला गेला. प्रत्यक्षात मात्र ४ सरदार महालाबाहेर गेले होते आणि तरीही उरलेल्या सरदारांनी चंद्रगुप्ताची दिशाभूल केली होती. ती कशी बरे केली असावी?

रात्र दुसरी:
या रात्री कोणताही सरदार महालाबाहेर गेला नाही परंतु ४ गावकर्‍यांना त्यांनी रात्री येऊन आपले मनोरंजन करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार ते ४ गावकरी महालात आले, पण चंद्रगुप्ताने पाहणी केली असता त्याने प्रत्येक दिशेला ९ सरदारच मोजले. ते कसे?

रात्र तिसरी:
तिसर्‍या रात्री सरदारांची भीड चेपली आणि त्यांनी ८ गावकर्‍यांना आमंत्रण दिले. आता महालात चंद्रगुप्ताव्यतिरिक्त २४+८=३२ जण होते, तरीही चंद्रगुप्ताने मोजणी केल्यावर प्रत्येक दिशेस ९ सरदारच भरले. ते कसे?

रात्र चौथी:
सरदारांना आता या प्रकरणाची मजा येऊ लागली. चौथ्या रात्री १२ पाहुणे आले. म्हणजेच ३६ जण भरले. चंद्रगुप्ताला फसवायला त्यांनी अशी मांडणी केली की प्रत्येक दिशेला ९ सरदारच भरतील.

रात्र पाचवी:
ही शिकारीची शेवटची रात्र होती. या दिवशी पाहुण्यांना आमंत्रण नव्हते. उलटपक्षी, ६ सरदार उठून जवळच्या गावात गेले. अर्थातच, चंद्रगुप्ताने प्रत्येक दिशेला ९ सरदार मोजले. ते कसे?

मंडळी, चंद्रगुप्ताचे गणित कच्चे नव्हते. सरदार मात्र त्याच्यासारखेच चलाख होते. कोडे वाचायला मोठे असले तरी सोपे आहे. उत्तरासाठी तक्ता दाखवण्याची गरज नाही.
३ ३ ३
३ च ३
३ ३ ३

अशाप्रकारेही उत्तर लिहिता येईल. पहिल्या रात्रीचे कोडे सोडवले की बाकी सोडवण्यास त्रास पडणार नाही. हे कोडे प्रसिद्ध गणिततज्ज्ञ रेमंड स्मलयन यांच्या पुस्तकातून घेतले आहे. बघा सोडवता येते का?

संदर्भ :
ऐतिहासिक संदर्भ : अशोकचरित्र - वा.गो.आपटे.
कोडे घेतले आहे : द रिडल ऑफ शहरजादी अँड अदर - रेमंड स्मलयन.

Wednesday, May 30, 2007

फ्लाइंग डचमॅन



धुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग भय वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो. रानात रस्ता चुकलेला वाटसरू आणि त्याच्या सभोवती त्याला आणि झाडा-झुडपांना वेढून टाकणारे धुकं, त्या धुक्यातून त्याचा होणारा पाठलाग. भयपटांतून दाखवलेली झपाटलेली हवेली नेहमीच धुक्याने वेढलेली असते. एखादा ड्रॅक्युलापट पाहिला असेल तर रात्रीच्या वेळी वेडीवाकडी वळणे घेत टेकडीच्या दिशेने जाणारी बग्गी आणि त्या टेकडीच्या माथ्यावर धुक्यात लपाछपी खेळणारा ड्रॅक्युलाचा वाडा नक्कीच आठवत असेल.

धुकं डोंगरावर, जमिनीवर, पाण्यावर कोठेही अचानक जन्म घेतं. भर समुद्रातही धुकं निर्माण होतं. या धुक्यातून एखादे भुताळी जहाज तुमच्यासमोर येऊन उभे ठाकले तर? स्वत: समुद्र ही काही कमी गूढ नाही. समुद्र हा अद्यापही मानवाच्या संपूर्ण ताब्यात न आलेला भाग, आजही अज्ञात, रहस्यमय आणि गूढ समजला जाणारा. कधी शांत, कधी खवळलेला, कधी वादळांत सापडलेला तर कधी भयंकर लाटा निर्माण करून बेटंच्या बेटं गिळून टाकणार्‍या समुद्र, त्यातील अगणित जीव आणि त्यावर स्वार झालेल्या जहाजांविषयी अनेक खऱ्याखोट्या अद्भुत कथा ऐकायला मिळतात. समुद्रावर खलाशांमध्ये अनेक आख्यायिका, अंधश्रद्धा असल्याचे सांगितले जाते.त्यातलीच एक सुप्रसिद्ध आख्यायिका आहे फ्लाइंग डचमॅनची.

फार लहानपणी ही गोष्ट कोणीतरी सांगितल्याचे आठवते. कालांतराने रिचर्ड वायनरच्या पुस्तकावर आधारित बाळ भागवतांचे पुस्तकही वाचले होते परंतु आता ही फ्लाइंग डचमॅनची आख्यायिका आठवण्याचे कारण म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरिबियन हा चित्रपट. डेव्ही जोन्स नावाचा कप्तान साक्षात सैतानाशी जुगार खेळतो आणि त्यात हरल्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याचे जहाज खलाशांसह जगाच्या अंतापर्यंत समुद्रात भरकटत राहते. एकाकी समुद्रात अचानक धुक्याच्या पडद्यामागून किंवा उंच उचंबळलेल्या लाटेतून प्रगट होणार्‍या या जहाजाच्या जवळपास जाणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देणे.

फ्लाइंग डचमॅनच्या तशा अनेक आख्यायिका युरोपात प्रसिद्ध आहेत. या जहाजावर अनेक कथा, नाटकेही लिहीली गेली आहेत. त्यापैकी एखाद्या गोष्टीत फ्लाइंग डचमॅन हे जहाजाचे नाव आहे तर दुसर्‍या एखाद्या आख्यायिकेत ते जहाजाच्या कप्तानाचे नाव आहे. काही आख्यायिकांत हे जहाज जगातील सर्व समुद्रात कोठे ना कोठे दिसले असे सांगितले जाते तर बहुतांश आख्यायिका केप ऑफ गुड होपला फ्लाइंग डचमॅनचे प्रमुख स्थान मानतात. या सर्व आख्यायिकांपैकी खालील दोन आख्यायिका सर्वात प्रसिद्ध आहेत.

पहिल्या आख्यायिकेचे मूळ एका डच जहाजाशी संबंधित आहे असे म्हटले जाते. सतराव्या शतकात कॅ. बर्नार्ड फोक्के हा डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावर कप्तान होता. त्याचे जहाज जावा ते हॉलंड असा प्रवास करत असे. या प्रवासासाठी इतर जहाजांना ८ महिने लागत परंतु फोक्के हा प्रवास केवळ ३ महिन्यांत आटोपत असे. यावरून लोकांत वावडी पसरली की बर्नार्ड फोक्केने साक्षात सैतानाशी करार केला आहे आणि त्यामुळेच तो हा प्रवास इतक्या जलद करायचा, असे म्हटले जाते. पुढे अर्थातच या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याला मृत्यूनंतरही जहाजासकट समुद्रात भरकटत राहावे लागले.

दुसर्‍या एका आख्यायिकेनुसार या जहाजाचा कप्तान हेंड्रिक वॅन्डरडेकन होता. १६८० च्या सुमारास तो डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजाची ऍमस्टरडॅम ते जावा अशी वाहतूक करत असे. केप ऑफ गुड होप जवळ एकदा त्याच्या जहाजाला प्रचंड वादळाचा तडाखा बसला. यावर संतापून वॅन्डरडेकन जहाजाच्या डेकवर उभा राहिला आणि त्याने निसर्गाला यथेच्छ शिव्या घातल्या आणि इतरांनी दिलेले सल्ले धुडकावून त्या वादळात आपले जहाज घातले. परिणामी जहाज कलंडून सर्वांचा मृत्यू झाला. यामुळेच हे जहाज समुद्रात आजही भरकटत असते.

या दोन्ही आख्यायिकांत फ्लाइंग डचमॅन हे कप्तानाला उद्देशून म्हटले आहे. जहाजाला नाही. अशा अनेक आख्यायिकांचा शेवट मात्र सारखाच आहे की या जहाजाला आणि त्याच्या कर्मचारीवर्गाला अनंतापर्यंत समुद्रात भरकटत राहण्याचा शाप मिळाला आहे.

या जहाजाच्या केवळ दर्शनाने संकटे ओढवतात असे म्हटले जाते. १९व्या आणि विसाव्या शतकात अनेकांनी या जहाजाचे दर्शन झाले असल्याचे म्हटले आहे. यांतील सर्वात प्रमुख किस्सा इंग्लंडचा राजा पाचव्या जॉर्जचा येतो. पहाटे चारच्या सुमारास तांबड्या प्रकाशात न्हाऊन निघालेले हे जहाज त्यांना ऑस्ट्रेलियाजवळच्या समुद्रात दिसले असे सांगितले जाते. १९४२ सालीही या जहाजाने दर्शन दिल्याचे किस्से ऐकवले जातात.

फ्लाइंग डचमॅनही आख्यायिका आहे की सत्यकथा कोणास ठाऊक? पायरेट्स ऑफ द कॅरेबियन या चित्रपटात डेव्ही जोन्स आणि त्याच्या खलाशांचे मानवी जीवन नाहीसे होऊन समुद्र जीवांचे गुणधर्म त्यांच्यात उतरलेले दाखवले आहेत. हे जहाज पाण्यातून उसळी मारून वर येतानाही दाखवले आहे. खरे खोटे कसेही असो. पायरेट्सचा तिसरा भाग बघायची उत्सुकता फ्लाइंग डचमॅनमुळे जितकी आहे त्याच्या दसपट कॅप्टन जॅक स्पॅरोमुळे आहे.
सर्व संदर्भ आणि चित्र विकिपीडियावरून.

Sunday, May 13, 2007

वाटणी

मदर्स डे स्पेशल!


“काय रे काही हवयं का?” स्वयंपाकघराच्या भिंतीला टेकून उभ्या असलेल्या अक्षयला मी विचारले तशी त्याने नकारार्थी मान हलवली. “मग इथे का? जाऊन खेळ की. भांडलात तर नाही ना दोघे?”

अक्षय माझ्या मैत्रिणीचा मुलगा. वय ७ वर्षे, माझ्या मुलीपेक्षा दीड वर्षांनी लहान. दोघे इतकी वर्षे एकुलते एक असल्याने एकमेकांशी त्यांचं बरं जमतं. आठवड्याभरापूर्वी अक्षयला नवा भाऊ झाल्याने म्हणजे घरात नवे बाळ आल्याने त्याला आज येथे खेळायला बोलावले होते. तेवढीच त्याच्या आईला विश्रांती म्हणून.

“काय रे भांडलात तर नाही ना दोघे? काय विचारत्ये मी?” पुन्हा त्याने मान हलवली.
“ती टीव्हीवर तिची सिरिअल पाहते आहे, मुलींची कुठलीतरी. मला नाही बघायची.”
“बरं मग तुला गेमबॉय देऊ का तिचा? किंवा दुसर्‍या टीव्हीवर गेमक्युब देऊ का लावून?”
“नको मावशी.”
“मग रे? मी काम करते, तू माझ्याशी गप्पा मार.” आता याला रमवावं तरी कसं या विचारांत मी काहीतरी बोलून गेले.
“तुझ्या शाळेतल्या गोष्टी सांगतोस?” शाळेतल्या गोष्टी सांगणे हा आमच्या कन्यकेचा आवडता विषय असला तरी मुलांना हा विषय प्रिय असावा की नाही याबाबत मी जरा साशंकच होते.
“मावशी, आता ते बाळ घरात आलं ना आता आई त्याच्यावर जास्त प्रेम करेल का गं?” अक्षय टपोर्‍या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाला.

“नाही रे असं काही नसतं! ती तुम्हा दोघांवरही सारखंच प्रेम करेल.” हा इथे तिष्ठत का उभा होता त्याचा अंदाज मला येऊ लागला होता. त्याचा प्रश्न बहुधा कालातीत प्रश्न असावा. डोळ्यासमोरून काळ सर्रकन तीस एक वर्षे मागे सरकला.

मला भाऊ झाला तो दिवस होता दिवाळीचा आणि मी पाच वर्षांची होते. म्हटलं तर बरंच काही कळण्यासारखं आणि म्हटलं तर काहीच न उमगण्यासारखं वय. आईच्या माहेरी डॉक्टरच डॉक्टर, ती होतीही मामाच्याच नर्सिंग होममध्ये म्हणजे घरातच तशी. नवं बाळ आलंय या खुशीत मी दिवसभर हुंदडत होते. मामेभावंडं, मामी, हॉस्पिटलाचा स्टाफ, बाकीचे पेशंट सर्वांना नवं बाळ आल्याची वर्दीही देऊन टाकली होती. मध्येच डोळे किलकिले करून एक हलकीशी जांभई देऊन पुन्हा गाई गाई करणारे कपड्यात करकचून बांधलेले बाळ आवडण्याचे कोणतेही सयुक्तिक कारण नसतानाही मनापासून आवडले होते. 'त्याला थोडावेळ मांडीवर घेऊ?' असा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्याने आईने ते दोन चार मिनिटे मांडीवर टेकवलेही होते. कधीतरी मध्येच मामाने येऊन दम भरल्याने दिवसभरात काहीतरी खाऊनही घेतले होते. दिवाळी असल्याने बाकीही मज्जाच मज्जा सुरू होती. या सगळ्या वातावरणात रात्र कधी झाली ते कळलेच नाही.

रात्र झाली तशी माझ्या मामेभावाने हळूच पिल्लू सोडले, “आज रात्री तुझी आई बाळाला जवळ घेऊन झोपणार. तुला नाही!”

खरंतर आईचे दिवस भरल्याने मी गेले कित्येक दिवस मामेबहिणी शेजारी झोपत होते पण दादाच्या चिडवण्याने अपेक्षित परिणाम साधला होता. 'असूया' काय असते हे त्या दिवशी कळले. मनात अनेक प्रश्न आले. आई खरंच दिवसभर बाळाला जवळ ठेवून त्याच्या शेजारी झोपली होती. बाळाला बघायला किती लोक आले होते आणि किती कौतुक करत होते. बाबाही येऊन येऊन त्याच्याकडे टक लावून पाहत होते. या सर्वात मी कोठे आहे याची कोणालाच चिंता नव्हती की काय?

मी धावत धावत जीना उतरून हॉस्पिटलमध्ये गेले. आई थकून झोपली होती. तिला गदगदा हालवले आणि सांगितले, “त्या बाळाला पाळण्यात ठेव. मला इथे झोपायचं आहे तुझ्या बाजूला.”

“आज नको, आज मला बरं नाही. इथून घरी गेलो की झोप माझ्या बाजूला.” आई थकलेल्या आवाजात म्हणाली.
“नाही आजच. तू दिवसभरात मला जवळही घेतलं नाहीस. झोपायला तरी घे ना जवळ.” म्हणून मी भोकांड पसरले.


आईने शांतपणे बाळाला पाळण्यात ठेवले आणि मला कुशीत घेतले. रात्री मामीची फेरी झाली तशी तिने आईला थोडासा दम भरला. मी चुकून पोटात लाथ वगैरे मारली झोपेत तर? त्यापेक्षा झोपली की तिला कोणीतरी उचलून वर घेऊन जाईल असे सुचवले पण आईने नकार दिला. झोपू दे, तिच्याकडे दिवसभरात खरंच दुर्लक्ष झाले असावे म्हणाली. त्या रात्री मी आईशेजारीच झोपले. सकाळी उठल्यावर राग, दु:ख पळाले होते.

“मावशी, सांग ना! अम्मा सारखं प्रेम कसं करेल आता ते शेअर होईल ना?” अक्षयच्या प्रश्नाने माझ्या मनातील शृंखलेला खीळ पडली.

“नाही आईचं प्रेम शेअर नाही होत. नवीन बाळ आलं आता तिचं प्रेम डबल होईल.”
“असं कसं?”
“त्याचं असं की आता नवीन बाळाचे लाड झाले की तुझेही होतील. त्याला खेळणी-कपडे मिळाले की तुलाही मिळतील. बाळ मोठं झालं की तुम्हा दोघांच्याही आवडीचे पदार्थ, गोष्टी, खेळणी घरात येतील. घरात दोन दोन वाढदिवस साजरे होतील म्हणजे डबल मजा. ते थोडं लहान आहे, त्याला अद्याप काही करता येत नाही त्यामुळे कदाचित आई त्याच्याकडे जास्त लक्ष देते असे वाटेल तुला पण आईचं प्रेम शेअर होत नाही काही. ते वाढतं, आधी ते तुझ्या एकट्यासाठी होतं. आता ते दोघांसाठी झालं म्हणजे वाढलं, डबल झालं. हो की नाही?”

“हम्म! हो मावशी खरंय तुझं, मला गेमबॉय देतेस?” अक्षय खुदकन हसला तसं मलाही बरं वाटलं. लहान मुलांची समजूत काढणं खूप सोपं असतं हे पुन्हा जाणवलं.

----

Wednesday, April 11, 2007

अंधश्रद्ध - २

पुढचा संपूर्ण आठवडा वसुंधराताईंना कोणतेही स्वप्न पडले नाही. रोज रात्री त्यांना शांत झोप लागत होती.

दर शुक्रवारी रात्री १० वाजता रीमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण होत असे. मनात धाकधूक ठेवूनच त्या टीव्ही सुरू करत परंतु गेले काही आठवडे विशेष घडले नव्हते. आजही रीमाचा कार्यक्रम पाहण्यासाठी त्या आणि नानासाहेब रात्रीची जेवणे झाल्यावर दिवाणखान्यात काहीतरी वाचत बसले होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी टीव्ही सुरू केला. आजचा कार्यक्रम अघोर विधी आणि पूजांबाबत होता. त्यासाठी रीमा आणि तिचा चमू मुंबईला लागून असलेल्या कान्हेरी जवळच्या जंगलात गेले होते. तेथील एका आड गुंफेत अघोर पंथाचे विधी चालतात आणि अमावास्येच्या रात्री काही विशेष पूजा तेथे केल्या जातात असा त्यांना सुगावा लागला होता.कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा कान्हेरीतील एका पायवाटेवर कॅमेर्‍यासमोर रीमा आपले छोटेखानी भाषण देत होती.

"या जगात कोणीही अश्रद्ध नाही. प्रत्येक माणूस सश्रद्धच असतो. प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असतात, त्याची खोली वेगळी असते, आयाम वेगळे असतात. एखादा माणूस देवावर अजिबात श्रद्धा ठेवत नसेल परंतु आपल्या आईवडिलांवर श्रद्धा बाळगून असेल, तर एखादा आपल्या कामावर श्रद्धा बाळगून असेल, गुरुवर, कलेवर, अभ्यासावर. माणसाच्या श्रद्धा आणि श्रद्धास्थाने वेगवेगळी असतात. ज्या श्रद्धांवर आपला विश्वास नाही त्याला आपण अंधश्रद्धेचे नाव देतो. एखादी विद्या, शास्त्र पुरातन आहे, आज तिचे महत्त्व उरले नसेल किंवा कमी झाले असेल म्हणजे ते थोतांड असेलच असे नाही. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, एखाद्या प्राण्याला किंबहुना कुत्र्याला माणसाच्या शरीराचा, त्याने वापरलेल्या वस्तूचा, हातरुमाल किंवा चपला यांचा अचूक वास येतो. त्यावरून तो हरवलेली गोष्ट, जागा, माणूस हुडकून काढू शकतो. समजा घ्राणेंद्रिय जागृत करण्याची ही कला किंवा ज्याला सिद्धी असे म्हणू माणसाने अवगत केली तर केवळ एखाद्याच्या हातरुमालाचा, केसांच्या पुंजक्याच्या आणि अशा इतर लहानसहान गोष्टींवरून कदाचित इतरांचे स्वभाववर्णन करता येईल, त्या माणसाबद्दल बरेच काही सांगता येईल. तंत्रसाधनेतून अशा अनेक सिद्धी प्राप्त होतात असे काही तज्ज्ञांचे मत आहे, जे इतर वेळेस भोंदूबाबांकडून चमत्कार, सिद्धी, जादू म्हणून खपवले जाते. हे करणी, नवस, जादूटोणा कुठेतरी याच विचारांशी संलग्न आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज आम्ही अघोरींना भेट देत आहोत. अघोर म्हणजे रक्त पिणारे, बळी देणारे, मृत व्यक्तीचे मांसभक्षण करणारे असा सर्वसाधारण समज असतो परंतु अघोर म्हणजे ज्याने स्वत:ला आठ प्रकारच्या दुर्गुणांपासून मुक्त केले आहे तो. हे दुर्गुण म्हणजे अपेक्षा, अभिमान, भीती, हाव, घृणा, बीभत्स, शारीरिक सुख आणि दांभिकता. यापासून मुक्ती मिळाली तर जीवाला कोणताही घोर राहत नाही आणि म्हणून यावर विजय मिळवणार्‍याला म्हणतात अघोर आणि साधनेला म्हणतात अघोर विद्या. जो हे साधतो तो शिव म्हणजे पवित्र असतो आणि त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात, तांत्रिक विद्येत तो प्रगती करतो.

तरीही आजच्या या युगात अशा शक्तींच्या मागे लागलेल्या व्यक्तींना या साधनेची काहीही माहिती नसते आणि अर्धवट ज्ञानाच्या आधारे ते आपली शक्ती व्यर्थ घालवतात याचे आम्ही आज चित्रण करणार आहोत.”

रीमाचे भाषण ऐकून वसुंधराताईंना शिसारी आली. “अहो, यावेळी तुम्हीच तिला सांगा की ही असली कामं करू नकोस म्हणून. कुठे जाते ही पोरगी रात्रीबेरात्री या आडरानात. हे सर्व पुरे झालं आता.”
“गप गं! तिची आख्खी टीम आहे तिच्याबरोबर. उगीच काळजी करत बसतेस. काही होत नाही. साध्या वेषातले दोन पोलिसही असतात बरोबर म्हणून सांगत होती मागे ती.” नानासाहेब उद्गारले.
“तुमचीच फूस आहे तिला. सोन्यासारखी एकुलती एक मुलगी, तिला काही होऊ नये एवढीच माझी इच्छा,” वसुंधराताईंच्या आवाजात काळजी भरली होती, त्यांनी आपले लक्ष पुन्हा टीव्हीकडे वळवले.

रीमा आणि तिचे सहकारी पूजेच्या ठिकाणी पोहोचले होते. समोरचे दृश्य पाहून वसुंधराताईंना मळमळून आले. जटा वाढवलेले आणि अंगाला भस्माचे पट्टे लावलेले काही साधू धीरगंभीर आवाजात काही मंत्रोच्चार करत होते, आजूबाजूला कोंबड्यांच्या रक्ताचा सडा पडला होता. जमिनीत त्रिशूळ खोचलेले होते, भिंतींवर मशाली पेटवल्या होत्या. जवळच कालीच्या मूर्तीची पूजा सुरू होती. रीमा आणि तिचे सहकारी कार्यक्रमाचे चित्रण करत होते. अचानक कॅमेरा हालल्यासारखा वाटला आणि सोबत काहीजणांचे चढवलेले आवाज.

“यहाँ आना मना है। चले जाव वरना नतीजा अच्छा नहीं होगा।"
“हम ये विधियाँ लोगोंतक पहुँचा रहे हैं। यही हमारा काम है, क्यों नहीं कर सकते?”

आपापसातील बाचाबाची वाढत चालली होती. कॅमेर्‍याशी हिसकाहिसकी सुरू होती. इतक्यात पन्नाशीच्या आसपासचा एक जटाधारी साधू कॅमेर्‍यासमोर येऊन उभा राहिला, त्याच्या घार्‍या डोळ्यात खुनशी भाव होते. त्याने रीमाकडे नजर रोखली आणि थंड आवाजात तो म्हणाला, “लडकी यहाँ से निकल। यहाँ आकर बहुत बडी गलती कर दी। इस साधनाको आप लोगोंने खंडित किया, नतीजा तो भुगतनाही पडेगा।"
“लेकिन यहाँ आना मना है ऐसे तो कहीं नहीं लिखा?” रीमाने त्याची रेवडी उडवण्याचा प्रयत्न केला.
“जुबान नहीं लडाना, ये मेरी आँखे याद रखना, आखीरतक तुम्हारे पीछे आएगी। बहोत वक्त नहीं देंगी। तोड दो इनका सामान।" मागे वळून त्याने इतरांना सूचना दिली आणि तो ताडताड निघून गेला. त्याच्या त्या थंडपणात एक प्रकारचा खुनशीपणा होता. वसुंधराताईंच्या सर्वांगावर शहारे आले.

यानंतर स्टुडियोतून झालेल्या प्रकाराचे वर्णन करण्यात आले परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत वसुंधराताई नव्हत्या. त्यांनी चटकन रीमाला फोन लावला.

“रीमा, बेटा हे काय चाललंय? कुठे आहेस तू? कशी आहेस?”“बरी आहे गं आई,” आईने कार्यक्रम पाहिला असावा हे जाणून रीमा म्हणाली.
“घरात आहे, टीव्हीसमोरच. कार्यक्रम अमावास्येच्या रात्री चित्रित झाला ना! दोन दिवसांपूर्वी. लाइव टेलेकास्ट नाहीये. काळजी करू नकोस.”
“ते काही नाही! तू नीघ आत्ता. असशील तशी इथे ये. हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबायला हवं,”रडवेल्या होऊन वसुंधराताई म्हणाल्या.
“रात्रीचे साडे दहा वाजायला आले आहेत आई. आता कुठे निघू म्हणतेस. ऑफिसात उद्या कामही आहे. पुढच्या आठवड्यात येते, काळजी नको गं करूस.”
“नाही, ते काही नाही. आत्ताच नीघ, मी नाही धीर धरू शकत उद्या सकाळपर्यंत. खोपोली काही लांब नाही, रात्रीच्यावेळी तासा दिडतासात पोहोचशील. उद्याचा काय भरवसा, तू नवीन कारणे देशील, टाळशील. तुला कधी बघते असं झालंय,” वसुंधराताईंना हुंदका आवरला नाही.
नानासाहेबांनी त्यांच्या हातातून फोन घेतला. “रीमा, तुला शक्य आहे का यायला?” शांतपणे त्यांनी विचारले. "उद्या सकाळीच नीघ. इतक्या रात्री नको. आई जरा जास्तच हळवी झालीये, तिचं ब्लडप्रेशर वाढलंय असं वाटतंय. मी बघतो तिच्याकडे पण उद्या आलीस तर मलाही बरं वाटेल."
"बाबा, आता तुम्हीही? ठीक आहे. मी उद्या घरी येते.”
"पण तुझं काम?"
"आई जरा जास्तच काळजीत दिसत्ये, कसही करून कोणत्याही परिस्थितीत मी येतेच. "रीमाने वचन दिले तसा नानासाहेबांनी फोन ठेवून दिला.

----

रीमा जागेवरून उठली, आईच्या रडण्याने ती पुरी बेचैन झाली होती. आताच जावं का? बारा साडेबारा वाजेपर्यंत पोहोचता येईल. आई बाबांची बर्‍याच दिवसांत भेटही नाही. तिच्या चमूला एक दिवस तिच्या गैरहजेरीत काम पाहणे अशक्य नव्हते. उद्या सकाळी फोनवरून त्यांना कळवता येईल असा विचार करतानाच तिने कपडे बदलले, पर्स उचलली आणि दरवाजा लॉक करून ती गाडीपाशी आली. रात्रपाळीची गस्त घालणारा गुरखा आपल्याकडे नजर रोखून बघतो आहे असे तिला वाटले. तिने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले. “सलाम मेमशाब!” म्हणून गुरखा निघून गेला. रीमाने स्मितहास्य करून मान झटकली आणि कार सुरू केली.

बिल्डिंगच्या बाहेर गाडी काढली तशी वळणावरचा भिकारी झटकन उठून उभा राहिला. आपल्याकडे तो डोळे फाडून बघतो आहे असे रीमाला वाटले पण नंतर लक्षात आले की बहुधा त्याची जागेवरून उठायची आणि परतायची वेळ झाली असावी. स्वत:शीच हसून तिने गाडी हमरस्त्यावर नेली. मुंबईचे रस्ते साडे १० वाजले तरी तुडुंब भरलेले. सिग्नलला गाडी थांबवली तशी ट्रॅफिक हवालदार आपल्याकडे जळजळीत नजरेने बघतो आहे असे तिला वाटले, नजर फिरवली तशी बाजूच्या गाडीतील चालक टक लावून तिला पाहत होता. 'हे काय चाललंय? मी घाबरले आहे की भास होताहेत?' तिने क्षणभर डोळे मिटले. पाठच्या गाडीचा कर्णकर्कश्श हॉर्न वाजला तसे हिरवा दिवा पडल्याचे तिच्या लक्षात आले.

"भित्यापाठी ब्रह्मराक्षस!” तिने आपल्या मनाला बजावले. गाडी आता हायवेला लागली होती. दिवसाच्या मानाने रहदारी तुरळक होती. बाहेर थोडं वारं सुटलं होतं. चंद्राची कोर ढगांशी लपंडाव खेळत होती. अंधार नेहमीपेक्षा जास्तच गडद असावा की काय कोणास ठाऊक, क्षितिजावर मध्येच एखादी वीज चमकत होती. हळूहळू पावसाचे थेंब काचेवर पडायला सुरुवात झाली. वायपरच्या मंद पार्श्वसंगीतावर रीमा गाडी हाकत होती. 'मागच्या ट्रकचे दिवे जरा जास्तच प्रखर आहेत का?' असा विचार तिच्या मनात आला. “ह्यॅ॒! आज फारच शंका येताहेत मनात बुवा. या मातोश्रींनी स्वत:बरोबर मलाही घोर लावला.”

आता बरेच अंतर कापले होते. रिमझिम पाऊस पडतच होता. मागच्या गाडीच्या प्रखर दिव्यांचा अजूनही तिला त्रास होत होता. मध्येच मागची गाडी फार जवळ आली की काय असा तिला वाटून गेले. चक्ककन प्रकाश तिच्या डोळ्यात गेला आणि क्षणभर तिला गाडीवरील ताबा सुटल्यासारखे वाटले. 'हम्म! किती घाई झालीये याला. ओवरटेक करून जा की, कशाला छळतोय मला!' रीमा स्वत:शीच पुटपुटली आणि त्या मागच्या ट्रकने बाजूने निघून जावे म्हणून तिने गाडी हळू केली, मागचा ट्रक आता फारच जवळ आला होता.

---

रात्रीचे बारा वाजून गेले होते. पाऊस आता जोमाने कोसळत होता. रीमाने गाडी घराकडे जाणार्‍या रस्त्यावर घेतली. तो ट्रकवाला अजूनही तिच्या मागेच होता. तिला थोडेसे विचित्र वाटले. 'हा माझा पाठलाग तर नाही ना करत?' पावसाने आता जोर धरला होता. घरापाशी जाणार्‍या गल्लीत तिने गाडी वळवली तरी तो ट्रक तिला मागेमागेच असल्यासारखा वाटला. तिने घाईघाईत गाडी बंगल्यात घेतली आणि ती उतरून धावतच दारापाशी आली आणि तिने दोन चारवेळा बेल दाबली. आतून काही चाहूल लागली नाही तशी तिने आईच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. 'आई! दार उघड. मी आल्येय. लवकर ये. दार उघड प्लीज!!'

दरवाजाशी काहीतरी चाहूल लागली असे वाटून वसुंधराताई उठल्या आणि दरवाजापाशी गेल्या. त्यांचा हात कडीवर गेला पण त्यांनी दरवाजा उघडला नाही, बंद दारावर आपले डोके टेकवले आणि त्या लहान मुलासारख्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. रीमा बाहेरून जिवाच्या आकांताने आईला हाका मारत होती."मी आल्येय आई! तुम्हाला सांगितलं होतं ना की येईन. दार उघड, मला आत घे प्लीज!"

आतमध्ये नानासाहेब थरथरत्या हाताने अजूनही पोलिसांशी बोलत होते. पंधरा वीस मिनिटांपूर्वी त्यांना फोन आला होता. खोपोलीजवळच रीमाचा अपघात झाला होता. मागून येणार्‍या भरधाव ट्रकने तिच्या कारला धडक दिली. अपघात मोठा होता, रीमाचा जागीच मृत्यू झाला असावा. कारमध्ये रीमाच्या डायरीत घरचा पत्ता सापडला आणि तो वाचून पोलिसांनी लगोलग नानासाहेबांना फोन केला होता.

(समाप्त)

marathi blogs