प्रकार

Sunday, November 07, 2010

पशू

हे घर भाड्याने घेतलं तेव्हा सुहासी थोडीशी कुरबुरत होती. या बायकांना प्रत्येक गोष्टीत खोड काढायची सवय का असते हेच कळत नाही. मनातून घर तिलाही आवडलं होतं पण उगीच काहीतरी लहानसहान खोड्या काढत बसली होती. घराचं तोंड पूर्वेला नाही, विहीरीवर जाळी नाही, स्वयंपाकघराचा ओटा अरुंद आहे आणि काय ना काय. तिला बराच वेळ समजावलं तेव्हा एकदा घर पसंत आहे म्हणाली. आज विचार केला तर वाटतं की उगीच तिला भरीला पाडलं मी.

पुलाच्या बांधकामाचं प्रोजेक्ट मिळालं होतं. त्यासोबत आणखीही काही बांधकामे मिळणार होती. किमान वर्षभर तरी काम चालणार होतं. सुहासी नोकरी करत नव्हतीच. वर्षभर स्वतंत्र राहायला मिळणार याचा आनंद दोघांनाही होता. माझ्या बांधकामापासून मैलभरावरच हे घर मिळत होतं. घराचा मालक पुण्याला राहत होता. तो मूळचा या इथलाच. त्याची वडिलोपार्जित जमीन होती. त्यावर त्याने घर बांधले. सरकारी पाहुणे इथे बरेच वेळा मुक्काम ठोकून असत. इथे येण्यापूर्वी मी त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटलो. घर भाड्याने द्यायचे असले तर त्याला घरात लग्न झालेलं जोडपं हवे होते त्यामुळे सौदा झटक्यात ठरला. घर तसं थोडंसं एकाकी होतं पण अगदीच काही जंगलात नव्हतं. नवी वस्ती बनत होती म्हणून आजूबाजूला थोडी मोकळी जागा होती. हाकेच्या अंतरावर इतर घरं होती. मुख्य म्हणजे साईटपासून घर जवळ होतं आणि दिमतीला बाइक होतीच की.

घर अगदी टुमदार होतं. पांढर्‍या शुभ्र भीतींवर लालचुटुक कौले, घराच्या बाहेर थोडंसं अंगण, प्रशस्त ओसरी, आत बैठकीची खोली, दोन बेडरूम्स आणि स्वयंपाकघर. हवेशीर आणि प्रसन्न. आम्हा दोघांना पुरून उरेल असं घर होतं. मुख्य दरवाजा बैठकीच्या खोलीत उघडत होता आणि स्वयंपाकघरातून मागच्या अंगणात जायला दरवाजा होता. अंगणाला पुढून मागून सुरेख लाकडी कुंपण होतं. मागच्या कुंपणाला लहानसं फाटकही होतं; माळावर जाण्यासाठी. मागच्या अंगणामागे विस्तीर्ण पसरलेला माळ होता. मोकळीच मोकळी जागा. कुंपणापासून काही अंतरावर उंचचउंच वाढलेल्या गवताचा लांबलचक पट्टा होता.

'तो माळ वापरात नाही; ओसाड आहे' असं रंगराव म्हणाला होता. रंगराव म्हणजे धरणावरला मुकादम. त्यानेच गावातली ४-५ घरं दाखवली होती मला. त्याला गावची बरीच माहिती होती; काही हवं नको झालं तर मी त्यालाच विचारत असे. 'त्या वाढलेल्या गवतात कधीतरी कोल्ही-कुत्री निघतात. उगीच फिरायच्या निमित्ताने फार आतवर घुसू नका, एखादं जनावर बाहेर येऊन पोटरीचा चावा घ्यायचं.' असं सांगून गेला होता. तशी अडचण काही नव्हती. माळावर फिरण्यासारखं काही नव्हतंच. घरासभोवतीच्या भक्कम लाकडी कुंपणातून कुणी कुत्रं अंगणात घुसण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून मी दुर्लक्ष केलं. माणसाला एखादी गोष्ट हवी असली की तो तिच्याबाबतीत फार खोलवर जात नाही. मला काम सुरू करायचं होतं, सुहासीला इथे आणायचं होतं, घर लावायचं होतं. आता मात्र वाटतं की मी आणखी चौकशी करायला हवी होती.

आम्ही आता या घरात राहायला येऊन आठवडा उलटला होता. घराची लावालावी, थोडंसं प्लंबिंगचं, कुठे थोडंफार डागडुजीचं काम यातच सगळा आठवडा व्यस्त गेला. सुहासीला टापटीप, स्वच्छता यांची भारी आवड. घर तिने मस्त सजवलं होतं. आठवडाभर गावातल्याच खानावळीतून डबा आणत होतो. आता स्वयंपाकघर लागलं होतं. रविवारी आम्ही दोघांनी मस्त आराम केला. बाजारहाट केली आणि मी सुहासीला गावात, नदीवर फिरवूनही आणली. तिचाही मूड मस्त लागला होता.

"बरं झालं नै! वर्षभर सुट्टी साजरी करणार आपण असं वाटतं आहे. " ती उत्साहाने म्हणाली.
"बघ हं! कंटाळशील लवकरच. मग म्हणशील कुठे या आडगावात येऊन पडलो. "
"अगदीच काही आडगाव नाहीये हं! आपण राहतो तिथे वस्ती अद्याप नाही एवढंच. अरे पण तू आहेस ना, पुरा माझ्या ताब्यात. आणखी कोण पाहिजे? " ती खट्याळ हसत म्हणाली.

संध्याकाळी आम्ही बाहेरच जेवलो आणि मनसोक्त गप्पा मारल्या. आमच्या लग्नाला तीन वर्षे उलटली होती पण अद्याप नवलाई गेलेली नव्हती. सुहासीचा शांत, नीटनेटका स्वभाव मला आजही हवाहवासा वाटे.

सोमवारी सकाळी मी साईटवर निघालो तेव्हा सुहासी आंघोळपांघोळ आटोपून स्वयंपाकाच्या तयारीलाही लागली होती.

"ए तू बारा वाजेपर्यंत ये हं जेवायला! उशीर करू नकोस. तुझ्या आवडीचं वांग्याचं भरीत बनवते आहे. " तिचं ते लाडिक बोलणं कानावर पडलं आणि उंबरठ्यातून बाहेर पडणारा पाय थबकला.
"जाऊच नकोस असं म्हण. हा बघ मी इथेच थांबतो की नाही ते. " मी हसून म्हटलं तशी ती तरातरा दारात आली आणि मला वेडावून म्हणाली, "निघ हं आता, नाहीतर रंगराव घरापर्यंत यायचा बोलवायला. "

दुपारी वेळेवर मी निघणारच होतो पण अचानक काही काम निघालं. सिमेंटच्या गोणी येऊन पडल्या त्याच्या पावत्यांवर सह्या हव्या होत्या. मला बाराच्या सुमारास निघताच येईना. घरातला फोन अद्याप सुरू झाला नव्हता. सुहासीला फोन करून सांगावं की 'तू जेवून घे' तर ते शक्य नव्हतं. मी मनातून वैतागलो पण हे काम हातावेगळं केल्याशिवाय निघणं बरं दिसत नव्हतं. दोनच्या सुमारास मी मोकळा झालो तशी धावतच जाऊन बाइक काढली. ऊन मी म्हणत होतं. मी सुसाट बाइक सोडली आणि एकदाचा घरी पोहोचलो. आत जाऊन आता बोलणी ऐकून घ्यायची आहेत अशी मनाची तयारी करून मी दार उघडलं. टळटळीत उन्हातून एकदम आत शिरल्यावर अंधारून आल्यासारखं वाटलं. मी डोळे किलकिले केले. आत सामसूम होती. घरात माणूस असल्याची अजिबात चाहूल लागत नव्हती. 'बाईसाहेब जाम वैतागलेल्या असाव्यात.' मी मनात म्हटलं आणि दबकतच आत गेलो. आधी बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. न जाणो, खाऊनपिऊन बायकोने मस्त ताणून दिलेली असायची आणि मी आपला उगीच हवालदिल. बेडरूममध्ये सुहासी नव्हती. आता राहिलं स्वयंपाकघर. मी स्वयंपाकघरात घुसलो.

स्वयंपाकघरातली खिडकी उघडी होती आणि खिडकीपाशी सुहासी स्तब्ध उभी होती. अगदी पुतळ्यासारखी. मी मागे उभा आहे याची किंचितही जाणीव तिला झाली नव्हती. कुतूहलाने ती खिडकीबाहेर बघत होती. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याने तिच्या बटा तेवढ्या हलत होत्या. फार सुरेख दिसत होती सुहासी. तिच्याकडे पाहिलं की मला नेहमी समाधान वाटे. सरळ नाक, नाजूक जिवणी, पाणीदार डोळे. खांद्यावर रुळणारे स्टाइलिश कापलेले केस आणि नजरेत भरणारा बांधा. या सर्वांत सुहासीचे डोळे मला फार आवडत. लहान मुलांसारखे टपोरे आणि निरागस. तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच डोळ्यांत माझा जीव गुंतला होता.

"सुहासी", मी तिच्या खांद्यावर हात टाकला तशी ती मागे वळली.
"अरेच्चा! तू कधी आलास? " ती साफ गोंधळली होती. "चल जेवायला बसूया. " असे म्हणून तिने खिडकी बंद केली आणि ताटे काढली. जेवणाची वेळ टळून गेली आहे, दुपारचे दोन वाजून गेले आहेत याचा मागमूसही तिच्या तोंडावर नव्हता. शेवटी मीच म्हणालो.
"सॉरी, अगं वेळेवर येताच आलं नाही. बराच उशीर झाला. "
"उशीर झाला? " सुहासी आश्चर्याने पुटपुटली आणि तिने घड्याळाकडे नजर टाकली. "अय्या! दोन वाजून गेले. मला कळलंच नाही वेळ कुठे गेला ते. " ती चकीत झाली होती.
"का गं? असं काय करत होतीस की तुला वेळेचं भान राहिलं नाही? "

"काही नाही रे. स्वयंपाक, साफसफाई आटोपून तुझी वाट बघत बसले होते. वेळ जाईना म्हणून या खिडकीतून सहजच बाहेर बघत होते. ते मागच्या माळावरचं गवत वाऱ्यावर संथ डुलत होतं. एका लयीत. एका नादात. त्याच्या त्या हिरव्यागार रंगात सूर्याचे सोनेरी रंग मिसळले होते आणि वार्‍याने होणारी पात्यांची सळसळ ना अरे इथपर्यंत, अगदी घरात ऐकू येत होती. सर्व भानच विसरूनच गेले मी त्याच्याकडे बघताना. " ती भारावल्यासारखी बोलत होती. तिच्या आवाजातला तो बदल मला जाणवला होता खरा पण त्यावेळेस खटकला का नाही ते कळत नाही. खटकला असता तर आज ही पाळी आमच्यावर आली नसती.

"अगं, शहरातल्या माणसांना हा असा निसर्ग कुठे बघायला मिळतो? लक्की यू! मला तर इथे येऊनही मिळत नाहीये. तेच सिमेंट, रेती, कॉंक्रिट बघतो मी दिवसभर." मी हसून म्हटलं आणि भरभर जेवायला सुरुवात केली. मला साईटवर परतायचं होतं.

त्यानंतर अनेकदा मी दुपारचा जेवायला घरी यायचो तेव्हा सुहासीला स्वयंपाकघराच्या खिडकीत, नाहीतर दारात उभी पाहायचो. ती टक लावून त्या गवताकडे बघत असायची. कित्येकदा मी तिच्या बाजूला जाऊन उभा राहिलो तेव्हा जाणवलं होतं की तिच्या डोळ्यांची पापणीही हलत नसे. असं काय आहे त्या गवतात हा प्रश्न मला पडत असे मात्र मी खोलात जायचं मनावर घेतलं नाही. का केलं मी असं? ...बेफिकीर होतो मी. संकटं वगैरे आपल्या चार हात लांबून निघून जातील या गैरसमजूतीत जगत होतो.

संध्याकाळी माझ्या घरी पोहोचण्याच्या वेळेवर घरकाम करायला पद्मा आलेली असे. आमच्या साईटवरच्या हणम्याची बायको. संध्याकाळी सुहासी काम आटोपत तिच्या मागेमागेच असे. निदान त्यावेळी तरी ती त्या गवतात रमलेली नाही याचं मला बरं वाटे.

असाच एके दिवशी संध्याकाळी मला साईटवरून यायला थोडा उशीर झाला. घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. मी अंगणात बाइक लावली. घरात मिट्ट काळोख होता. 'कुठे गेली असेल सुहासी यावेळेस?' असा विचार करतच मी घराचा दरवाजा उघडला आणि आतला दिवा लावला. प्रकाशाने संपूर्ण खोली उजळून निघाली. माझी पावलं तडक स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. माझ्या अपेक्षेप्रमाणेच स्वयंपाकघरातल्या काळोखात सुहासी खिडकीसमोर उभी होती. तशीच; दुपारी उभी असे अगदी तश्शीच. स्तब्ध. पुतळ्यासारखी. आजूबाजूच्या जगाला विसरून गेलेली. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा चेहरा मी निरखत होतो. कोड्यात पडलेला. कुतूहलाने खिडकीबाहेर माळाकडे पाहणारा. मी घाईने लाइट लावला तशी ती एकदम दचकली. "तू कधी आलास? "

"काय बघतेस सुहासी? " दुपारी मी जेवून साईटवर परतायच्या घाईत असे पण आज या प्रश्नाचा छडा लावायला बरी वेळ सापडली होती.
"काही नाही रे. ते गवत चंद्रप्रकाशात इतकं सुरेख दिसत होतं की नजरच निघत नव्हती. बघत राहावसं वाटतं त्या गवताकडे. त्या गवताचे आणि माझे जणू काही ऋणानुबंध आहेत. मी ना एकदा त्या गवतापलीकडे जाऊन बघणार आहे. " ती झोपेत बोलणार्‍या माणसाप्रमाणे बोलत होती.

मी तिच्याकडे निरखून पाहिले. गेले काही दिवस सुहासीत काहीतरी बदल होतोय अशी शंका मला येऊ लागली होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. थोडीशी खंगल्यासारखीही वाटत होती.

"तुला रंगरावने काय सांगितलं माहित आहे ना. तिथे उगीच रानटी कुत्री वगैरे असायची. नको ते स्टंट करू नकोस. उगीच अंगाशी नको यायला. हे गाव अजूनही आपल्याला अपरिचित आहे." मी तिला खडसावलंच.

"अरे, आपण इतके दिवस इथे राहतो. तू कधी कुठल्या कुत्र्याचं भुंकणं ऐकलं आहेस का? मी तर दिवसभर घरात असते. या खिडकीशी उभी असते. गवताची सळसळही मला ऐकू येते पण कधी त्या माळरानावर कुत्र्यांना पाहिलेलं नाही की त्यांचं भुंकणं ऐकलेलं नाही. "

"हे बघ! तुला माझं ऐकायचं नसेल तर तसं सांग. तुझ्याकडे मोबाईलही नाही. त्या माळावर जाऊन कुठे तरी हरवू नकोस म्हणजे झालं. " मी तिला थोड्या तुसडेपणाने म्हटले तशी ती हिरमुसली झाली. जेवून झोपायला जाईपर्यंत ती माझ्याशी फारशी बोलली नाही.

रात्री सुहासी माझ्याकडे पाठ करूनच झोपली होती. मला वाईट वाटलं. इथे परक्या गावात आम्ही दोघेच एकमेकांचे सोबती आणि आता उगीच आमच्यातला संवाद बंद झाला. मी तिला जवळ ओढली आणि म्हणालो, "येत्या रविवारी जाऊ आपण त्या माळरानाच्या दिशेने. चक्कर मारून येऊ. एक दांडुका घेऊन जाऊ बरोबर. आलंच कुत्रं तर घालू पेकाटात. " सुहासी खुदकन हसली. "हो हो नक्की जाऊ. " असं म्हणून मला आणखीनच खेटली.

दुसर्‍या दिवशी दुपारी जेवायला मी घरी आलो तर घरात पुन्हा सामसूम होती. आपोआप माझी पावलं स्वयंपाकघराकडे वळली. खिडकीपाशी दररोज उभी असणारी सुहासी आता मला सरावाची झाली होती. त्याच अपेक्षेने मी स्वयंपाकघरात पाय टाकला पण त्या दिवशी स्वयंपाकघर मोकळं होतं. मी बेडरूमकडे गेलो; तिथेही कुणी नव्हते मग दुसर्‍या बेडरूमकडे. नाही, सुहासीचा पत्ता नव्हता. ती घरात नव्हतीच.

मला कळेना ही यावेळेस कुठे गेली असावी? मी पुन्हा स्वयंपाकघराकडे वळलो. स्वयंपाकघराचा दरवाजा ओढून घेतलेला होता पण खिडकी उघडी होती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. मागल्या कुंपणाचे फाटक उघडे होते. त्या बाहेर विस्तीर्ण माळ पसरला होता. माळरानावरचं उंचच उंच वाढलेलं गवत वाऱ्यावर फेर धरून डोलत होतं. संथ; एका लयीत. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात हिरवीगार पाती चमचमत होती. मी स्तब्ध झालो. डोळ्यांच्या कक्षेत फक्त डोलणारं, संथ हेलकावे खाणारं गवत मावत होतं. त्याची ती मंद सळसळ कानावर पडत होती. अचानक माळरान रुंदावल्यासारखं भासलं. गवतही आणखीच उंच होत होतं. माळरान आता हळूहळू माझ्याजवळ सरकत होतं. जवळ येत होतं. त्याचा विस्तार पूर्वीपेक्षा वाढल्यासारखा वाटत होता. चकीत करणारे क्षण होते ते. मी आणि माळावरचं गवत सोडून आसमंतात दुसरं काहीच नाही असा विचार मनाला चाटून गेला. माझे डोळे त्या दृश्यावर खिळून होते... तिथे जायला हवं एक दिवस. त्या गवतात... ते गवत बोलवत होतं. एवढ्यात गवतात काहीतरी हललं आणि डोलणारं गवत एकदम स्तब्ध झाल्यासारखं वाटलं. माळाचा आकारही पूर्ववत झाला. माझी तंद्री मोडली.

त्या गवतातून सुहासी धडपडत बाहेर पडत होती. विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे, घामाघूम शरीर; सुहासीचा हा अवतार बघून मी थक्क झालो.

मी तिला पाहून चटकन मागचं दार उघडलं आणि बाहेर गेलो. ती कुंपण बंद करून आत येत होती. तिला दम लागला होता आणि चेहर्‍यावर भीतीचे सावट दिसत होतं.

"सुहासी? काय झालं? " काळजीने मी तिला विचारलं. ती धापा टाकत होती. तिच्या कुडत्यावर, सलवारवर केसांवर गवताचे तण चिकटले होते. पायांना चिखल लागला होता. काहीही न बोलता ती तरातरा घरात शिरली. मी तिच्यामागून घरात शिरलो तेव्हा दुपारचे तीनचे ठोके पडत होते. मी जेवायला घरी आल्यापासून इतका वेळ गेला होता याची जाणीव मला आत्ता होत होती. काहीतरी होतं त्या माळरानावर जे आधी सुहासीला खिळवून ठेवत होतं आणि आज मलाही त्याची प्रचिती आली होती. तो माळ संमोहन टाकत होता, आम्हाला खेचून घेत होता. मी घाईने खिडकी आणि दरवाजा बंद केले.

"सुहासी, काय झालं? "
"काही नाही. आज राहावलं नाही म्हणून मी त्या गवतात घुसले आणि रस्ता चुकले. उंच आहे ते गवत भारी. इथून जाणवत नाही पण खरंच खूप उंच आहे. परत कसं यावं तेच कळेना. वाटच मिळेना. पुढल्या वेळेस काहीतरी खुणा घेऊन गेलं पाहिजे. " ती आता शांत दिसत होती. शांतपणे बोलत होती. मगाशी तिच्या डोळ्यांतली भीती नाहीशी झाली होती. जसं काही घडलंच नव्हतं. मी मात्र धास्तावलो होतो.

"हे बघ, तिथे पुन्हा जायची अजिबात गरज नाही. पुन्हा या खिडकीतही उभी राहू नकोस. तुझ्या डोक्यातले माळाचे विचार आधी काढून टाक. हा वेडेपणा पुरे झाला." मी आवाज चढवून म्हणालो. त्या खिडकीतून पाहिल्यावर मला जे जाणवलं होतं ते तिला सांगावं की नको असा विचार मनात आला. न जाणो जे मला भासलं होतं ते तिला भासत नसलं तर ती उगीच मला वेड्यात काढायची असा विचार करून मी गप्प बसलो पण या माळरानाबद्दल खोलात चौकशी करणं गरजेचं होतं. डोळ्यांसमोर रंगराव आला.

मी साईटवर पुन्हा परतलो तर रंगराव गायब होता. कामावरल्या दोघांकडून कळलं की त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना भेटायला तो गावी गेला होता. दोन दिवसांनी परत येणार होता. पुलाचा प्लॅन घेऊन असिस्टंट इंजिनिअर येताना दिसला आणि मीही कामाच्या धांदलीत माळरानाची गोष्ट विसरून गेलो.

त्यानंतर गेले दोन दिवस मी घरी आलो तर सुहासी घरीच दिसली. ती नेहमीप्रमाणे खिडकीतही उभी नव्हती. मला मनात कुठेतरी खूप बरं वाटलं आणि तेवढीच काळजीही वाटत होती. का कुणास ठाऊक? सुहासी बदलली होती. तिचा चेहरा उतरलेला दिसे. बोलण्यात-वागण्यात उत्साह नव्हता. काहीतरी विचार करत एकटीच बसलेली असे. केस विंचरलेले नसत. कपडे टापटीप नसत. मी तिला कितींदा विचारलं की कसला विचार करतेस? पण ती उत्तर टाळत होती. 'रविवारी जायचं का माळावर आपण?' असं मी तिला मुद्दाम खोचकपणे विचारून पाहिलं पण तिने नकारार्थी मान हलवून वेळ मारून नेली. मला मनात बरंच वाटलं. निदान ते माळरानाचं भूत तिच्या मानगुटीवरून उतरलं हेच खूप होतं.

दोन दिवसांनंतरची गोष्ट. मध्यरात्र उलटून गेली असावी. कसलंतरी भयंकर स्वप्न पडलं होतं. मी दचकून जागा झालो तेव्हा सुहासी माझ्या बाजूला नव्हती. ती पाणी प्यायला उठली असेल किंवा बाथरूमला गेली असेल या विचाराने मी गादीवरून उठलो नाही पण पुन्हा डोळा लागत नव्हता. थोडा वेळ गेला, सुहासीची चाहूल लागली नाही. मला अस्वस्थ वाटू लागलं; मी उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो. घराचा मागचा दरवाजा आणि कुंपणाचं फाटक दोन्ही सताड उघडे होते.

रात्रीच्या अंधारात माळ निळसर-करडा दिसत होता. आकाशात चंद्रावर ढगांनी गर्दी जमा केली होती. ढगांच्या आडून कुठेतरी चांदणी उगीच लुकलुकत होती. मी डोळे फाडून माळाकडे बघत होतो पण काहीच दिसत नव्हतं. काय करावं काही सुचेना. सुहासी पुन्हा त्या गवतात तर गेली नसेल... काय करायचं? रात्रीच्या वेळी असं माळावर... तिथे ती भटकी कुत्री असली तर? मला कुत्र्यांची भीती वाटते पण माझी बायको तिथे गेली आहे... एकटीच. विचार डोक्यात मावेनासे झाले होते. माझे पाय आपोआप माळाच्या दिशेने पडू लागले. मी दरवाजा ओलांडून मागच्या अंगणात पोहोचलो असेन नसेन तोच गवतात काहीतरी हललं. गवतातून सुहासी वाकून बाहेर पडत होती. मी धावत कुंपणापाशी गेलो. तिला दम लागला होता, श्वासही फुलला होता. अंगाला गवत चिकटलं होतं. मी तिचा हात पकडला आणि तिला खेचून घरात आणली. क्षणभर, तिच्या नजरेला माझी ओळख पटत नसावी असं मला वाटून गेलं. ही तिथे कुणाला भेटायला तर जात नसावी? कुणी प्रियकर तर नसावा? असा चुकार विचार माझ्या मनात आला आणि मलाच स्वतःची लाज वाटली. सुहासी अशी नाही. खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर. तिचं काहीतरी बिनसलं आहे, तिचं चित्त थार्‍यवर नाही आणि ती त्या गवतात गेली असावी हे कळल्यावरही मी तिचा नवरा असून तिला शोधायला तिच्यामागे गेलो नाही. मला अपराधी वाटलं.

"सुहासी. रात्री उठून तू तिथे गेली होतीस? बरं आहे ना तुला? अंधारात कुठे घुसलीस माळावर? तोंडचं पाणी पळवलंस माझ्या. खबरदार पुन्हा तिथे गेलीस तर. तिथे काहीतरी विचित्र आहे. त्या गवताच्या आसपासही फिरकू नकोस. " मी तिच्या अंगावर ओरडत होतो.
"हो, तिथे काहीतरी आहे. " ती भारावल्यागत बोलत होती.
"काय आहे? तुला काही दिसलं आहे का? " मी तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेऊन विचारलं तसं तिने नकारार्थी मान हलवली आणि हात सोडवून घेतले.
"आई गं! सुहासी तुझी नखं किती वाढली आहेत. " हात सोडवताना सुहासीच्या नखाने माझ्या हातावर भलामोठा ओरखडा उमटवला होता. "काप ती. लागलं मला. "

"उद्या सकाळी कापेन हं! " शांत आवाजात म्हणाली आणि मला एकट्याला तिथे सोडून काहीच न घडल्यासारखी बेडरूममध्ये झोपायला गेली. या प्रकरणावर आता वेळ काढून उपयोगाचे नव्हते. लवकरात लवकर या माळरानाचे रहस्य माहित करून घ्यायला हवं. मी सुहासीच्या मागोमाग बेडरूममध्ये गेलो. ती आपले पाय जवळ घेऊन झोपली होती. मला थोडंसं विचित्र वाटलं पण मी तिच्या अंगावर चादर घातली आणि झोपी गेलो.

दोन दिवसांचं सांगून रंगराव गेला होता तो ४-५ दिवस झाले तरी परतला नव्हता. त्याच्या भरवशावर राहणे उपयोगाचे नव्हते. मी धरणावर गेल्यागेल्या कामाला येणार्‍या काहीजणांकडे चौकशी करायला सुरुवात केली. पण त्यातून विशेष काही कळलं नाही. तशीही पोटापाण्यासाठी बांधकामावर आलेली माणसं होती ती. त्यांना कामधाम, पोट आणि पोरंबाळं यातून उसंतच नव्हती. एकंदरीत या विषयाविषयी औदासीन्य होतं. गावात माझ्या कोणाशी फारशा घनिष्ठ ओळखीही नव्हत्या. हणम्या गावातला होता त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यातल्या त्यात जास्त माहिती कळली. त्याच्या बोलण्यातून कळलं की दीड-दोन वर्षांपूर्वी गावात बरीच बेवारशी कुत्री झाली होती. या कुत्र्यांची पिडा टाळण्यासाठी काही टारगट पोरांनी कुत्र्यांना पकडून, गोणात घालून या माळावर आणून, त्यांच्या शेपटीला फटाके बांधून त्यांना माळाच्या दिशेने गवतात सोडून देण्याचा चंग बांधला होता. हे असं महिनाभर तरी चाललं होतं. त्यानंतर गावातली बेवारशी कुत्री बरीच कमी झाली. गावकर्‍यांनी सुटकेचे निःश्वासच सोडले.

सुमारे ६ महिन्यांपूर्वी सावत्याचा मुलगा; तो ही याच टारगट पोरांतला. एके दिवशी बापाशी कडाक्याचं भांडण केलं आणि बापाने घराबाहेर काढला. रागारागात शिव्या घालत त्याला काही लोकांनी माळावर जाताना पाहिलं. कोणी म्हणतं तो घरातून चोरी करून बापाला तुरी देऊन पळाला. कोणी म्हणतं त्याला शहरात पाहिला तर कोणी म्हणतं तो त्या गवतात खपला. गायब झाला. पोरगा काही पुन्हा घरी परतला नाही. त्याचं काय झालं त्याची काळजी खुद्द सावत्यालाही नव्हती आणि हे सर्व सांगताना हणम्याच्या आवाजातही कसली काळजी नव्हती. मी विचारतो आहे म्हणून तो सांगत होता झालं. माझं मन मात्र शंकेने ग्रासलं होतं. हणम्या सांगतो तेवढाच इतिहास या माळरानाला नसावा. सुहासीला या माळरानाच्या वेडापासून दूर करणं अतिशय गरजेचं होतं.

मी संध्याकाळी घरी परतलो तेव्हा ऊनं उतरत आली होती. आज घरी गेल्यावर सुहासीला समजवून सांगायचं, तिला थांबवायचं, या वेडापासून परावृत्त करायचं अशी खूणगाठ मनाशी बांधूनच घरात शिरलो. नेहमीप्रमाणे घरात सामसूम होती.
मी थेट स्वयंपाकघरापाशी गेलो. मागचा दरवाजा उघडा होता आणि कुंपणाचं फाटकही. मी समजायचं ते समजलो आणि मागचा पुढचा जराही विचार न करता सरळ फाटकातून बाहेर पडून समोरच्या गवतात घुसलो. गवत दाट होतं. मी जसजसा पुढे जात होतो तस तसं ते अधिकच दाट आणि उंच होत होतं. त्यातून वाट काढत जाणं जिकिरीचं होतं. मी कुठल्या दिशेने जातो आहे तेच मला कळत नव्हतं. गवत आता पुरुषभर उंचीचं तरी होती. मी सुहासीला हाका मारायला लागलो पण त्या गवतात त्या हाका विरून गेल्यासारख्या वाटत होत्या.

अचानक गवताची सळसळ सुरू झाली. जणूकाही त्या गवताला मी आल्याची जाणीव झाली होती. माझी छाती धडधडत होती पण तरीही मी वेड्यासारखा सुहासीला शोधत होतो. दिशेचं भान मला राहिलं नव्हतं. गवत तर इतकं उंच, इतकं दाट झालं होतं की त्यातून सूर्यप्रकाशही शिरणं कठीण होत होतं. मला त्या गवतात गुदमरल्यासारखं होऊ लागलं.

"सुहाऽऽऽसी” मी जिवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न केला पण माझा आवाज आतच विरला. त्या दाट गवतात मी घुसमटत होतो. मागे काहीतरी सर्रकन आवाज झाला. कुठला तरी प्राणी आसपास असावा. मी मागे वळून पाहिलं तर कुणीच नव्हतं. "सुहाऽसी" मी आणखी एकदा आवाज दिला आणि पुढे सरकलो.

कुणीतरी माझ्यामागून दबकत, खुरडत येतं आहे अशी जाणीव मला व्हायला लागली. मी वळून वळूनबघत होतो पण आजूबाजूला गवतच गवत दिसत होतं. माझ्या मनात अभद्र विचार येऊ लागले. णा कुत्र्याकोल्ह्यांनी माझ्या सुहासीचं काही केलं तर नसेल. किती नाजूक आहे ती. तिच्या त्या सुरेख शरीराचे त्या कुत्र्यांनी चावे, तिचे लचके... त्या विचारांनीसुद्धा अंगावर शहारा आला. माझ्या मागच्या खुरडण्याचा आवाज अगदी जवळ आला होता. मागे वळून पाहायची माझी हिंमतही झाली नाही. मी वेगाने वाट मिळेल तिथे धावू लागलो. किती वेळ मी त्या माळावर भरकटत होतो देव जाणे पण अचानक गवत विरळ झाल्यासारखं भासलं. गवताच्या पात्यांतून मला घराचं कुंपण दिसलं आणि मी हायसं वाटून श्वास घेण्यासाठी क्षणभर थांबलो. मागचा आवाज पुन्हा एकदा जवळ आला होता. मी धीराने मागे वळून पाहिलं – बाहेर अंधारून आलं होतं पण चंद्राच्या प्रकाशात सर्व स्पष्ट दिसत होतं. त्या गवतात सुहासी एखाद्या भुकेजल्या श्वापदासारखी हातापायांवर दबा धरून बसली होती. तिच्या हाताचे पंजे जनावरासारखे जमिनीत रुतले होते. छाती धपापत होती. माझ्याकडे बघून ती दात विचकत होती. तिच्या तोंडातून जीभ बाहेर आली होती आणि त्यातून लाळ गळत होती. तिचे विस्कटलेले केस चेहर्‍यावर चिकटले होते. त्यातून तिचे ते चमकदार हिंस्र डोळे चकाकत होते. त्यांत मनुष्यासारखी कोणतीही जाणीव नव्हती की तिला माझी ओळख आहे असं दिसत नव्हतं. क्षणभर माझ्या मनात किळस दाटून आली आणि तोंडातून अस्फुट किंकाळी फुटली. ती सावध श्वापदासारखी माझ्यावर गुरगुरली आणि पुढल्या क्षणाला मी घराच्या दिशेने धाव घेतली. कुंपण पार करून मी फाटक लावून घेतलं आणि तिथेच थोडावेळ रेंगाळलो. सुहासी गवताबाहेर आली नाही. गवतात खसफस आवाज येत होता. सुहासी माघारी फिरली होती.

माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. मी खिसा चापापला. बाइकची चावी खिशातच होती. मी थेट पुढल्या अंगणात आलो, बाइक काढली आणि पोलिस स्टेशन गाठलं.

“साहेब नाहीयेत. तालुक्याच्या गावाला गेल्येत. उद्या येणार. काय कंप्लेंट आहे? ” हवालदाराने डोकं वर करायची तसदीही घेतली नाही.
“मी पुलाच्या साईटवर चीफ इंजिनिअर आहे. माझी बायको आज संध्याकाळपासून बेपत्ता आहे. मी दुपारी जेवायला घरी आलो तेव्हा ती होती पण संध्याकाळी घरी आलो तर ती नव्हती. तिचा पत्ता नाही. ” मी चक्क खोटं बोलत होतो.
हवालदाराने माझ्याकडे रोखून पाहिलं. “नाव काय तुमचं? बायकोशी भांडण झालं होतं का? कुठे गावात गेली असेल. आताशी ९ वाजतायत रात्रीचे. थोडावेळ वाट बघा. कुठे गेली असेल तर येईल परत.” काय घाबरट माणूस आहे असे भाव त्या हवालदाराच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

"नाही हो. आमची गावात फारशी ओळख नाही. ती कुठे जाणार नाही. " त्या माळरानाचा प्रकार हवालदाराच्या कानावर घालावा की न घालावा तेच मला कळत नव्हते. "तुम्ही आमच्या घराच्या आजूबाजूचा भाग शोधून बघा प्लीज. "

"ते आता शक्य नाही. साहेब आणि बरोबर दोन हवालदार एका केसच्या कामानिमित्त शहरात गेले आहेत. ते उद्या पहाटे परततील. आम्ही इथे दोघेच आहोत आज. उद्या सकाळी बघू. आता तुम्ही कंप्लेंट लिहा आणि घरी जा. आम्ही उद्या सकाळी हजर होतो." मी बरीच गयावया केली पण हवालदार काही बधला नाही.

मी घरी परतलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते. सुहासीशिवाय घर खायला उठत होतं. मी पलंगावर जाऊन कोसळलो. डोळे भरून आले होते. डोके भणभणत होते. ती मागे त्या गवतात एकटी... मी तिचा नवरा होतो. तिची साथ देण्याची शपथ घेतली होती पण तिला एकटीला तिथे सोडून आलो होतो. तिचं ते अमानवी, अभद्र रूप सारखं डोळ्यासमोर येत होतं. काय झालं होतं तिला? काय होतं त्या माळरानावर?... एखादी पाशवी शक्ती की एक वेगळं जग? मला जे दिसलं तसं काही तिलाही दिसलं होतं का? की आमच्या जाणीवा वेगळ्या होत्या? तिला तिथे काही वेगळं दिसलं होतं तर ती बोलली का नाही? विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. मी इतका थकललो होतो की माझा डोळा कधी लागला तेच कळलं नाही.


सकाळी कुणीतरी दरवाजा ठोठावत होतं. मी खडबडून जागा झालो. घड्याळात पाहिलं. सकाळचे साडेआठ वाजले होते. मी इतका वेळ कसा झोपलो? सुहासीशिवाय... ती रात्रभर त्या गवतात... मला लाज वाटली. पुन्हा कुणीतरी दरवाजा ठोठावला तसा मी भानावर आलो.

बाहेर इन्स्पेक्टर आणि पोलीस पार्टी उभी होती. इन्स्पेक्टरने सुहासीची चौकशी केली आणि पुन्हा नव्याने सर्व सवाल जवाब केले. मी त्यांना सुहासी मागच्या गवतात हरवली असेल, माळावर रस्ता चुकली असेल अशी शंका बोलून दाखवली. इन्स्पेक्टरना त्यावर फारसा विश्वास वाटला नाही पण ते स्वत: पोलीसपार्टीसह माळावर गेले. माझा जीव घशाशी गोळा झाला होता. काय मिळेल त्यांना तिथे? पशुवत सुहासी की माझी सुहासी... ती जिवंत तरी असेल का? तासाभराने पोलिस पार्टी हात हलवत घरात परतली. त्यांनी सर्व घर उलथेपालथे केले. वासकावासकी करतानाच इन्स्पेक्टरने माझ्यावर प्रश्नांची पुन्हा सरबत्ती केली. मला कळून चुकलं होतं की पोलिसांचा संशय माझ्यावरच आहे. उत्तरे देताना मी गोंधळलो होतो, गांगरून गेलो होतो. जे सत्य होतं, जे मी अनुभवलं होतं आणि स्वत:च्या डोळ्यांनी मी जे पाहिले होतं ते त्यांना सांगू शकत नव्हतो; त्यांनी मला वेड्यात काढला असता. बराच वेळ चौकशी करून आणि बाहेर एक हवालदार उभा करून पोलिस पार्टी परत गेली. ते लवकरच परततील याची मला खात्री होती... माझे अटक वॉरंट घेऊन पोलिस पुन्हा दारात हजर होणार होते. मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्या हातात काहीही पुरावे नव्हते.

मी पुरता खचलो होतो. सुहासी गेली. माझं काय होणार? अब्रूचे धिंडवडे निघणार. अटक टळणार नाही. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. सुहासीच्या आईवडीलांना काय सांगायचं? माझ्या आईवडीलांना काय सांगायचं? तिचं ते माळावरचं अमानवी रूप राहून राहून डोळ्यासमोर येत होतं. मी त्या स्थितीत तिला एकटीला टाकून आलो.... मी अस्वस्थपणे येरझारा घालत होतो. दोन मिनिटं सोफ्यावर विसावलो तेव्हा माझं लक्ष अचानक माझ्या हातांकडे गेलं. माझी व्यवस्थित कापलेली नखं एकदम अचानक वाढलेली दिसत होती. अणकुचीदार.. एखाद्या श्वापदासारखी. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. समोर मार्ग दिसू लागला.

मी तडक स्वयंपाकघरात गेलो आणि मागची खिडकी उघडली. बाहेर कुंपणा पलीकडे गवत वार्‍यावर फेर धरून डोलत होतं. संथ, एका लयीत. एका नादात. मी स्तब्ध होऊन त्या गवताकडे बघत होतो. हळूहळू माळरानाचा आकार मोठा होऊ लागला, गवत आता डोळ्यांत मावत नव्हतं. त्याची सळसळ मला खुणावत होती. जवळ बोलावत होती. मनाला खूप बरं वाटलं...मी मागचा दरवाजा उघडला आणि माळाकडे धाव घेतली.

समाप्त

Wednesday, June 16, 2010

ठेव

लाल दिवा लुकलुकत होता. स्मिताने प्ले बटण दाबलं तसा अंजूचा आवाज घरात घुमला.

"अजून आली नाहीस का गं? मला वाटलं घरी पोहोचली असशील म्हणून फोन केला होता. परवाही केला होता पण तेव्हाही नाही भेटलीस. इतक्यात पोहोचलीस तर फोन कर, मी वाट बघते....खट्ट"

स्मिताने क्षणभर डोळे मिटले. 'नको आता नकोच फोन करायला. नंतर करेन सावकाश. काहीतरी कारण सांगेन. आधीच उशीर झाला आहे, डोकं कावलं आहे आणि त्यात अंजूने नानाकाकांचा विषय सुरु केला तर... नकोच!'

गॅसवर तिने चहाच आधण चढवलं आणि ती तोंड धुवायला वॉशबेसिनपाशी गेली. 'नानाकाकांबद्दल सांगायला हवं अंजूला. आई म्हणत होती की कानावर घाल तिच्या... पण नुसतं सांगून प्रश्न सुटणार आहे का?' स्मिताने चेहर्‍याला खसाखसा साबण लावला. 'इथे लांब राहून फक्त चिंता करत रहायच्या. विषय उगाळत राहायचे आणि डोळ्यातून पाणी काढायचं. पटकन जाऊन पाहून यावं म्हणायला मुंबई काही तासाभरावर नाही.' स्मिताने पाण्याचा हबका तोंडावर मारला आणि टॉवेलमध्ये चेहरा लपवला.

----



अंजू तिची लहानपणापासून जिवाभावाची मैत्रिण. दोघी एकाच वयाच्या, एकाच इमारतीत राहणार्‍या, एकाच शाळेत आणि दहावीपर्यंत एकाच वर्गात होत्या. अभ्यास, खेळ, क्लास, खरेदी सगळीकडे दोघींची जोडी एकत्रच असे. जेवा-खायलाही अंजू अनेकदा स्मिताकडे असे पण त्यामानाने स्मिताचा अंजूच्या घरातला वावर कमी होता. कारण नानाकाका. अंजूच्या वडिलांचा करडा स्वभाव, माणूसघाणेपणा आणि कडक शिस्त हा सर्वांच्या नावडीचा विषय होता.

नानाकाका गरीबीत वाढलेले. त्यांचे वडिल लहानपणीच अपघातात गेले. नानांच्या आईने पोटाला चिमटा घेऊन इंटरपर्यंत त्यांना कसेबसे शिकवले. इंटरनंतर नाना नोकरीला लागले. नानांच्या मागे लग्नाची बहिण होती. एक धाकटा भाऊ होता. घरातल्यांचं करता करता नाना अबोल होऊन गेले. काटकसरीने राहण्यासाठी त्यांनी अंगाला शिस्त लावून घेतलीच पण स्वभावात तुसडेपणा शिरल्याचं त्यांच्या गावीही आले नाही. यथावकाश बहिणीचे लग्न आणि भावाचे शिक्षण त्यांनी करून दिले. नानांचेही लग्न झाले. रमाकाकूंनी नानांचा स्वभाव लवकरच ओळखला असावा. इतरवेळेस बोलक्या असणार्‍या गपिष्ट रमाकाकू नानांच्या समोर दबकून राहायच्या. घरातला नानांचा एकाधिकार मुलांच्याही अंगवळणी पडला होता. अंजू स्वभावाने गरीबच पण धाकट्या अमितलाही नानांनी जरबेत ठेवले होते. काही मोजके मित्र सोडता नाना कोणाशी हसूनखेळून बोलल्याचेही आठवत नव्हते. नोकरीत मात्र नाना हुशार आणि कामसू म्हणून ओळखले जात आणि शिक्षण कमी असले तरी जम बसवून होते.

दहावीनंतर अंजूने कॉमर्सला जावे असा निर्णय नानांनी घेतला. अंजूचे परीक्षेतले गुण बघता तिला सायन्सला प्रवेश सहज मिळाला असता परंतु "दोघांचे खर्च जमणार नाहीत. तू हुशार आहेस. कॉमर्सला गेलीस तरी तुझं अडणार नाही. तुझ्या शिक्षणाचा खर्च मला द्यावा लागणार नाही. अमितची शिक्षणातली बाजू लंगडी आहे; त्याला पैशांची मदत लागली तर आमच्या म्हातारपणाची ठेव म्हणून त्याला शिकवण्याकडे लक्ष अधिक द्यावे लागेल. तुझे लग्न झाले की तुझ्याकडून आम्ही अपेक्षा करू शकत नाही. तो मुलगा आहे. त्याला आता शिकवू, चांगले ठेवू तर तो आम्हाला म्हातारपणी बघेल." अशी अनेक कारणे देऊन अंजूला नानांनी कॉमर्सकडे जाण्याची गळ घातली. अंजू खट्टू झाली पण नानाकाकांना विरोध करण्याचं बळ तिच्याकडे आणि रमाकाकूंकडे नव्हतं.

बी.कॉम. झाल्यावर पुढे शिकण्याचीही अंजूची इच्छा होती पण नानांनी परस्पर आपल्या मित्राच्या पुतण्याशी तिचे लग्न करून देण्याचा घाट घातला होता. संजय अमेरिकेत होता. त्याच्या घरच्यांना त्याचे लग्न लवकर उरकून टाकायचे होते. रूपाने देखणी अंजू त्यांना पसंत होती. अंजूची मात्र इतक्या लांब लग्न करून जाण्याची इच्छा नव्हती. रमाकाकूही पोरीला इतक्या लांब पाठवायला तयार नव्हत्या. 'तिला अद्याप शिकू द्या. लहान आहे ती तशी.' असे त्यांनी सुचवूनही पाहिले पण नानांना अंजूच्या शिक्षणाच्या बाबतीत झालेली हयगय भरून काढायची होती. त्यांनी अंजूला समजावले की 'तिच्या शिक्षणाच्या बाबतीत ते कमी पडले असले तरी अमेरिकेचे स्थळामुळे ती जन्मभर सुखी राहील. भविष्यात कसलीही अडचण येणार नाही.' नानांनी अमितच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च करून त्याला इंजिनिअरींगला पाठवले होते. त्याच्या अभ्यासाचा, हॉस्टेलचा खर्च भागवून अंजूचे लग्न धूमधडाक्यात लावून देणे त्यांना जमणार नव्हते. संजयच्या घरच्यांची मोठ्या लग्नाची अपेक्षा नव्हती. मुलगा लहान सुट्टीवर येथे येणार आहे, चटकन लग्न उरकून टाकायचे म्हणत होते. सर्वकाही नानांच्या पथ्यावर होते. त्यांनी अंजू आणि रमाकाकूंना न जुमानता लग्नाची बोलणी करून टाकली.

लग्न होऊन अंजू अमेरिकेला गेली तरी स्मिताला तिची नियमित पत्रे येत. संजयने अंजूला स्वतःहून पुढे शिकण्याची गळ घातली होती. अंजूची त्याला अर्थातच आनंदाने तयारी होती. आपले नवे आयुष्य, शिक्षण वगैरे यांत ती चटकन रमून गेली. आपल्या वडिलांनी आपल्यावर अन्याय केला आहे ही खंत तिच्या मनातून गेली नसावी. पत्रांतून स्मिताकडे अंजूला मन मोकळं करता येत होतं. नानांच्या अरेरावीने आपण आयुष्यात मागे पडलो ही उणीव तिला भरून काढायची होती. घरी ती अभावानेच पत्र लिहित असे किंवा फोन करत असे. केलाच तर रमाकाकूंची चौकशी करे. त्यांच्याशी बोलत असे. रमाकाकू तिला कधीतरी भारतात ये म्हणून सांगत पण ती ऐकून कानाआड करत असे.

स्मिताचे यथावकाश लग्न झाले आणि लग्नानंतर दोन वर्षांत सुधीरनेही आपले बस्तान अमेरिकेला हलवले. मधल्या वर्षांत अंजूने आपले शिक्षण पूर्ण केले, अमेरिकेत नोकरी धरली, तिला मुलगा झाला. दरवेळेस कसले ना कसले कारण पुढे करून ती भारतात येण्याचे टाळत गेली. अमितच्या लग्नालाही तिने सुट्टी मिळत नाही हे कारण सांगून टाळले. रमाकाकूंना या गोष्टीचा विलक्षण त्रास होत असे पण त्या बोलून दाखवत नसत.

दरम्यान, नानाकाका रिटायर झाले. त्यांना इतक्या वर्षांच्या नोकरीचा उत्तम फंड मिळाला. गावाकडली जमिनही त्यांनी विकली होती, त्याचे चांगले पैसे मिळाले होते. एकंदरीत रिटायर झाले तरी त्यांची परिस्थिती उत्तम होती. परंतु, नानांच्या स्वभावात झालेला बदल सर्वांना जाणवण्यासारखा होता. नानांच्या हेकट आणि माणूसघाण्या स्वभावाला अचानक मुरड पडल्यासारखी दिसत होती. घरातल्या सर्व गोष्टींत त्यांनी आपला अधिकार गाजवणे कमी केले होते. अमितशी आणि त्याच्या बायकोशी ते मिसळून राहण्याचा प्रयत्न करत. नातेवाईकांकडे येणेजाणे त्यांना पूर्वी आवडत नसे परंतु काही मोजक्या नातेवाईकांकडे रमाकाकूंबरोबर येणे-जाणे त्यांनी सुरू केले होते. अंजूचा फोन आला तर मागून घेत. तिच्याशी, जावयाशी, नातवाशी बोलत. तिने भारतवारी करावी म्हणून गळ घालत.

रमाकाकू सोडून सर्वांना नानांच्या बदललेल्या स्वभावाचं आश्चर्य वाटे. रमाकाकू याविषयी बोलताना स्मिताच्या आईला एकदा म्हणाल्या, "जोपर्यंत नोकरी असते तोपर्यंत गुर्मी असते. पुरुष रिटायर झाला की त्याला विचारपूस करणार्‍या माणसांची गरज लागते. बदल झाला आहे ते बरेच झाले. मी म्हणून अशा स्वभावाला दबून राहीले. सून ऐकून घेईल का? त्यांनाच ते जाणवत असेल म्हणून बदलले म्हणायचे."

नानांच्या बदललेल्या स्वभावामुळे अंजूच्या मनातली अढीही कमी झाल्यासारखं स्मिताला वाटत होती. अनेक वर्षांनी अंजूने भारतवारी केली. आजी आजोबांनी नातवाला पाहिलेही नव्हते. दोघांचे खूप कोडकौतुक नानांनी केले. अंजू फोनवर स्मिताकडे पूर्वीपेक्षा दिलखुलासपणे नानांचे नाव घेई. नानांबद्दल तिच्या बोलण्यातला विशादही ओसरल्यासारखा वाटत होता.

"बरं झालं बाई. इतक्या वर्षांनी का होईना पण रमाकाकू आणि अंजू दोघी आनंदी आहेत ना, मग झालं तर!" स्मिताची आई म्हणालीही. परंतु, आनंद फार कमी काळ टिकतो म्हणतात.

नानाकाकांना एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली पण गादीवरून उठता येईना. अमितने आणि त्याच्या बायकोने धावाधाव केली म्हणून अनर्थ टळला. नानांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला होता. शरीराची एक बाजू लुळी पडली आणि वाचेवरही परिणाम झाला. जन्मभर वाघासारख्या वागलेल्या माणसाची अशी दयनीय अवस्था पाहणे सर्वांनाच कठिण होत होते. रमाकाकू होत्या म्हणून सर्व निस्तरत होते तरी अमितला आजारी बापाचे लोढणे दिवसेंदिवस नकोसे होत चालले होते.

"म्हातारपणी मुलगा सांभाळेल म्हणून मला शिकू दिलं नाही नानांनी. त्याला शिकवलं. त्याची परिस्थिती चांगली झाली तर तो म्हातारपणाची ठेव बनेल म्हणून. आई सांगत होती की अमित त्यांच्या तोंडावर म्हणतो की 'अशा परिस्थितीत अजून किती वर्षे सांभाळायचे तुम्हाला? आमची कामेधामे सोडून नाही बघता येत तुमच्याकडे.' वाचा गेली आहे नानांची. ऐकू येतंय त्यांना अद्याप. जातील तर बरे होईल. सुटतील सगळेच पण मृत्यू असे सांगून येत नाहीत." नानांबद्दल बोलताना एके दिवशी अंजू म्हणाली.

नियतीही विचित्र असते. नानांची अशी तीन वर्षे सेवा करून रमाकाकू अचानक फ्लूचे निमित्त होऊन गेल्या. धडधाकट होत्या; त्या जातील अशी कोणालाच कल्पना नव्हती पण होणारं टळत नसतं. सगळंच त्रांगडं झालं होतं. अंजू तातडीने भारतात गेली. काकूंचे दिवस होण्याआधीच अमितने विषयाला तोंड फोडले. नानांची जबाबदारी फक्त त्याच्या खांद्यावर पडत होती ते त्याला मान्य नव्हते. "तू अमेरिकेत राहणार आणि आईबापांच्या खस्ता इथे राहून मी काढायच्या. खर्च, सेवा आणि त्रास फक्त माझ्या नशिबी." अंजूने ऐकून घेतलं. तसंही, त्या परिस्थितीत दुसरं काय जमणार होतं? नानांची काळजी घ्यायला एक गडी निश्चित केला. त्याचा पगार अंजूने द्यायचे असे ठरवले. जातेवेळी अंजू नानांचा निरोप घ्यायला गेली तशी नानांनी तिचा हात गच्च धरून ठेवला आणि लहान मुलासारखे गलबलून रडले.

परत आल्यावर अंजूला नानांच्या तब्येतीची सतत टोचणी लागून असे. घरी फोन केला तर अमितच्या आणि त्याच्या बायकोच्या फक्त तक्रारी ऐकून घ्याव्या लागत. अंजूने काही सुचवले तर त्या दोघांना पटत नसे. कधीतरी अंजूने नानांशी बोलण्याची इच्छा दाखवली तर नाना कानाला फोन लावत पण पलिकडे अंजूला फक्त रडण्याचा आवाज येई. स्मिताकडे मन मोकळं केलं की अंजूला तेवढंच बरं वाटे.

----


चहा उकळायला लागला तशी स्मिता भानावर आली. कप हातात घेऊन ती डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर टेकली. चहाच्या कडक घोटाबरोबर तरतरी आल्यासारखे वाटले. आई मध्यंतरी सांगत होती.

अमितच्या बायकोने नानांची रवानगी फ्लॅटमधल्या बंद बाल्कनीमध्ये केली होती. बाल्कनी काचा लावून बंद केली तरी काचेतून इमारतीतल्या सर्वांना नानांची शोचनिय परिस्थिती दिसत होती. घराच्या मालकाची अशी परिस्थिती पाहून लोकांना विशाद वाटत होता पण मध्यात कोण पडेल म्हणून सर्व गप्प होते. उगीच अंजूला त्रास का म्हणून स्मिता हे तिला बोललीच नव्हती. काल आईचा फोन होता...

"पावसाची झड आली होती आज. अमित आणि त्याची बायको दोघे ऑफिसला आणि तो गडीही मेला कुठेतरी गायब होता. बाल्कनीच्या खिडक्या उघड्या होत्या. भिजत होते गं नाना बिचारे. बघवलं नाही पण काय करू? दरवाजा वाजवला तर उघडायला होता कुठे तो गडी? गेला असेल गाव उंडारायला. तू सांग अंजूला. बघवत नाही नानांची दैन्यावस्था. कसंही का होईना, मुले आहेत. त्यांनी नाही बघायचं तर कुणी?"

'काय सांगायचं अंजूला? नेमकं काय करणार होती ती इथे बसून? पण सांगायला तर हवं. वडिल आहेत तिचे.'

स्मिताने अर्धवट प्यालेल्या चहाचा कप बाजूला सारला आणि फोनची बटणं दाबायला सुरुवात केली.

Friday, April 09, 2010

निरागस

झाली असतील या गोष्टीला आता १२-१३ वर्षे. गल्फचा कंटाळा आल्याने आम्ही मुंबई किंवा इतरत्र स्थायिक होण्याचे ठरवले तेव्हाची. सॉफ्टवेअर व्यवसायाची तेव्हा चलती असल्याने आम्हाला दोघांनाही सहज नव्या नोकर्‍या मिळून गेल्या. माझ्या ऑफिसात मराठी माणसे तशी कमीच, त्यामुळे आम्हा ४-५ जणांचा चांगलाच कंपू बनला होता. मी, माझ्या टीममध्ये असणारा संदेश, नेटवर्किंगमधला सुनील, लायब्ररीयन आणि ऍडमिनिस्ट्रेशन पाहणारी वैशाली, एच.आर.मध्ये माझ्यानंतर लागलेली माधवी आणि दुसर्‍या एका प्रोजेक्टवरचा सिनिअर डेवलपर राहुल. केवळ सहकारी न राहता एकमेकांच्या घरी-दारी येण्यापर्यंत आमची मैत्री घट्ट झाली होती. वेगवेगळ्या डिपार्टमेंटसमधली डोकी एकत्र आल्याने फावल्यावेळातला आमच्या डिटेक्टिवगिरीचा व्यवसायही झोकात होता. एक मात्र होतं की आमच्यातल्या गप्पा कधी बाहेर गेल्या नाहीत.

असाच एके दिवशी सकाळी राहुल एका मुलीला घेऊन पहिल्या मजल्यावर माझ्या क्यूबपाशी आला. काही माणसे आपल्याला पाहताक्षणीच आवडतात. सावळा तजेलदार रंग, पाणीदार डोळे, नाजूक जिवणी, ओठांच्या वरचा रेखासारखा एक गोंडस तीळ, शिडशीडीत, फॅशनेबल मुलगी चटकन डोळ्यांत भरणारी होती. लहानशीच दिसत होती. नुकतीच कॉलेजातून बाहेर पडली असावी. ऑफिसच्या वातावरणाला दबल्यासारखी वाटत होती.

"मीट माय फ्रेंड उर्मी, उर्मीला पटेल. शी'ज जॉईन्ड अस टूडे अँड उर्मीला मीट प्रियाली. उर्मी, सायरसबरोबर काम करणार आहे. माझ्या एका जवळच्या मित्राची मावसबहीण आहे. प्रियालीची वट आहे हं इथे! तुला काही हवं असल्यास बिनधास्त तिला गाठ. ही देखील माझी चांगली मैत्रिण आहे."

सवयीचं "वेलकम!" वगैरे झाल्यावर मी तिला हसत म्हटलं, "याचं काही ऐकू नकोस. माझी काही वट वगैरे नाहीये, उगीच लोक माझ्याबद्दल गैरसमज पसरवत असतात पण सायरसवर कधी फायरिंग करायचं असेल तर सांग. आपलाच बंदा आहे."

उर्मीलाने असिस्टंट प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर म्हणून नोकरी पत्करली होती. सायरसला, आमच्या प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटरला गेल्या काही दिवसांपासून व्याप वाढल्यामुळे एका असिस्टंटची गरज होती. सायरस खरास हा एक मस्त मनुष्य. मनमिळाऊ आणि हाडाचा गरीब. झुरळ पाहिलं तरी घाबरून पळत सुटेल असा. आम्ही त्याला मागून "वेडा बावा" म्हणायचो.

दुपारी सुनिल माझ्या डेस्कपाशी थबकला. "ए तू त्या उर्मीला भेटलीस का? आयटम आहे."
"ऑफिसात तरी तोंड सांभाळून बोलत जा रे." सुनिलच्या शर्टाची सर्व बटणे आज लावलेली आहेत हे लक्षात येत होते.
"राहुलच्या मित्राची मामेबहीण आहे असं कळलं."
"मला वाटतं तो मगाशी म्हणाला मावसबहीण." मी लगेच चूक सुधारून दिली.
"असेल."

संध्याकाळी ऑफिसातून बाहेर पडले आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारी बस पकडली. सराईतांना बसमध्ये चढल्याचढल्या कोणत्या जागा रिकाम्या होणार आहेत हे चटकन कळतं. मला बूड टेकवायला जागा मिळाली आणि तेव्हाच मागून बसमध्ये चढणारी उर्मीही दिसली. गर्दीत स्वतःला सावरत कशीबशी उभी होती. तिच्या बाजूचा मळकट कपड्यांतला मनुष्य तिच्या अंगचटीला येत होता असं वाटलं. आमची नजरानजर झाली तशी ती ओशाळवाणं हसली.

'अगं! मोठ्यानं बोल की गधडे त्याला की बाजूला सरक म्हणून.' मी मनात म्हटलं पण मग लक्षात आलं की बहुधा असल्या प्रसंगांची तिला सवय नसावी.
"इथे ये. माझ्याजागेवर बस." मी तिला ओरडून सांगितलं. "हिम्मत है तो इधर आके कुछ करके दिखा उसको" त्या माणसाकडे पाहून मी ओरडले. आता बसमधली माणसं त्यांच्याकडे वळून बघू लागली तशी त्या माणसाने चालत्या बसमधून उतरून पोबारा केला.

"थँक्स हं! मला काय करावं हेच सुचत नव्हतं. किती किळसवाणी माणसं असतात नै."
"अगं असे महाभाग रोजच भेटतात. त्यांचा फाजीलपणा तेवढ्यापुरताच असतो. अंगात काही धमक नसते. आपण आवाज चढवला की काम होतं. पाहिलंस ना कसा पळून गेला ते. यांचा फाजीलपणा असाच बाहेर काढायचा असतो."
"मला अनुभव नव्हता पण आता लक्षात ठेवेन."

हम्म! येशील हळूहळू अंड्यातून बाहेर येशील. रेल्वेचा ब्रिज चढताना मी तिला विचारले "तू कुठे राहतेस? सेंट्रल का वेस्टर्न?"
"वेस्टर्न, मालाडला."
"हो का? मीही मालाडलाच. लिबर्टी गार्डनजवळ."
"मीही लिबर्टी गार्डनजवळच राहते." मी तिला माझ्या इमारतीचे नाव सांगितले. ती माझ्यापासून दोन चार इमारती सोडून राहत होती.
"पण मी आधी कधी पाहिले नाही तुला." तिने विचारले.
"अगं आम्ही आताच आलो. हा फ्लॅट माझ्या बहिणीचा आहे. तात्पुरते राहतो आहोत. माझं घर बनतं आहे. बांधकाम झालं की आम्ही शिफ्ट होऊ. हा तुझा पहिलाच जॉब का गं?"
"अलमोस्ट! मी याच वर्षी बी. कॉम. झाले मग एके ठिकाणी दोन महिने काम केलं पण मला ना मल्टीनॅशनलमध्ये जॉब हवा होता. काहीही करून खूप मोठं व्हायचं आहे मला." तिच्या पाणीदार डोळ्यांत बरीच स्वप्नं तरळून गेल्यासारखी वाटली.
'निरागस आहे.' मी मनात म्हटलं.

-----


दोन-चार दिवसांनंतरची गोष्ट. उर्मीचा सकाळीच फोन आला.
"राहुल है क्या वहां?"
"नाही. इथे नाहीये."
"अजून कसा नाही आला? १० वाजत आले. तुझा मित्र आहे ना तो? तुला माहित आहे का?"
"आज मंगळवार ना! राहुल आणि वैशाली पहाटे ४ वाजल्यापासून सिद्धीविनायकाच्या रांगेत उभे असतात. आज उशीर झाला असावा."

दुपारी राहुल तणतणत आला. "तुला कोणी सांगितलं होतं त्या उर्मीला सांगायला की मी आणि वैशाली सिद्धिविनायकाच्या लायनीत उभे राहतो ते."
"का काय झालं? क्लासिफाईड इन्फो आहे का ती?"
"नाही पण तिला माझ्याबद्दल जास्त काही सांगत जाऊ नकोस."
"अरे पण तुझी मैत्रिण आहे ना ती. बरं! अरे तुला माहित्ये का? ती माझ्या घराशेजारीच राहते."
"मला माहित्ये पण तू तिच्यापासून चार हात लांब रहा."
"अं! का रे?"
"सांगेन मग कधीतरी." म्हणून राहुलने काढता पाय घेतला. राहुलचा हा विचित्रपणा पास-ऑन करणे आवश्यक होते. मी वेळ झाल्यावर वैशालीला त्याच्याबद्दल सांगितले.

"अय्या! गंमतच आहे." वैशाली उत्साहाने म्हणाली. "मलाही त्या उर्मीने दोन-चारदा फोन करून राहुलबद्दल विचारलं. मलाही विचारत होती - तुझा मित्र आहे ना तो. किती चांगला मित्र आहे वगैरे. मला वाटतं ती राहुलवर लाईन मारत असावी. गीतूला सांगायला हवं हं!"

गीतांजली ही राहुलची कॉलेजपासूनची गर्लफ्रेंड. दोघांचेही प्रकरण घरांत पसंत होते. दोघांना थोडे सेटल व्हायचे होते म्हणून लग्न झाले नव्हते इतकेच. पुढच्या महिन्यात साखरपुडा उरकून घ्यायचे ठरले होते. "फिरुन फिरुन थकले आणि लग्नाला लागले." असं संदेश म्हणायचा त्यांना.

"ती उर्मी लाईन मारते का रे तुझ्यावर?" संधी मिळाल्यावर आम्ही राहुलची थोडी खेचली.
"माहित नाही. तिला थोडं लांबच ठेवायला हवं. उगीच गळ्यात पडते आहे." राहुल रुक्षपणे म्हणाला.
"तूच आणलीस तिला. मी सांगू का रे गीतूला?" संदेशने आणखी थोडी खेचली.
"प्लीज. माझ्या आयांनो आणि बापांनो, तुम्ही त्या उर्मीपासून लांब रहा आणि कृपा करून गीतूला काही सांगू नका."
"हे बघ! उर्मी तुझ्या गळ्यात पडत असेल तर तू तिला स्पष्ट सांग की तुझं लग्न ठरलं आहे. ती आताच कॉलेजातून बाहेर पडली आहे. लहान आहे. तिला अद्याप पोच नसावी. मला तर ती अगदी निरागस वाटते."
"निरागस! माय फूट! तिचा विषय नको आता. तिला माझ्यापासून कटवायचं हे मात्र नक्की. तिला कसलीही माहिती देऊ नका आणि तुम्हीही लांब रहा. माझ्या मित्राची बहीण आहे ती. तिच्यामुळे माझे संबंध खराब होता कामा नयेत."
"ठीक आहे." आमचा करार वगैरे झाला.

काही दिवसांनी उर्मीचे चौकशीचे फोन बंद झाले. त्यावर आमचे चर्वितचर्वणही झाले. 'ऑल वेल! ब्याद टळली आहे असे दिसते.' असं संदेश म्हणाला. राहुलही निर्धास्त दिसला. उर्मीला ऑफिसात लागून आता तीन-चार महिने उलटले होते. ऑफिसातल्या अनेकांना तिचं आकर्षण वाटतंय हे सर्वांच्या लक्षात आले होते. तिच्या डेस्कपाशी घुटमळणारे, तिला लंचला बाहेर घेऊन जाणारे अनेक होते. राहुलच्या तंबीमुळे संदेश आणि सुनील सांभाळून होते. शिवाय राहुलच्या मित्राची बहीण असल्याचेही कारण असावे.

----


"सायरस माझ्याशी फटकून वागतो. अजिबात मदत करत नाही." उर्मी एक दिवस ट्रेनमध्ये बोलता बोलता म्हणाली. तशा तिच्या आणि माझ्या वेळा वेगळ्या होत्या पण कधीतरी गाठ पडतच असे.
"सायरस? आणि फटकून वागतो. काहीतरीच काय? त्याच्यासारखा गरीब मनुष्य ऑफिसमध्ये नाही."
"अगं खरंच!"
"बरं मला वेळ झाला की मी विचारेन त्याला सहज म्हणून."


मी आणि सायरस हॉलवेमध्ये काहीतरी बोलत होतो आणि समोरून राहुल येताना दिसला.
"केम छो बावा?" राहुलने त्याला खास पारशी हेल काढत विचारले.
"शाला तूने फसाया है मेरेको कैसा सॅम्पल लाया है यार?" राहुल ऐकून फिसकन हसला. हे वाक्य उर्मीसाठी आहे हे लक्षात येत होतं.
"अरे ती उर्मी सांगत होती मागे की तू तिला हेल्प करत नाहीस म्हणून." मी संधी मिळताच विचारलं.
"अरे येडी, हेल्प मेरेको चाहिये उसको क्या हेल्प? ये राहुलने बुरा फसाया है" काय झाले ते कळत नव्हते. सायरस घुश्श्यात दिसत होता आणि राहुल मजेत. ही ब्याद सायरसच्या गळ्यात पडू पाहते आहे का काय? मला उर्मी आवडत होती. तिच्यासारख्या मुलीने थोडं सांभाळून वागायला हवं असं वाटत होतं. तिच्याशी एकदा बोलून बघायला हवं.

-----


त्या दिवशी सकाळीच डेस्कवरचा फोन खणखणला. माधवी होती. लंचला सर्वांनी बाहेर जाऊया असं सांगत होती. काहीतरी जबरदस्त खबर होती तिच्याकडे. तशाही माधवीकडे बातम्या असायच्याच. कोणत्या डायरेक्टरने रिझाईन केले? कोणाला किती दिवसांची सुट्टी हवी आहे? कोणी कोणाची एच आर मध्ये तक्रार केली वगैरे वगैरे. चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचा बेत ठरला होता.

"एक सॉलिड खबर द्यायची आहे. तुमचा विश्वासही बसणार नाही. काल तो राकेश भाटिया उर्मीची चौकशी करत होता." माधवी उत्साहाने सांगत होती.
"राहुल, सायरस आणि आता राकेश. सही जा रही है बाप!" सुनिलने तोंड उघडलं.
"का रे? तुझा चान्स लागला नाही म्हणून जळतोस काय?" संदेशने नाक खुपसलं.
"तिला प्रेमात पडण्याची घाई असावी. राहुल वटलेला चेक, सायरस वेडा बावा तेव्हा आता राकेशची पाळी." वैशालीने आपली बोली लावली. माणसं गॉसिप करायला लागली की एक एक तर्क कुतर्क लढवू लागतात.
"ही काय सॉलिड खबर आहे का?" मी खट्टू होऊन विचारले.
"मला बोलू द्याल तर खबर कळेल ना. तुमची मुस्काटं आवळा मग सांगते." माधवी सरसावून म्हणाली, "राकेश बराच गोंधळलेला होता. उर्मीची चौकशी करत होता. थोडीशी पर्सनल."
"गटलेला दिसतो." इति संदेश.
"ऐक रे! उर्मीने म्हणे त्याला शुक्रवारी संध्याकाळी कुठेतरी बीचवर भेटायला बोलावलं आहे."
"कुठेतरी नाही. गोराईला असणार संध्याकाळी साडे सहाला." राहुलने पहिल्यांदाच तोंड उघडले.
"हो गोराईच म्हणत होता बहुतेक. तिथे म्हणे तिने बंगला बुक केला आहे दोन-तीन तासांसाठी. राकेश म्हणत होता की या आधीही ऑफिसातल्या एक दोन जणांना तिने अशी आमंत्रणे दिलेली आहेत. तो थोडासा टरकला होता. तक्रार अशी करत नव्हता पण एच आरच्या कानावर जावं असं त्याला वाटत होतं."

सायरस काय म्हणत होता, राहुल तिला का चुकवत होता त्याचा पत्ता आता लागत होता. बोंबला!

"तुला कसं कळलं गोराई? म्हणजे तू ही..... तुझ्या मित्राची बहीण आहे ना ती." माझी ट्यूबलाईट लख्ख पेटली होती.
"खीखीखी! माझ्या मित्राची कसली आली आहे बहीण. याहू चॅटवर भेटली होती."

च्यामारी! आणि ती आम्हाला विचारत असे की तुम्ही राहुलच्या मैत्रिणी ना!

***


(मूळ अनुभवातील पात्रे, स्थळ, प्रसंग बदलले आहेत.)

marathi blogs