प्रकार

Monday, December 24, 2012

आठच्या आत घरात...


"मुलींनी रात्री आठनंतर घराबाहेर पडू नये."

"
बरोबर आहे. ही सावधगिरीची सूचना आहे. मुंबई किंवा शिकागो-न्यूयॉर्कच्या वाईट भागांत पुरुषांनीही रात्री बेरात्री एकटे दुकटे फिरू नये. जर कायदा रक्षण करू शकत नसेल तर आपण सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबवायला हवेत."

“हो पण एखाद्या कुप्रसिद्ध एरियात न जाणे आणि राजरोस सर्वत्रच आठनंतर बाहेर न पडण्याची सक्ती येणे यांत काहीतरी फरक आहे ना.”

“असला तरी सावधगिरी बाळगण्यात काही चूक आहे का?”

"
खरंय पण मला कॉल सेंटरमध्ये नाइट ड्यूटी असते."

"
मग दुसरा जॉब बघ."

"
पण माझी मैत्रिण डॉक्टर आहे. तिलाही नाइट शिफ्ट्स असतात."

"
हॉस्पिटलने त्यांची रात्री राहण्याची सोय करावी. ते शक्य नसल्यास तिनेही हा जॉब करू नये. सुरक्षितता नाही ना तिथे."

"
पण माझी तिसरी मैत्रिण पत्रकार आहे. तिलाही रात्री बेरात्री न्यूज कवर कराव्या लागतात."

"
मला वाटतं या परिस्थितीत तिने या जॉबला तिलांजली द्यावी किंवा रात्रीबेरात्री ज्या न्यूज कवर कराव्या लागतात त्यांची जबाबदारी घेऊ नये."

“म्हणजे?”

“पाककृती, फ्याशन, मुलांचे संगोपन, मुलाखती, अनाथाश्रम-वृद्धाश्रमांना भेटी असे विषय तिला कवर करता येतीलच की.”

"
पण माझ्या आणखीही मैत्रिणी आहेत. काही आयटीत आहेत. त्याही रात्री बेरात्री प्रोजेक्ट्ची डेडलाईन पूर्ण करतात, एक सिरिअल्समध्ये कामं करते. तिचीही शूटींग्ज दिवसात उशीरा असतात आणि एक तर आयपीएस आहे."

"
हो हो पण मी म्हणालो ना आधी की या परिस्थितीत रात्री आठनंतर घराबाहेर पडणे योग्य नाही. मध्यंतरी महिला कॉन्स्टेबल्स सोबत काय झाले होते ते विसरलीस का? स्त्रिया या देशात सुरक्षित नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा काळजी घेतलेली बरी एवढेच मला म्हणायचे आहे."

"
म्हणजे रात्री आठनंतर लांडगे रस्त्यांवर फिरतात असे समजायचे?"

"
दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण झालीये खरी."

"
पण मग आता रात्री आठनंतर बायका दिसत नाही म्हटल्यावर लांडगे संध्याकाळी सहालाच सावज शोधायला बाहेर पडले तर? जंगली श्वापदे नाही का... त्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले की रानाबाहेर पडून इतरांवर हल्ले करत... तसेच."

"
हम्म! माहित नाही बुवा. मध्ययुगीन पडदापद्धती कशी वाटते? नाही सुरक्षिततेसाठी अशा पर्यायांचाही विचार करून ठेवू सध्या."
“असे असेल तर स्त्रीभ्रूणहत्येचा मार्गच काय वाईट आहे? सशा आणि लांडग्यांच्या दुनियेत बायांनी जन्मच तरी का घ्यावा?”

1 comment:

Panchtarankit said...

जरासी सावधानी जिंदगी भर आसानी अशी सरकारी घोषणा आहे ,
जरी वेगळ्या संधर्भात असली तरी त्यातील आशय त्यांच्या जनतेच्या प्रती असलेल्या सुरक्षिततेच्या दायित्वाच्या प्रती असलेल्या मानसिकते वरुन सिद्ध होतो.

marathi blogs