प्रकार

Saturday, February 04, 2006

आतले आणि बाहेरचे

जगात अनेक प्रकारचे लोक आहेत. अनेक रंगांचे, धर्माचे, जातींचे, व्यवसायाचे वगैरे. यात एक फारसा उठून न दिसणारा पण सर्वत्र आढळणारा एक प्रकार आहे. "आतले आणि बाहेरचे". तसा आपल्याला हा प्रकार नवा नाहीच. मी ही काही हा जावईशोध लावलेला नाही. खरं सांगायच झालं तर शाळेत असताना एक धडा होता, अगदी याच नावाचा "आतले आणि बाहेरचे".

या आतल्या बाहेरच्यांची अनेक उदहरणे आपल्याला माहित असतीलच, जस की घरातले - घरा बाहेरचे, देशांतले - देशाबाहेरचे. मला आवडणारं उदाहरण म्हणजे ट्रेन मधले आतले आणि प्लॅटफॉर्म वरचे बाहेरचे.
या आतल्या बाहेरच्या लोकांची एक मनोवृत्ती असते. आतला पक्ष आणि बाहेरचा पक्ष. आतल्यांना बाहेरचे नको असतात आणि बाहेरचे आतल्यांचा हेवा करून पक्ष बदलण्याची वाट पहात असतात. वेगळ्या शब्दांत सांगायच झालं तर बोरिवली, कांदीवलीच्या ट्रेन मधल्या लोकांना गोरेगाव, मालाडच्या बाहेरच्या लोकांची पीडा नको असते, तर गोरेगाव, मालाडच्या लोकांना या बसून प्रवास करणाऱ्या, उलट बसून जाणाऱ्या आतल्या लोकांचा प्रचंड हेवा वाटत असतो. पण धडपडत एकदा का बाहेरचे आत घुसले की मात्र ते अचानक आतले होऊन जातात, त्यांचे पक्षांतर होते आणि मनोवृत्ती ही बदलते. या नंतर त्यांना पुढील सर्व स्थानकांवर चढणाऱ्या लोकांचा त्रास व्हायला लागतो.

पण आजच्या लेखाचा विषय तो नाही. माझ्या आतल्या बाहेरच्यांच्या संकल्पनेत मी यावेळी देशातल्या आणि देशा बाहेरच्यांना घालणार आहे. मागच्या वेळी मुंबईला जाणं झाल आणि बरेच मजेशीर अनुभव आले. त्यापैकी काही लिहून ठेवावेसे होते.

अनुभव पहिला:
जवळच रहाणारे एक काका एक दिवस पुढयात आले, "कसं काय वाटतं अमेरिकेत? आवडतं का?"
खरंतर हा प्रश्न प्रत्येक ओळखीचा मनुष्य या ना त्या प्रकारे विचारत असतो. हल्ली पुण्या मुंबईच्या हर एक ५ घरांमाजी एकजण ईंग्लंड अमेरिकेला आहे आणि त्या सर्वांनी या प्रश्नाला बरेचदा तोंड दिले असावे या बद्दल माझी पुरेपुर खात्री आहे. मला हा प्रश्न ऐकला की पोटात खड्डा पडतो, उत्तर कठीण नाही पण समोरचा कोणत्या उत्तराच्या अपेक्षेने हा प्रश्न विचारत असतो कुणास ठाऊक.

सहज "हो! आवडतना," म्हणून जावं तर समोरचा प्रतिक्रिया देतो,

"काय माणसं बघा, आपल्या देशा बद्दल, आपल्या माणसां बद्दल काही प्रेमच नाही. एकदा गेले की तिथलेच होऊन जातात. आता कायमचे गेलात तुम्ही, एकदा परदेशाची चटक लागलेला माणूस कधी परत आलाय का?"

बरं "नाही, मला नाही आवडत फारसं" म्हणावं तर पाठून ऐकू येतं,
"बिच्चारी, अगदी एकट एकट वाटत असणार तिला. काय तरी पैशाचा हव्यास? आपल्या माणसांना, आपल्या देशाला सोडून दूर रहायच आणि अस दु:खी व्हायच."
यातला एखादा जण असा विचार का नाही करत की माणूस हा सवयीचा गुलाम असतो. तो जिथे रहातो, खातो, व्यवसाय करतो, तिथे हळू हळू रुळत जातो. त्या जागेला, राहणीला आपलं मानू लागतो, मग तो मुंबई - पुण्यातून ईंग्लंड अमेरिकेला जाऊ दे नाहीतर कोकणा देशावरुन मुंबई पुण्यात येऊ दे.
या पुढचा अनुभव तर आणखीनच मजेशीर आहे.
अनुभव दुसरा:
आमच्या एक मावशी आहेत, एकदम स्पष्टवक्त्या म्हणजे कोणाची भीड भाड वगैरे ठेवणार नाहीत. मनात येईल ते सरळ बोलून मोकळ्या होणार. गुगली वगैरेच्या फंदात नाही पडणार, बाऊन्सर टाकून समोरच्याला चाट पाडणार. त्यांनी मला प्रश्न केला, "काय? करोडभर तर जमले असतील ना. बस झालं नाही का? वर घेऊन जायच्येत की काय?"

मी चाट. आमच्या भविष्याचा विचार बहुतेक या मावशी आमच्यापेक्षाही जास्त करत असाव्यात.
अनुभव तिसरा :

अशाच ओळखीच्या एक काकू आहेत. स्वभावाने गरीब, एक दिवस न रहावून त्यांनी ही विचारुन घेतलं,
"काय गं? तुम्ही ते हे खाता का गं?"
"हे म्हणजे काय हो काकू?" माझा साळसूद प्रश्न.
"बीफ, हॅम आणि काय काय मिळतं ना तिकडे."
"नाही काकू तसलं काही नाही खात आम्ही."
"बरं गं बाई, बघ हं पण आज नसाल खात पण उद्याचं काय? बाहेर राहून तुम्ही काय कराल त्याचा नेम नाही."
मनात चटकन विचार आला की येणाऱ्या जाणाऱ्या, भेटणाऱ्या प्रत्येकासाठी आता मी बाहेरची झाले आहे. ही माणसं सहज म्हणून असे प्रश्न विचारतात की मी इतकी दूर गेले आहे की त्यांच्यातील एक राहीलेच नाही. हे माझी ओळख विसरले आहेत की हा त्यांचा अविश्वास असावा? भारतात राहून घरापासून दूर ठिकाणी नोकरी करणारे, बक्कळ पैसा कमावणारे आणि मनात येईल ते खाणारे आणि वागणारे काही कमी असतील? पण ते सगळे आतले आहेत आणि मी मात्र बाहेरची.

3 comments:

Anonymous said...

सुरेख लेख!

Dr. Amit Rajput said...

sensitve one..but the examples were funny hehe..unfortunately these situations are faced by most of the people who stay abroad... *shrug

good to see you back to writing...i thought u stopped it or somethg :P

Priyabhashini said...

Thanks all,

No I didnt stop but was busy compiling another article.

marathi blogs