प्रकार

Wednesday, October 15, 2008

कुमारी देवी

ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.

http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html

कुमारी देवीची प्रथा नेपाळात फार प्राचीन नसल्याचे सांगितले जाते. सुमारे १२ व्या ते १७ व्या शतकांदरम्यान कधीतरी ही प्रथा अस्तित्वात आली. आख्यायिकेनुसार नेपाळी राजाशी दुर्गास्वरुप देवता खाजगीत सारिपाट खेळण्यास येत असे. याचा पत्ता कोणालाही नव्हता. एकदा राणीला कुणकुण लागल्याने तिने राजावर पाळत ठेवली आणि राजाला भेटायला देवी आल्यावर ती सामोरी गेली. याप्रकाराने देवी क्रोधित झाली आणि तिने राजाची कानउघडणी केली. लुप्त होण्यापूर्वी तिने राजाला सांगितले की जर राजाला तिला पुन्हा भेटायची इच्छा झाली तर ती शाक्य समाजात सापडेल. (गौतम बुद्ध हा शाक्य होता)

तेव्हापासून शाक्य समाजातील लहान मुलींना त्यांचा मासिक धर्म येण्यापूर्वी कुमारी देवी म्हणून निवडले जाते. दलाई लामा किंवा पंचेन लामा यांचा शोध घेताना जसे प्रयत्न केले जातात त्याप्रमाणेच ही देवी शोधण्यासाठीही अनेक विधी, प्रयत्न करावे लागतात आणि अनेक अटींची पूर्तता करावी लागते जसे -

तिची पत्रिका तपासली जाते. या मुलीला कधीही शारिरीक जखम झालेली नसली पाहिजे. तिचे दात पडलेले नकोत. ते २० असायला हवेत. तिचा आवाज, चालणे, बोलणे, केस, डोळे, शरीर अशी बत्तीस लक्षणे तपासली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिला अंधाराची भीती नाही हे तपासले जाते आणि मग तिची सर्वात कठिण परीक्षा घेतली जाते. कुमारी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात रेडे आणि बोकडांचे बळी देऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या मुंडक्यांवर दिवे लावून मुखवटेधारी व्यक्ती नृत्य करतात आणि या ठिकाणी या लहान मुलीला एकटे सोडले जाते. ती घाबरली नाही तर तिला नंतर संपूर्ण रात्र या बळी दिलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यासमवेत घालवावी लागते. ही मुलगी न घाबरता, न रडता तिथे रात्रभर राहीली तर कुमारी देवी म्हणून तिची निवड होते.

kumari devi


यानंतर तिला कुटुंबापासून वेगळे, कुमारी देवीच्या मंदिरात ठेवले जाते. तिच्या कपाळावर देवीचा तिसरा नेत्र आरेखला जातो. तिची पूजा केली जाते. लोक कुमारीचौकात गर्दी करून तिचे दर्शन घेतात. दर्शन घेताना तिच्या पाया पडतात. दर्शनाच्या वेळेस देवीचे लहान मुलीसारखे वागणे जसे, टाळ्या वाजवणे, हसणे, रडणे, ओरडणे, आणलेल्या नैवेद्याकडे आशेने पाहणे भक्तांवर संकटे आणते असा समज आहे. या उलट, देवीने शांतपणे नमस्कार, नैवेद्याचा स्वीकार केला तर देवी पावते असा समज आहे. चांगली वस्त्रे, कपडे, मान या वातावरणात वाढणार्‍या मुलींना मासिकपाळी आल्यावर देवी त्यांचे शरीर सोडून जाते आणि या सर्व सुखसोयींपासून त्यांना अचानक वंचित व्हावे लागते.

यानंतर त्यांना दरवर्षी सरकारी मानधन मिळते परंतु अचानक आलेल्या बदलामुळे बर्‍याच मुली सामान्य जीवनाला रुळू शकत नाहीत. त्यांना नंतर लग्न करता येत असले तरी त्यांच्याशी लग्न करणारा माणूस वर्षभरात मरण पावतो असा समज अस्तित्वात आहे. (अनेक कुमारी देवींची लग्ने झाल्याचा दाखला विकिवर मिळतो) पुन्हा एकदा नव्याने देवीचा शोध सुरु होतो.

यापूर्वीची कुमारी देवी सजनी शाक्य मोठी झाल्याने तीन वर्षांच्या मतिना शाक्यची निवड करून कुमारी देवीची स्थापना करण्यात आली आहे.

हा सर्व वृत्तांत वाचताना एक प्रकारे विचित्र खेद होतो. या मुलींचे बालपण कोमेजून टाकून त्यांच्या तारुण्याशीही कळत-नकळत खेळ केला जातो. इतर अनेक धर्म आणि पंथातही कोवळ्या वयांत मुलांना देव, देवता, संन्यासी, साधू, आजन्म ब्रह्मचारी करणे होत आले आहे. ज्या वयांत निर्णय घ्यायची क्षमता नसते, चांगल्यावाईटाची जाण नसते, आपली आवड-निवड ठरवायची जाणीव नसते त्या वयांत दुसर्‍यांनी माथी मारलेले निर्णय घेऊन जगायची शिक्षा त्यांच्या माथी मारणे आणि इतर मुलांना मिळणार्‍या बाल्यापासून त्यांना वंचित ठेवणे हे सहजी पटणारे नाही. नवरात्रांत कन्यापूजा नावाचा जो प्रकार चालतो त्यात लहान मुलींच्या पाया पडणे, त्यांच्याकडून आशिर्वाद मागणे, त्यांना प्रसाद चढवणे असे प्रकार केले जातात. कुठेतरी आपण त्या उमलणार्‍या फुलांवर आपण हा प्रकार लादत असतो का? असे प्रकार, प्रथा केवळ समाजातील अशिक्षित समाजात होत असतील असे वाटत असल्यास आवर्जून सांगावेसे वाटते की कन्यापूजा ही अमेरिकेतही देवळांदेवळांतून चालते. चांगली सुशिक्षित, अतिउच्चशिक्षित माणसे लहान मुलींना रांगेत बसवून त्यांच्या पाया पडून, त्यांच्या हातात डॉलर्स कोंबताना आणि आशीर्वाद मागताना अनुभवले आहे.

अधिक माहिती:

http://en.wikipedia.org/wiki/Sajani_Shakya
http://hinduism.about.com/cs/godsgoddess/a/aa090903a.htm

चित्र http://solidaritynepal.org वरून साभार.

4 comments:

HAREKRISHNAJI said...

आपण एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली आहेत। नेहमी प्रमाणेच खुप अभ्यासपुर्वक व माहीतीपुर्वक लेख

यांच्या आयुष्याशी हा क्रूर खेळ असतो। केवळ पैशासाठी ।

Maithili said...

Kumarika pujane ha balyashi kelela khel vaigare nasato. Mulina suddha samajat kimmat milavi mhanun ha sarv khatatop kela jato. aani aaj jari yachi garaj nasali tari jevha hi pratha suru keli geli asel tevha yachi nishchitach garaj asel.
baki blog uttam aahe.

Priyabhashini said...

लेखात जो प्रकार व्यक्त केला आहे तो त्या मुलीच्या बाल्याशी खेळ आहे हे स्पष्ट आहे. नवरात्रीत मुलींना बोलवून त्यांची पूजा करण्याएवढेच ते मर्यादित नाही. ज्या वयात मुलीला शाळेत जायची गरज आहे त्यावेळेस तिला देवी बनवून तिच्या बालपणातील महत्त्वाची वर्षे तिला प्रौढांसारखे वागण्यात जात आहेत हे लक्षात येत नसेल याचे आश्चर्य वाटले. आपल्या अशा मतांशी मी असहमत आहे हे सांगायला नकोच.

StayLinked said...

my personal belief is that this is kind of custom was started inorder to satisfy the sexual urges of the priests in olden time. Priest and such kind of religious people have made lots of wrong customs. Unfortunately because we lack good leaders not only today but from historic periods. This is the reason why such foolish customs still exist in India or Nepal.

marathi blogs