प्रकार

Thursday, December 04, 2008

का?

कितीतरी दिवसांत या ब्लॉगवर काही लिहिलं नाही. हल्ली लिहावसं वाटत नाही. लिहिण्यासारखं काही नसतं.वेळ नसतो, वाचन नसतं, इच्छाही नसते. मनात येणारे विचार मूर्त स्वरूपच घेत नाहीत. का त्यांनी मूर्त स्वरूप घेऊ नये अशी माझी इच्छा असते? ठरवण्यात मी असमर्थ आहे.

जेव्हा लिहिता येत नव्हतं तेव्हा लिहिण्याची जबरदस्त इच्छा होती, मनात आलेलं सर्व उतरवून ठेवावसं वाटायचं. जसजसं लिहिता येऊ लागलं तसतसे विषय कमी होत गेले. मनापासून लिहिण्याची ओढ कमी झाली. लोक वाचू लागले, लेखन त्यांच्यासाठी येऊ लागले. माझ्यासाठी काहीच नाही.

अजूनही मी लिहिते - लेख उतरतात पण ते माझ्यासाठी लिहिलेले नसतात. लोक वाचतात, त्यांना आवडेल, त्यांना रुचेल, त्यांना पटेल असं लिहिते. लोक ओळखतात, लेखन ओळखतात, शैली ओळखतात, चुका दाखवतात, अपेक्षा करतात. मी त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करते. पण माझ्या अपेक्षा अपूर्ण राहतात. मला काय लिहायचं आहे हे ठरवता येत नाही. लोकांना काय वाचायचं आहे याचा मात्र कधीतरी ठाव घेता येतो. लेखनातला प्रामाणिकपणा कमी झाला आहे. अतृप्ततेची भावना मनात सतत घोटाळते. काहीच साध्य होत नसल्याची तक्रार डोक्यात असते. अस्वस्थता इतरांवर फटके मारण्यास भरीला का पाडते याचे उत्तर मिळत नाही.

मी माझ्यासाठी लिहित नाही. का? कारण शोधते आहे.

Tuesday, October 21, 2008

वळणावर ती येते

हल्ली मी भल्या पहाटेच उठून ऑफिसला पळायची सवय केली आहे. लवकर पोहोचलं की भराभर कामं आटोपून लवकर निघताही येतं. संध्याकाळी क्लबला जाऊन निवांत गॉल्फ खेळायला वेळ मिळतो. दिवसभर बैठं काम करणार्‍यांना काहीतरी व्यायाम हा हवाच. गॉल्फच्या निमित्ताने व्यायाम होतो, ऑफिसात शिणलेलं डोकं शांत होतं आणि संध्याकाळ बरी जाते. नाहीतर माझ्यासारख्या सड्याफटींग माणसाने घरी एकट्याने काय करायचं हा मोठा प्रश्न असतो.


पहाटेचा मी घराबाहेर पडतो तेव्हा बाहेर मिट्ट काळोख असतो. गाडीच्या प्रकाशात रस्ता दिसतो तेवढाच, बाकी सर्वत्र अंधाराचे राज्य. गेले आठ-दहा दिवस मी मुख्य रहदारीचा सोडून एक लहानसा शॉर्टकट घेतो आहे. हा रस्ता एकपदरी आणि अरुंद आहे, वळणावळणांचा नागमोडीही आहे. गाडीचा वेगही बराच कमी ठेवावा लागतो पण मायलेज आणि गॅस बर्‍यापैकी वाचतो आणि धडधडत ऑफिस गाठण्यापेक्षा रमत गमत, शीळ घालत, पहाटेचा वारा खात जाण्यात काही और मजा असते. ऑक्टोबर लागल्यापासून गेले काही दिवस हवा थंड झाली आहे तरी गाडीच्या काचा खाली सरकवून आरामात प्रवास होतो. या रस्त्याच्या एका बाजूला मोठा तलाव आहे आणि दुसर्‍या बाजूला रान माजलं आहे. त्या रानामागे उंचच उंच झाडं पसरली आहेत. काळोखात तळ्यातल्या पाण्यावर शुभ्र धुकं तरंगताना काहीतरी रहस्यमय आकार घेताना दिसतं. पहाटेच्या मंद वार्‍यात पानांची सळसळ स्पष्ट ऐकता येते. आजकाल आकाशही बरेचदा ढगाळलेलं असतं. आकाशात संथ वाहणारे ढग चंद्राला झाकोळून टाकतात तेव्हा काळोख आणि मंद प्रकाशात प्रवास करताना एक अनोखा थरार जाणवतो. मात्र निसर्गाचं हे लोभस रुप हे एवढेच हा शॉर्टकट घेण्याचे कारण नाही.


मुख्य रस्ता सोडून या लहान रस्त्याला लागलं की फर्लांगभर अंतरावर रस्ता अचानक वळतो. इथे गाडीचा वेग अतिशय कमी करावा लागतो, फारतर ५-१० मैल. गाडीने वळण पूर्ण केल्याशिवाय पुढे काय आहे याचा पत्ताही लागत नाही. वळण धोकादायक असल्याची पाटीही येथे दिसते. वेग किंचित जास्त असेल तर बाजूच्या झाडावर आपटून किंवा समोरून येणार्‍या वहानाने धडक दिल्याने कपाळमोक्ष ठरलेला. आधीही बरेच अपघात झाले आहेत म्हणतात इथे पण इतक्या पहाटे इथे वर्दळ नसते आणि गेल्या आठ दिवसांत मी हे वळण अंगवळणी पाडलं आहे...... कारण वळणावर ती दिसते.


भल्या पहाटे फेरफटका मारायची सवय असावी तिला. पांढरा सफेत टिशर्ट आणि पँट घालून पाठीवर रुळणारे केस सावरत रोज ती याच वळणावर नजरेस पडते. चंद्रप्रकाशात तिचं रुप पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मती गुंग होणे म्हणजे नेमकं काय ते कळून आलं. इतकं अप्रतिम लावण्य घेऊन स्वर्गातली अप्सरा तर रोज इथे येत नसावी ना अशी शंका मनाला चाटून गेली आणि भारावल्यासारखा रोज मी या वाटेने येऊ लागलो. गाडीचा वेग वळणावर कमी केला की तिला निरखण्यात जो आनंद जिवाला होतो त्याचं वर्णन शब्दांत केवळ अशक्य आहे. त्या वळणावर केवळ क्षण दोन क्षण ती मला दिसत असावी. नंतर माझी गाडी वळते आणि ती दिसेनाशी होते पण त्या एका झलकेसाठी मी वेडा झालो आहे. कधीतरी तिला थांबवून विचारण्याचा, तिची चौकशी करण्याचा मोह होतो पण अजून हिम्मत बांधलेली नाही. तिची ओळख काढायची अनिवार इच्छा आहे हे निश्चित, मात्र काहीतरी रहस्यमय आहे तिच्यात, जे मला तिच्याकडे खेचतं आणि थांबवूनही ठेवतं.


तिच्याशी ओळख काढून घ्यायला मी का थांबलो आहे यावर गेले काही दिवस विचार करतो आहे. माझी भीड, सभ्यता की आणखी काही? तसा मी बायकांच्याबाबत प्रसिद्ध नसलो तरी माझं व्यक्तीमत्व कोणावरही छाप पाडणारं आहे. बायकांशी सभ्यतेने बोललं की त्यांच्याकडून फारसा विरोध होत नाही ओळख करून घेण्यात असा अनुभवही गाठीशी आहे.

वळणावर गाडीचा वेग कमी केला की तिच्याकडे क्षणभर का होईना निरखून पाहता येतं. ते काळेभोर केस, कपाळावर रुळणार्‍या बटा, सरळ चाफेकळी नाक, नाजूक जिवणी आणि डोळे. तिचे डोळे वेगळे आहेत, मोठे आहेत तिला शोभूनही दिसतात पण तेजहीन आहेत. गाडीच्या अंधुक प्रकाशातही त्यातील भाव ओळखण्याचा मी प्रयत्न केला आहे. तिचे डोळे निष्प्राण नाही..नाही निष्प्राण कसे असतील? पण थिजलेले आहेत. ते डोळे तर मला तिच्याशी ओळख वाढवून घेण्यापासून थांबवून ठेवत नाही ना हा प्रश्न मनाला मी दोन चारदा विचारला आहे पण निश्चित उत्तर मिळत नाही. तिच्याकडे पाहून काल स्मितहास्यही केलं होतं पण तिच्या त्या डोळ्यांत अस्पष्ट कुतुहलाखेरीज दुसरे कुठले भाव दिसले नाहीत.


आज घरातून निघताना लक्षात येतं आहे की आकाशात ढगांची गर्दी जमलीये. चंद्र क्वचित ढगांआडून बाहेर डोकावतो आहे तेवढाच. गाडीत बसता बसता पावसाचे दोन थेंब डोक्यावर शिडकतात. 'आज येईल का ती?’ मनात तिचेच विचार घोळत असतात. पावसाला सुरुवात होते. ती घरातून आधीच निघाली असेल तर पाऊस तिला गाठणार हे नक्की पण ती पावसाच्या अंदाजाने निघालीच नसेल तर? आज तिचं दर्शन होणार नाही. एक अनामिक हुरहुर माझ्या मनात जमा होत होती. 'आज ती दिसली तर गाडी थांबवायची. तिची ओळख काढायची. तिला गाडीत येण्याची विनंती करायची. तिला विचारायचं..... पण काय...... काय विचारायचं? ’ गाडी सुरू करता करता माझ्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. काय विचारायचं? तिला काहीतरी विचारायचं असं मी मनाशी ठरवलं होतं पण नेमकं काय ते उलगडत नव्हतं. जिवाची घालमेल होत होती.


गाडी मुख्य रस्ता सोडून शॉर्टकटला लागली तेव्हा पाऊस रिपरिपत होता. रोजच्या वेगापेक्षाही मी थोड्या कमी वेगातच गाडी हाकत होतो. वळणावर ती येईल या आशेवर.


आणि वळणावर ती उभी होती. ओलीचिंब. तिचे ओले कपडे तिच्या भरदार शरीराला चिकटून बसले होते आणि तिच्या सौष्ठवाची जाणीव प्रकर्षाने करून देत होते. ओलेत्या बटा कपाळाला चिकटल्या होत्या. ती त्या मागे न सारता तशीच उभी होती. जशी कुणाची तरी वाट पाहत असावी. मी गाडी थांबवली, काच खाली सरकवली आणि चटकन गाडी अनलॉक केली.


"या लवकर, आत बसा. मी सोडतो घरी. " ती आत येईल की नाही अशी शंका मनाला चाटून गेली. तिने शांतपणे दरवाजा उघडला आणि ती सावकाश आत येऊन बसली. मी गाडी सुरु केली.


"कुठे सोडायचं तुम्हाला? " मी सहज आवाजात विचारलं.
"इथूनच पुढे. " ती माझ्याकडे न पाहता काचेतून सरळ बघत म्हणाली. तिच्या आवाजात गोडवा होता पण एक अनामिक रुक्षपणा त्यात भरलेला होता. घरी पोहोचण्याची घाई त्यात नव्हती की अनोळखी माणसाबरोबर त्याच्या गाडीत बसल्याची भीती. तिच्या आवाजात माझ्याशी बोलण्याची उत्सुकताही दिसत नव्हती. तरीही तिला बोलतं करणं भाग होतं. मी तिला मोजक्या शब्दांत माझी करून दिली. मी काय करतो, कुठे राहतो हे सांगता सांगता एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती, वातावरणात गारवा होता. ती ओलीचिंब होती पण तिच्या अंगावर शहारा नव्हता. तिला थंडी वाजत होती किंवा ती थंडीने थरथरत असल्याचे मुळीच जाणवत नव्हते. मी तिच्या गोर्‍यापान भिजलेल्या हातांकडे बघत होतो. अचानक तिला स्पर्श करण्याचा अनावर मोह मला झाला आणि ओळख करून दिल्यावर मी एक हात स्टिअरींगवर घट्ट रोवून दुसरा हात हस्तांदोलनासाठी पुढे केला. तिने सावकाश नजर माझ्याकडे वळवली आणि माझा हात हातात घेतला.


एक जबरदस्त सणक माझ्या डोक्यात गेली.....तिचा हात बर्फासारखा थंड होता. जिवंत माणसाचा हात असा थंड नसतो. त्यात धुगधुगी जाणवते, ती तिच्या स्पर्शात जराही नव्हती. मी कोणाबरोबर गाडीत बसलो होतो? माझ्या बाजूला बसलेली ही तरुणी कोण? मी गोंधळलो आहे पण घाबरलेला नाही.


"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.

"माझा? " मी चकित झालो होतो. तिची नजर आता माझ्यावर रोखलेली होती पण त्यात आता कुतूहल नव्हते एकतर्‍हेचा विषाद जाणवत होता.

"आठ दिवसांपूर्वी, " ती क्षणभर थबकली आणि पुढे बोलू लागली "तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलेत आणि तेव्हापासून रोज त्या वळणावर आपण एकमेकांना दिसतो. "

"हो, " मी आवंढा गिळला.

"वर्षभरापूर्वी माझा त्या जागेवर अपघात झाला होता. तेव्हापासून मी इथे... " म्हणजे माझी शंका खरी होती. ही तरुणी जिवंत नाही. तिचे ते थिजलेले डोळे, मोकळे केस, पांढरे कपडे सर्वांचा संदर्भ लागत होता. माझ्या गाडीत, माझ्या शेजारी बसलेली ही बाई मानवी नाही... पण मला जे विचारायचे होते ते हे नव्हतेच ते तर यापुढे होते.


"आणि मी? " माझे शब्द घशात विरतात का काय वाटून गेले.
पाऊस थांबला होता. चंद्रावरचं ढगाचं सावट बाजूला होत होतं. चंद्रप्रकाशात आता समोरचा परिसर उजळून निघाला होता.


“मी इथे कधीपासून?”
"आठ दिवसांपासून. मी तुम्हाला वळणावर दिसले आणि रस्ता वळताना तुम्ही पुन्हा मागे वळून पाहिलंत. " ती पुन्हा तेच सांगत होती पण या वेळेस माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता. हेच तर तिला गेले आठ दिवस विचारायचं होतं पण त्या प्रश्नाचं उत्तर आज माझं मलाच मिळालं होतं.

तिला पुन्हा एकवार पाहावं म्हणून मी त्या दिवशी गाडीच्या रिअर-मिररमध्ये डोकावून पाहिलं होतं पण आरशात कोणीच दिसलं नाही तेव्हा चमकून मान वळवून मागे पाहिलं होतं आणि त्या वळणावर गाडीवरचा ताबा सुटला होता.


हॅपी हॅलोवीन!!

Wednesday, October 15, 2008

कुमारी देवी

ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.

http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html

कुमारी देवीची प्रथा नेपाळात फार प्राचीन नसल्याचे सांगितले जाते. सुमारे १२ व्या ते १७ व्या शतकांदरम्यान कधीतरी ही प्रथा अस्तित्वात आली. आख्यायिकेनुसार नेपाळी राजाशी दुर्गास्वरुप देवता खाजगीत सारिपाट खेळण्यास येत असे. याचा पत्ता कोणालाही नव्हता. एकदा राणीला कुणकुण लागल्याने तिने राजावर पाळत ठेवली आणि राजाला भेटायला देवी आल्यावर ती सामोरी गेली. याप्रकाराने देवी क्रोधित झाली आणि तिने राजाची कानउघडणी केली. लुप्त होण्यापूर्वी तिने राजाला सांगितले की जर राजाला तिला पुन्हा भेटायची इच्छा झाली तर ती शाक्य समाजात सापडेल. (गौतम बुद्ध हा शाक्य होता)

तेव्हापासून शाक्य समाजातील लहान मुलींना त्यांचा मासिक धर्म येण्यापूर्वी कुमारी देवी म्हणून निवडले जाते. दलाई लामा किंवा पंचेन लामा यांचा शोध घेताना जसे प्रयत्न केले जातात त्याप्रमाणेच ही देवी शोधण्यासाठीही अनेक विधी, प्रयत्न करावे लागतात आणि अनेक अटींची पूर्तता करावी लागते जसे -

तिची पत्रिका तपासली जाते. या मुलीला कधीही शारिरीक जखम झालेली नसली पाहिजे. तिचे दात पडलेले नकोत. ते २० असायला हवेत. तिचा आवाज, चालणे, बोलणे, केस, डोळे, शरीर अशी बत्तीस लक्षणे तपासली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिला अंधाराची भीती नाही हे तपासले जाते आणि मग तिची सर्वात कठिण परीक्षा घेतली जाते. कुमारी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात रेडे आणि बोकडांचे बळी देऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या मुंडक्यांवर दिवे लावून मुखवटेधारी व्यक्ती नृत्य करतात आणि या ठिकाणी या लहान मुलीला एकटे सोडले जाते. ती घाबरली नाही तर तिला नंतर संपूर्ण रात्र या बळी दिलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यासमवेत घालवावी लागते. ही मुलगी न घाबरता, न रडता तिथे रात्रभर राहीली तर कुमारी देवी म्हणून तिची निवड होते.

kumari devi


यानंतर तिला कुटुंबापासून वेगळे, कुमारी देवीच्या मंदिरात ठेवले जाते. तिच्या कपाळावर देवीचा तिसरा नेत्र आरेखला जातो. तिची पूजा केली जाते. लोक कुमारीचौकात गर्दी करून तिचे दर्शन घेतात. दर्शन घेताना तिच्या पाया पडतात. दर्शनाच्या वेळेस देवीचे लहान मुलीसारखे वागणे जसे, टाळ्या वाजवणे, हसणे, रडणे, ओरडणे, आणलेल्या नैवेद्याकडे आशेने पाहणे भक्तांवर संकटे आणते असा समज आहे. या उलट, देवीने शांतपणे नमस्कार, नैवेद्याचा स्वीकार केला तर देवी पावते असा समज आहे. चांगली वस्त्रे, कपडे, मान या वातावरणात वाढणार्‍या मुलींना मासिकपाळी आल्यावर देवी त्यांचे शरीर सोडून जाते आणि या सर्व सुखसोयींपासून त्यांना अचानक वंचित व्हावे लागते.

यानंतर त्यांना दरवर्षी सरकारी मानधन मिळते परंतु अचानक आलेल्या बदलामुळे बर्‍याच मुली सामान्य जीवनाला रुळू शकत नाहीत. त्यांना नंतर लग्न करता येत असले तरी त्यांच्याशी लग्न करणारा माणूस वर्षभरात मरण पावतो असा समज अस्तित्वात आहे. (अनेक कुमारी देवींची लग्ने झाल्याचा दाखला विकिवर मिळतो) पुन्हा एकदा नव्याने देवीचा शोध सुरु होतो.

यापूर्वीची कुमारी देवी सजनी शाक्य मोठी झाल्याने तीन वर्षांच्या मतिना शाक्यची निवड करून कुमारी देवीची स्थापना करण्यात आली आहे.

हा सर्व वृत्तांत वाचताना एक प्रकारे विचित्र खेद होतो. या मुलींचे बालपण कोमेजून टाकून त्यांच्या तारुण्याशीही कळत-नकळत खेळ केला जातो. इतर अनेक धर्म आणि पंथातही कोवळ्या वयांत मुलांना देव, देवता, संन्यासी, साधू, आजन्म ब्रह्मचारी करणे होत आले आहे. ज्या वयांत निर्णय घ्यायची क्षमता नसते, चांगल्यावाईटाची जाण नसते, आपली आवड-निवड ठरवायची जाणीव नसते त्या वयांत दुसर्‍यांनी माथी मारलेले निर्णय घेऊन जगायची शिक्षा त्यांच्या माथी मारणे आणि इतर मुलांना मिळणार्‍या बाल्यापासून त्यांना वंचित ठेवणे हे सहजी पटणारे नाही. नवरात्रांत कन्यापूजा नावाचा जो प्रकार चालतो त्यात लहान मुलींच्या पाया पडणे, त्यांच्याकडून आशिर्वाद मागणे, त्यांना प्रसाद चढवणे असे प्रकार केले जातात. कुठेतरी आपण त्या उमलणार्‍या फुलांवर आपण हा प्रकार लादत असतो का? असे प्रकार, प्रथा केवळ समाजातील अशिक्षित समाजात होत असतील असे वाटत असल्यास आवर्जून सांगावेसे वाटते की कन्यापूजा ही अमेरिकेतही देवळांदेवळांतून चालते. चांगली सुशिक्षित, अतिउच्चशिक्षित माणसे लहान मुलींना रांगेत बसवून त्यांच्या पाया पडून, त्यांच्या हातात डॉलर्स कोंबताना आणि आशीर्वाद मागताना अनुभवले आहे.

अधिक माहिती:

http://en.wikipedia.org/wiki/Sajani_Shakya
http://hinduism.about.com/cs/godsgoddess/a/aa090903a.htm

चित्र http://solidaritynepal.org वरून साभार.

Tuesday, October 07, 2008

स्वप्नांच्या जादूनगरीत

राज्याच्या वेशीत आम्ही प्रवेश केला तसे एकाने आमंत्रणपत्रिका आमच्या हातात कोंबली. राजवाड्यात सोहळा सुरू होण्यास थोडाच वेळ बाकी होता. राजवाड्यासमोर लोकांची गर्दी जमू लागली होती. उशीर झाला तर राज्याभिषेकाचा सोहळा लांबूनच पाहावा लागेल ही जाणीव झाली तशी मी मुलीला सांगितले, "हात घट्ट पकड. थोड्या वेळात तोबा गर्दी उसळली की त्यात हरवायचीस कुठेतरी.” आणि आम्ही तिघे राजवाड्याच्या दिशेने धावत सुटलो. आजच्या सोहळ्याप्रीत्यर्थ जरीच्या पताका, कलाबतू आणि बादल्याच्या कामाने राजवाडा सजवला होता. सुवर्णनक्षीने सजवलेला राजवाडा आज विशेष खुलून दिसत होता. राजवाड्यातून सैनिकांची फलटण आणि त्यांच्या मागे अमीर उमराव राजवाड्याच्या मुख्य सदरेवर येऊ लागले. पाठोपाठ राजेसाहेब येण्याची वर्दी आली आणि राजेसाहेबांचे आपला पुत्र प्रिन्स चार्मिंग आणि पुत्रवधू सिंड्रेला यांच्यासमवेत आगमन झाले.DSC00316

आपल्या कारभारातून निवृत्ती घेऊन राजेसाहेब राज्यकारभार आजपासून राजपुत्राच्या हाती सोपवणार होते. सिंड्रेला राज्याची राणी होणार आणि परीराणी आपल्या करामती दाखवायला येणार नाही असे थोडेच होईल? सिंड्रेलाच्या आगमनाबरोबरच राजवाड्याच्या सज्जात परीराणीही अवतीर्ण झाली. सोबत नौबती झडल्या, आकाशात फटाक्यांची फुले उधळली गेली. सिंड्रेला तिच्या शुभ्र सफेद वेशात खुलून दिसत होती. देखण्या राजपुत्रासमवेत जोडा अगदी शोभून दिसत होता.समारंभासाठी मोठमोठ्या पाहुण्यांना आमंत्रण होते. DSC00329त्यांचेही आगमन होऊ लागले. राजेसाहेब आणि युवराज, युवराज्ञीला त्यांची ओळख करून दिली जात होती. अल्लाउद्दीन आणि जास्मीन, ब्युटी आणि बीस्ट, स्नोव्हाईट (हिमगौरी) आणि तिचा राजकुमार, स्लीपिंग ब्युटी (झोपलेली राजकन्या) आणि तिचा राजकुमार असे सर्वजण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. पाहुण्यांनी युवराज आणि युवराज्ञीचे अभीष्टचिंतन केले. समारंभासाठी आलेल्या कलावंतांनी नृत्य आणि गायन सादर करून पाहुण्यांना रिझवले. राजेसाहेबांनी उठून आपला मनोदय उपस्थित पाहुण्यांसमोर व्यक्त केला आणि आपला मुकुट आपल्या पुत्राच्या माथ्यावर चढवला. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सिंड्रेलालाही राणीचा मुकुट बहाल करण्यात आला. सिंड्रेलाने उपस्थितांचे आभार मानले.

"राज्याच्या देखरेखीत कोणताही कसूर होणार नाही, राज्याचे प्रजाजन सुखी राहोत, सर्वांचे कल्याण होवो." अशी इच्छा व्यक्त केली आणि नृत्य गायनाच्या कार्यक्रमांना पुनश्च सुरुवात झाली. यावेळेस या आनंदात सर्व उपस्थित पाहुणे, सिंड्रेला आणि प्रिन्स चार्मिंग यांनीही भाग घेतला आणि हळूहळू उपस्थितांचे निरोप घेतले.

परीकथेतील पात्रांना याचि देही याचि डोळा पाहून तृप्त झाल्यावर मी मुलीला विचारले, “आता काय करूया? अल्लाउद्दीनच्या उडत्या गालिच्यावरून सफर, डम्बोच्या पाठीवरून आकाशाची सफर, कपबशीत बसून गिरक्या घेऊया, पायरेट्सना भेटायला त्यांच्या जहाजात जाऊया, जंगल सफारीला भेट देऊया, मिकी माऊसच्या घराची सफर करूया, बाहुल्यांच्या राज्याची सफर करूया की खुद्द मिकी माऊसच्या गळ्यात पडून दोन चार फोटो काढूया?” तशी ती खुदकन हसत म्हणाली, “मम्मा, तू तर माझ्यापेक्षाही जास्त एक्सायटेड आहेस.”“असणारच!” मी तिला चिडवले, “स्वप्नांच्या या जादूनगरीत आज तू राजकन्या आहेस आणि मी.... मीही राजकन्याच आहे.”

स्वप्नातली ही नगरी सत्यात उतरते ती अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलॅंडो शहरात वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टमधील मॅजिक किंगडम पार्कात.---प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल दडलेले असते. काहीजण या मुलाला दडपून टाकतात, काही त्याचे अस्तित्वच विसरून जातात तर काही थोडके स्वत:तील या मुलाची निरागसता, खेळकरपणा, उत्साह Florida_Trip_197[1]जपत राहतात, आपल्यातील मूल जगवतात आणि स्वत:सह इतरांनाही आनंदी करतात. वॉल्टरने लहानपणापासूनच आपला चित्रकलेचा छंद जोपासला होता. शाळेतून निघणार्‍या मासिकात तो चित्रे आणि कार्टून्स काढत असे. पुढे सैन्यात भरती होण्याच्या इच्छेने त्याने शाळा सोडली पण वय कमी भरल्याने त्याला सैन्यात प्रवेश मिळाला नाही. खिशात अवघे ४० डॉलर्स आणि आपल्या चित्रकलेचे बाड घेऊन वॉल्टरने हॉलिवूडमध्ये प्रवेश केला तो दिग्दर्शनाची संधी मिळावी म्हणून. परंतु हेही स्वप्न सत्यात उतरले नाही. जेथून तेथून नकार मिळाल्यावर एका गराजमध्ये त्याने आपला स्टुडिओ थाटला आणि कार्टून्सच्या निर्मितीला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता एक दिवस वॉल्टरच्या आल्टर इगोचा "मिकी माऊस"चा जन्म झाला. उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक, कार्टूनिस्ट, पटकथा लेखक, व्यावसायिक आणि मानवतावादी म्हणून जगाला वॉल्टरची, वॉल्ट डिस्नींची ओळख आहे पण त्यांच्यातल्या स्वप्नाळू, निरागस मुलाची ओळख पटते ती त्यांनी निर्माण केलेल्या डिस्नीलॅंड, डिस्नीवर्ल्डसारख्या प्रचंड स्वप्ननगरांना भेट दिल्यावर. स्लीपिंग ब्युटी, अल्लाउद्दीन, सिंड्रेलासारख्या ज्या परीकथांत रममाण होऊन आपण आपले बालपण पोसले त्या परीकथेतील पात्रे खरी होऊन आपल्यात वावरू लागणे आणि आपल्याला त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणे यांत असणारा अनोखा आनंद, गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात ओरलॅंडोच्या ३०,००० एकर जमिनीवर वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टला भेट दिल्यावर आम्हाला मिळाला. करमणूकीचे DSC00340आणि विसाव्याचे जगातील सर्वात मोठे ठिकाण म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट प्रसिद्ध आहे. या स्थळाचे विशेष म्हणजे,लहानमोठ्यांना जादूनगरीची सफर घडवणारे मॅजिक किंगडम, चित्रपटातील भूलभुलैया आणि करामतींची ओळख करून देणारा एमजीएम स्टुडियो, आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची ओळख करून देणारे एपकॉट, ५०० एकर जमिनीवर वसलेले प्राणी उद्यान, ऍनिमल किंगडम ही चार प्रमुख थीम पार्क्स, दोन वॉटर पार्क्स, गोल्फची मैदाने, क्रीडासंकुल, मोटारींचा रेसकोर्स, डाऊनटाऊन डिस्नी आणि त्यालगत असणारी अनेक आकर्षणे, राहण्याचे सुमारे २० प्रचंड रिसॉर्टस आणि असंख्य खरेदीची ठिकाणे आणि उपाहारगृहे यांनी हा परिसर नटलेला आहे.मानवनिर्मित आकर्षणांत अमेरिकेतील एक सर्वोत्तम स्थळ म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे नाव घेता येईल. या पर्यटनस्थळाला भेट देऊ इच्छिणार्‍या पर्यटकांना, सहल ठरवण्यासाठी उपयुक्त होईल अशी माहिती या लेखाद्वारे येथे संकलित करण्याचा मानस ठेवून आहे.

वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टची सहल कशी ठरवावी?

सहल ठरवण्याच्या ४ ते ६ महिने आधी डील्स तपासावीत. ही डील्स वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या संकेतस्थळावर तसेच अनेक पर्यटन उद्योगांच्या संकेतस्थळांवर मिळतात. तेथून तुम्हाला विमानाची तिकिटे, राहण्याचे हॉटेल आणि पार्कची तिकिटे यांची सोय करता येते. याखेरीज अनेक इतर पर्यटन व्यावसायिकांमार्फतही या सहलीचे आयोजन करता येईल.उन्हाळ्यात फ्लोरिडाचे तापमान सुमारे ३५-४० डि. से.च्या आसपास असल्याने वसंत किंवा शरद ऋतूत ही सहल आखणे उत्तम. DSC00529तसे हे स्थळ बाराही महिने पर्यटकांनी फुललेले असते आणि अत्युच्च गर्दीचा काळ रिसॉर्टच्या संकेतस्थळावर दिलेला असतो, तोही सहल ठरवण्यासाठी उपयोगी पडावा. उन्हाळ्याच्या दिवसांत सनक्रीन चोपडणे आणि पावसाची शक्यता असल्यास पाठीवरील बॅकपॅकमध्ये पातळ रेनकोट घेणे बरे पडते. आम्ही दोन वेळा मॅजिक किंगडमला भेट दिली असता, दोन्ही दिवशी तास-दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि रेनकोट घालून सर्व आकर्षणांची मजा लुटावी लागली.डिस्नी वर्ल्डमधील सर्व पार्क्स आरामशीरपणे बघायची झाली तर सुमारे ५-६ दिवसांची सहल योजावी लागते. पर्यटकांनी कमीतकमी ४ दिवस तरी या सहलीसाठी राखून ठेवावेत. त्यापेक्षा कमी दिवसांत ही सहल अतिशय दगदगीची होते. या पार्कांत येणार्‍या प्रचंड गर्दींमुळे प्रत्येक आकर्षण पाहण्यास १ तासाहून अधिक काळही लागू शकतो. यावर उपाय म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट "पार्क हॉपर" पासेस मिळतात. ४ दिवसांच्या वर राहणार्‍यांनाच थोडे अधिक डॉलर्स भरून या पासांचा फायदा होतो. हे पास घेऊन कोणत्याही पार्कात कधीही प्रवेश करता येतो किंवा एकाच पार्कात वेगवेगळ्या दिवशी प्रवेश करता येतो. तसेच येथे काही पार्कांत "फास्टपासेस" मिळतात. फास्टपासमुळे एखाद्या आकर्षणासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याचे कष्ट वाचतात. हे पास फुकट मिळतात व ते घेतले की हव्या असणार्‍या आकर्षणांसाठी आपल्याला हव्या त्या वेळी आपला क्रमांक राखून ठेवता येतो.

कोठे राहावे?

डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या परिसरात राहणे कधीही उत्तम. येथे असणार्‍या अनेक रिसॉर्ट हॉटेल्समध्ये सामान्यांपासून श्रीमंतांना आवडेल अशा सर्व प्रकारे राहण्याची सोय होते. प्रत्येक रिसॉर्ट हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी फास्टफूड आणि इतर रेस्टॉरंट्स आहेत, एक दोन लहान किराणा दुकाने, स्विमिंग पूल इ. सारख्या सोयींनी ही हॉटेल्स सुसज्ज आहेत. या रिसॉर्ट हॉटेल्समध्ये राहण्याचा दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक पार्काला जाणारी बस हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी येते आणि कार नेणे, ती पार्क करणे, तेथून पार्क गाठणे हे सर्व कष्ट वाचतात. विमानाने प्रवास न करता जर कार घेऊन ओरलॅंडोला जाण्याचा विचार असेल तरीही ही कार हॉटेलच्या आवारात पार्क करून बसने ये-जा करणेच सोयिस्कर ठरते.

काय पाहावे आणि करावे?

या स्वप्ननगरीतील सर्वच आकर्षणे लाजवाब आहेत. प्रत्येक पार्कातील फिरती चक्रे, झुले, झोपाळे, रोलर कोस्टर्स आणि चतुर्मितीतील सर्व नाटके किंवा चित्रपट यांची वर्णने शब्दांत करण्यासारखी नाहीत. प्रत्येक आकर्षणात त्याचा वेगळेपणा आणि एक अनोखा थरार जाणवतो.मॅजिक किंगडम पाहण्यासाठी सहसा एक पूर्ण दिवस पुरेसा पडत नाही. त्यामानाने इतर तीन थीम पार्क्स पाहण्यासाठी संपूर्ण दिवस पुरेसा ठरतो असा अनुभव आला. व्यक्तिश: माझी आवड सांगायची झाली तर ऍनिमल DSC00510किंगडमच्या मानाने इतर तीनही पार्क्स अधिक आवडली. सर्वात आवडले ते मॅजिक किंगडम. एपकॉट आणि एमजीएम स्टुडियो ही दोन्ही पार्क्स लहान मुलांना आवडण्याचा संभव कमी परंतु कुमारवयीन मुले आणि मोठे यांच्यासाठी ही दोन्ही पार्क्स म्हणजे खास पर्वणीच आहे. प्रत्येक थीम पार्कमध्ये आवर्जून पाहावेत अशी काही आकर्षणे किंवा कार्यक्रम आहेत ते पुढीलप्रमाणे:

१. मॅजिक किंगडम: येथे दिवसातून दोनदा डिस्नीच्या पात्रांची मिरवणूक निघते. एकदा दुपारी आणि एकदा रात्री. या दोन्ही मिरवणुका पाहण्याजोग्या आहेत. रात्रीची विशेष. बरेचदा संपूर्ण दिवस या पार्कात घालवून थकवा जाणवल्याने अनेकजण रात्रीच्या या मिरवणुकीसाठी थांबत नाहीत असे दिसते परंतु ही मिरवणूक, रात्रीच्या अंधारात सिंड्रेलाच्या राजवाड्यावर होणारे प्रकाशाचे खेळ आणि फटाक्यांची आतषबाजी अप्रतिम दिसते.

२. एमजीएम स्टुडियो: येथे दाखवले जाणारे सर्व करामतींचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. दर रात्री येथे फॅंटास्मिक नावाचा लेझर शो होतो. यांतही अनेक डिस्नी कथांतील किंवा चित्रपटांतील प्रसंग दाखवले जातात. अप्रतिम प्रकाशयोजना आणि रंगसंगती, संगीतावर नाचणारी पाण्याची कारंजी आणि मन सुखावणारी डिस्नी पात्रे यांच्या संगमाने सादर होणारा हा कार्यक्रम जगातील एक अत्युच्च दर्जाचा कार्यक्रम ठरावा.

३. एपकॉट: येथेही रात्री "रिफ्लेक्शन ऑफ द अर्थ" हा प्रकाश-रंगांचा आणि फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. नेहमी फटाक्यांची आतषबाजी काय पाहायची? त्यात वेगळेपणा काय असणार? असा विचार करून हा कार्यक्रम पाहण्याचे टाळू नये. प्रकाश आणि रंगसंगतीने अतिशय लोभसवाणा दिसणारा आणि धगधगणार्‍या अग्नीने मनाला भुरळ पाडणारा हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा आहे.

४. ऍनिमल किंगडम: लायन किंग या डिस्नीपटातील सुप्रसिद्ध गाणी, सिम्बा आणि त्याची मित्रमंडळी आणि चित्रविचित्र पोशाखातील कलावंत यांनी सजलेला नृत्य-गायन आणि कसरतींचा हा कार्यक्रम आवर्जून पाहण्याजोगा आहे.

आसपास पाहण्यासारखी ठिकाणे:

डिस्नी वर्ल्डच्या परिसरात ही महत्त्वाची उद्याने सोडून पाहण्यासारखी दोन प्रमुख ठिकाणे आहेत.


डाऊनटाऊन डिस्नी: या परिसरात चांगली रेस्टॉरंट्स, फास्टफूड उपाहारगृहे, खरेदी करण्यासाठी प्रशस्त दुकाने आहेत. येथे गायन-नृत्य-संगीताचे कार्यक्रम होतात. सुप्रसिद्ध सूर्य-सर्कस (Cirque du Soleil ) येथे पाहता येते. संध्याकाळच्या वेळेस खरेदी करता करता, बाजारातून फेरफटका मारण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

प्लेजर आयलंड: सळसळत्या तारुण्याचा जोश व्यक्त करण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे. पश्चात्य संगीताचे निरनिराळे प्रकार येथे अनुभवायला मिळतील. संगीत-गायन आणि त्यावर थिरकणारी पावले यांच्या आनंदात प्लेजर आयलंडला नित्य दिवाळी असते.

बिल्झर्ड बीच आणि टायफून लगून : ही दोन जलोद्याने (वॉटर पार्क्स) डिस्नी परिसरात आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत बाहर राहून तापलेले अंग थंड करून पाण्यात डुंबण्याकरता आणि मन चिंब करण्याकरता ही दोन्ही पार्क्स उत्तम आहेत.डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या बाहेर ओरलॅंडोला पाहण्यासारखी इतर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यातील दोन प्रमुख स्थळांबद्दल येथे लिहावेसे वाटते.

युनिवर्सल पार्क्स: येथे दोन पार्क्स आहेत: युनिवर्सल स्टुडिओ आणि युनिवर्सल आयलंड्स ऑफ ऍडवेंचर हे थीम पार्क. ही दोन्ही पार्क्स पाहण्यासारखी असली तरी डिस्नीसोबत यांचीही वारी करणे अतिशय दगदगीचे ठरते. इच्छुकांनी हे लक्षात घेऊनच सहल आखावी किंवा युनिवर्सल सहलीची स्वतंत्र आखणी करावी.DSC00593

सीवर्ल्ड, ओरलॅंडो: प्रचंड आकाराचे किलर व्हेल्स, पाण्यात सूर मारणारे डॉल्फिन्स, माणसांच्या आज्ञा लीलया पाळणारे चतुर सील, गरीब स्वभावाचे परंतु भीतिदायक दिसणारे प्रचंड वॉलरस, उरात धडकी भरवणारे शार्क्स आणि असे अनेक सागरी जीव या उद्यानात पाहण्यास मिळतात. शामू या किलर व्हेलचे, सील आणि डॉल्फिन यांचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. डिस्नी वर्ल्डची सफर करणार्‍या पर्यटकांनी या उद्यानाला भेट देणे चुकवू नये. हे पार्क एका दिवसात पाहून होते."ट्रिपल ए"चे सदस्यत्व असल्यास या पार्काची तिकिटे स्वस्तात मिळतात.फ्लोरिडा राज्यात ओरलॅंडो शहराबाहेर पाहण्यासारखीही इतर अनेक स्थळे आहेत यात ओरलॅंडोपासून सुमारे चार तासांवर असणारे मायामीचे समुद्र किनारे, सुमारे दोन तासांवर असणारे टॅम्पाचे समुद्र किनारे विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच बुश गार्डन्स (Busch Gardens) आणि किसिमी येथील थीम पार्क्स पाहण्यासारखी आहेत.


---

डिस्नीनगरीबद्दल एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे येथील सेवादात्यांकडून आणि सेवकवर्गाकडून पर्यटकांना मिळणारी वागणूक. लाखोंच्या गर्दीला सांभाळून हसतमुखपणे आणि अदबीने पर्यटकांच्या प्रत्येक प्रश्नाला, शंकांना सविस्तर उत्तरे देणारा, त्यांना तत्परतेने मदत करणारा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणारा डिस्नीचा कर्मचारीवर्ग प्रत्येक पर्यटकाला राजपुत्र नाहीतर राजकन्या असल्याचे सतत जाणवून देतो. वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे उद्घाटन १९७१ साली करण्यात आले - वॉल्ट डिस्नी यांच्या मृत्यूच्या सुमारे ५ वर्षांनंतर! संपूर्ण दुनियेला स्वप्न विकणारा हा मनुष्य त्याने स्वत: स्वप्नात पाहिलेली जादूनगरी सत्यात उतरताना पाहण्यास हयात नव्हता. परंतु लहान-मोठे, तरुण-म्हातारे सर्वांना वेड लावेल अशा स्वप्ननगरीच्या निर्मितीतून त्यांनी आपले नाव चिरंतन केले. लहानांना वेड लावणार्‍या आणि मोठ्यांच्या हृदयात दडलेल्या बालकाला पुनश्च उभारी देणार्‍या या जादूमय स्वप्ननगरीत वर्षातील ३६५ दिवस दिवाळी असते. आपल्या कुटुंबासमवेत दिवाळीतील आनंदाचे क्षण प्रकाश, रोषणाई, फटाके यांच्या सोबतीने या स्वप्ननगरीत काढायची संधी पर्यटकांना लवकरच चालून येवो ही दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा!

लेखातील काही चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. चित्रांवर टिचकी मारली असता ती मोठी करून पाहता येतील.


Disney_fireworks2[1]


(पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००७)

Friday, July 11, 2008

गबाळ्या

लेखनप्रकार: (किंचित) भयकथा

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत आज पहिल्यांदाच सर्वांची भेट होत होती. पहिली घंटा अद्याप झाली नसल्याने दमदार दंगामस्ती सुरु होती. घंटा झाली तशी सर्वजण झपकन आपल्या बाकांपाशी परतले. 'सातवीचा वर्ग म्हणजे सकाळच्या शाळेतला शेवटचा वर्ग . पुढल्या वर्षीपासून म्हणजे आठवीत गेल्यावर शाळा दुपारी भरणार, पण सातवी म्हणजे ४ ते ६ वीच्या वर्गांचे दादा. यावर्षी बाकीची पोरं आपल्याला कशी दबून राहायला हवीत. उम्म्म...बाकीची पोरं कशाला वर्गातली पोरंही वचकूनच राहायला हवीत. मुलगी असले म्हणून काय झालं, मुलगे टरकतात, टरकवता आलं पाहिजे. काय?' माझा लाडका शेवटचा बाक पकडताना विचार डोक्यात घोळवत मी गालात हसत होते. या माझ्या अशा हसण्याला आमचे मुख्याध्यापक चिडून "गेल्या जन्मी गौतम बुद्ध होतीस काय?" असं हमखास विचारतात, पण मला असं दुसर्‍यांवर हसायला आवडतं, बुद्धालाही आवडत असावं म्हणूनच तो ही हसायचा, गालातल्या गालात.

या वर्षी आमच्या वर्गशिक्षिका सावंतबाई असणार हे गेल्या आठवड्यात आईला कळलं तेव्हा तिने सुटकेचा मोठ्ठा निश्वास सोडला होता. "बरं झालं बाई! गेल्यावर्षीच्या सातवीच्या वर्गाच्या साठ्येबाई नाहीत यावर्षी ते. भलत्याच कडक आहेत असं ऐकून आहे. सावंतबाई गरीब आहेत, मुलांना त्यांचा त्रास नाही. तू ही बर्‍याबोलाने त्यांच्याशी नीट वाग. मुलांच्या नसतील एवढ्या तुझ्या तक्रारी येतात. केवळ अभ्यासात चांगली असल्याने सुटतेस नेहमी तू. मुलींनी मुलींसारखं वागावं. वर्गातले टवाळ मुलगे दंगा करतात म्हणून तूही त्यांच्याबरोबर फाजीलपणा करावास असं नाही." आईने असा तोंडाचा पट्टा सोडला की कानात कापसाचे बोळे कोंबले आहेत असं समजून मी स्वस्थ राहते. आई बोलते बोलते आणि गप्प बसते. बिच्चारी!!

सावंतबाई वर्गात आल्या तेव्हा बाकांवर बसून सर्वांच्या मस्त टवाळक्या सुरू होत्या. बाई वर्गात कधी आल्या त्याची चाहूलच लागली नाही. बाईंनी डस्टर जोरात टेबलावर आदळला आणि पहिल्याच दिवशी फर्मान काढलं की मुलगे-मुलगे आणि मुली मुलींनी शेजारी बसायचे नाही. प्रत्येक बाकावर एक मुलगा आणि एक मुलगी असं बसायचं म्हणजे वर्गात शांतता राहिल. वर्गातल्या काही काकूबाई हे ऐकून काय हिरमुसल्या झाल्या होत्या... बावळट कुठल्या? मला मुलांशेजारी बसायला आवडतं आणि बहुतेक मुलांनाही मुली बाजूला बसलेल्या आवडतात. तसं ते दाखवत नसले म्हणून काय झालं, मला माहित आहे की त्यांना ते आवडतं. उगीच कुठल्यातरी काकूबाई शेजारी बसून "ए तू माझ्या वहीत डोकावू नकोस" नाहीतर "अय्या! तो राजू बघ कसा चोरून बघतो आहे" अशा बायकी गोष्टी करण्यापेक्षा वर्गातल्या एखाद्या उंचपुर्‍या, थोड्याशा घोगरट आवाजाच्या मुलाशेजारी बसण्यात वेगळीच मजा असते. बाई दोन दिवसांनी जागा ठरवणार होत्या. तोपर्यंत कोणी कोणा शेजारी बसायचं ते ठरलं नव्हतं. माझ्या शेजारची शैला कुरकुरत कुजबुजली "बाई तरी काय? माझ्या आईला सांगितलं की मुलांशेजारी बसायचं आहे तर ती मला ५० गोष्टी सांगत राहणार. नीट बस, फ्रॉक तोकडा तर पडत नाही ना! उगीच अंगाला हात लावायला देऊ नकोस."

"हाहा! माझी आईही असंच सांगणार पण तिला सांगतंय कोण की बाई मुलांशेजारी जागा ठरवणार आहेत म्हणून. उग्गीच नसती कटकट कोण ऐकेल?" मी हसत डोळे मिचकावले.
"ग्रेटच आहेस." शैलाच्या तोंडावर कौतुकाचे भाव होते, "मला तर आईपासून कोणतीच गोष्ट लपवता येत नाही." "मला येते." मी टेचात म्हटलं, "आपण काय कुक्कुलं बाळ आहोत?"

नवं वर्ष, नवा वर्ग, नवा अभ्यास यांत दोन दिवस कधी भुर्रकन उडून गेले कळलंच नाही. तिसर्‍या दिवशी बाई वर्गात आल्या ते एका मुलाला सोबत घेऊन. शैला मला तिच्या वहीत चिकटवलेले इंडियन क्रिकेट टीमचे फोटो दाखवत होती, तिने बाईंना बघून गपकन वही बंद केली. नाराजीने मी डोकं वर केलं. बाईंच्या शेजारी एक उंच, हाडकुळा मुलगा भेदरलेल्या सशासारखा जीव मुठीत घेऊन उभा होता. जसं काही, आम्ही वर्गातली पोरं वाघोबाच होतो आणि एका फटक्यात त्याचा चट्टामट्टा करणार होतो.

"हा बाळकृष्ण गणपुले" सावंतबाईंनी ओळख करून दिली.
"बाळकृष्ण!" तिसर्‍या बाकावरचा अवि फिस्सकन हसला आणि त्याबरोबर सगळा वर्ग हसू लागला. सावंत बाईंचे डोळे मोठे झाले होते. "हसण्यासारखं काय आहे. गप्प बसा. नव्या विद्यार्थ्याचं स्वागत असं करतात का? सातवीतले घोडे झाले तरी अजून अकला आलेल्या नाहीत." बाई आवाज चढवून म्हणाल्या.

"बाळकृष्ण, मा..माझ्या आजोबांचं नाव होतं, मला सगळे बाळ म्हणतात," तो मुलगा रडवेलासा झाला होता. एखाद्या शिशुवर्गातल्या पोरासारखं त्याचं नाक वाहत होतं. त्याने ते शर्टाच्या बाहीला पुसलं. सावंतबाई त्याच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. "असं कर, तू भिंतीकडच्या रांगेत जाऊन शेवटच्या बाकावर बस. मी मुलांना उंचीप्रमाणे बसवते आणि आज सर्वांच्या कायम जागाही ठरवायच्या आहेत. शैला, तू उठून पुढच्या बाकावर बस." बाईंनी एक एक करून जागा ठरवायला सुरूवात केली.

"आ..शैला म्हणजे हे ध्यान माझ्या बाजूला बसणार का काय?" माझ्या डोक्यावर आठ्या पडल्या "हीही! मज्जा आहे बुवा तुझी" शैला कुजबुजली. "हसतेस काय? या ध्यानाला दोन दिवसांत पळवून नाही लावलं तर विचार. बाई तरी काय? मीच दिसले वाटतं सगळ्या वर्गात. त्या कर्णिक काकू शेजारी बसवायचं होतं की, जोडी अगदी जमली असती."

"बरं बरं! दाखव तू त्याला पळवून." शैलाने दप्तर उचललं आणि वह्या, पुस्तकं गोळा केली आणि ती पुढच्या बाकावर जाऊन बसली.

बाळकृष्ण बाका शेजारी येऊन उभा होता. मी त्याच्याकडे मान वळवून पाहिलंही नाही. शेवटी तोच बिचकत बिचकत म्हणाला "ए तू सरक ना, मला बसायला जागा दे ना."

एखाद्या झुरळाकडे तुच्छतेने पहावं तसं मी त्याच्याकडे पाहिलं आणि उठून उभी राहिले. "भींतीकडे तू बसायचंस."

"मी..मी नाही बसणार भींतीजवळ. मला नाही बसायचं तिथे" केविलवाण्या आवाजात तक्रार करत त्याने आपलं वाहणारं नाक शर्टाच्या बाहीला पुसलं. बावळट कुठला!

"का रे? ही माझी जागा आहे. मी गेले दोन दिवस इथेच बसते आहे. तू भींतीच्या बाजूला बसायचंस." मी त्याला दमात म्हटलं. त्याची ती बावळटासारखी अवस्था बघून मला चेव चढला होता. नाईलाजाने तो भींतीपाशी बसला. या येड्या ध्यानाची चांगली हजेरी घेऊन कमीतकमी वेळात त्याला इथून कसं फुटवता येईल हाच विचार डोक्यात घोळत होता.

"नाव काय रे तुझं?""सांगितलं ना मघाशी वर्गासमोर," त्याला माझा अरेरावीचा स्वर आवडला नसावा पण हवं कोणाला होतं आवडून घ्यायला?"हो ना! सांगितलंस खरं, काय बरं नाव तुझं," मी त्याला वेडावत विचारलं "हं... गबाळ्या नाही का?""बाळकृष्ण गणपुले." तो हिरमुसला होऊन म्हणाला.

"तेच तर गणपुले बाळ, ग-बाळ...ग-बाळ्या...गबाळ्या. कसं चपखल नाव आहे!! आजपासून मी तुला गबाळ्या म्हणणार." गबाळ्याचा चेहरा लालेलाल झाला होता पण तो काही बोलला नाही. वाहणारं नाक त्याने पुन्हा शर्टाच्या बाहीला पुसलं. हे येडचाप ध्यान बघून मला ढवळून येत होतं. मधली सुट्टी होऊ दे याची थोडी आणखी मरम्मत करायची हे मनाशी ठरवून टाकलं होतं. मधल्या सुट्टीत संपूर्ण वर्गाला बाळकृष्णचे टोपणनाव कळले तशी पोरांनी ठेक्यावर "बाळ्या गबाळ्या" चिडवायला सुरूवात केली. गबाळ्या बिच्चारा घामाघूम झाला होता. ओक्साबोक्शी रडला असता तर आमची खैर नव्हती. मधल्या सुट्टीनंतर मोरे सरांचा गणिताचा तास होता. त्यांना हा चिडवाचिडवीचा प्रकार कळला असता तर आमची रवानगी वर्गाबाहेर होणार होती. आमच्या सुदैवाने बाळ्याने रडायला सुरुवात केली नाही.

मोरे सर चक्रवाढ व्याज उगीच वाढवून चढवून शिकवत होते. वर्गावर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि बाळ्याची मधल्या सुट्टीत बरीच ताणली होती म्हणून मी त्याला थोडी विश्रांती देण्याचं ठरवलं. सर अगदी तल्लीन होऊन मुद्दल, व्याज, टक्के अशा भक्कम शब्दांचा मारा आमच्यावर करत होते. अचानक काय कोणास ठाऊक ते थांबले आणि माझ्या दिशेने रोखून बघू लागले. माझ्या? नाही माझ्या नाही, गबाळ्याच्या. गबाळ्या तोंडाचा आ वासून भिंतीकडे बघत होता. त्याच्या भित्र्या डोळ्यांत भीती मावत नव्हती.

"गबाळ्या...ए गबाळ्या" मी त्याला कोपराने ढोसलं, "सर बघताहेत. भिंतीकडे काय बघतोस? समोर बघ नाहीतर मार खाशील त्यांचा आता." गबाळ्यावर ढोसण्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. तो भिंतीकडे बघत होता आणि आता त्या आ वासलेल्या तोंडातून लाळही बाहेर आलेली दिसत होती. भयंकर किळस वाटत होती या ध्यानाची. पाठीत एक धपाटा देण्याचा मोह अनावर होत होता पण ते बरं दिसलं नसतं.

"भिंतीवर काय सोनं लागलंय रे? नाव काय गं याचं?" सरांचा करडा आवाज कानावर पडला."गबाळ्या" कोणीतरी किनर्‍या आवाजात चिरकलं तशी सगळे फिदीफिदी हसू लागले.
"गणपुले" हसू आवरत मी साळसूद उत्तर दिलं.
"ए गणपुल्या! काय विचारतोय मी? भिंतीवर काय आहे?"
"प..प..पाल सर. भिंतीवर पाल आहे." छताशी एक भली दांडगी पाल चिकटली होती.
"अरे गधड्या, पाल भिंतीवरच असणार." सरांनी त्यांचे लाडके शब्द वापरायला सुरूवात केली.
"मला भीती वाटते सर. ती बघा कशी डोळे वटारून बघते आहे माझ्याकडे," गबाळ्या काकुळतीला येऊन म्हणाला.

"पाल काय खाणार आहे का तुला?" मी त्याला ऐकू जाईल अशा आवाजात कुजबुजले.
"त...तिचे डोळे बघ. लाल लाल..बाहेर आलेले...आणि ती जीभ बघ कशी लपकन बाहेर येते. मला खूप भीती वाटते."
"आणि मला तुझी किव वाटते गबाळ्या, भेकड कुठला" मी दटावणीच्या सुरात म्हटले. एवढीशी तर पाल, तिची कसली भीती; पण गबाळ्या थरथरा कापत होता. चाललेलं नाटक कमी होतं का काय म्हणून ती पाल सर्रकन जागची सरकली तसा गबाळ्या विजेचा करंट लागल्यागत उठला आणि गळा काढून रडायला लागला. मोरेसरांना दया आली असावी किंवा या घोड्याला रडताना पाहून काय करावं ते सुचलं नसावं. त्यांनी मला भींतीकडे सरकायला लावून माझ्या जागेवर गबाळ्याला बसवलं.

"ए रडू नको रे! आजच्या पुरती बसते आहे, उद्या चूपचाप भिंतीकडे बसायचं. आज पाल दिसली म्हणून घाबरतोस. उद्या झुरळ नाहीतर उंदीर दिसला म्हणून घाबरशील."
गबाळ्याने खाली डोकं घालून डोळे पुसले आणि मान हलवली.
"तुला नाही भीती वाटत पालीची? मुली तर किती भित्र्या असतात." त्याने घाबर्‍या आवाजात विचारलं.
"हो क्का! मग तू पण मुलगीच असशील." मी त्याला चिडवत म्हटलं, "मला नाही वाटत भीती कोणाची. भित्रीभागुबाई कुठचा!" गबाळ्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं.

शाळा सुटली तशी सर्वांनी वर्गाच्या दाराकडे धावायला सुरूवात केली. राजूने दप्तराचे बक्कल बांधणार्‍या गबाळ्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हटलं, "ए ती बघ पाल येत्ये तुझ्या दिशेने."
"कुठे..कुठे?" गबाळ्या बावळटासारखा भिंती शोधायला लागला आणि त्या धांदलीत त्याचे दप्तर धपकन खाली पडलं. सगळे त्याला हसत होते आणि हे बावळट ध्यान माना वळवून भिंती शोधण्यात गुंतलं होतं.

गबाळ्याला शेजारून हलवायचं असेल तर ही युक्ती खाशी आहे...."पाल".. पण पाल मिळवायची कशी?

***
घरी गेल्यावर आईने पुढ्यात गरमागरम पोहे ठेवले. इतर वेळेस वाफाळणारे पोहे पाहिले की पोटात नुसता डोंब उसळतो पण आज मी उगीच चमच्याने पोहे चिवडत बसले होते. एकच विचार डोक्यात पिंगा घालत होता... 'पाल मिळवायची कशी?'

"अगं काय विचारते आहे? लक्ष कुठे आहे? बाजारात येतेस का? सामान उचलायला मदत हवी आहे." आई वैतागून विचारत होती.

"अं..हम्म, येते." तसंही करण्यासारखं दुसरं फारसं काही नव्हतं. बाजार तर बाजार. या आयांना पन्नास भाज्या बघून भाव करून घेण्याची काय गरज असते कोण जाणे बा! त्या भाज्या खायला मी आणि बाबा नेहमी कुरकुरत असतो पण हीचं आपलं मेथी, मुळा, माठ चाललेलं असतं... माठ! गबाळ्या काही आज डोक्यातून हलायला तयार नव्हता. त्याची जागा बदललायलाच हवी. शेवटी, आपली पण काही वट आहे...शैलाला शब्द दिला आहे...दोन दिवस पण तेवढंही थांबता कामा नये!

आईने भाजीच्या पिशव्या हातात कोंबल्या आणि आमची स्वारी घराच्या दिशेने जाऊ लागली. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडे काही घ्यायचं नाही अशी आईची सक्त ताकीद असते पण त्यांच्या टोपल्यांत डोकावून बघायचं नाही असं थोडंच आहे. बांगड्या, चपला, पाकिटं काहीही विकत असतात हे पथारी पसरून. एका टोपलीपाशी मी जरा जास्तच रेंगाळले तशी आईने हाक दिली, "अगं चल ना, मागे काय राहिलीस?"

"ए आई, इथे ये ना. मला ती पाल हवी." रस्त्यावर एक फेरीवाला रबरी पाली, सरडे, साप, विंचू विकायला बसला होता.
"ईईईई! पाल कशाला हवी? काहीतरी भलतंच... चल चूपचाप."
"अगं साठ्येबाईंनी मागितली होती. विज्ञानाच्या तासाला." साठ्येबाईंचं नाव काढलं का आई पुढचं काही विचारत नाही हे माहित होतं. तिने भाव करून पैसे दिले आणि मी रबरी पाल हातात गच्च धरली.

दुसर्‍या दिवशी गबाळ्या भिंतीकडे बसायला कां कू करत होता पण मी ऐकूनच घेतलं नाही तसा गपगुमान बसला. संपूर्ण दिवस दप्तराचा एक बंध त्याने हातात घट्ट पकडला होता. जसं काय पाल दिसली की हा दप्तर घेऊन तिथून धूम ठोकणार होता. ती रबरी पाल मी माझ्या पिनोफ्रॉकच्या खिशात टाकली होती. संधी मिळेल तशी ती गबाळ्याच्या अंगावर टाकायची होती पण संधी काही मिळत नव्हती.
साठ्येबाईंचे दोन सलग तास होते. त्यावेळेला काही गडबड झालेली त्यांच्या लक्षात आली असती तर माझी खैर नव्हती. नंतरचे दोन तास पीटीचे होते. त्यावेळी सगळे मुलगे गबाळ्याला चिडवत होतेच आणि तो हिरमुसला होऊन दूर एकटाच उभा होता. तेव्हा काही केलं असतं तर सगळ्यांच्या नजरेत आलं असतं. दिवसभर शोधूनही संधी सापडली नाही. तरी मी त्याला अध्ये-मध्ये कानपिचक्या दिल्या होत्या, 'सांभाळून रहा हो, शाळेत भल्या मोठ्या पाली फिरत असतात,' पण गबाळ्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं. तो मान फिरवून गप्प बसला.

शाळा सुटली तशी वर्गाच्या दाराशी सर्वांनी एकच गल्ला केला. इतर वर्गांतूनही मुलं मुख्य दाराकडे पळत होती. गबाळ्या आपलं दप्तर सांभाळत, आपला अर्धवट बाहेर आलेला शर्ट आत खोचत डोकं खाली घालून चालला होता. हीच संधी होती. मी खिशातून पाल बाहेर काढली. गबाळ्या धक्के खात शाळेच्या मुख्य दरवाजाशी चालला होता. मी पुढे सरून चटकन पाल त्याच्या दप्तरावर कधी टाकली ते कोणाच्या लक्षातच आले नाही. जो तो आपापल्या गडबडीत होता पण कोणीतरी चित्कारले "ईईई! पा‍ल, गबाळ्याच्या पाठीवर पाल!" क्षणार्धात सर्वजण गबाळ्यापासून दूर सरकले. "कुठे कुठे?" गबाळ्या कावराबावरा होऊन तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

"तुझ्या पाठीवर...ईईई... तिची शेपटी बघ कशी वळवत्ये" कोणीतरी किंचाळलं आणि काय झालं कळण्यापूर्वी गबाळ्या अंगात वारं भरल्यागत सुसाट शाळेच्या दरवाजातून बाहेर धावला. आपल्या आजूबाजूला मुलं आहेत, शिक्षक आहेत याचा त्याला विसर पडला असावा. वाटेत येणार्‍या-जाणार्‍यांना धडक देऊन अंगात वारं भरल्यागत तो रस्त्यापर्यंत कधी पोहोचला ते कोणाला कळलंच नाही आणि समोरून वेगात ट्रक येत होता हे गबाळ्याला कळलं नाही.

***

पुढचे दोन दिवस शाळेला सुट्टी होती. पंचनामा, साक्षी, पोलीसी कार्यवाही या दिवसांत उरकून टाकण्यात आले. खरं सांगायचं तर माझं धाबं दणाणलं होतं. 'ती पाल कोणाला सापडली तर? कोणी मला ती पाल गबाळ्याच्या पाठीवर टाकताना पाहिलं असलं तर?' दोन दिवस मला धड अन्नपाणी गेलं नव्हतं. दाराची घंटी वाजली की कापरं भरल्यागत वाटत होतं. आई-बाबा बोलताना शाळेबद्दल बोलत असावेत काय असं वाटून कान टवकारले जात होते. पण काहीच घडलं नाही. माझी अस्वस्थता आईला जाणवत होती. रात्री तिने जवळ घेऊन सांगितलं की 'विचार करू नकोस. जे झालं ते विसरायचा प्रयत्न कर. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. देवाची कृपा!' तिला काहीच कल्पना नव्हती. माझ्या वर्गातल्या कोण्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला असंच तिला वाटत होतं.

दोन दिवसांनी मी दबकतच वर्गात शिरले. शाळेत काय होईल या भीतीने छाती धडधडत होती. सावंत बाई वर्गाच्या दाराशीच उभ्या होत्या. मला पाहून त्यांनी मला पोटाशी धरलं आणि स्वत:शीच बोलल्यागत म्हणाल्या, "तुला धक्का बसला असेल गं बाळा. बाजूला बसायचा बाळकृष्ण तुझ्या. असा पालीला घाबरून जिवाची पर्वा न करता रस्त्यावर धाव घेईल असं कसं कोणाला वाटावं? गरीब होता बिचारा, नशीब त्याचं. तू मनाला लावून घेऊ नकोस हो. धीराने घे." त्यांच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं. मी माझे डोळे गपकन बंद केले. गबाळ्याला असं मरण यावं याबद्दल गेले दोन दिवस थोडं वाईट वाटलं होतं. मी त्याचं काही बरं-वाईट व्हावं म्हणून पाल टाकली नव्हती. बाई म्हणाल्या ते खरंच 'ते त्याचं नशीब.' माझं नशीब मात्र चांगलं बलवत्तर होतं. कोणाला काही कळलं नव्हतं, जाणवलं नव्हतं! मी गबाळ्याच्या पाठीवर ती पाल टाकली हे कोणाला दिसलंच नव्हतं. ती पालही गर्दीत कुठे गेली ते कोणाला कळलं नसावं. मला हायसं वाटलं. दोन दिवस डोक्यात विचारांची गर्दी झाली होती ती पांगल्यासारखी वाटली. दोन दिवसांत पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. सारं कसं शांत शांत होतं. गबाळ्यापासून सुटका झाली होती. आता कोणतीही टोचणी नव्हती. बाईंनी माझ्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला.

"जा! आज तुझ्याबाजूला शैला बसेल. तुम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी आहात. तुला बरं वाटेल तेवढंच." मी गबाळ्याच्या शेजारी बसत होते म्हणून मला धक्का-बिक्का बसला असावा असं बाईंना वाटलं असावं. माझ्या चेहर्‍यावर उमटणारी स्मितरेषा मी दाबून धरली. आज सगळं शांत आहे. इतक्यात नको, हे आवडतं बुद्धासारखं स्मितही नको. सर्वांना वाटत असेल की मला धक्का बसला आहे तर तसंच असू दे, पथ्यावर पडलं.

सावंतबाईंचा तास संपला तशी शैला मला म्हणाली, "वाईट झालं नै. बाळचं असं काही व्हायला नको होतं."
मी थोडीशी चुळबूळ केली आणि "हं" म्हणून गप्प बसले.
"तुला नाही वाईट वाटलं?"
"वाईट काय वाटायचं? रोज हजारो लोक अपघातात मरतात. सर्वांचं वाईट वाटून घ्यायचं का?" मी तुसडेपणाने उत्तर दिलं. गबाळ्याचा विषय मला नको होता. माझ्यासाठी गबाळ्या आणि त्याचा विषय दोन्ही संपले होते आणि माझ्या मनातली भीतीही संपली होती. बिचकत, दचकत, टरकत राहायला मी काय गबाळ्या थोडीच होते? सर्वकाही ठीक होणार होतं, दोनचार दिवसांत वातावरण निवळणार होतं.

साठ्येबाईंचा तास सुरु झाला. साठ्येबाईंच्या तासाला वर्गात तशीही शांतताच असे. आज तर अगदी सुतकी वातावरण होतं. सगळी पोरं कशी निमूट पुस्तकांत माना घालून बसली होती. साठ्येबाईही आज कधी नव्हे ते नरमाईने बोलत होत्या. माझं लक्ष सहजच भिंतीकडे गेलं....

शैला मला ढोसत होती, "काय झालं? आ वासून काय बघते आहेस खुळ्यासारखी? अगं तोंड बंद कर. किती बावळट दिसते आहेस...बाई बघतील." तिचा आवाज माझ्या कानाशी रेंगाळून परत जात होता. "बाई! ही बघा कसं करत्ये. इथे या ना बाई," शैला मला गदागदा हलवत होती. माझे डोळे भिंतीवर खिळले होते, त्यांत भीती मावत नव्हती. तिच्या हलवण्याचा, ओरडण्याचा माझ्यावर कसलाही परिणाम होत नव्हता. माझ्या सर्वांगाला कापरं भरलं होतं. अंग घामाने निथळत होतं.

भिंतीच्या छताला गबाळ्या पालीसारखा चिकटला होता. त्याचे ते बटबटीत डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि जीभ मध्येच लपकन माझ्या दिशेने बाहेर येत होती.

****

Sunday, July 06, 2008

आम्ही जेव्हा पिंजर्‍यातील प्राणी बनतो!

प्रवासातील संकटे आणि आमचा घनिष्ठ संबंध कधीपासून सुरू झाला असावा याबाबत खात्रीलायक असं सांगता येत नाही पण तसा संबंध आहे हे निश्चित. वादळं तर आमच्या जणू पाचवीला पुजलेली. वाळूची वादळे, टोरनॅडो, गारपीट, ट्रॉपिकल स्टॉर्म, मुंबईतील २००५चा वादळी पाऊस सर्वकाही आमच्या प्रवासादरम्यान हमखास घडून यायलाच हवे.

उत्तर अमेरिकेत हिंडण्याफिरण्याचे महिने तीन. जून ते ऑगस्ट. या महिन्यांखेरिज फिरायचे झाले तर पार दक्षिणेला जावे लागते किंवा स्वेटर्स, हातमोजे, बूट यासर्वांचे जड ओझे बाळगत फिरावं लागतं. तर काही दिवसांपूर्वी यावर्षी फिरायला कुठे जायचे हे ठरवायला बसलो होतो -

“न्यूयॉर्कला जाऊया.” इति नवरा.
“हम्म चालेल,” इति कन्यका.
आता दोघांचे एकमत झाले तर तिसर्‍याने पाय ओढावे असा आमच्या घरातील रिवाज असल्याने -“चालेल पण किती माणसं त्या शहरात? इतकी माणसं बघायची म्हणजे वैताग. गर्दी, गजबजाट, चांव-चांव, काव-काव. नको रे बाबा! "माझा नाराजीचा सूर. "इतकं लांब ड्रायविंग करून गर्दी बघायला काय जायचं? त्यापेक्षा जवळपास जाऊ. दरवर्षीचे गोंधळ गडबड, थीमपार्क्स, ऍट्रॅक्शन्स टाळून यावर्षी फक्त आराम करू. ”

मिडवेस्टात राहणारी माणसं माणूसघाणी असतात का असा प्रश्न एखाद्याला पडला असेल तर खरेखुरे उत्तर येथे मिळून जावे. खरंतर, माणसांपासून दूर जाऊन आराम करायचा झाला तर मिडवेस्टासारखी दुसरी जागा नाही पण पिकतं तिथे विकत नाही म्हणतात.

“मग कुठे जाणार? माणसंच नको असतील तर जंगलात जाऊन राहूया?" कन्यकेने फुरंगटून म्हटले.
“ऍबसोल्युटली!! जंगलातच जाऊ.”
“डन! जंगलातच जाऊया," नवर्‍यानेही आनंदाने म्हटले.

जंगलात जाऊन राहणे म्हणजे एखाद्या नॅशनल पार्कात जाऊन तंबू ठोकणे पण तेवढे कष्टही आपण यावर्षी घ्यायचे नाहीत यावर शिक्कामोर्तब झाल्याने तो बेत बारगळला. शेवटी, ग्रेट स्मोकी माउंटन्सच्या परिसरात वुडन कॅबिनमध्ये राहायचे ठरवले. कामाच्या अतिव्यग्रतेमुळे दोघांकडूनही शेवटच्या क्षणापर्यंत बुकिंग करायचे या ना त्या कारणाने राहून गेले. आयत्यावेळेस बुकिंग करायचे झाले तर हवी तशी कॅबिन मिळेलच असे नाही पण सुदैवाने आम्हाला बर्‍यापैकी कॅबिन मिळून गेली. आणि हो, या सुट्टीच्या दिवसांत वादळांची शक्यता नाही याची वारंवार खात्री आम्ही करून घेतली.

आठवड्याभराचे किराणा सामान, कपडे, फोल्डींग खुर्च्या, खेळ, डिव्हीडी, सीडीज आणि जे हाताला मिळेल ते सर्व पॅक करून आम्ही ४०० मैलाचा प्रवास करून एकदाचे गॅटलिनबर्ग परिसरात पोहोचलो. तिथून कॅबिनचा नकाशा घेऊन डोंगराच्या वाटेला लागलो. या डोंगरातल्या वुडन कॅबिनपर्यंत पोहोचायचे म्हणजे एक दिव्य असते. अरुंद आणि निमुळते घाटातील रस्ते, अचानक येणारे उतार आणि चढण, खोल दरी, रस्त्यांवर दिव्यांचा पत्ता नसणे, समोरून आपल्याला धडकायलाच येत आहे अशा आविर्भावात अचानक येणारी गाडी इ. पार करता करता आमच्या लक्षात आले की आमची कॅबिन डोंगराच्या माथ्यावरील शेवटची कॅबिन आहे. DSC01891

कॅबिन मात्र अतिशय सुरेख होती. टापटिप, स्वच्छ, आरामशीर आणि उबदार. उबदार कारण स्मोकीच्या माथ्यावर भर उन्हाळ्यातही कुडकुडायला होते. कॅबिनमधून स्मोकीच्या शिखराचे अप्रतिम दर्शन होत होते तर डेकच्या खाली घळ दिसत होती. कॅबिनच्या मागून रानात उतरण्यासाठी वाट दिसत होती. स्थिरस्थावर झाल्यावर दोन गोष्टी आमच्या लक्षात आल्या. डेकवरच्या जकुझीचे कव्हर अडकून बसले होते आणि टिव्ही चालत नव्हता. एव्हाना संध्याकाळचे साडेसहा झाले असावेत. आम्ही ऑफिसात फोन करून आमची अडचण कळवली तशी रिसेप्शनिस्टने १५-२० मि. मेन्टेनन्सचा मनुष्य येऊन जाईल याची खात्री दिली.

सांगितल्याप्रमाणे १५-२० मिनिटांत मेन्टेनन्सचा मनुष्य हजर झाला. त्याने हॉट टबचे झाकण काढून दिले आणि टिव्ही प्रोग्रॅम करून दिला. वर, आता आलोच आहे तर तुम्हाला बाकीचे सर्व कंट्रोल्स बघून घेतो आणि तुम्हालाही दाखवतो असं म्हणून त्याने सर्व काही व्यवस्थित करून दिले. निघताना त्याला काय वाटले कोणास ठाऊक पण तो थबकला आणि म्हणाला -

“या कॅबिनपाशी हमखास अस्वले येतात. ही मागची बाजू पाहिलीत. सरळ रानात उतरते आणि उतरण्या-चढण्यासाठी चांगली वाट आहे. हा अस्वलांचा रस्ता. मागच्या वेळेस मी येथे आलो असता समोर अस्वल उभे होते. नशीबाने मी गाडीतूनच पाहिले आणि आत बसून राहिलो. तुम्ही सांभाळून असा, संध्याकाळी उन्हं उतरण्याच्या वेळेस अस्वलं इथे हमखास दिसल्याचे ऐकून आहे.”

“अरे बापरे! मी ती वाट मगाशीच पाहिली होती. तिथून रानात एखादी चक्कर मारता येईल का काय असा विचार करत होते.” मी म्हटलं.

“नाही. ती सुरक्षित वाट नाही, तिच्या वाटेलाही जाऊ नका किंबहुना गाडीतून आणि कॅबिनमधून बाहेर पडताना आजूबाजूला एक नजर टाका. नशीबवान असाल तर अस्वल दिसेलही पण सांभाळून रहा.” असं म्हणून तो निघून गेला.

“काय रे हा माणूस घाबरवून गेला. आता दबकतच बाहेर पडावं लागणार रोज.”
“घाबरवून नाही पण सावध करून गेला. बरंच झालं की.”

त्या रात्री आमच्या स्वागताला पर्जन्यराज नेहमीप्रमाणे हजर झाले. विजांच्या चकचकाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडला. भर जंगलात डोंगरमाथ्यावर रात्रीच्या काळोखात निसर्गाचे विलोभनीय रुद्र रूप आणि अधूनमधून येणारे प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज, घुत्कार आणि चित्कारांत ती रात्र सरली.
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही लॉरेल धबधब्याच्या ट्रेकसाठी जाणार होतो. यापूर्वी स्मोकी माऊंटनच्या भेटीत अवघड ट्रेक्स केले आहेत परंतु यावेळेस आराम करायचा असे ठरल्याने अडिच मैलांचा सोपा ट्रेक निवडला होता. बाहेर स्वच्छ उन पडले होते. सामान गाडीत ठेवायला नवरा पुढे गेला आणि मागाहून आम्ही दरवाजा बंद करून गाडीत बसलो. गाडी सुरू करता करता तो म्हणाला "मी आता गाडीपाशी आलो तेव्हा बाहेर काहीतरी आवाज आल्यासारखा वाटला. मागे वळून पाहिलं तर झाडापाशी एक मांजर उभं होतं.”

“हुश्श! मांजरच ना.” मी निश्वास टाकून म्हटलं.
“हाऊसक्याट की बॉबक्याट? म्हणजे हाऊसक्याट जंगलात काय करत होती?” पोरीने अक्कल पाजळली.
“काळी मांजरी होती म्हणजे बहुधा हाऊसक्याटच.” नवर्‍याने शंकानिरसन केले आणि गाडी सुरू केली.
लॉरेल धबधब्याचा ट्रेक सुरू करण्याच्या ठिकाणी एक मोठा फलक लावला होता.

या भागात अस्वलांनी माणसांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. एखादे अस्वल समोर आले तर त्याला पाठ दाखवून पळू नका. अस्वल जर पाय आपटत तुमच्या दिशेने येऊ लागले तर धोका आहे असे समजून अस्वलाच्या डोळ्यांत बघत एक एक पाऊल मागे सरका. छाव्यांसह फिरणार्‍या अस्वलांच्या माद्या या धोकादायक असून त्या माणसांवर हल्ले करण्याची शक्यता अधिक असते.
DSC00669लॉरेल धबधब्याचा ट्रेक करून आम्ही दुपारी दोन वाजता डोंगर उतरायला सुरूवात केली. एके ठिकाणी ५० एक माणसे जमून खाली वाकून बघत होती. “अस्वल असणार.” मी कुजबुजले.“अस्वलच आहे. तीन छावे आणि त्यांची आई आहे.” ८-१० वर्षांचा एक चुणचुणीत मुलगा खाली वाकून पाहता पाहता म्हणाला.“दाखव कुठे आहे?” आम्ही त्याला म्हटले तशी त्याने आम्हाला अस्वलं दाखवली. आमच्यापासून सुमारे १०० फुटांवर खाली दरीत अस्वलाची मादी आणि तीन छावे मजेत फिरत होती. त्यांना क्यामेरात बंद करायची वरच्या सर्वांची धांदल सुरू होती परंतु त्या घनदाट वृक्षांच्या छायेत मुक्त बागडणार्‍या छाव्यांना कॅमेरात बंद करणे अतिशय जिकिरीचे होते.सगळे दाबतात म्हणून आम्हीही उगीच आमच्या क्यामेराची बटणे खटाखट दाबून टाकली आणि तिथून काढता पाय घेतला. कॅमेरात काहीही टिपता आलेले नाही हे नक्की होते.

तिथून स्मोकीच्या परिसरात फिरत, केड्स कोव्हची गाडीतून सफर करत संध्याकाळी ६च्या सुमारास आम्ही गॅटलिनबर्ग परिसरात परत आलो. रात्रीच्या जेवणाची सोय पहायची होती. जेवण प्याक करून कॅबिनमध्ये जावं असं ठरवून समोरच ऍपल बीज रेस्टॉरंट दिसलं म्हणून तिथून जेवण घेऊन आम्ही कॅबिनच्या वाटेला लागलो. सकाळपासून जंगलात सटर फटर खाल्लं होतं पण व्यवस्थित जेवण पोटात न गेल्याने सर्वांना भूक लागली होती.

सातच्या सुमारास कॅबिनपाशी पोहोचलो तर उन्हं उतरली होती. उंचच उंच झाडांच्या सावल्याही उन्हासोबत जमिनीवर अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. मध्येच एखादी उन्हाची तिरिप अद्याप सूर्यास्त न झाल्याची जाणीव करून देत होती.

“आधी आत जावून जेवूया. नंतर गाडीतलं सामान, कॅमेरे इ. बाहेर काढतो.” “ठीक आहे" असं म्हणून आम्ही दोघी डेकच्या वाटेला लागलो. दरवाजा उघडत असताना मागून नवरा धावतच आला आणि म्हणाला "लवकर आत चला. मागे रानात काहीतरी आहे. खसफस ऐकू येत होती.”

“ते सकाळचं मांजर असेल" मी दरवाजा बंद करता करता म्हटलं आणि लिविंग रूमच्या दुसर्‍या टोकाकडून "डॅडी...इथे बघ बेअर" अशी पोरीची हाक ऐकू आली.DSC00681रानाच्या त्या वाटेवरून अस्वलाची मादी आणि तीने छावे आरामात ड्राईव्ह वे वर अवतीर्ण झाले होते. “अरेच्चा! खरंच अस्वल होतं तर. बरं झालं आपण आत पोहोचलो. थोडक्यात चुकामुक झाली वाटतंय.” मी आश्चर्याने म्हटलं.“माझी गाडी.... ही अस्वलं खरवडून तर नाही ना ठेवणार?” ह्याच्या डोक्यात तिसरेच विचार सुरू होते.“अरे ते सकाळी तुला काळं मांजर दिसलं...ते या अस्वलाच्या छाव्या एवढंच होतं का रे?”
अस्वलाच्या मादीने संपूर्ण ड्राईव वे फिरून घेतला. छावेही मस्त बागडत होते. सुदैवाने (नवर्‍याच्या) आमच्या गाडीत त्यांना काडीचाही इंटरेश्ट नव्हता. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून अस्वलाच्या मादीने चक्क बसकण मारली.

DSC00687“आता हे रात्रभर इथेच राहिले म्हणजे?” काचेला नाक लावत कन्येने विचारलं.
“काही इथे रात्रभर राहात नाहीत. जंगली प्राणी असे एका जागेवर बसून राहात नाहीत.”
“पण राहिले तर?”
“तर आपण ९११ डायल करू.”
“ह्य॒! ९११ माणसांसाठी असतं, प्राण्यांसाठी नाही काय?”
“बरं बरं! उद्या सकाळचं उद्या सकाळी बघू. कॅमेरा गाडीत राहिला. निदान यांचे फोटो तरी काढता आले असते.”

“माझ्याकडे आहेना माझा कॅमेरा. आता काही नाहीतर तोच वापरू,” लेकीने आपल्या कमरेचा कॅमेरा काढून दिला. गेल्यावर्षी तिला एक वापरायला सोपा डिजिटल कॅमेरा घेऊन दिला होता. DSC00682

अस्वलाचे छावे दंगामस्ती करून दमले होते. त्यांच्याही भुकेची वेळ झाली असावी. त्यांनी आईला लुचायला सुरूवात केली. आईही त्यांना प्रेमाने चाटत होती. जंगली प्राण्यांचे असे दृश्य या आधी प्रत्यक्ष डोळ्यांनी कधी बघायला मिळाले नव्हते पण जंगली असो का पाळीव, प्राणी असो का मनुष्य- आईही आईच असते याची जाणीव त्या दृष्यातून होत होती.

“मी डेकवर जाऊन फोटो काढतो,” असं म्हणून नवरा हळूच बाहेर सटकला आणि क्षणार्धात परत आला. “तुम्हा दोघींना बाहेर येऊन बघायचे असेल तर आताच या, त्यांचं इतरत्र लक्ष नाही.”

आम्हीही दबकत बाहेर गेलो. अस्वलं आता अगदी जवळून दिसत होती. त्यांना आमच्या अस्तित्वाची कल्पनाही नव्हती. तेवढ्यात
“डॅडी बस हो गया। अब अंदर जायेंगे" आमच्या छाव्याला अद्याप कुठे मोठ्याने बोलावं आणि कुठे कुजबुजावं त्याची अक्कल आलेली नाही पण तो आवाज अस्वलाच्या मादीपर्यंत सहज पोहोचला आणि ती ताडकन उभी राहिली आणि आम्ही पुन्हा आत धूम ठोकली.

आता काय होणार याची कल्पना करत होतो पण त्या आईला पोरांची भूक महत्वाची असावी. तिने पुन्हा बसकण मारली आणि स्तनपानाला सुरूवात झाली. तिला माणसांची भीती नव्हती की या माणसांना आपण पिंजर्‍यात बंद केलं आहे याची खात्री झाली होती का काय देव जाणे. भूकशमनानंतर सुमारे अर्धातास छाव्यांनी पुन्हा धांगडधिंगा घातला आणि मग सर्वजण आल्या वाटेने आरामात निघून गेले. आम्हाला भूक लागली होती हे आम्ही या वेळात विसरूनच गेलो होतो.

पुढचे दोन्ही दिवस आम्ही खिडक्यांतून बाहेर बघून "ऑल वेल"चे ईशारे करून नंतरच घराबाहेर पडत होतो. बाहेर पडल्यावरही रानातील त्या वाटेवर एक नजर होतीच, पण सुदैवाने आमच्या हजेरीत अस्वलं परतली नाहीत.


DSC00689

फोटोंवर टिचकी मारल्यास ते मोठ्या स्वरूपात पाहता येतील.

Sunday, May 11, 2008

आय फील सो लकी....

काल आम्ही वर्गात हस्तकलेच्या तासाला आपापल्या आईसाठी हे उघडझाप करणारं फूल बनवलं. याच्या प्रत्येक बंद पाकळीवर तुझ्यासाठी एक छोटासा संदेश आहे. मला माझी आई का आवडते हे त्यात सांगितलं आहे.

पहिली पाकळी सांगते की मला माझी आई आवडते कारण ती माझ्या खाण्या-पिण्याकडे लक्ष पुरवते. मला भूक लागेपर्यंत थांबत नाही. माझे खाणे, माझा डबा, माझे जेवण यांकडे तिचे काटेकोर लक्ष असते.

दुसरी पाकळी सांगते की माझ्या आईला माझी काळजी घ्यायला आवडते. माझे केस विंचरायला, माझे कपडे धुवायला, इस्त्री करायला, माझ्यासाठी खरेदी करायला तिला आवडते.

तिसरी पाकळी सांगते की मला दुखलं-खुपलं, मी आजारी असले की माझी आई हवालदील होते. ती त्यावेळी थोडीशी जास्तच प्रेमळ असल्यासारखी वाटते.

चौथी पाकळी सांगते की माझ्या आईला माझ्याबरोबर बसून वाचन करायला आवडते. मी काय वाचते याकडे तिचे लक्ष असते. ती ग्रंथालयातून मला पुस्तके आणायला मदत करते आणि दररात्री ती तिचे पुस्तक वाचते आणि मी माझे पुस्तक वाचते. मला तिच्याबरोबर असा वेळ घालवणे खूप आवडते.

पाचवी पाकळी सांगते की ती मला तिच्या कामात मदत करायला देते तेव्हा ती मला खूप आवडते. यावेळी आम्ही काहीतरी खेळ खेळत कामे उरकतो.

सहावी पाकळी सांगते की मला तिच्याशी गप्पा मारायला खूप आवडतात. माझ्या शाळेच्या, वर्गातल्या, मैत्रिणींच्या गोष्टी ती दर संध्याकाळी ऐकते. मला एखादे दिवशी भीती वाटली तर तिच्या कुशीत घेते.

सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही.

आय फील सो लकी, कॉझ आय हॅव यू विद मी!

मदर्स डे निमित्त माझ्यात आणि लेकीत झालेला संवाद.

Monday, March 10, 2008

बादशहा अकबर आणि वादंग

लहानपणी अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकल्या नाहीत असा माणूस मिळणे विरळा. बादशहा अकबर आणि त्याचा वझीर (प्रधान) बिरबल. साधा,सरळ आणि थोडासा बिनडोक अकबर बादशहा आणि तल्लख बुद्धीचा हजरजबाबी बिरबल. यांच्या गोष्टी कोणा मोठ्याच्या तोंडातून ऐकताना खूप मजा वाटत असे. जंगलातला देव बनवून बादशहाला घाबरवणारा बिरबल आणि "क्यों बिरबल कैसा सेव?" असे बादशहाने विचारल्यावर "जंगल में जैसे था देव" असे उत्तर देऊन त्याला चारीमुंड्या चीत करणारा बिरबल, थंडीत कुडकुडणारा माणूस दूरवरच्या दिव्याची उब घेत होता म्हणून त्याला बक्षिस नाकारणार्‍या बादशहाला उंचावर हंडी बांधून मंद जाळावर खिचडी पकवत चिडवणारा बिरबल आणि आंब्यांबरोबर साली आणि कोयीही खाल्ल्यास म्हणून बादशहाला चिडवणारा आणि त्याच्या बेगमेचीही मर्जी संपादन करणारा बिरबल. मला अजूनही हा आपला सांस्कृतिक वारसा बिरसा वाटतो.

मला या गोष्टी ऐकताना नेहमी प्रश्न पडे की खरंच बादशहा इतका मूर्ख होता? जर इतका मूर्ख होता तर बादशहा कसा बनला? आता या विचारांचे हसू आले तरी एक प्रश्न मला कधीच पडला नव्हता आणि का ते कळत नाही. बादशहाच्या कथेत येणार्‍या त्या बेगमेचे नाव काय? मी हा प्रश्न कधी विचारल्याचे मला आठवतच नाही आणि आज त्यावर विचार केला तेव्हा ज्युली चित्रपटातील एक दृश्य आठवले.

"ओमप्रकाशचे बॉस त्याच्या घरी आलेले असतात. ओमप्रकाशची बायको नादीरा त्याला आपण अँग्लो-इंडियन असल्याबद्दल आणि आपल्या वडिलांबद्दल काहीतरी मोठ्या अभिमानाने सांगत असते. मध्येच हा बॉस तिला विचारतो, 'तुझी आई कोण होती?' त्याबरोबर ती पटकन काहीसे असे सांगते, "आईचे नाव महत्त्वाचे नाही. ते कोणी लक्षात घेतं का?" का कुणास ठाऊक पण जोधा-अकबराच्या गोंधळात हा प्रसंग नेमका आठवला.

राजा मानसिंगाची बहिण अकबराला दिली होती आणि म्हणून राजा भारमल आणि त्याचा पुत्र मानसिंग यांचा अकबराशी घरोबा होता. इतका घरोबा की आपल्या विशाल सैन्याचे सेनापती अकबराने या दोघांना नियुक्त केले होते असा इतिहास वाचलेला आठवतो. अकबराच्या पत्नीने त्यात विशेष काय केले हे मात्र आठवत नाही. तिचं नाव जोधा नसून वेगळे असते तर नेमका काय फरक पडता? मुख्य गोष्ट अशी होती की अकबराने आपल्या सेनापतीच्या मुलीशी लग्न करणे त्याच्या धोरणी स्वभावाला साजेसे वाटते. असो, मूळ इतिहासाचा, माझा आणि बादशहा अकबराचा संबंध इतकाच असावा.

यानंतर अकबर बादशहा आठवतो तो मुघल-ए-आज़म मधल्या पृथ्वीराज कपूरचा. मूल होण्यासाठी आतुरलेला आणि पुत्राच्या जन्माची वार्ता कळताच सोन्याच्या नाण्यांनी भरलेले ताट दासीच्या पदरात ओतणारा राजा. आपल्या हिंदू राणीच्यासह कृष्णजन्माष्टमीच्या उत्सवात "मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे" या नृत्य-गीताचा आस्वाद घेणारा पती. पुत्राच्या बंडाने कासावीस झालेला आणि त्याविरुद्ध शस्त्र उचलणारा सम्राट. "सलीSSम, अनारकली तुम्हारे काबील नहीं" असे बेंबीच्या देठापासून ओरडणारा पिता आणि शेवटी दासीला दिलेले वचन अनिच्छेने का होईना पण पाळणारा बादशहा.

खूप वर्षापूर्वी वाचल्याप्रमाणे पृथ्वीराज कपूरने अकबराचे कपडे चढवले की एक अनामिक शक्ती आपला ताबा घेत असे आणि त्या कैफात आपण ही भूमिका निभावत असू असे सांगितल्याचे आठवते. बादशहा अकबर म्हटले की आजही फक्त पृथ्वीराज कपूर डोळ्यासमोर उभा राहतो.


मुघल-ए-आज़मची रंगीत फीत आली तेव्हा हा चित्रपट पुन्हा पाहिला आणि पूर्वी एवढाच आवडला. हे सर्व पहात असताना अकबर मुसलमान होता, जोधा त्याची बायको नव्हती, अनारकली त्याची बांदी नव्हती, इतिहासाला वेगळे वळण दिले आहे, के. आसिफने लोकांची फसवणूक केली आहे हे इतिहासाबद्दल मनापासून प्रेम असून कधी डोक्यातही आले नव्हते.

गोवारीकरांनी जोधा-अकबरची घोषणा केली तेव्हा ऋतिक रोशन नावाचा "एक पल का जीना" म्हणत "इधर चला,उधर चला" नाच करणारा किरकोळ शरीरयष्टीचा नायक देशाचा सम्राट म्हणून कसा काय शोभू शकेल असा प्रश्न पडला. आपल्या निर्णयावर अडून बसलेला बाप आणि प्रणयोत्सुक पती या दोन्ही भूमिका वेगळ्या असल्यातरी ऋतिकला पृथ्वीराज कपूरने निर्माण केलेले वलय आणि वजन पेलवेल का असा प्रश्न पडतो.



चित्रपट गोवारीकरांनी काढला म्हणजे त्यात काहीतरी विशेष असावं, जे त्यांच्या पारखी नजरेला दिसलं असावं. अमेरिकेत हिंदी चित्रपट एखादा दिवस लागतो आणि लगेच काढला जातो त्यामुळे नवे चित्रपट पाहण्यासाठी चांगल्या प्रतीची डिवीडी येईपर्यंत २-३ महिने थांबावे लागते. एखाद्या शुक्रवारी संध्याकाळी सिनेमा पाहिला आणि वेळ घालवला इतकीच एका चित्रपटाची महती माझ्यामते असते. लोकांना त्यावर रस्त्यावर उतरावेसे का वाटते ते तेच जाणोत.

अकबर खानने काढलेला "ताजमहल" मध्यंतरी पहायची संधी मिळाली. त्यात शहाजहानचे चित्रणही प्रेमळ आणि सत्शील बादशहा म्हणूनच केले गेले आहे परंतु त्यावरून कोणताही वाद निर्माण झालेला ऐकला नाही. (चू. भू. दे. घे) गोवारीकरांच्या अकबरावरच असे का व्हावे हे अद्यापही कळले नाही आणि हा प्रश्न विचारता ज्या अनपेक्षित उत्तरांना सामोरे जावे लागेल त्यावरून बहुधा कळणारही नाही.

शाळेत पास होण्यापुरता इतिहास शिकणारे, मोघलांचा इतिहास दोन चार धड्यांत पार पाडणारे, दहावीनंतर इतिहासाच्या पुस्तकाला हातही न लावणारे इतके असंख्य आहेत की तीन तासांचा चित्रपट पाहून त्यांचे मतपरिवर्तन होईल अशी त्या चित्रपटात गोवारीकरांनी नेमकी कोणती जादू भरली असावी?

----



अकबर बिरबलाच्या कथा येथे पाहता येतील.
चित्र टाईम्स नाऊ.टिवी च्या सौजन्याने

Saturday, January 26, 2008

भिकारीण

“इतक्या थंडीच्या सकाळी काय रे खरेदीला निघायचं सुचलं आज?” घराबाहेर पडलो तसे हातात हातमोजे सरकवत मी नवर्‍याकडे नाराजीने तक्रार केली. कालच अर्धा फूट हिमवर्षाव झाला होता आणि आज तापमापीचा पारा शून्याखाली ८-१० डी. सहज उतरला असावा. रविवारच्या दिवशी दुलईत पडून राहण्यापेक्षा धडपडत खरेदीला निघायची माझ्यामते अजिबात गरज नव्हती.

“अगं कारने तर जाणार. ख्रिसमसचे दिवस आहेत. मॉल लवकर उघडतोय. सेल आहे. खरेदीही करायची होतीच. उरकून टाकू की सकाळीच मग दिवस मोकळा! नाही का?” त्याने कारचे इंजिन सुरू केले आणि गाडीचा हीटरही सुरू केला. रस्ते निसरडे झाले होते, त्यात बोचरं वारं आमच्याकडे पाचवीला पुजलेलं. सावकाश गाडी हाकत आम्ही मॉलदर्शन घेतलं. मागच्या सीटवर लेकही सकाळी उठायला लागल्याबद्दल नाराज होती.

कुरकुरत का होईना पण आमची खरेदी नेहमीप्रमाणेच व्यवस्थित झाली. पैशांनी किती गोष्टी खरेदी करता येतात? या प्रश्नाला बर्‍याच आणि थोड्याशाच असे दुहेरी उत्तर आहे. मॉल्समध्ये गेले की आपल्याकडे पैसे असल्याचा आनंद आणि आपल्याकडे पैसे नसल्याचे दु:ख एकत्रित मिळून जाते. जे हवे असते त्याच्या किंमती परवडत नसतात आणि जे नको असते ते हमखास निम्म्या किंमतीला मिळत असते.

खरेदी झाली तेव्हा सकाळ उलटायला आली होती. “किती फिरफिर फिरलो रे या दोन चार दुकानांतच? वेगळा व्यायाम करायची गरजच नसते नाही या मॉलच्या चकरा मारल्या की. जीममध्येही पैसे देऊनच व्यायाम करतो आपण. इथे पैसे देऊन खरेदी करता करता व्यायाम होतो.” माझ्या टोमणामिश्रित विनोदाचा नवर्‍यावर गेली कित्येक वर्षे काहीही परिणाम होत नाही. त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकून खरेदीच्या पिशव्या ट्रंकमध्ये टाकल्या आणि कार सुरू केली.

दिवस वर आला असला तरी बाहेर थंडी मी म्हणत होती, वारंही सुटलं होतं. रस्त्यांच्या बाजूला बर्फाचे ढिगारे दिसत होते, रस्त्यांचा निसरडेपणाही जसाच्या तसा होता. हे असले दिवस नेहमीच नकोसे वाटतात त्यात मला, आता घरी जाऊन स्वयंपाकाचा श्रीगणेशा करायचा या कल्पनेने वैताग आला होता.

“सगळी सकाळ इथे गेली आता घरी जाऊन भूक भूक कराल, “ कंटाळलेल्या सुरात मी तक्रार केली.
“अगं ब्रंच करून जाऊ, आता कुठे घरी जाऊन स्वयंपाक करत बसणार.” हा समजुतीचा स्वर मला भयंकर प्रिय आहे. मागच्या सीटवरूनही सकाळपासून पहिल्यांदाच आनंदी हुंकार ऐकू आला. गाडी "ल पीप"च्या दिशेने वळली तशी पोटात आगीचा डोंब उसळल्याची जाणीव झाली. तसंही बाहेर खायचं म्हणजे सडसडून भूक लागतेच लागते. रेस्टॉरंटातल्या उबदार वातावरणात तर ती आणखीच प्रज्वलित होते असा नेहमीचा अनुभव आहे.

खाऊन बाहेर पडलो आणि रस्त्याला लागलो. समोरच्या सिग्नलला गाड्यांची बरीच गर्दी झाली होती. वेग मंदावून नवर्‍याने खिसे चाचपडायला सुरुवात केली.

“काय रे काय झालं? पाकीट, सेल विसरला तर नाहीस रेस्टॉरंटात? काय शोधतो आहेस?”
“काही नाही, पाकीटच शोधत होतो. जरा एक डॉलर काढशील.” त्याने हात स्टीअरींगवर पुन्हा ठेवत म्हटले.
“एक डॉ. कशाला रे?”“समोर बघ सिग्नलजवळ एक भिकारीण दिसत्ये, तिला देतो.”

सिग्नलपाशी एक मध्यमवयीन बाई कळकट कोट, टोपी, हातमोजे घालून थंडीत कुडकुडत उभी होती. हातात "गरीबाला मदत करा" लिहिलेला एक पुठ्ठ्याचा बोर्ड होता.

“हं? सर्व सोडून भीक द्यायला कुठे निघालास?” मी आश्चर्याने विचारलं, "काही गरज आहे का अशा धडधाकट माणसांना भीक घालायची. कामं करायला काय हरकत आहे यांना? उगीच माणसं भीक देऊन त्यांना कामं न करता, ऐतखाऊ बनवण्यास भाग पाडतात. ” किती वर्षांनी भीक द्यायची वेळ आली होती कोणास ठाऊक. मागच्यावेळी नेमकी कधी भीक दिली ते आठवणेही कठिण होतं.

“असू दे गं. ती भीक मागते आहे इतक्या थंडीची. आपल्याला दोन क्षण बाहेर राहणं कठिण होतंय आणि ती केव्हाची उभी आहे कोण जाणे? सणाचे दिवस आहेत दिला एक डॉलर तर काय मोठा फरक पडणार आहे.”

“प्रश्न फरक पडण्याचा नाही, पण मग चार भिकारी उभे असते तर चारांनाही भीक दिली असतीस का? आणि भीक मागणे हा तिचा नाइलाज नसून धंदा असेल तर? ज्या पैशांसाठी आपण राबतो त्यातला एक पैसाही ऐतखाऊंना का द्यायचा?” गाडी अद्यापही गर्दीत अडकून होती.

“किती विचार करते आहेस एका क्षणात. मी इतका विचारही केला नव्हता. आनंदाचे दिवस आहेत. आपण खरेदीला निघालो. मनपसंत खरेदी झाली, बाहेर खाणं झालं. एखाद्या आनंदाचा क्षण त्या भिकारणीलाही देता येईल असं वाटलं. या मॉल्समध्ये आपण जातो, मूळ किंमतींच्यापेक्षा कितीतरी किंमत त्यातल्या वस्तूंसाठी मोजतो. त्या काउंटरवरल्या पोरींचं खोटंखोटं स्मितहास्य, दिव्यांची रोषणाई, सजावट या सर्वांचा फुकट खर्चही आपण भरतो. रेस्टॉरंटात गेलो तर वेटरला टीप दिल्याशिवाय बाहेर पडत नाही. असं तो वेटर काय अधिकच करतो आपल्यासाठी? पण रीत म्हणून आपण त्याला पगार मिळत असतानाही टीप देतो. मग जर एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीच करत नसेल आणि तरीही दिला तिला आपल्या आनंदातला थोडासा हिस्सा एके दिवशी तर काय मोठा पहाड कोसळला? काहीतरी नसेल तिच्याकडे जे आपल्याकडे आहे. काहीतरी असेल जे तिला भीक मागायला प्रवृत्त करतंय आणि आपणही कधीतरी नकळत भीक मागतो. अगदी आपल्या हक्काच्या सुट्टीचीही भीक मागावी लागते ऑफिसात.”

“हो पण देण्याचंच झालं तर संस्था, अनाथालये वगैरे आहेत ना.” मी माझा हेका सोडला नाही.

“त्यांनाही देतोच ना! की देतच नाही? जे आपल्याकडे आहे ते जर त्यांच्याकडे नसेल तर प्रत्येकवेळीच मोजूनमापून विचार करून दुसर्‍याच्या पदरात टाकावं असं थोडंच आहे?” त्याने थोडंसं वैतागून विचारलं.

गाडी एव्हाना त्या भिकारणीच्या जवळ सरकली होती. त्याने गाडीची काच खाली केली तशी भप्पकन गार हवेचा झोत अंगावर आला आणि सर्वांगावर नकोशी शिरशिरी आली. तिने काच खाली झाल्याचं हेरलं असावं. ती लगबगीने खिडकीच्या दिशेने आली आणि आशेने खिडकीत डोकावत थंडीने गारठलेली मूठ तिने घाईने पसरली. तिच्या फाटक्या हातमोजांत डॉ. बिल पडलं तसं ’गॉड ब्लेस यू. हॅपी हॉलीडेज!" म्हणत तिने तोंडभरून हास्य फेकलं. तिच्या पाणीदार डोळ्यांतली लकाकी त्या पिवळ्या दातांच्या हास्यात मिसळून आनंदाची एक आगळी चमक क्षणभर दिसली, एक वेगळा आनंदही नवर्‍याच्या डोळ्यांत क्षणभर चमकून गेला आणि मनातील सर्व विचारांना खीळ पडली.

जसं आमच्याकडे काहीतरी होतं जे तिच्याकडे नव्हतं तसंच, काहीतरी वाटत होतं त्याला जे मला वाटतं नव्हतं इतकाच विचार करून मी हायवेतल्या गर्दीत मिसळून गेले.

Sunday, January 20, 2008

लढा लहानगीचा

गोष्ट फारशी जुनी नाही, १९६० सालातील आहे. यावर्षी लुईझियाना राज्याने गोर्‍यांच्या आणि काळ्यांच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचा कायदा लागू केला. त्यापूर्वी गोर्‍या मुलांच्या व काळ्या मुलांच्या शाळा वेगवेगळ्या असत. या कायद्यानुसार केवळ ६ काळ्या मुलांची गोर्‍यांच्या शाळेत जाण्यासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ मुलांच्या पालकांनी घाबरून आपल्या मुलांना पूर्वीच्या शाळेत ठेवणेच पसंत केले. राहिलेल्या चौघांपैकी ६ वर्षांच्या लहानग्या रुबीवर 'विल्यम फ्रॅन्ट्स प्राथमिक शाळेत' एकटीने जायची पाळी आली.

रुबीच्या वडलांना रुबीचे गोर्‍या मुलांच्या शाळेत जाणे फारसे पसंत नव्हते. गोरी मुले तिला आपल्यात कधीच सामावून घेणार नाहीत ही भीती त्यांना वाटत होती. रुबीच्या आईला मात्र रुबीला या शाळेत चांगले शिक्षण मिळेल अशी खात्री वाटत होती. तिने रुबीच्या बाबांची बरेच दिवस समजूत घातली, 'ही लढाई आपली नाही तर संपूर्ण काळ्या समाजाची आहे. आपल्याला सुरुवात करायची संधी मिळाली आहे ती आपण गमवून चालणार नाही.' शेवटी बाबांनी परवानगी दिलीच. खरी लढाई मात्र लढायची होती ती लहानग्या रुबीला आणि आपल्याला नेमकी कोणती लढाई लढायची आहे हेच तिला माहित नव्हते.

१४ नोव्हेंबर १९६०चा दिवस काळ्या मुलांनी गोर्‍यांच्या शाळेत जाण्यासाठी निश्चित करण्यात आला. त्या दिवशी सकाळी रुबीला आईने उठवले. तिची तयारी करताना आईने तिला नव्या शाळेत जाण्याविषयी सांगितले. नव्या शाळेत जाताना काहीतरी गडबड होईल ही शंका असल्याने चार सरकारी अधिकारी रुबीला न्यायला येणार होते. शाळेजवळ गर्दी असेल, लोक काहीतरी आरडाओरडा करतील त्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचे नाही हे आईने रुबीला सांगून ठेवले.

ठरल्याप्रमाणे चार अधिकारी सकाळीच घरी आले. त्यांच्या गाडीतून शाळेत जाताना त्यांनी रुबीला आणि तिच्या आईला सांगितले की रस्त्यावरून चालताना दोन अधिकारी त्यांच्यापुढे चालतील आणि दोन अधिकारी मागून. काही गडबड झाल्यास ते काळजी घेतील. शाळेच्या आवारात गाडी थांबली तशी रुबीला बरेच लोक गर्दी करून उभे असल्याचे दिसले. तिने आईचा हात घट्ट पकडला. काही गोरे लोक जोरजोरात काहीतरी ओरडत होते. डोळ्यांच्या कोपर्‍यातून रुबीने पाहिले तर त्यांच्या हाताच्या मुठी आवळलेल्या तिला दिसल्या. येथे नक्की काय चालले आहे याची रुबीला कल्पना येत नव्हती. तो संपूर्ण दिवस रुबीने आणि तिच्या आईने मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसून काढला. कार्यालयाच्या खिडकीतून रुबीला ती जोरजोरात घोषणा देणारी माणसे दिसत होती. काहीजण आपल्या मुलांना शाळेतून काढून घरी घेऊन जात होते. या सर्व गोंगाटात रुबीचे नव्या वर्गात जाणे झालेच नाही.


दुसर्‍या दिवशीही ते अधिकारी रुबीला आणायला आले. आईही शाळेत आलीच. त्यादिवशीही शाळेच्या आवारात बरेच गोरे लोक जमले होते. त्यापैकी एकाने पुढे सरून शवपेटीत घातलेली काळी बाहुली रुबीला दाखवली. रुबीला ती बाहुली पाहून खूप भीती वाटली. हे लोक आपल्याला घाबरवत आहेत याची तिला प्रथमच जाणीव झाली. लोक रुबी आणि तिच्या आईवडिलांविषयी काहीतरी अर्वाच्य बोलत होते. त्यांना टाळून रुबीने शाळेत प्रवेश केला.

त्यादिवशी शाळेत एक गोरी स्त्री त्यांची वाट पाहात होती. "गुड मॉर्निंग, रुबी नेल. मी तुझी नवी शिक्षिका, मिसेस हेन्री." गोड आवाजात तिने रुबीचे स्वागत केले. मिसेस हेन्रींचा चेहरा दयाळू दिसत होता तरी रुबीला त्या कशा असतील, आपल्याशी बाहेरच्या लोकांप्रमाणेच वागतील की काय असा प्रश्न पडला. हेन्रीबाई, रुबीला आणि तिच्या आईला दुसर्‍या मजल्यावर रुबीच्या वर्गात घेऊन गेल्या. संपूर्ण वर्ग रिकामा होता. बाईंनी रुबीला पहिल्या बाकावर बसवले आणि संपूर्ण वर्गाला शिकवतो आहे अशा थाटात तिला इंग्रजी अद्याक्षरे शिकवायला सुरूवात केली. शाळेतला तो दिवस बरा गेला.

त्यानंतरच्या दिवशी आईने रुबीला जवळ घेऊन सांगितले की आजपासून तिला कामावर जाणे भाग आहे त्यामुळे ती शाळेत येऊ शकत नाही. यापुढे ते सरकारी अधिकारीच तिला शाळेत पोहचवतील व परत आणतील. रुबीचा चेहरा पडला. ते पाहून आई म्हणाली, "घाबरू नकोस रुबी. शाळेत जाताना मन लावून देवाची प्रार्थना म्हण. देव सर्वत्र असतो. तू तुझे लक्ष प्रार्थनेत ठेवलेस तर ते लोक तुझ्याबद्दल काय बोलतात हे तुला ऐकू येणार नाही." रुबीने आईचा सल्ला मानला. ते गोरे लोक रोज शाळेच्या आवारात जमायचे, आचकट विचकट बोलायचे. त्यांना टाळून शाळेच्या पायर्‍या चढताना रुबीला हायसे वाटायचे. शाळेत हेन्रीबाई रुबीची वाट पाहत असायच्या. रुबी दिसली की तिला जवळ घ्यायच्या, गोंजारायच्या. एव्हाना रुबीला त्या आवडू लागल्या होत्या. वर्गात हेन्रीबाई आणि रुबी दोघीच असायच्या. बाकीच्या मुलांची नावे त्यांच्या पालकांनी कमी करून टाकली होती. बाई फळ्यासमोर उभ्या राहण्याऐवजी रुबीच्या शेजारी बसून तिला शिकवू लागल्या. रुबीलाही शाळेत येणे आवडू लागले.

परंतु गोष्टी इथेच थांबल्या नाहीत. वर्णद्वेषी गोरे आता रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण शहरात दंगलीचे लोण पसरले होते. रुबीच्या घराला लक्ष्य करण्याचे प्रयत्न करण्यात आले. रुबीच्या वडिलांनाही कामावरून कमी करण्यात आले. दुकानदाराने रुबीच्या कुटुंबाला धान्य व इतर सामान देणे बंद करून टाकले आणि आपल्या दुकानात येण्यास मनाई केली. रुबी आणि तिचे कुटुंबीय घराबाहेर पडले की त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या जात. धमक्यांची पत्रे येत. मिसिसीपी राज्यात राहणारे रुबीचे आजी-आजोबाही या उद्रेकाचे बळी ठरले. परंतु याचबरोबर काही सहृदय माणसांनी रुबीच्या कुटुंबाची मदतही केली. एका शेजाऱ्याने रुबीच्या वडिलांना रंगार्‍याची नोकरी दिली. काहीजणांनी रुबीच्या घरावर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. त्यांना मदत मिळवून दिली. एवढेच नव्हे तर शाळेत जाताना रुबीच्या गाडीमागून रोज शांततेने चालण्यास सुरुवात केली.

रुबीच्या वर्गात मात्र रुबी आणि हेन्रीबाई दोघीच असायच्या. मधल्या सुट्टीत रुबीला बाहेर जाऊन इतर मुलांसमवेत खेळण्याची मनाई होती. हेन्रीबाई वर्गात स्वत: रुबी बरोबर खेळायच्या. शारिरीक शिक्षणाच्या तासाला रुबीबरोबर नाचायच्या, उड्या मारायच्या. केवळ हेन्रीबाईंमुळे रुबीला शाळा आवडायची. एक दिवस रुबीने त्यांना ती बाहेरची माणसे अशी क्रूर का वागतात असा प्रश्न विचारला. तशा हेन्री बाई तिला म्हणाल्या, "काही माणसांना एकदम बदलणे जमत नाही. ते वर्षनुवर्षे असेच वागत आले आहेत, यापेक्षा वेगळे वागायला कदाचित त्यांना भीती वाटत असावी. रुबी, ते लोक तुझ्यापेक्षाही जास्त घाबरलेले आहेत." त्यादिवशी रुबीला बाईंचे म्हणणे कितपत समजले कोणास ठाऊक परंतु त्यावर्षी ती तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकली. शाळेबाहेर उभे राहून अर्वाच्य बोलणारे लोक गोरे होते आणि हेन्रीबाईही गोर्‍याच होत्या, पण रुबीला भेटलेल्या प्रेमळ लोकांपैकी त्या एक होत्या. हेन्रीबाईंनी रुबीला डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांची शिकवण शिकवली. "जगात कोणलाही त्याच्या कातडीच्या रंगावरून जोखू नये. देवाने सर्वांना सारखे बनवले आहे आणि तरीही प्रत्येकाला दुसर्‍यापेक्षा वेगळे." त्यादिवशीपासून शाळेत येताना रुबीने आपल्याबरोबरच त्या बाहेरच्या गोर्‍या लोकांसाठीही प्रार्थना म्हणायला सुरूवात केली. तेही आपल्यासारखेच घाबरलेले आहेत हे तिच्या बालमनाने पक्के जाणले होते.

म्हणता म्हणता वर्ष कसे सरले ते रुबीला कळलेही नाही. हेन्रीबाईंच्या सान्निध्यात तिचे व्यक्तिमत्त्व फुलून येत होते. वर्षभरात तिने एकही दिवस शाळा चुकवली नाही. बाहेरचे लोकही थंडावले. शाळेबाहेर येईनासे झाले. जून महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या तशा रुबीने आणि हेन्रीबाईंनी एकमेकींचा निरोप घेतला. सप्टेंबरमध्ये रुबी शाळेत परतली तर शाळेचे रुपच पालटले होते. तिला पोहचवायला न्यायला येणारे ते अधिकारी आले नव्हते, शाळेत काही अधिक काळी मुले भरती झाली होती. शाळेबाहेर गोंगाट नव्हता. रुबीच्या वर्गात इतर मुलेही होती आणि त्यातली काही काळीही होती. जसे काही शाळेत काही घडूनच गेले नव्हते. रुबीला हेन्रीबाई मात्र दिसल्या नाहीत. चौकशी केले असता कळले की त्यांची बोस्टनला बदली झाली होती.

रुबीची शाळा व्यवस्थित सुरू झाली. तिने प्राथमिक शाळेनंतर, महाविद्यालयात प्रवेश मिळवला व आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर व्यवसाय शाखेचा अभासक्रम पूर्ण केला. पर्यटन विभागात नोकरी केली. रुबी ब्रिजेस हॉल आज पन्नाशीची आहे आणि आपल्या कुटुंबासमवेत सुखी आयुष्य जगते आहे. संपूर्ण गोर्‍यांच्या प्राथमिक शाळेत जाणरी ती अमेरिकेतील पहिली काळी मुलगी गणली जाते. वर्णद्वेषाबद्दल तिच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, "आपल्यापैकी प्रत्येकजण निर्मळ मन घेऊन जन्माला येतो. आपल्या मुलांना वर्णद्वेषाबद्दल काहीही माहित नसते.. त्यांनी ती माहिती पुरवतो आपण. आपण वर्णद्वेष जीवंत ठेवतो आणि त्याचा वारसा आपल्या मुलांना देतो. आपल्या मुलांची मने निर्मळ राहावीत ही आपली जबाबदारी आहे."



१५ जानेवारी डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचा जन्मदिवस म्हणून अमेरिकेत साजरा होतो. त्यांच्याशी आणि त्यांच्या विचारांशी आपली बांधिलकी असेल नसेल परंतु वयाच्या सहाव्या वर्षी आपल्याला किंवा आपल्या मुलांना कनिष्ठतेची वागणूक मिळून एखादा दिवसतरी शाळेत रुबीप्रमाणे घालवावा लागल्यास काय वाटेल याची कल्पना करावी.

* प्रसिद्ध चित्रकर नॉर्मन रॉकवेल यांचे 'The problem we all live with' हे रुबीवर तयार केलेले तैलचित्र विकिपीडियावरून चिकटवले आहे.

marathi blogs