प्रकार

Sunday, December 20, 2009

टॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार



"मला माझ्या दंडावर सिंहाचे तोंड गोंदवून घ्यायचे आहे. " काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्रवर्यांनी आपली इच्छा सहजच माझ्यासमोर मांडली.

"ईईईईव! हे काय भलतंच. नसती फ्याडं सुचतात एक एक. जंकी, ड्रगी, हिप्पी, फ्याशनच्या जगतातील काही बिघडलेले कलावंत यांच्याखेरीज कोणीही टॅटू लावत नाहीत. अमेरिकेत एखादे फ्याड निर्माण झाले की लग्गेच आपण त्याचे कित्ते गिरवायलाच हवेत, नाही का? आपल्या अंगावर काहीतरी कोरून घ्यायचे, त्याचे साइड इफेक्ट्स, इन्फेक्शन झाले तर पंचाईत. एडसचा बागुलबुवा आहेच वर. आपल्या कातडीत सुया टोचून रंग खुपसून घेण्याचा रानटीपणा आणि त्यातून काही वर्षांनी आपण कसला मूर्खपणा करून बसलो असे वाटले तर पश्चात्ताप करत बसायचं. तो टॅटू पुसून टाकणे इतके सोपेही नाही. " मी तोंड सोडले आणि त्या दटावणीमुळे बहुधा त्यांची इच्छा तिथेच विरून गेली आणि त्यांनी हलक्या सुरात केलेली तक्रारही.
"ठीक आहे नाही लावून घेत टॅटू पण ते जंकी, हिप्पींचे संदर्भ जरा चुकताहेत असे वाटत नाही का आणि आपल्याकडील लहान मुलांचे कान-नाक टोचण्याच्या रानटीपणाबद्दल काय वाटते? "


त्यानंतर अनेक वर्षे अनेक प्रसंगांतून हे टॅटू कोणत्यानं कोणत्या प्रसंगांतून डोळ्यासमोर येत राहिले. एखाद्या बाईच्या कपाळावर गोंदवलेली चंद्रकोर, हातावर गोंदवलेले हिरवट निळसर नाव, भटक्या जमातीतील स्त्रियांच्या हातावर आणि पायांवर गोंदवलेली नक्षी, दिवारमधल्या अमिताभच्या हातावरील "मेरा बाप चोर है।" हे गोंदवण, नाझी कॅंपमधील कैद्यांच्या हातावर गोंदवलेले क्रमांक, बेकहॅमचा हातावर कोरलेला देवनागरी लिपीतील व्हिक्टोरिया या बायकोच्या नावाचा टॅटू, ऍंजेलिना जोलीच्या पाठीवरील ख्मेर लिपीतील संस्कृत श्लोक, बेकहॅमचा कित्ता गिरवून सैफने हातावर कोरून घेतलेल्या करिनाच्या नावाच्या टॅटूची वदंता, मायकेल स्लेटरच्या छातीवरील ३५६ हा नंबर, हल्लीच आलेल्या गजीनीमधील अंगावर गोंदवून आपली स्मरणशक्ती काबूत ठेवण्याचा आमीरने अवलंबलेला मार्ग आणि रस्त्यावर, मॉलमध्ये, कार्यालयात दिसणाऱ्या असंख्य जनतेने अंगावर ल्यालेला हा कायमस्वरुपी शृंगार कधीना कधी नजरेस पडतोच. अगदी, आताच प्रकाशित झालेल्या डॅन ब्राऊनच्या "द लास्ट सिम्बॉल" या कथानकामध्येही टॅटूंना विशेष महत्त्व आहे.

टॅटूइंग किंवा गोंदवणे या कलेबद्दल टोकाचे विचार मांडणार्‍या अनेक व्यक्ती भेटतात. आपले अंग टोचून कायमस्वरुपी रंगवण्याविषयी नाराजी व्यक्त करणारी माझ्यासारखी माणसे किंवा टॅटू लावणे "कूल" आहे म्हणून दिमाखात आपल्या अंगावरचे गोंदवण मिरवणारे. या टॅटूंविषयी सामोआ या पॉलिनेशियन बेटावरील भाषेत एक म्हण आहे - एकवेळ तुमच्या शरीरावरील दागिना मोडून तुमची साथ सोडण्याचा संभव आहे पण गोंदवण तुमची साथ कबरीपर्यंत करेल.

लोकप्रिय किंवा पॉप संस्कृतीत अंगावर टॅटू गोंदवणे हे आत्मप्रकटनाचे किंवा स्वत:ला व्यक्त करण्याचे साधन समजले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत शरीर रंगवण्याची ही कला अनेकांना भुरळ घालते. प्रदर्शने, आर्ट-गॅलरीज, संग्रहालये अशा अनेक माध्यमांतून गोंदवण्याच्या या कलेला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली आहे. एखाद्यावरील आपल्या निःसीम प्रेमाची ग्वाही देण्यासाठी, जीवनात झालेले अचानक झालेले चांगले-वाईट बदल, प्रिय व्यक्तीचा विरह किंवा मृत्यू, ईश्वरावरील किंवा सुष्ट आणि दुष्ट शक्तींवरील श्रद्धा किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, दुष्ट किंवा तांत्रिक शक्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून आणि अशा नानाविध घटना आणि कारणांना व्यक्त करण्यासाठी टॅटू हा एक मार्ग समजला जातो. या प्रक्रियेत वेदना सामावली असल्याने टॅटू हे शौर्य आणि धीराचे प्रतीक असल्याचेही मानले जाते. पाठीवर किंवा स्त्रियांच्या मानेमागे गोंदवलेले नाजूकसे फूल किंवा फुलपाखरू, पायाच्या घोट्यावर गोंदवलेले असेच एखादे नाजूकसे चिन्ह किंवा पुरुषांच्या दंडावर, छातीवर गोंदवलेले प्राण्यांच्या चेहऱ्यापासून ते ग्रीक आणि चिनी भाषेतील मुळाक्षरांपर्यंत चिन्हे वगैरे हे समोरच्याला आकर्षित करण्यासाठी करवून घेतलेले असतात. यांतील काही चिन्हांचा परामर्श लेखात पुढे घेऊच. गोळ्या आणि चॉकलेट्समधून मिळणारे टॅटूंचे तात्पुरते स्टिकर्स आणि या वेडाचा फायदा घेऊन च्युईंग गम किंवा फ्रूटबार खाऊन जिभेवर तात्पुरते टॅटू उमटवण्याचा प्रयोग यांतून टॅटूंची कला लहान मुलांतही प्रसिद्धी पावली आहे.

प्राचीन काळापासून शृंगाराचे मानवाला वेड असल्याचे अनेक पुरावे देता येतात. हस्तिदंती फण्या, अत्तराच्या आणि काजळाच्या कुप्या, सुगंधी तेले, लेप, रंग यासारख्या सौंदर्य खुलवणार्‍या साधनांचे आणि कायमस्वरुपी शारीरिक शृंगार म्हणता यावे असे कान, नाक किंवा शरीराचे इतर भाग टोचणे, अंग गोंदवणे यांचेही मानवाला आकर्षण असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात हातावर, पायांवर आणि शरीराच्या अन्य भागांवर मेंदीची नक्षी काढणे ही देखील टॅटूसदृश कला मानली जाते. शाईने गोंदवण्यासारखी ती कायमस्वरुपी नसते एवढेच. अन्यथा, परदेशांत मेंदीला इंडियन टॅटू या नावाने सर्रास संबोधले जाते. मेंदीच्या नक्षींचे डाय वापरून अंग रंगवण्याची कलाकुसरही प्रसिद्ध आहे. इजिप्त, लिबियापासून भारतापर्यंत सर्व प्रदेशांत गेली हजारो वर्षे धार्मिक, सांस्कृतिक कार्यांत मेंदी लावण्याची प्रथा जोपासलेली आहे. भारतात मेंदीला सौभाग्यलंकार मानले जाते.

नवपाषाणयुगातील सुमारे ५३०० वर्षांपूर्वी सापडलेल्या ऑत्झी या आदिमानवाच्या पाठीवर पट्ट्याप्रमाणे गोंदवलेल्या लहान रेषांचा समूह आणि पायांवर गोंदवलेली काही चिन्हे हे टॅटूचे जगातील सर्वात आद्य उदाहरण मानले जाते. इटली आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्स पर्वतात सापडलेल्या या मृतदेहाच्या अंगावर मोजून ५७ गोंदवल्याच्या खुणा सापडल्या आहेत. या गोंदवणांचे ऑत्झीच्या शरीरावरील स्थान ऍक्युपंक्चर पॉईंटसपाशी असल्याने कदाचित शारीरिक उपचार म्हणूनही ही गोंदवणे केलेली असावीत असा एक मतप्रवाह दिसतो. प्राचीन इजिप्त आणि लिबियामध्ये सापडलेल्या ममींच्या शरीरांवरही गोंदवल्याच्या स्पष्ट खुणा दिसून येतात.

प्राचीन संस्कृतीत गोंदवून घेण्याची कारणे मात्र निराळी असावीत असा तर्क मांडला जातो. धार्मिक विधी म्हणून, ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी, एखादा ताईत किंवा मंत्र म्हणून, त्यागाच्या भावनेतून, आपण एका कबिल्याचे, जमातीचे आहोत हे ठसवून देण्यासाठी, गुलामांची-दास्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा शिक्षा म्हणूनही अंग चिन्हांकित करण्याची प्रथा अस्तित्वात आली असावी.

टॅटू हा शब्द पाश्चिमात्य जगतात प्रथम आला तो पॉलिनेशियन बेटांमधील ताहिती येथील भाषेतून. कॅप्टन जेम्स कूक हा ब्रिटिश रॉयल नेव्ही मधील प्रसिद्ध नाविक होता. त्याने पॉलिनेशियन बेटांना दिलेल्या भेटींत अंग गोंदवलेली माणसे प्रथम पाहिली आणि इथूनच टॅटू हा शब्द आणि कला दोन्ही युरोपात शिरल्या. ताहितियन भाषेतील या शब्दाचा मूळ अर्थ फराटे मारणे असा होतो. इ. स. पूर्व १२०० पासून पॉलिनेशियन संस्कृतींमध्ये टॅटूंना स्थान असल्याचे दिसते. हाडे तासून त्याच्या सुया आणि काजळाचा वापर करून गोंदवण्याची प्रक्रिया केली जात असे. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत तोंडावर गोंदवणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते आणि गोंदवणावरून माणसाचे समाजातील स्थान ओळखण्याची पद्धत होती. मायन संस्कृतीत ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी आणि धार्मिक रीतिरिवाज म्हणून गोंदवण्याची पद्धत होती. जपानमध्येही गोंदवण्याची कला फार प्राचीन समजली जाते आणि गोंदवण्याचे पहिले पुरावे इ. स. पूर्व ३००० मधील आढळतात.

ख्रिस्ताचा क्रूस, भळभळा वाहणारे हृदय, अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक चिन्हे, आद्याक्षरे, नावे आणि असे अनेक टॅटू प्रत्येकाने आजवर पाहिले असतील परंतु टॅटूंच्या या विविध नक्षींना अर्थ असतो किंवा त्यातून एखादी भावना व्यक्त केलेली असते. काही प्रसिद्ध नक्षींबद्दल थोडक्यात माहिती पाहू:

जहाजाचा नांगर: जहाजाचा नांगर हे सावधानतेचे आणि सुरक्षिततेचे निशाण मानले जाते. खलाशी आणि जहाजावरील इतर कर्मचार्‍यांच्या मते नांगर हे जहाजाला बुडण्यापासून वाचवणारे सुचिन्ह आहे.

फुलपाखरू: फुलपाखरू हे माणसाच्या आत्म्याशी संबंधीत असल्याचे मानले जाते. आनंद, तारुण्य व्यक्त करण्याचे चिन्ह म्हणूनही फुलपाखराचा वापर केला जातो.

गुलाब: हे निःसीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते तसेच सौंदर्य आणि निकोपतेचे चिन्हही. प्रेमाची आणि सौंदर्याची रोमन देवता व्हीनस हिचे प्रतीक म्हणून गुलाबाचे गोंदवण केले जाते.

सर्प: साप आपली कात टाकून नवा जन्म धारण करतो या भावनेतून साप किंवा नाग यांचे गोंदवण हे अमरत्वाशी संबंधीत मानले जाते. साप हे शक्तीचे प्रतीकही मानले जाते.

सिंह: सिंह हा वनाचा राजा मानला गेल्याने सिंहाचे चिन्ह हे पुरुषत्वाचे, शौर्याचे, विजयाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते.

मासा: मासा हे प्राचीन ख्रिश्चन संस्कृतीचे प्रतीक ख्रिस्ताशी संबंधीत असल्याने माशाच्या रेखाकृतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

ड्रॅगन: मानवाला भीती वाटेल असे आग ओकणार्‍या किंवा पंख विस्तारलेल्या ड्रॅगनचे गोंदवण हे भीतीवर मात केल्याचे किंवा संकटातून पुढे जाण्याचे चिन्ह मानले जाते.

सूर्य, चंद्र, तारे: सिंहाप्रमाणेच सूर्य हे देखील पुरुषत्वाचे, शौर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते तर चंद्रकलांचा वापर जीवनातील टप्पे दाखवण्यासाठी केला जातो आणि चांदण्या हे आशेचे आणि आत्मिक आनंदाचे प्रतीक मानले जाते.

अग्नी: अग्नी हे जीवनाचे प्रतीक मानले जाते. जीवनातील चांगल्या-वाईट क्षणांची आठवण म्हणून या गोंदवणाचा वापर होतो.

पक्षी: पक्षी हे प्रेमाचे, शांततेचे, ज्ञानाचे, आशेचे आणि आत्मसाक्षात्काराचे प्रतीक मानले जाते.

लहान-मोठ्यांपासून सर्वांना आकर्षित करणार्‍या या टॅटूंबरोबर आरोग्याची सुरक्षितता आणि त्यामागील धोक्यांचे आकलन हे अतिशय महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. शरीरात किंवा त्वचेत सुया खुपसण्यातून अनेक त्वचारोग, टीबी, हेपॅटॅटिस आणि HIV ची आणि इतर रोगांची लागण होण्याची शक्यता असते . अमेरिकेत टॅटू स्टुडिओ उघडण्यासाठी विशेष परवानापत्र लागते तर सरकारमान्य नसलेल्या स्टुडियोंतून टॅटू लावून घेतल्यास त्या व्यक्तीस पुढील १२ महिन्यांपर्यंत रक्तदानाची मुभा नसते. टॅटू गोंदवणारी व्यक्ती कायद्याने सज्ञान असण्याची अट घातलेली आढळते किंवा काही वेळेस पालकांच्या परवानगीने टॅटू करवून घेता येतो. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठीच नाही तर बर्‍याचदा असा वैयक्तिक निर्णय भविष्यात चुकीचा वाटू शकतो आणि म्हणून हा निर्णय घेताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
गेल्या आठवड्यात एका मिटिंगमध्ये ग्रेग नावाचा एक अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार सहकारी प्रोजेक्टमधील काही महत्त्वांच्या घटकांवर समरसून चर्चा करत होता. कामाचे काही पेपर्स माझ्या दिशेने सरकवताना त्याच्या शर्टाची बाही थोडी वर सरकली आणि त्याच्या दंडावरील राखेतून जन्म घेणारा लाल-निळा फिनिक्स पक्षी माझी नजर वेधून गेला हे त्याच्या लक्षात आले.

“आय ऍम फिनिक्स,” ग्रेग मंद हसत कुजबुजला आणि एका लेखाचा जन्म झाला.

संदर्भ :
बॉडी पिअर्सिंग ऍंड टॅटूज - जे. डी. लॉयडद बॉडी आर्ट बुक - जीन-क्रिस मिलरटॅटू - इंग्रजी विकिपीडिया
चित्रे:
अँजेलिना जोली - http://www.chinadaily.com.cn/ येथून साभार.

गजीनीमधील आमीरचे चित्र -

ममीचे चित्र - http://www.smithsonianmag.com/ येथून साभार.

Saturday, October 31, 2009

गाठ माझ्याशी आहे - २

“आई बाबा, हे बघा काय आहे माझ्या खोलीत. ” रविवारचा दिवस होता. सकाळी शम्मी उठली आणि खोलीतूनच जान्हवी आणि सुधीरला हाका मारू लागली.
“काय गं? ” म्हणत सुधीर तिच्या खोलीत शिरला आणि आतलं दृश्य बघून चकित झाला. शम्मी पलंगावर उठून बसली होती आणि थरथरत होती. तिची खोली अस्ताव्यस्त होती. कपाटातले कपडे, पुस्तकं, तिचे खेळ खोलीभर पसरले होते पण सुधीरला जाणवले ते भिंतींवर खरडलेले शब्द. शम्मीच्या खोलीतल्या सर्व भिंतींवर कुणीतरी गिचमीड अक्षरांत "घर माझं आहे. " असं अनेकदा लिहून ठेवले होते.

“हे काय आहे? ” जान्हवी आत येत म्हणाली तशी शम्मी ताडकन उठून जान्हवीला बिलगली.
“मला नाही माहीत. मी नाही केलं. मी झोपले होते. मी नाही लिहिलं भिंतीवर. ” शम्मी थरथरत होती. जान्हवीने तिला आणखी जवळ ओढले आणि तिच्या लक्षात आले की शम्मीच्या हातावर काळे निळे वळ होते. जसे काही कोणाची तरी बोटे उमटली असावीत.

“हे काय आहे गं? हे वळ कसले? ” जान्हवीने काळजीने विचारलं.
“कसले वळ आई? मला नाही माहीत. ” शम्मीने आपल्या हातांकडे पाहिलं आणि ती मुसमुसायला लागली.
सुधीरने जान्हवीला इशारा केला तशी ती शम्मीला घेऊन खोलीबाहेर आली.
“तू राजवाडेकाकांना फोन करून विचारतेस का जान्हवी? ” एकांतात सुधीरने जान्हवीला प्रश्न केला. त्याने सर्वात आधी फोन करून आपल्या साईटवरच्या माणसाला बोलवून खोली ताबडतोब रंगवून घेतली होती.
“हो विचारते पण सुधीर या घरात काही वावगं नाही ना! ”
“हम्म! काय वावगं असणार? तू फोन करून विचार काकांना. ”

राजवाडेकाका, जान्हवीच्या बाबांचे जुने मित्र. मुरलेले मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबईला त्यांची अनेक वर्षांची प्रॅक्टीस होती. आता वयोमानानुसार त्यांनी प्रॅक्टिस कमी केली असली तरी काही निवडक केसेस ते हाती घेत.

“काका, तुमचा सल्ला हवा होता. ” जान्हवीने तातडीने काकांना फोन लावला आणि घडला प्रकार सांगितला.

“वयांत येणार्‍या मुलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या बदलांबाबत इतरांशी बोलावे, अडचणी सोडवून घ्याव्यात इतक्या समजूतदारपणाची अपेक्षा त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकत नाही आणि मग या बदलांना तोंड वेगवेगळ्या प्रकारे फुटते. मुले या काळात मूडी बनतात, आई-वडिलांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, आपल्या मित्र-मैत्रिणींवर अधिक अवलंबून राहतात किंवा आपल्याकडे आईवडीलांचे लक्ष वेधून घेण्याचे नवीन मार्ग अवलंबतात. शम्मी कदाचित तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असावी. ”
“म्हणजे कसे? ” जान्हवीने कुतूहलाने विचारले.

“तुला माझी एक केस सांगतो. एका सधन, सुशिक्षित घरातील नवरा बायको येऊन मला सांगायला लागले की त्यांच्या मुलीला भूतबाधा झाली आहे. तिच्या पाठीवर कुणीतरी फुल्या काढते, तिचे केस कुणीतरी ओढते आणि असे बरेच काही. आई-वडील हा भुताखेताचा प्रकार आहे म्हणून हवालदिल झाले होते. प्रत्यक्षात मात्र वाढत्या मुलीला आपल्या व्यवसायांत सतत व्यग्र असणार्‍या आईवडीलांचे लक्ष वेधून घ्यायचे होते. त्यांना काय सांगावे कसे पटवावे हे तिला कळत नव्हते पण असे काहीतरी केल्यावर आई-वडील आपल्याकडे लक्ष पुरवतात ही कल्पना तिला आली होती. शम्मीची केसही अशीच असावी का हे तूच मला सांग. या नव्या घरात तुम्ही आलात. तिची शाळा बदलली, परिसर बदलला, मित्र-मैत्रिणी बदलल्या याचा त्रास तिला होत असावाच ना आणि तो नेमक्या शब्दांत व्यक्त करता येतही नसावा कदाचित. आणखीही काही बदल असतील तर सांग बघू. ” काकांच्या बोलण्यात तथ्य वाटत होते.
“काका, या नवीन घरात शम्मीला आम्ही तिची स्वतंत्र खोली दिली. घर मोठं आहे, खोल्याही आहेत. तिलाही पसंत होती. अक्षय मात्र अजूनही माझ्या बाजूला झोपतो. हे कारण असेल का? ”

“असावे, असू शकते. शम्मी काही फार मोठी झालेली नाही. स्वतंत्र खोली हा विचार रात्री एकटं झोपायची वेळ येईपर्यंत उत्तम वाटतो परंतु एकांतात आई आपल्या लहान भावावर आणि आपल्यावर एकसमान प्रेम करत नाही अशी भावना मनात येऊ शकेल. शम्मीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवून बघ. तिला रोज नाही तरी अधेमधे तुमच्याबरोबर झोपायचे असेल तर तशी परवानगी दे. शाळेत जाऊन तिच्या टीचर्सशी बोल. एखाद्या टीचरचा किंवा वर्गातील मुलामुलींचा तिला त्रास होतो का याची चौकशी कर.... ”

“काका, एक सहज प्रश्न विचारू? या सर्वामागे शम्मी नसून खरंच काही वेगळं असेल तर? ”“अगं वेगळं काय असणार आणि असलंच तर ते तुम्हा सर्वांनाच जाणवलं असतं ना? ”

जान्हवीच्या मनात काकांना तो भांडणाचा प्रसंग सांगण्याचे आले होते पण तिने स्वत:ला थांबवले. सुधीरच्या आणि सासूबाई-दादांच्या कानावर तिने काकांचा सल्ला घातला. सकाळी झालेल्या प्रकाराने सासूबाई थोड्या काळजीत होत्या.
“शम्मीला रात्री आमच्याबरोबर झोपू दे. नको तिला खोलीत एकटीला. माझी झोप गाढ नसते हल्ली. लक्ष राहील तिच्यावर. ”

“चालेल आई तसे करू. ” सासूबाईंचा बदलेला सूर जान्हवीला धीर देऊन गेला पण दिवसभरात तिच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरत होते. "खरंच! शम्मी असं काही करत असेल? " आणि काकांचे शब्दही मनात पिंगा घालत होते. - वेगळं काय असणार आणि असलंच तर ते तुम्हा सर्वांनाच जाणवलं असतं ना!
रात्री सासूबाईंनी शम्मीला आपल्याजवळ झोपायला घेतले. अक्षय आणि सुधीरही झोपायला बेडरूममध्ये गेले होते. मागचं उरकून जान्हवी झोपायला आली आणि गादीवर टेकली. सुधीर आणि अक्षय शांत झोपले होते. तिने अक्षयच्या अंगावरची चादर सारखी केली आणि खिडकीकडे कूस बदलली. थंडगार वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत येत होती. तिने आपल्या अंगावरही चादर ओढली अन डोळे मिटले. किती वेळ गेला कोणजाणे, जान्हवीचा डोळा लागत होता.

“घर माझं आहे. सोडून जा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. ” कुणीतरी कानात कुजबुजलं तशी जान्हवी ताडकन उठून बसली.“सुधीर, सुधीर ऊठ. कुणीतरी आहे इथे. ” जान्हवीचा आवाज घाबरा झाला होता.“काय आहे? ” सुधीर पुटपुटला.“अरे कोणीतरी कानात कुजबुजत होतं माझ्या कानात? ”“काहीतरीच काय? प्लीज झोप. मला लवकर उठायचं आहे उद्या. ”

जान्हवीने पुन्हा उशीवर डोके टेकवले. १०-१५ मिनिटे शांततेत गेली असावीत. पुन्हा तिच्या कानात तोच आवाज घुमला. यावेळेस आवाज गेल्यावेळेपेक्षा स्पष्ट होता आणि निर्जीव. जान्हवीच्या अंगावर काटा फुलला.

“सुधीर ऊठ रे. खरंच कोणीतरी आहे इथे? ”“कुठे? कोण आहे? ” सुधीर झोपाळलेल्या आवाजात म्हणाला तरी त्याने जान्हवीचा थरथरता आवाज ऐकला होता.“असं कर. तू माझ्या जागेवर झोप. मी खिडकीकडे झोपतो. ”
दोघांनी जागांची अदलाबदल केली आणि अगदी पाच मिनिटांत सुधीर घोरायला लागला. जान्हवीचा डोळा अद्याप लागला नव्हता पण तिने डोळे गच्च मिटून घेतले होते.
“च्यायला! हे काय आहे? ” आता सुधीर उठून बसला होता. “माझ्याही कानात कोणीतरी बोलत होते. इतका थंडगार निर्जीव आवाज मी कधी ऐकला नव्हता. ” त्याने जान्हवी आणि अक्षय दोघांना जवळ घेतले. जान्हवीला हुंदका फुटला.
“सुधीर, काहीतरी आहे रे या घरात. ”

“मी चौकशी करतो. आजूबाजूचे, शेजारी, दुकानदार कोणाला तरी माहीत असेलच. ” दुसर्‍या दिवशी सकाळी घराबाहेर निघताना सुधीर म्हणाला. “मी निघतो आता. तुम्ही सगळे सांभाळून राहा. ”
“सुधीर, हे घर सोडता येईल का रे? ” जान्हवी बिचकत म्हणाली. प्रश्नाचे उत्तर काय असावे ही कल्पना तिला होती.“कठिण आहे गं. पैसे गुंतवून बसलो पण तू काळजी करू नकोस. आपण मार्ग काढू. अशा घरात फार दिवस राहण्यात अर्थ नाही हे मलाही कळतंय. आई-दादा, तू, मुलं यांच्यापेक्षा पैसा मोठा नाही. तू राजवाडेकाकांना बोलावून घेतेस का? ते काय म्हणतात ते बघू किंवा एखादा शांतीपाठ करूया का?“आपण गृहप्रवेशाची पूजा घातली होतीच ना रे. असे उपाय काम करतात का ते कळत नाही. त्यापेक्षा मी राजवाडेकाकांना फोन लावते. ”

राजवाडेकाका येईपर्यंत घरात बरेच काही घडून गेले होते. कधी पावलांचे दणदणा आवाज, कधी खोल्यांतील सामान अस्ताव्यस्त होणे. एके रात्री जान्हवीला आपल्या अंगावरून कोणीतरी हात फिरवत असल्याचा भासही झाला पण तिला स्वत:पेक्षा मुलांची काळजी लागून राहिली होती. सासूबाईंचे ब्लडप्रेशरही थोडे वाढले होते. दादांनाही अस्वस्थ वाटत होते. आपल्या सर्वांव्यतिरिक्त घरात कोणीतरी आहे ही जाणीव प्रत्येकालाच होत होती. घराचे एकूण स्वास्थ्य बिघडले होते. राजवाडेकाका लोणावळ्याला आले त्यानंतरची गोष्ट...
राजवाडेकाका आणि दादा बैठकीच्या खोलीत चहा घेत बसले होते. शम्मी शाळेत, सुधीर साईटवर, जान्हवी आणि सासूबाई स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होत्या. अक्षय घरातच खेळत होता. अचानक, दादांना त्याची हाक ऐकू आली.

“आजोबा, मी उडी मारू? ”
अक्षय वरच्या मजल्यावर पायरीच्या अगदी टोकाशी उभा होता. दादांनी त्याचे बोलणे नीटसे ऐकले नव्हते.
“अरे मागे हो. किती कडेशी उभा आहेस. पडशील. ” म्हणत ते उभे राहिले.“उडी मारू का आजोबा? हा काका म्हणतोय की मार. ”

राजवाडेकाका आणि दादा दोघे ताडकन पायर्‍यांपाशी आले. दादांनी क्षणाचा उसंत न घेता पायऱ्या चढायला सुरुवात केली पण तोपर्यंत अक्षयचा पाय वरच्या पायरीवरून सटकला होता...


***
संध्याकाळी सुधीर घरी आल्यावर राजवाडेकाकांनी विषयाला वाचा फोडली. जान्हवी अक्षयला कुशीत घेऊन बसली होती. अक्षयचा पाय मुरगळला होता. तो अधेमधे कण्हत होता पण काही गंभीर झाले नव्हते. जान्हवीच्या तोंडावरची रया मात्र पार ओसरली होती. सासूबाई आणि दादांच्या तोंडावरही तणाव दिसून येत होता.

“सुधीर, हे घर घेताना चौकशी केली होती? काही पूर्वातिहास वगैरे? ” राजवाडेकाकांनी विचारले.
“पूर्वातिहास...म्हणजे” सुधीरचा आवाज अडखळला.. “या बंगल्याचा केअरटेकर होता गुलाबराव. दारुड्या होता. बंगला त्याच्या ताब्यात. मालकाच्या ऐटीत तोच वापर करत असे. माणूस मोठा रंगेल होता आणि बदमाशही असं म्हणतात. मी आजूबाजूला, किराणा दुकानात चौकशी केली तेव्हा कळलं की गेल्यावर्षी या घरातच त्याचा मृत्यू झाला. त्यात अनैसर्गिक काही नव्हते, अतिदारूपानाने मेला. दर दोन दिवसांनी बाहेरची बाग राखायला माळी येतो त्याला बंगल्यात हालचाल दिसली नाही तेव्हा घर फोडले. स्वयंपाकघराच्या भिंतीशी त्याचा देह मिळाला. ”
“काय आणि हे तू आम्हाला सांगितलेही नाहीस सुधीर. ” दादांनी काळजीने विचारले.
“दादा, मला त्यात काही गैर वाटले नाही. घर रिसेलचे होते, नवे नाही. प्रत्येक घरात काही ना काही किस्से घडलेले असतातच. ”
“गैर वाटले नाही? पोराच्या जिवावर बेतले आज. काही वेडेवाकडे झाले असते म्हणजे. गेले किती दिवस घरातले वातावरण बिघडले होते. ” सासूबाई जान्हवीकडे बघत म्हणाल्या.
जान्हवीचे डोळे पाण्याने भरले. “स्वयंपाकघरात... " तिच्या अंगावर शहारे आले. "मला या घरात राहायचे नाही. ”
“मी काही बोलू का? ” राजवाडे काका म्हणाले. “मला अक्षयला काही विचारायचे आहे. अक्षय राजा, तुला कोणी सांगितले पायरीवरून उडी मारायला? त्या काकाला काही नाव आहे का? ”
“लाकशश काका. ”
“काय म्हणतोय गं हा? ” राजवाडेकाकांनी काही न कळून विचारले तशी जान्हवीने अक्षयला पुन्हा तोच प्रश्न केला.
“लाकशश काका. त्या भिंतीवर होता ना. ” स्वयंपाकघराकडे बोट दाखवत अक्षय म्हणाला.
“राक्षस काका" विस्मयाने जान्हवी म्हणाली आणि तिला त्या भिंतीवरील धब्ब्यांची आठवण झाली. त्या धब्ब्यांत अक्षयला राक्षस दिसला होता आणि तो गुलाबराव त्याच भिंतीपाशी.... तिने अक्षयला जवळ घेतले आणि ती मुसमुसू लागली. “माझ्या मुलांच्या जिवावर उठला आहे राक्षस मेला. ”

“किंवा तुम्हाला फक्त घाबरवायचा प्रयत्न करतो आहे. ” राजवाडेकाका म्हणाले.
“काका तुम्ही पेशाने डॉक्टर. तुमचा या अशा अमानवी गोष्टीवर विश्वास आहे? ” सुधीरने विचारले.

“याला विश्वास म्हणावे की नाही ते मला माहीत नाही. वैद्यकशास्त्रात या जगातील प्रत्येक गोष्ट नमूद आहे असे नव्हे. इथे या घरात भूत, पिशाच्च, हैवान आहे असंच मला म्हणायचं नाही. कदाचित, चुंबकीय क्षेत्र असेल, एखादी ऊर्जा किंवा शक्ती असेल पण सोयीसाठी गुलाबरावाचे भूतच आहे असे मानू. प्रश्न हा आहे की ही शक्ती तुमच्या जिवावर उठली आहे किंवा तुम्हाला घाबरवते आहे का? तर मला वाटते हो. सध्या घाबरवते आहे पण तुम्ही घाबरत नाही म्हटल्यावर पुढचा प्रयत्न करून बघेलच आणि हे काही भूतपिशाच्चांबाबत होते असे नाही तर आपण सर्वच एक उपाय चालत नाही म्हटल्यावर दुसरा करून बघत असतो त्यातलाच प्रकार आहे.

आपण मानूया की इथे गुलाबराव नावाचा अमानवी हैवान आहे आणि पुढे चलू. गुलाबराव या घराशी बांधलेला आहे. त्याच्या नजरेत तुम्ही परके आहात आणि या घरावर कब्जा करून आहात. म्हणतात की कधीतरी काळ एका क्षणी गोठतो. ती ऊर्जा त्या जागी, त्या वेळी सीमित होते. वैज्ञानिक भाषेत याची तर्कनिष्ठता पडताळून पाहता येईलच असे नाही पण गुलाबराव या घराशी अद्याप बांधलेला आहे हे टाळता येत नाही. आता पुढचे तुम्ही ठरवायचे. एक कुटुंब म्हणून तुम्हाला या घरात राहायचे आहे का ते? मला असं वाटतं की हे प्रकार बंद होणार नाहीत. पूजापाठ, शांतीपाठ यांनी फरक पडतो असे मला वाटत नाही. फारतर वातावरण बदलते, श्रद्धेचे बळ मिळते. अशा बदलेल्या वातावरणाचा फायदा तुम्हाला होईल पण तो तात्पुरताही असू शकतो. ”

“मला अजिबात इथे राहायचे नाही. ” जान्हवीने निकराने सांगितले. “माझ्या मुलांना घाबरवेल, त्यांच्या जिवावर उठेल अशा जागी मला राहायचेच नाही. काका, हे घर सोडले तर हा उच्छाद थांबेल ना. हे घर त्या गुलाबरावालाच लखलाभ होवो. ”

“थांब! इथे मुलांना घाबरवण्याचे प्रयत्न आहेत असं मला वाटत नाही. एक लक्षात घे. या घरातली सर्वात घाबरलेली व्यक्ती आहेत तू. तू दिवसभर घरात असतेस, तुला मुलांची काळजी आहे, घराची, नवर्‍याची, सासू-सासर्‍यांची काळजी आहे. मी तुला म्हटले तसे ही शक्ती या घराचा ताबा मागते आहे, या घरावर मालकी हक्क दाखवते आहे. अनेकांचे अनुभव सांगतात की अशा शक्ती त्या जागेपुरत्या मर्यादित असतात. घर सोडणे हा उत्तम पर्याय आहे पण अशा शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाही. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत. गुलाबराव या घराशी बांधलेला आहे. त्याची इच्छा, वासना, हक्क या घरावर असल्याचे तो तुम्हाला दाखवून देतो आहे. मला वाटतं की विषाची परीक्षा न बघता तुम्ही हे घर सोडावेत. बाकी निर्णय तुमचा आहे. ” राजवाडेकाकांनी सुधीरकडे पाहत म्हटले.

“काका, घर सोडणे ही काही सोपी गोष्ट नाही. ”

“अरे, हा रोजचा त्रास आणि भीती बाळगणं सोपं आहे का रे? ” सासूबाई अक्षयच्या पायावरून हलकेच हात फिरवत म्हणाल्या. दादांनीही राजवाडेकाकांच्या मताला अनुमोदन दिले. जान्हवी तर काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हती. शेवटी, सुधीरने मुंबई-पुण्यात निदान भाड्याने घर घ्यावे असे ठरले आणि तोपर्यंत शांतीपाठ करून घ्यायचा असा सर्वांनी निर्णय घेतला.

***

घर घेई-घेईपर्यंत पुढचे तीन चार महिने गेलेच. साग्रसंगीत शांतीपाठाने घरातले वातावरण निवळल्यासारखे झाले होते. या तीनचार महिन्यांत त्रास झाला नाही असे नाही पण जिवावर बेतेल असे काही झाले नाही. कदाचित, लवकरच आपल्याला घराचा ताबा मिळणार आहे हे गुलाबरावलाही कळले असावे.
कोथरुडसारख्या गजबजलेल्या वस्तीत सुधीरने फ्लॅट घेतला तेव्हा जान्हवीला हायसे वाटले. शहरात वातावरण कसं मोकळं असतं. माणसांची, वाहनांची वर्दळ, रोजच्या कामांत माणूस इतका गुंतलेला असतो की वेडेवाकडे विचार करायलाही त्याला वेळ नसतो. शाळेचे वर्ष संपत असताना शम्मीची ऍडमिशन होणे कठिण झाले होते पण ओळखी काढून सुधीरने कशीबशी शम्मीच्या शाळेची व्यवस्थाही केली. जान्हवीने अक्षयलाही बालवाडीत घातले होते. पुढल्या वर्षी त्याचीही शम्मीच्या शाळेत ऍडमिशन होणार होती. या नव्या घरात कसं सर्व सुरळीत झालं होतं.
दुपारची वेळ होती. बाहेर टळटळीत ऊन पडले होते. शम्मी आणि अक्षय दोघेही शाळेत गेले होते. बेडरूममध्ये जान्हवी धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करण्यात मग्न होती. रस्त्यावरील रहदारीचा आवाज तिला सुखावून जात होता. मध्येच रस्त्यावर ओरडणारा फेरीवाला सर्व काही आलबेल असल्याचं सांगून जात होता. बेडरूमच्या खिडकीकडे तिची नजर गेली आणि तिला लोणावळ्याच्या घरातल्या मोठ्या खिडक्या आठवल्या. त्या खिडक्यांपेक्षा शहरातली ही काडेपेटीसारखी खिडकीच बरी. तिच्या डोक्यात विचार आला आणि ओठांवर स्मितहास्य.

“जान्हवी, इथे जरा स्वयंपाकघरात येतेस का? ” सासूबाई स्वयंपाकघरातून बोलावत होत्या.
“आले हं! ” जान्हवीने हातातील शर्ट टाकला आणि ती बेडरूमच्या दरवाज्याकडे वळली. दारात तिची पावलं एकदम थबकली. तिला आठवलं की आज ती घरात एकटीच होती. सासूबाईंना झाल्या प्रकारातून थोडासा बदल हवा होता म्हणून दादा आणि सासूबाई आज सकाळीच मेधाकडे बडोद्याला गेले होते. जान्हवीच त्यांना सकाळी बसमध्ये बसवून आली होती.

राजवाडेकाका म्हणाले होते, ' या शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाहीत. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत.'

गुलाबराव आता त्या घराशी बांधलेला नव्हता.....

(एका तथाकथित सत्यघटनेवर आधारीत)
हॅपी हॅलोवीन

गाठ माझ्याशी आहे - १

"बरं, ते काय आहे सांग बघू. " जान्हवीने आकाशातून स्वस्थ विहरणार्‍या ढगाच्या एका लहान पुंजक्याकडे बोट दाखवले."अम्म्म.... ते माऊ आहे. " अक्षय खिदळत म्हणाला आणि जान्हवी त्याच्या हसण्यात सामील झाली.

मायलेकांचा हा खेळ दर संध्याकाळी चाले. मुंबईच्या उपनगरातल्या इमारतीच्या लहानशा खिडकीतून दिसणार्‍या टीचभर आकाशात ढगांचे विविध आकार शोधायला जान्हवीने अक्षयला शिकवले होते. सुधीरची वाट बघता बघता अंधार पडायचा. दादा आणि सासूबाई फिरायला बाहेर तरी जायचे. शम्मीच्या अभ्यासामुळे जान्हवीला तेही करता येत नव्हते. सकाळी सहा वाजता उठून सुधीरचा डबा, मुलांचे डबे, शाळा, सकाळचा स्वयंपाक, बाजारहाट, संध्याकाळचा स्वयंपाक, मुलांचे अभ्यास यांत जान्हवीचा जीव मेटाकुटीला येत असे. सुधीरला गेले सहा महिने पुणा-मुंबई हायवेवर एका रिसॉर्टच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले होते. तो आठवड्यातले २-३ दिवस तिथेच राहत असे. मध्येच यावंस वाटलं तर उठून रात्री उशीरा घरी येई आणि सकाळीच उठून चालता होई. सासूबाईंची तब्येतही गेले काही दिवस नरमच होती. बीपी वाढले होते, डायबिटीसही सुरू झाला होता. त्यांचं पथ्यपाणी बघावं लागे. संसाराच्या रगाड्यात जान्हवी पिचून जात होती. अडीच वर्षांचा अक्षयच काय तो तिचा विरंगुळा होता.

"आई, झाला होमवर्क. मी थोडावेळ टीव्ही बघू? " शम्मी विचारत होती.
"हो बघ. " जान्हवी खिडकीतून उठत म्हणाली. संध्याकाळचे साडेसात वाजत आले होते. आज शुक्रवार असल्याने सुधीर घरी यायचा होता. जान्हवीने त्याचा मोबाईल नंबर फिरवला."सुधीर, निघालास का रे? कधीपर्यंत पोहोचतो आहेस? "

"हो हो निघालो आहे. पोहोचेन तासा-दोन तासांत. ट्रॅफिकवर अवलंबून आहे गं. तसं फारसं ट्रॅफिक नाहीये आज. बऱ्यापैकी वेळेत पोहोचेन म्हणतो. तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. घरी आल्यावर बोलू. पोरांना जेवायला वाढून झोपायला सांग. बाबा उद्या खेळेल म्हणावं. बाहेरही घेऊन जाईल किंवा त्यांना सांग की मला यायला थोडा उशीरच होणार असं. आई-बाबांना मात्र थांबायला सांग. तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे. बरं ठेवतो. " सुधीरने मोबाईल बंदही करून टाकला.

जान्हवीने ओठ मुडपला. 'असं काय सांगायचं आहे याला? आणखी एखादे प्रोजेक्ट मिळाले असेल. आता उरलेल्या दिवशीही घरी येत नाही, असे सांगतो का काय? ' जान्हवीच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पडले आणि तेवढ्यात दाराची बेल वाजली.

शम्मीने धावत जाऊन दार उघडले. संध्याकाळचा फेरफटका मारून सासूबाई आणि सासरे परतले होते. "अगं, कोपर्‍यावरच्या भय्याकडे ताजी मेथी दिसत होती. मी दोन जुड्या आणल्या. उद्या सकाळी पालेभाजी करूया. मी मेथी निवडून ठेवते, " म्हणत सासूबाई घरात शिरल्या आणि थेट स्वयंपाकघरात घुसल्या. त्यांच्या मागोमाग जान्हवीही स्वयंपाक घरात आली. "मी पोळ्या करायला घेते. सुधीरला फोन केला होता, दोन तासांत येईल म्हणाला. "

"माझ्यासाठी एकच लाट गं पोळी. संध्याकाळचं नको वाटतं हल्ली जड खाणं. मी येऊ का मदतीला? ""नको. आधी मुलांसाठी करते. त्यांना जेवायला वाढते आणि मग आपल्या करते. " जान्हवी सासूबाईंशेजारी गेली. "म्हणत होता काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मुलांना झोपव. " जान्हवी हलकेच म्हणाली."हं! आता काय बाई आणखी नवीन? " सासूबाईंनी डोळे मोठे केले तशी जान्हवीने खांदे उडवले. सासूशी जान्हवीचे सूत जमत होते. जान्हवी कॉलेजात असताना तिची आई गेली. आपल्या सुनेला आई नाही याची खंत जान्हवीच्या सासूला होती. त्या प्रेमाने जान्हवीचे करत. सुधीर एकटाच मुलगा त्यामुळे त्याच्यावरच आई वडिलांची जबाबदारी होती. त्यांची मोठी मुलगी मेधा बडोद्याला असे. तिच्याकडेही कधीतरी सासू-सासऱ्यांचे जाणे होई पण सासूबाईंची तब्येत हल्ली मलूल झाल्यापासून त्यांनी बाहेरगावी जाणे बंद केले होते.

घरातल्या कामांत, मुलांचं पाहण्यात त्यांची पूर्वी खूप मदत व्हायची पण आताशा तब्येत खालावल्यापासून त्या स्वतःला सांभाळूनच सर्व करत. जान्हवीलाही त्याची जाणीव होती.

मुलांची जेवणं उरकली तशी जान्हवीने 'बाबाला यायला उशीर होणार आहे. बाबा उद्या तुम्हाला बाहेर घेऊन जाईल. आता झोपायला जा. ' अशी समजूत घालायला सुरुवात केली. अक्षयला फारसा फरक पडला नव्हता. तसाही त्याला जान्हवीचा लळा जास्त होता. शम्मी मात्र हिरमुसली झाली होती. तिची समजूत काढता काढता जान्हवीच्या नाकी नऊ आले. शेवटी, दादांनी तिला गोष्ट वाचून दाखवण्याचे कबूल केले तशी ती आजोबांबरोबर पाय आपटत का होईना पण झोपायला गेली. पावणे दहाच्या सुमारास सुधीर परतला तोपर्यंत मुले झोपली होती.

"लवकर येत जा रे. किती उशीर करतोस? जेवायचे थांबले आहेत सगळे. " घरात शिरतानाच आईंनी सुधीरला दटावले."अगं आई, तू जेवून घेत जा ना. तुला आताशा बरं नसतं, कशाला उशीरापर्यंत जेवणाची वाट बघत बसता. मी जान्हवीलाही सांगितलं आहे की तू जेवून घेत जा मुलांसोबत. " बुटांचे बंद सोडता सोडता सुधीर म्हणाला."अरे, तू कधी येतोस कधी येत नाहीस. आलास तरी उशीरा उगवतोस. काळजी वाटत राहते रे. घास उतरत नाही घशाखाली. त्यापेक्षा थांबलेलं बरं, " सुधीरच्या आई टेबलावर ताटं मांडत म्हणाल्या."काळजी नको गं करूस? मी काय अक्षयच्या वयाचा आहे का आता? चल जेवायला बसूया. जान्हवी तू पण ये गं. " म्हणत सुधीर बेसिनपाशी हात धुवायला गेला.

जान्हवीने सुरण आणि वांग्याची भाजी ताटात वाढली. काळ्या वाटाण्यांची आमटी वाटीत काढली आणि दोन गरमा गरम फुलके प्रत्येकाच्या ताटात वाढले. सुधीरला जेवताना काहीतरी गोड लागते म्हणून सासूबाईंनी केलेला आंब्याचा मुरंबाही वाढला आणि सगळे जेवायला बसले.

"पोरं झोपली का गं? " सुधीरने पहिला घास तोंडात टाकायच्या आधी प्रश्न केला.
"हो रे झोपली. काहीतरी सांगायचं म्हणत होतास ना. तूच म्हणालास की झोपव. शम्मी कुरकुरत होती पण झोपली एकदाची. " जान्हवी म्हणाली.
"अगं हो, तसं त्यांच्यापासून लपवण्यासारखं काही नाही. निवांत बोलायला मिळावं म्हणून त्यांना झोपव म्हटलं. "
"आणखी एखादं प्रोजेक्ट गळ्यात बांधून घेऊ नकोस म्हणजे झालं. त्या पोरांना बाप, जान्हवीला नवरा आणि आम्हाला मुलगा म्हणूनही कधीतरी वेळ देत जा. स्पष्टच सांगतो. " दादांनी सुधीरच्या मनातलं जसं काही ओळखलंच होतं.
"दादा, नवं प्रोजेक्ट तर आहेच. धंदा जमतो आहे. चांगली संधी मिळाली तर सोडवत नाही. उद्याचं कोणी पाहिलं आहे. दिवस बरे आहेत. हवी तशी संधी चालून आली आहे. सोडावी कशी? " सुधीर आवाज पाडून म्हणाला.
"अरे पण.. " आईंनी जान्हवीकडे बघत म्हटले. जान्हवी गप्प होती. डोकं खाली करून पोळीचे तुकडे करत होती.
"अगं आई, ऐक तर खरी. लोणावळ्यापासून २५ एक किलोमीटर आत एक नवा रिसॉर्ट बनतो आहे. दोन वर्षांचं प्रोजेक्ट आहे. ज्या बिझनेसमनचं आहे त्याने या कामावरून लोणावळा आणि पुढे पुण्याजवळ आणखी कामे मिळवून देईन अशी ऑफर दिली आहे. माझी सगळी कामाची माणसंही तिथेच राहतात. एक मीच ये-जा करतो मुंबईपर्यंत. "
"तिथेच राहणार का रे मग तू आता? " जान्हवीने एकदाचे तोंड उघडले. तिच्या आवाजातली निराशा स्पष्ट जाणवत होती.
"हो असं म्हणतो आहे खरं. " मंद हसत सुधीर म्हणाला "पण एकटा नाही, आपण सर्वांनीच तिथे शिफ्ट करूया असा विचार करत होतो. "
"काऽऽय? हे मुंबईतलं घर सोडून लोणावळ्याला? " जान्हवी वैतागून म्हणाली.

"मग त्यात वाईट काय? तूच विचार कर. या लहान घरात इतक्या माणसांची किती कुतरओढ होते. मुलांना बाहेर खेळायला धड जागा नाही. दादा-आई संध्याकाळचे ट्रॅफिकमध्ये जीव मुठीत धरून फिरायला जातात. मला रोज घरी यायला जमत नाही. तुला सगळ्यांचं काम पडतं. मुंबईत नोकर टिकत नाहीत. या मुंबईच्या प्रदूषणात आईची तब्येत म्हणावी तशी सुधारत नाही. पोरं मला भेटायला आतुर असतात. या सगळ्यापेक्षा आपण सर्व एकत्र एके ठिकाणी राहिलो, बंगल्यात... तर... " बंगल्यावर जोर देत एका दमात सुधीरने सर्व यादी दिली.
"बंगल्यात? " जान्हवी आश्चर्याने म्हणाली.

"तलवारसाहेबांनी, म्हणजे हे नवं प्रोजेक्ट ज्यांचं आहे त्यांनी, एक बंगला दाखवला त्यांच्या मित्राचा. मित्र मुंबईत राहतो पण सुट्टीत म्हणून बंगला बांधला होता लोणावळ्याला. मध्यंतरी त्यांची बायको गेली. त्यांचंही आता वय झालं तसं त्यांच्याच्याने आडगावी जाणं होत नाही. बंगल्याचा केअर टेकर होता म्हणे इतके वर्ष पण तोही आता राहिला नाही तेव्हा ते बंगला विकायचं म्हणत होते. तलवार म्हणाले की मी मध्यस्थी करतो. तुम्हा सर्वांना पसंत असेल तर रविवारीच बोलणी करता येतील. " ताटावरून उठत सुधीर म्हणाला.

जान्हवीची आणि सासूबाईची नजरानजर झाली पण दोघी काहीच बोलल्या नाहीत. दादा पानावरून उठताना तोंडात पुटपुटले, "सर्व ठरवूनच आला आहे हा. "

स्वयंपाकघरातलं आवरून जान्हवी बेडरूममध्ये शिरली तेव्हा तिचा चेहरा साफ पडलेला होता.

"अगं काय जान्हवी. मुंबईपेक्षा लोणावळा चांगला नाही का? आणि लोणावळा म्हणजे काही खेडेगाव नाही. " सुधीर पलंगावर फायली मांडून पाय ताणून बसला होता. जान्हवीने त्या फायली एक एक करून बंद करायला सुरुवात केली. "अगं, लोणावळ्याला राहिलो तर हा एकांताचा वेळ मलाही मोकळा मिळेल ना. घरी कामं घेऊन यायला नको. " सुधीरचा स्वर समजुतीचा होता.

"हो रे पण शम्मीची शाळा, तिच्या मित्र-मैत्रिणी, आपला शेजार सगळं सोडून जायचं? आणि शम्मी मोठी झाली की कॉलेजसाठी पुन्हा मुंबई पुण्याला नको का यायला? "

"अगं, तेव्हाचं तेव्हा बघू. धंद्यात जम बसला की पुण्याला फ्लॅट घेता येईल. आई-दादांचंही तोपर्यंत कसं असेल काही सांगता येतं का? ही काही वर्षं आपण सर्वांनी मजेत मोठ्या घरात घालवली, आई दादांना-पोरांना मोकळं फिरता-खेळता आलं तर काही बिघडणार आहे का? लोणावळ्याला चांगल्या शाळा आहेत. मी चौकशी करून ठेवली आहे. "

"हम्म! तू सर्व काही ठरवूनच आला आहेस सुधीर. " जान्हवीला आपलं काही चालणार नाही याची जाणीव झाली.
"नाही गं। शम्मीला विचारूया. ती तयार असेल तर जाऊ. अक्षय लहान आहे. लहान मुलं चटकन मागचं विसरतात पण शम्मीला शाळा सोडताना, मित्रमैत्रिणी सोडताना त्रास होईल हे कबूल आहे. आपण तिच्याशी बोलूया. ती मानली तरच जाऊ. " सुधीर नरमाईने म्हणाला पण जान्हवीला एव्हाना खात्री झाली होती की आपण आता लोणावळ्याला जाणार.


***
बंगल्याबाहेर गाडी थांबली तसा सुधीर झटकन उतरला आणि मोठ्या झोकात वाकून त्याने जान्हवीसाठी दरवाजा उघडला.
"उतरा मालकीणबाई. "

जान्हवीने गाडीतून उतरून सभोवार नजर टाकली. रस्त्यावर एकापेक्षा एक सुंदर बंगल्यांची रांग होती. सकाळच्या उन्हात तलवार साहेबांचा बंगला तळपून निघाला होता. प्रथमदर्शनातच जान्हवीला बंगला आवडून गेला. सुधीरने फाटकाचं कुलूप उघडलं आणि दोघेही आत आले. गेटमधून गाडी आत घेता येईल इतक्या जागेवर डांबरी सडक होती पण सुधीरने गाडी बाहेरच उभी केली. बंगला अद्याप त्यांच्या नावावर व्हायचा होता. सडकेच्या दुतर्फा हिरवळ वाढली होती पण अंगण चांगलं राखलेलं होतं. लगबगीने जाऊन सुधीरने दाराचे कुलुप काढले आणि दरवाजा उघडला.

सकाळचे ऊन घरात पडले होते. जान्हवीने भराभरा सर्व खोल्यांत जाऊन घराची पाहणी केली. घर प्रशस्त होते. मोठ्या हौसेने बंगला बांधला असावा हे पाहता क्षणीच लक्षात येत होते. मुख्य दरवाज्यासमोर बैठकीची खोली, तिथून वरच्या मजल्यावर जाण्यास जिना आणि स्वयंपाक घराचे प्रवेशद्वार. स्वयंपाक घराला लागून डायनिंग रूम आणि त्यानंतर एक बेडरूम. वरच्या मजल्यावर तीन बेडरूम होत्या. मास्टर बेडरूम घराच्या एका टोकाला होती. जान्हवीला ती पाहता क्षणीच आवडली. प्रायव्हसी असावी तर अशी. बेडरूमला मोठी खिडकी होती. ती पाहून जान्हवीला मुंबईच्या घराची खिडकी आठवली. तिने खिडकी उघडली आणि खिडकीतून टेकड्या आणि वनराईचे दृश्य बघून ती हरखून गेली. आकाशात ढगांचा पुंजका धीम्या गतीने विहरत होता. तिला चटकन अक्षयची आठवण आली.

"पायर्‍यांवर सांभाळायला हवं नाही अक्षयला. त्याला घरात जिना असण्याची सवय नाही. " जान्हवी म्हणाली.
"अगं, होईल सवय. " बेफिकिरीने सुधीरने उत्तर दिले.

स्वयंपाकघर प्रशस्त होते. जान्हवीला पाहताक्षणीच ते आवडले. इंग्रजी एलच्या आकारातले प्रशस्त ओटे, त्यावरील कॅबिनेट्स, भिंतीतलं लाकडी कपाट. स्वयंपाकघराच्या एका भिंतीवर धब्बे दिसत होते.
“सुधीर अरे इथे पाणी गळतंय असं दिसतंय. बघ लीकेज आहे कुठेतरी भिंतीत. ”“अगं, हा मी घरचा प्लंबर आहे. काळजी कशाला करतेस. मी बोलावून घेतो काही मजूर आणि कामाला लावतो. घरात इतर कुठे काही डागडुजी करायची आहे ती देखील करून घेऊ आणि रंगही देऊ, राहायला यायच्या आधी. फक्त तुला घर आवडलं म्हणून सांग की झालं. ”

घरात न आवडण्यासारखं काही नव्हतंच. बाजारहाट, शाळा, डॉक्टर सर्वांची चौकशीही सुधीरने करून ठेवली होती. घर मोक्याच्या ठिकाणी होते.

“आपला मुंबईचा फ्लॅट विकायचा का रे? ठेवला तर भविष्यात उपयोगाला येईल ना! पुढे मागे शम्मी कॉलेजात गेली की. ”“अगं, मुंबई नको वाटते बघ आणि या बंगल्यासाठी पैसे उभारायचे तर तो फ्लॅट विकूनच उभारायला हवेत आणि फार पुढचे विचार करू नकोस गं. शम्मीला कॉलेजात जायला अजून वेळ आहे. तेव्हाचं तेव्हा बघू. ” जान्हवी बेत फिसकटवते की काय असा सूक्ष्म विचार सुधीरच्या मनात आला.“बरं! घर छानच आहे. तू करून घेतोस ना जरा रंगरंगोटी वगैरे. ” जान्हवी म्हणाली आणि सुधीरला हायसं वाटलं.

मे महिन्याच्या शेवटी सुधीर आणि जान्हवीने संसार लोणावळ्याला हालवला. शम्मीच्या शाळेची ऍडमिशन झाली होती. सुधीरने घराची डागडुजीही करून घेतली होती. बागेसाठी माळी आणि घरकामासाठी बाईही ठेवून घेतली. सुधीरने आपल्या काही माणसांच्या मदतीने घर लावून घेतलं. जान्हवी आणि सासूबाईंना फारशी दगदगही होवू दिली नाही. संध्याकाळच्या सुमारास जान्हवी, मुले आणि सुधीरचे आईबाबा पोहोचले तेव्हा हे घर राहते नाही असे कोणालाही वाटले नाही.

अक्षय मात्र आल्यापासून जरा नाखूश होता. त्याला नेमकं काय सांगावं हे कळत नव्हतं पण आपण आपल्या घरी कधी जायचं असं त्याने जान्हवीला दोन-चारदा विचारलं. आता हेच आपलं घर आहे हे त्याला कसं समजावून सांगावं हे जान्हवीला कळत नव्हतं.

दुसर्‍या दिवशी सकाळीही अक्षय सर्वात आधी उठून बसला. “मलाही नं जरा वेगळं वेगळं वाटतंय. मुंबईच्या काडेपेटीसारख्या घरात राहण्याची सवय झाली होती. ” जान्हवी सुधीरला म्हणाली. “आपण गृहप्रवेशाची पूजा करायची का रे? ”

“करू ना. जरा सर्व स्थिरस्थावर होऊ दे मग सावकाश करूया. ”“बरं. त्यानिमित्ताने जरा आजूबाजूच्यांशी ओळखीही होतील. ” जान्हवीने अक्षयला उचलले आणि ती बेडरूमच्या बाहेर आली.“हे बघ. जिना हळूच उतरायचा. गडगडशील हं नाहीतर आणि भू होईल. चल आपण दूदू पिऊया. ”

जान्हवीने अक्षयला ओट्यावर बसवला आणि दुधाची पिशवी फोडून तिने दूध गरम करायला ठेवले. “नीट बस हं. एकदम उडी मारू नकोस. ” नव्या घराची अक्षयला ओळख करून देताना सर्व सूचना देणेही गरजेचे होते.

"लाकशश"
“काय रे? ”
“आई तो बग, लाकशश" अक्षय स्वयंपाकघराच्या भिंतीकडे बोट दाखवत म्हणाला. जान्हवीने वळून पाहिले तर भिंतीवर पुन्हा पाण्याचे धब्बे दिसत होते.

“सुधीर ए सुधीर. हे बघ रे काय? ” जान्हवीने सुधीरला हाक दिली.
सुधीर खाली येईपर्यंत सासूबाईही स्वयंपाकघरात पोहोचल्या होत्या. “अगं काल नव्हते हे डाग. ”
“हो नं, आम्ही पहिल्यांदा घर बघायला आलो ना तेव्हा होते डाग आणि सुधीर म्हणाला की मी रिपेअर करून घेतो. असं रे काय काम करतात तुझी माणसं? ”

सुधीर डोळे विस्फारून भिंतीकडे बघत होता. “असं कसं झालं बुवा? मी स्वत: हजर होतो काम सुरू होते तेव्हा आणि मी इतरांच्या कामात हलगर्जी करत नाही तर स्वत:च्या घरात कसा करेन? ”

“पावसाळा सुरू होईल रे लवकर आणि मग आणखी गळायला लागेल. छतावरून तर गळत नाहीये ना पाणी. माणसांना जरा वर चढून बघायला सांग. डांबर घालायचं असेल गच्चीवर तर घालून घेऊ. ” दादांनी स्वयंपाकघरात डोकावत सल्ला दिला.
“मी करून घेतो. रंगाचा हातही पुन्हा द्यायला सांगतो. ” उतरत्या आवाजात सुधीर म्हणाला.

पावसाळा सुरू होऊन महिना झाला होता. गेले दोन चार दिवस पावसाची संततधार लागली होती. शम्मी दुपारी शाळेतून येऊन वरच्या मजल्यावर अभ्यासाला बसली होती. दादा आणि सासूबाई मराठी सिरियल बघण्यात दंग होत्या आणि अक्षय दुपारची झोप काढत होता. साडेतीन वाजून गेले तशी जान्हवी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. चहाचे आधण ठेवले तशी वरच्या मजल्यावरून पावलांचे दाण दाण आवाज ऐकू येऊ लागले.

“ए शम्मी! नाचत्येस का गं? अभ्यास कर. ” जान्हवी खालूनच ओरडली.
“नाही आई अभ्यास करत्ये. ”

जान्हवी पुन्हा चहाकडे वळली पण पावलांचा दणदणाट कमी झाला नाही. जान्हवीने गॅस बंद केला आणि ती वरच्या मजल्यावर गेली. “शम्मी तुला सांगितलं ना एकदा की इतक्या जोरात नाचू नको. करत्येस काय नक्की? उड्या मारत्येस का? ” जान्हवी शम्मीच्या खोलीत डोकावली.

“नाही आई. अभ्यास करत्ये. सायन्सच्या मिसने केवढा होमवर्क दिला आहे माहित्ये. ” शम्मी जमिनीवर पुस्तकांचा पसारा मांडून बसली होती.
“खोटं! मी खाली होते तर पायांचा दणदणा आवाज येत होता. तो तू नाहीस तर कोण करत होतं? ” जान्हवी आवाज मोठा करून म्हणाली. शम्मी मुद्दाम खोडकरपणा करत असावी.
“हे काय गं आई! यू डोंट बिलीव मी. मी सांगितलं ना की अभ्यास करत होते. ” शम्मीचा आवाज रडवेला झाला. हे अस्त्र आईवर हमखास काम करते हे तिला माहीत होते.
“बरं बरं! कर अभ्यास. ” जान्हवी जिना उतरून खाली आली. पुन्हा आवाज आला तर हळूच जाऊन शम्मीला एक धपाटा घालायचे तिने ठरवले होते पण पुन्हा आवाज आला नाही.

काही दिवसांनंतरची गोष्ट. सुधीर सकाळीच घराबाहेर पडला होता. जाताना शम्मीला शाळेत सोडून जाणार होता. जान्हवी मागचं उरकत होती. सासूबाई आणि दादा दोघेही आज त्यांच्या खोलीबाहेर आले नव्हते म्हणून शेवटी जान्हवीने जाऊन त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. दादांनी दार उघडले. सासूबाई पलंगावर बसल्या होत्या.

“हे काय आई? बरं आहे ना, बाहेर नाही का यायचं? चहा निवून गेला. ”
“तिला म्हणावं की तू जा. येईन मी बाहेर मला यायचं तेव्हा. उगीच मनकवडेपणा करण्याची गरज नाही. ” सासूबाई फणकार्‍याने म्हणाल्या.
“अं! असं काय झालं? ” काही न कळून जान्हवीने विचारले.
“काही नाही. तू जा इथून. तुझ्याशी एक शब्दही बोलण्याची इच्छा नाही माझी. ” सासूबाईंचा हा अवतार जान्हवीला नवा होता.
“अहो पण काय झालं ते तरी सांगा. चुकलं का आमचं काही? सुधीर काही म्हणाला का? ”
“सुधीर कशाला काही म्हणायला? आम्ही आमच्या मुलाला चांगले संस्कार दिले आहेत. आई बापांना उलटूनही बोलत नाही तो कधी. शिव्याशाप तर दूरची गोष्ट. ”
सासूबाई काय बोलताहेत त्याचा अर्थ जान्हवीला लागत नव्हता. “कोणी शिव्याशाप दिले? मला सांगता का आई की काय सुरू आहे. ”
“तू दिलेस. ऐकले आम्ही काल रात्री. तू भांडत होतीस सुधीरशी तो काल रात्री उशीरा आला म्हणून आणि इतक्या घाणेरड्या शिव्या तुझ्या तोंडात. शी शी! आमच्या कानावर पडल्या तर आम्हालाच लाज वाटली. काय बिघडवलं आहे गं सुधीरने तुझं? घरासाठीच खपतो ना आणि त्याला इतक्या अर्वाच्य शिव्या? त्याची आई आहे मी. ऐकवल्या नाहीत. “ सासूबाईंनी तोंड वेंगाडले.

"काहीतरीच काय बोलताय आई? मी कशाला सुधीरला शिव्या घालू? असं का म्हणताय तुम्ही तेच कळत नाही मला. माझं आणि सुधीरचं मोठ्या आवाजात बोलणंही नाही झालं काल. भांडण तर नाहीच नाही. सुधीर उशीरा आला ही गोष्ट खरी पण तो इतका थकला होता की जेवला आणि सरळ वर झोपायला गेला. मी मागचं उरकून वर जाईपर्यंत त्याला झोपही लागली होती. ”

“मग मी ऐकलं ते खोटं की मला तुझा आवाज कळत नव्हता? यांनी थांबवलं म्हणून नाहीतर मी तेव्हाच बाहेर येणार होते. ”
जान्हवीने दादांकडे पाहिलं, “दादा तुम्हीही? ”
“जे ऐकलं ते किळसवाणं होतं. निदान बायकांच्या तोंडीतरी.. जाऊ दे! याबाबतीत मला अधिक काही बोलायचं नाही. ” दादांनी मान फिरवली.

जान्हवीच्या डोळ्यांत पाणी तरारलं. तिने हात तोंडावर दाबला आणि ती धावतच वरच्या मजल्यावर बेडरूममध्ये धावली आणि पलंगावर झोकून देऊन तिने अश्रूंना मोकळीक दिली. दिवसभरात सासूबाई फारशा खोलीबाहेर आल्याच नाहीत. दुपारचे जेवणही त्यांनी टाळले तशी जान्हवीने फोन करून सुधीरला लवकर घरी यायला सांगितले. संध्याकाळी सुधीर घरी आल्यावर तिने हळूच त्याच्या कानावर प्रकार घातला. त्यालाही आईच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटले. त्याने समजुतीने आई-वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण फारसा उपयोग झाला नाही. निदान सुधीरच्या समजवण्याने त्या दोघांनी रात्री दोन घास तरी खाल्ले.

संपूर्ण दिवसभर जान्हवीचे तोंड उतरले होते. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला तोंड दाबून स्वीकारावी लागत होती. रात्री खोलीत थोडा एकांत मिळाला तेव्हा तिने ही व्यथा सुधीरकडे बोलून दाखवली.
“काही कळत नाही गं। आई अशी एकदम बिथरल्यासारखी का वागते आहे ते. तिला मी किती समजावण्याचा प्रयत्न केला तर म्हणाली तू बायकोची बाजू घेऊ नकोस. तुला काही स्वाभिमान आहे की नाही. ऐकूनच घेत नाही ती, आणखी काय समजावू तिला. त्यामानाने दादा निवळल्यासारखे वाटले. जान्हवी, तू समजूतदार आहेस. मला वाटतं की पुढचे काही दिवस तू मोठ्या मनाने घे. काही दिवस गेले की सर्व सुरळीत होईल. ”

जान्हवीने कूस बदलली आणि खिडकीकडे तोंड केले। बेडरूमच्या मोठ्या खिडकीतून चंद्राचे चांदणे आत येत होते. जान्हवीला मुंबईच्या घरातल्या खिडकीची आठवण झाली. पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाशात लखलखत होते. अचानक ढगाचे सावट चंद्राला ग्रासून गेले आणि खोलीही काळोखात बुडली तशी जान्हवीने डोळे गपकन मिटून घेतले. रात्री तिला विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात एक सावली तिच्या उशाशी उभं राहून तिला निरखत होती.

त्यानंतर पुढचे काही दिवस सासूबाई तुटक तुटक वागत होत्या. जान्हवीने जवळीक साधायचा प्रयत्न केला परंतु फारसा उपयोग झाला नाही. सर्वांच्याच वागण्यात एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता।
***
(क्रमश:)

Thursday, October 15, 2009

तिर्‍हाइत

आज कामाचा कंटाळा आला होता म्हणून वेळेवर घरी निघायचं ठरवलं. कधी नाही ते अनायसे रस्त्यावर ट्रॅफिकही कमी होते. मुलीला संध्याकाळी डान्स रिहर्सलला घेऊन जायचे होते म्हणून जेवणाचा करण्याचा बेत कॅन्सल होता. पिझ्झा ऑर्डर केला की काम भागणार होतं. घरी पोहचले तसे कळले की मुलीच्या मैत्रिणीची आई दोघींना घेऊन जाणार आहे. नवर्‍याला उशीर होणार आहे. प्रायवसी!!!

घरी यायला नेहमीप्रमाणे उशीर नाही, आल्यावर स्वयंपाक करायचं टेन्शन नाही, पुन्हा कुठेतरी धडपडत बाहेर पडायची घाई नाही. पावले आपोआप संगणकाच्या दिशेने वळतात. गेले दोनचार रात्री जागून एक लेख कितीतरी महिन्यांनी कसाबसा पूर्ण केला, आज काहीही उरलेले नाही... ब्लॉग लिहावा का असा विचार मनात डोकावतो आणि मन उदास होते. गेले कितीतरी महिने ब्लॉगवर चक्करसुद्धा मारलेली नाही. या महिन्यांत काही घडले नाही असे नाही। उलट बरेच काही घडून गेले पण मनात आलेले लिहावेसे वाटलेच नाही एवढेच.

इतक्या दिवसांनी पाहिल्यावर स्वत:चाच ब्लॉग परका वाटतो.

आपल्या जगात, आपल्या माणसांत आपणच तिर्‍हाइत आहोत ही जाणीव हुरहुर लावणारी आहे. एखाद्या आवडत्या गोष्टीपासून, जागेपासून किंवा व्यक्तीपासून फारकत घेतल्यावर निर्माण होणारा दुरावा मनाला बोचतो कधीतरी. नेमकं वाईट कशाचं वाटतं? माणसं, जागा आपल्याला दुरावतात याचं? कोण जाणे..दुराव्यापेक्षाही आपल्यालाही कोणीतरी इतक्याच ओढीने मिस करत असेल का हा चुकार प्रश्न मनात डोकावतो याचं. आपल्या आठवणीनेही कोणी बेचैन होत असेल का याचं आणि आपण आपल्याच विश्वात तिर्‍हाइत होतो याचं.

आणखी काय लिहावं? मगासपासून ५ वेगवेगळे परिच्छेद लिहून पुसले. म्हणजे लिहिण्यासारखं काही नाही किंवा आहे पण उतरवायचे नाही. शब्द जसे परके झाले आहेत.

तिर्‍हाइत नजरेने मी माझ्या ब्लॉगकडे आणि माझ्या ब्लॉगने माझ्याकडे पाहण्याचा परकेपणा या विस्कळीत शब्दांनी का होईना पण संपवावा म्हणते.

Saturday, January 17, 2009

दयामरण हवे का नको?

आजचा सुधारकमध्ये श्रीमती मंजिरी घाटपांडे यांचा दयामरणाला अनुमती देण्याबद्दल लेख प्रकाशित झाला होता. तो येथेही वाचता येईल. त्या लेखाला प्रतिक्रिया म्हणून माझी अंकात प्रकाशित झालेली प्रतिक्रिया येथे देत आहे.




सर्वप्रथम, मंजिरीताईंचे एका चांगल्या लेखाबद्दल आणि वेगळ्या विचारांवर मत मांडण्यास उद्युक्त केल्याबद्दल धन्यवाद.

मरण हे एकमेव शाश्वत सत्य आहे असे मानले तरी सतत मरणाचा विचार करून मनुष्य जगत नाही हे देखील सत्यच आहे. वेळ-काळ योजून जनन नियोजीत करता येते त्याप्रमाणे माणसाला मरणही नियोजीत करता यावे, तो हक्क त्याला बहाल करण्यात यावा यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत पण त्याला बहुतांशवेळा अपयशच मिळाले आहे. मरण नियोजीत करण्याचे इच्छामरण आणि दयामरण या दोन वेगळे प्रकार आहेत असे वाटते.

इच्छामरण

इच्छामरण मागण्यासाठी/ अवंलबण्यासाठी मनुष्य हा मानसिक दृष्टीने सक्षम असायला हवा. आपण स्वेच्छामरणाचा निर्णय घेतो आहोत यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा. सदर कृत्य तो एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा भरीला पडल्याने करत नाही हे त्याला सिद्ध करून देता यावे. सदर निर्णय झटक्यात घेता येणार नाही हे लक्षात घेता, व्यावहारिक दृष्ट्या ही गोष्ट किंचित कठीण वाटते.

आत्महत्या हा पलायनवाद झाला. अत्यंत निराशेपोटी माणूस तो अवलंबतो परंतु त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन अयोग्य वाटते. इच्छामरणाला आत्महत्या म्हणावे का याबाबत साशंकता वाटते. आत्महत्याही बहुधा गुप्तता राखून किंवा मागचा पुढचा विचार न करता झटक्यात घेतलेल्या निर्णयाने केली जाते. इच्छामरणासाठी आपली आणि आपल्या आप्तांची मनाची तयारी करून देणे गरजेचे वाटते. भीष्म पितामहांनी जे अवलंबिले ते इच्छामरण कारण शरशय्येवरूनही ते पांडवांना उपदेश करत राहिले, इतरांना पूर्ण कल्पना देऊन प्राण त्यागला.

सावरकरांचे मरण हे इच्छामरणच असावे. अशाप्रकारचे मरण अवलंबताना मी आणखीही काही वृद्धांना पाहिले आहे. त्यांची वासना कमी होत जाऊन अन्नपाण्याचा त्याग केला जातो हे समाजात घडताना पाहिले आहे. त्यावर कायदा आक्षेप घेतो असे दिसत नाही. परंतु हे न होता, आपले मरण इतरांनी आपल्याला बहाल करावे असा विचार म्हणजे इतरांकडून आपला खून करवून घेणे आहे असे वाटते.

दुर्गाबाईंनी म्हटल्याप्रमाणे

ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते.

प्रत्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते. कॅन्सरमुळे होणार्‍या असह्य वेदनांतून जाणारी आणि तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणारी एक लहान मुलगी मी पाहिली आहे तर मायग्रेनमुळे जीव द्यावासा वाटतो म्हणणारी प्रौढ माणसंही पाहिली आहेत. यावरून शारिरीक वेदनांचे आणि सहनशक्तीचे मापदंड ठरवणे हे कठीण काम वाटते. दुसरं म्हणजे, विनायातना मरण यावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वैद्यकी पेशाला ती साजेशी गोष्ट वाटत नाही. खुट्ट झाले की मरण पाहिजे असे लोक म्हणू लागले तर वैद्यकशास्त्राचा हा पराभव मानावा लागेल. वैद्यकशास्त्र सहसा माणसाचे जीवन सुकर व्हावे या हेतूने कार्य करते.

एखाद्याचे जगून संपलं आहे हे तरी कितपत खरे? अमेरिकेत राहून ८० वर्षांचे वृद्ध प्रवास करतात, खेळतात, प्रेमात पडतात, लग्न करतात त्यांचे मला अतिशय कौतुक वाटते. एकदाच मिळालेल्या आयुष्याचा उपभोग ते अद्यापही घेत आहेत याची जाणीव होते. जगात थोड्या अधिक फरकाने प्रत्येकाला आपण आणि आपले आप्त हे अमरत्वाचा पट्टा घेऊन अवतरले आहेत असे वाटत असते. आपल्या मृत्युची घटका जवळ आल्याचे लक्षात येताच ती लांबवावी कशी याचा विचार सर्वसामान्य माणसांच्या मनात येतो. आयुष्यात कधीतरी निराशेपोटी मरणाचा विचार मनात आला तरी प्रत्यक्ष आत्महत्येपर्यंत पोहोचणारी माणसे अतिशय थोडकी असतात आणि एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला/ फसला म्हणून पुन्हा पुन्हा करणारी त्याहूनही कमी असतात आणि जी असतात त्यांना मानसिक व्याधी असल्याचे मानले जाते.

लेखात आलेल्या सॉक्रेटिसच्या उदाहरणावरून पाश्चात्य जगात आत्महत्येला प्रतिष्ठा होती असे वाटत नाही. सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती आणि तीतून सुटण्याचे मार्ग नाकारत त्याने दिले गेलेले हेम्लॉक प्याले अशी कथा वाचण्यास मिळते. समाधी या मृत्युला मात्र प्रतिष्ठा असावी परंतु ती देखील संन्यास घेतलेल्यांसाठीच मर्यादीत असावी असे वाटते. अशाप्रकारे जपानमधील सामुराई योद्ध्यांनाही प्रसंगी आपले प्राण घेण्याचे शिक्षण दिले जाई परंतु तेही त्या गटापुरतेच मर्यादित वाटते आणि समाज संकल्पना वाटत नाही.

दयामरण

दयामरणाचे मला वाटतं दोन प्रकार असतात - स्वसंमतीने मागितलेले दयामरण आणि परसंमतीने अंमलात आणलेले दयामरण. यापैकी स्वसंमतीने मागितलेले दयामरण हे इच्छामरणाशी जुळते वाटते. परसंमतीने अंमलात येणार्‍या मरणाबद्दल मात्र कायद्याने अनेक बंधने येतात. ब्रेनडेथ, मरगळलेल्या भाजीसारख्या किंवा तत्सम अवस्थेत असलेल्या रुग्णाला डॉक्टर्स, कुटुंबीय आणि कायदा यांच्या सहाय्याने दयामरण देणे एकवेळ ठीक वाटते परंतु अशक्यप्राय परिस्थितीतूनही परत येणारे रुग्ण आहेतच.

पुन्हा येथे सांगावेसे वाटते की जननात हस्तक्षेप झाला म्हणून मरणात हस्तक्षेप करावा ही वैद्यकशास्त्रामागील शुद्ध हेतूची धारणा नसावी (चू. भू. दे. घे.) येथेही मरणासन्न जीवाला दयामरण द्यायचे झाले तर कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यावर मतभेद दिसतात. मरणप्राय रुग्णाचा जीवनाधार काढून घेणे हे डॉक्टरने करणे म्हणजे फाशीची शिक्षा अंमलात आणणार्‍या जल्लादाप्रमाणे झाले असा मतप्रवाह दिसतो. तर, देण्यात येणारे उपचार हळू हळू कमी करून मृत्यु द्यावा असा दुसरा विचारप्रवाह दिसतो.


संपूर्ण प्रतिसादाचा गोषवारा इतकाच की स्वेच्छामरण/ इच्छामरण या कल्पना सुखदायी वाटल्या तरी कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने त्यात बर्‍याच अडचणी निर्माण होणे शक्य आहे आणि जगातील कोणताही समाज अद्याप या कल्पना राबवण्यास तयार आहे असे वाटत नाही.

marathi blogs