प्रकार

Friday, October 18, 2013

लघु-भयकथा - १

रोहन स्कूलबसमधून उतरून घरापाशी आला. दरवाजा आतून बंद केलेला नव्हता, म्हणजे मम्मी घरात होती. तो धावत आत शिरला.

"मम्मी!" त्याने हाक मारली पण मम्मीने ओ दिली नाही तशी तो धावत वरच्या मजल्यावर गेला. "मम्मी! कुठे आहेस?." त्याने पुन्हा हाक मारली. 

"इथेच आहे राजा. ये खाली ये." जिन्यापाशी उभी राहिलेली मम्मी रोहनला दिसली तसा तो खाली जायला निघाला. तेवढ्यात वरच्या मजल्यावरच्या कपाटाचा दरवाजा हळूच उघडला आणि 
.
.
.

" रोहन, जाऊ नकोस रे बाळा. मीही तिला खालच्या मजल्यावर पाहिलंय..." कपाटातून मम्मी कुजबुजली.

Monday, December 24, 2012

आठच्या आत घरात...


"मुलींनी रात्री आठनंतर घराबाहेर पडू नये."

"
बरोबर आहे. ही सावधगिरीची सूचना आहे. मुंबई किंवा शिकागो-न्यूयॉर्कच्या वाईट भागांत पुरुषांनीही रात्री बेरात्री एकटे दुकटे फिरू नये. जर कायदा रक्षण करू शकत नसेल तर आपण सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबवायला हवेत."

“हो पण एखाद्या कुप्रसिद्ध एरियात न जाणे आणि राजरोस सर्वत्रच आठनंतर बाहेर न पडण्याची सक्ती येणे यांत काहीतरी फरक आहे ना.”

“असला तरी सावधगिरी बाळगण्यात काही चूक आहे का?”

"
खरंय पण मला कॉल सेंटरमध्ये नाइट ड्यूटी असते."

"
मग दुसरा जॉब बघ."

"
पण माझी मैत्रिण डॉक्टर आहे. तिलाही नाइट शिफ्ट्स असतात."

"
हॉस्पिटलने त्यांची रात्री राहण्याची सोय करावी. ते शक्य नसल्यास तिनेही हा जॉब करू नये. सुरक्षितता नाही ना तिथे."

"
पण माझी तिसरी मैत्रिण पत्रकार आहे. तिलाही रात्री बेरात्री न्यूज कवर कराव्या लागतात."

"
मला वाटतं या परिस्थितीत तिने या जॉबला तिलांजली द्यावी किंवा रात्रीबेरात्री ज्या न्यूज कवर कराव्या लागतात त्यांची जबाबदारी घेऊ नये."

“म्हणजे?”

“पाककृती, फ्याशन, मुलांचे संगोपन, मुलाखती, अनाथाश्रम-वृद्धाश्रमांना भेटी असे विषय तिला कवर करता येतीलच की.”

"
पण माझ्या आणखीही मैत्रिणी आहेत. काही आयटीत आहेत. त्याही रात्री बेरात्री प्रोजेक्ट्ची डेडलाईन पूर्ण करतात, एक सिरिअल्समध्ये कामं करते. तिचीही शूटींग्ज दिवसात उशीरा असतात आणि एक तर आयपीएस आहे."

"
हो हो पण मी म्हणालो ना आधी की या परिस्थितीत रात्री आठनंतर घराबाहेर पडणे योग्य नाही. मध्यंतरी महिला कॉन्स्टेबल्स सोबत काय झाले होते ते विसरलीस का? स्त्रिया या देशात सुरक्षित नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा काळजी घेतलेली बरी एवढेच मला म्हणायचे आहे."

"
म्हणजे रात्री आठनंतर लांडगे रस्त्यांवर फिरतात असे समजायचे?"

"
दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण झालीये खरी."

"
पण मग आता रात्री आठनंतर बायका दिसत नाही म्हटल्यावर लांडगे संध्याकाळी सहालाच सावज शोधायला बाहेर पडले तर? जंगली श्वापदे नाही का... त्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले की रानाबाहेर पडून इतरांवर हल्ले करत... तसेच."

"
हम्म! माहित नाही बुवा. मध्ययुगीन पडदापद्धती कशी वाटते? नाही सुरक्षिततेसाठी अशा पर्यायांचाही विचार करून ठेवू सध्या."
“असे असेल तर स्त्रीभ्रूणहत्येचा मार्गच काय वाईट आहे? सशा आणि लांडग्यांच्या दुनियेत बायांनी जन्मच तरी का घ्यावा?”

Monday, May 07, 2012

सत्यमेव जयते... वेगळे काय?


काल आमीर खानचा सत्यमेव जयते मुद्दाम वेळ काढून पाहिला. सादरीकरण, संचलन, सुसूत्रता, पार्श्वसंगीत या सर्वच बाबतील कार्यक्रम उजवा होता. कार्यक्रम वस्तुस्थितीला धरून होता, ऑफ-ट्रॅक झाला नाही. आमीरचा संयत चेहरा, त्याचे ते विचारात पडणे, हलकेच डोळे टिपणे वगैरे अनेकांना अभिनय वाटेल असे बेगडी नसल्याने कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला. मध्यमवर्गाला लक्ष्य करून हा कार्यक्रम बनवला आहे हे सतत जाणवत राहिले. रविवारी सकाळी लोकांना जेव्हा महाभारत, रामायण वगैरेंसारख्या मालिका कुटुंबासहित एकत्र पाहण्याची सवय आहे त्या कार्यक्रमांमध्ये हा कार्यक्रम थोडा तापदायक वाटू शकेल किंवा संपूर्ण कुटुंबाने आनंद घेण्याजोगा नसल्याने कालांतराने पाहाणे कमी होईल का असे प्रश्नही पडले. या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. तूर्तास, एक चांगला कार्यक्रम प्रस्तृत केल्याबद्दल या चमूचे अभिनंदन करावेसे वाटते.

यापुढे विचार करायचा झाल्यास या कार्यक्रमात वेगळेपणा तो काय? रजनी या प्रसिद्ध मालिकेतून लोकांचे प्रश्न सोडवल्यावर प्रिया तेंडूलकर यांचा टॉक-शो एकेकाळी प्रसिद्ध झाला होता. समाजातील नानाविध प्रश्नांवर बोट ठेवणारा हा कार्यक्रम पिडितांच्या मुलाखती, बोलावलेले मान्यवर आणि त्यांनी मांडलेले विचार, लोकांनी विचारलेले प्रश्न वगैरे प्रकारांतून प्रसिद्ध झाला होता. लोक आवडीने हा कार्यक्रम पाहात पण म्हणून त्याने समाजावर फार मोठा परिणाम झाला असे म्हणता येत नाही. यानंतर टिव्हीवर असे अनेक कार्यक्रम येऊन गेले असावे. २४ तास बातम्यांच्या वाहिन्यांवर अशा प्रकारची "स्टींग ऑपरेशन्स" अनेकदा दाखवली जातात. परंतु कार्यक्रमांचे सादरीकरण अतिशय बटबटीत असते असा अनुभव आहे. प्रेक्षकांना हळहळ वाटण्यापेक्षा डोकेदुखी होईल किंवा प्रसंगाचे गांभीर्य समजण्यापेक्षा हसू येईल अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर आमीरचा कार्यक्रम वेगळा असला तरी नवा नक्कीच नाही.

मग या कार्यक्रमात नवीन ते काय? नवीन एवढेच की या पूर्वी सर्व सुपरस्टार्सनी ढमाढम पैसे घेऊन गेम-शो सादर केले आहेत. त्याऐवजी आमीरने एका वेगळ्या धर्तीच्या कार्यक्रमातून लहान पडद्यावर आगमन केले आणि एक नवी गोष्ट अशी झाली की प्रश्नांबरोबर प्रश्नांवर उपाय शोधण्याची किंवा ते तडीस नेण्याची आशा आमीरने दाखवली. परंतु ही आशा कितपत खरी हे अद्याप कळत नाही. राजस्थान सरकार खरेच का एसएमएस पाठवल्याने स्त्रीभृणहत्येच्या केसेस फास्टट्रॅक कोर्टात नेणार आहे? लोकपाल विधेयकाचे काय झाले हे आपल्यासमोर आहे.


भारतातील मध्यमवर्गाला एक मसिहा हवा आहे. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या रुपात तो मसिहा आपल्याला मिळतो आहे अशी अनेकांची धारणा झाली होती. या धारणेने जे सर्वव्यापी स्वरूप घेतले होते त्याचे कालांतराने काय झाले हे सर्वांनी पाहिले. लोकांना काहीतरी इन्स्टंट करून हवे आहे, ताबडतोब निर्णय हवा आहे परंतु असे काही करण्याची क्षमता अण्णा आणि आमीर या दोघांकडे नसावी. किंबहुना, असे काही करण्याचा आमीरचा प्रयत्न आहे असेही नसेल आणि तसे नसल्यास लोकांचा भ्रमनिरास निश्चित आहे.

सेलिब्रिटींनी अशाप्रकारे सामाजिक कार्यात भाग घ्यावा का याचे उत्तर निश्चितच "हो" असे आहे. त्यांचे फॅन फॉलोइंग लक्षात घेता, त्यांच्या तोंडून निघणारे शब्द झेलायला तयार असणारे लोक निश्चितच मिळतील आणि मिळतात. त्यातून काहीजणांचे मनपरिवर्तन होणे शक्य वाटते परंतु स्वार्थ प्रत्येकाला प्यारा आहे आणि तो निश्चितच आमीर खानपेक्षा प्यारा आहे हे विसरता येत नाही. याचसोबत, टिव्हीवर कार्यक्रम दाखवल्याने, भरपूर प्रायोजक मिळवल्याने समाजसुधारणा होईल असेही म्हणता येत नाही आणि अशी चटकन समाजसुधारणा होणार नाही हे जाणण्याइतपत आमीर सूज्ञ वाटतो. या कार्यक्रमात वेगळे काहीच नाही, तसे काही दाखवायचा प्रयत्न नाही असा सूर असल्यास ज्याप्रकारे प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उचलून धरल्याचे लक्षात येते आहे त्यामागील प्रेक्षकांची भूमिका काय असावी असा प्रश्न पडतोच.

सदर कार्यक्रमातून जाणवलेल्या, खटकलेल्या काही गोष्टी अशा की हा कार्यक्रम ज्या वेळेत दाखवला जातो ती वेळ रविवार सकाळ असल्याने संपूर्णतः कौटुंबिक वेळ आहे. यांतील काही कार्यक्रम लहानमुलांसाठी योग्य असतीलच असे नाही. काही दृश्ये अस्वस्थ करणारी होती. त्या दृश्यांबाबत पूर्वसूचना देण्याचे कसे काय सुचले नाही याचे आश्चर्य वाटले. ही दृश्ये कार्यक्रमाच्या टीआरपीला मारक ठरू नयेत अशी अपेक्षा. तसेच, संपूर्ण कार्यक्रमात दुसरी बाजू दिसली नाही. ज्याप्रमाणे पिडीत बायकांना बोलावले गेले होते त्याप्रमाणे पिडा देणार्‍यांनाही बोलायला लावले असते किंवा त्यांना बोलावून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता तर आवडले असते. "पीअर प्रेशर" हा आपल्या समाजाचा एक मोठा भाग आहे. मुलगा हवा असा धोशा लावणार्‍यांनाही तो कामी येतो आणि त्याविरुद्ध त्यांची निंदा करायची झाल्यासही तोच कामी येईल.

कायदा आणि सुव्यवस्था जोपर्यंत बळकट होत नाही, लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि ती भीती वाटण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी त्वरित होत नाही तोपर्यंत ओवरऑल वस्तुस्थितीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही आणि तूर्तास तरी भारतातील उदासीन मध्यमवर्गाला जागवण्याची क्षमता या कार्यक्रमात असल्याचे दिसले नाही. परंतु, माणसाने आशावादी राहावे या तत्त्वावर आमीरला पुन्हा एकदा शुभेच्छा!

Tuesday, April 03, 2012

तिच्या बुडण्याचे शतसांवत्सरिक

ते त्या काळी पाण्यावर तरंगणारे सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. जहाजात जलाभेद्य कक्ष असल्याने ते कधीच बुडणार नाही अशी त्याची ख्याती होती. ७५ हजार टन वजनाचे हे पोलादी जहाज भक्कम बांधणीचे होते. या जहाजावर १९ जलाभेद्य कक्ष होते आणि संकटसमयी किंवा अपघातात त्यातील ९ कक्ष पाण्याने भरले तरी हे जहाज पाण्यावर तरंगण्याची क्षमता राखून होते. अमेरिकेकडून इंग्लंडकडे त्याचा पहिला प्रवास चालला होता. या विलासी जहाजावर श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींचा समावेश होता.

न्यू यॉर्कवरून यात्रा सुरू करून एप्रिलच्या महिन्यात हे जहाज उत्तर अटलांटिकमध्ये प्रवासात होते. त्या भागात समुद्र बर्फाळ होता. सर्वत्र धुकं पसरलं होतं. अशा या धोकादायी वातावरणात अचानक मध्यरात्रीच्या सुमारास जहाजाची टक्कर हिमनगाशी झाली आणि हिमनगामुळे जहाजाची उजवी बाजू (स्टारबोर्ड) चिरत गेले. जहाजात पाणी शिरू लागलं. ३००० प्रवाशांनी खच्चून भरलेल्या जहाजावर केवळ २४ लाइफबोटी होत्या. त्यावेळच्या कायद्यानुसार अशा आकाराच्या जहाजांवर किमान २४ लाइफबोटी लागत पण खच्चून भरलेल्या या जहाजावर २४ ही संख्या फारच कमी होती.

टक्कर झाल्यावर जहाजात पाणी घुसू लागले आणि जहाज पाण्याखाली जाऊ लागले. जहाजातील बायका मुलांना लाइफबोटींवर चढवण्यात आले पण तरीही जहाजावरले अर्धेअधिक प्रवासी गारठलेल्या समुद्रात बुडून मेले. समुद्राने दया दाखवली नाही.

ही प्रसिद्ध गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहित आहे पण कदाचित काही चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल की ही कथा "टायटॅनिकची" नाही. टायटॅनिक हे जहाज अमेरिकेतून इंग्लंडकडे जात नव्हते तर ते इंग्लंडहून निघून अमेरिकेतील न्यू यॉर्क सिटीकडे चालले होते आणि या प्रचंड जहाजावर वर म्हटल्याप्रमाणे अवघ्या २४ लाइफबोटीही नव्हत्या!

वर दिलेली ही घटना सत्य नसून एक कल्पितकथा आहे. बरील कथानक फ्युटिलिटी: ऑर द रेक ऑफ टायटन या १८९८ मध्ये मॉर्गन रॉबर्टसनने लिहिलेल्या दीर्घकथेतील टायटन या जहाजाच्या अपघाताबद्दल आहे. टायटॅनिक या जहाजाचा अपघात होण्यापूर्वी सुमारे १४ वर्षे आधी प्रकाशित झालेल्या या दीर्घकथेत आणि टायटॅनिकच्या गोष्टीत काही महत्त्वाची साम्यस्थळे आहेत.

विशेषतः जहाजांच्या नावांतील सारखेपणा, त्यांची जलाभेद्यतेबद्दल प्रसिद्धी, मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर अटलांटिकमध्ये हिमनगाशी टक्कर होणे, जहाजावर लाइफबोटींची कमतरता असणे, जहाजावरील प्रवाशांची अदमासे संख्या वगैरे योगायोग विशेष वाटतात. अन्यथा, दीर्घकथा म्हणून ही एक अतिसामान्य कथा आहे आणि टायटॅनिकच्या दुर्दैवी अपघाताशी मेळ न खाणारे किंवा तांत्रिक त्रुटी दाखवणारे अनेक प्रसंग कथानकात आहेत.

तरीही या सामान्य कथानकाला टायटॅनिकच्या अपघाताशी असणाऱ्या असामान्य साम्यामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीचे मूळ कारण अर्थातच १५ एप्रिलला झालेला टायटॅनिकचा अपघात हे होते. या दुर्दैवी अपघाताला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या कारणास्तव उपक्रमावर हा धागा सुरू करणे अपरिहार्य वाटले.


प्रवासी वाहनांना जे अनेक अपघात झाले आहेत त्यात टायटॅनिक आपले नावामागचे प्रसिद्धीचे वलय राखून आहे. इतिहासात टायटॅनिकपेक्षा मोठ्या जहाजांना अपघात घडलेले आहेत आणि टायटॅनिकपेक्षा मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झालेली आहे; पण मग या अपघातात विशेष असे काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे देता येतील.

  • युद्धकालीन परिस्थिती नसताना; टायटॅनिकचा अपघात हा पहिल्या महायुद्धा आधी घडलेला आहे हे लक्षात घेतल्यास इतक्या मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याचे हे महत्त्वाचे उदाहरण आहे. टायटॅनिकच्या अपघातात दीड हजारांहून अधिक माणसे मृत्युमुखी पडली. यांत अनेक बायका आणि लहान मुलांचा समावेश होता. अर्ध्याहून अधिक लोकांची प्रेतेही हाताला लागली नाहीत.
  • हजारोंच्या संख्येने प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असताना केवळ २० लाइफबोटी जहाजावर असणे हा व्यवस्थापनाच्या हलगर्जीचे उत्तम उदाहरण म्हणून दाखवता यावे. या घटनेनंतर जहाजांवर किमान लाइफबोटी आणि संरक्षक साधनांविषयी नियम कडक करण्यात आले.
  • टायटॅनिकचा प्रवास महागडा होता. १९१२ साली टायटॅनिकमधून पहिल्या वर्गाच्या प्रवासासाठी ४००० डॉ. च्या वर किंमत मोजावी लागत होती. टायटॅनिक हे सुखदायी प्रवासासाठीच बांधलेले जहाज होते. इलेक्ट्रिसिटी, उबदार वातावरण, गरम पाण्याचा तरण तलाव, तुर्की अंघोळ, व्यायामशाळा, बँड रुम वगैरे अनेक सोयी या "लक्झरी लायनर"वर होत्या.
  • आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे "आढ्यता". हे जहाज कधीच बुडणार नाही अशी प्रसिद्धी जहाज बांधताना करण्यात आली होती पण निसर्गाच्या कचाट्यात सापडलेले हे प्रचंड महागडे जहाज आपल्या पहिल्या प्रवासातच समुद्राने गिळंकृत केले. या निमित्ताने जहाजबांधणी व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाकडे, बांधल्या जाणाऱ्या जहाजांकडे बारकाईने पाहण्याची उपरती झाली. किंबहुना, टायटॅनिकच्या अपघाताची नोंद जागतिक जलवाहतूकीने गांभीर्याने घेतली. यांत इंटरनॅशनल आईस पॅट्रोलची स्थापनेचा समावेश आहे.

या शिवायही अनेक कारणे येथे देता येतील. लोकांना एखाद्या घटने सभोवती कथानक निर्माण करून तिला प्रसिद्धी देण्याची सवय असते, त्या कथानकात टायटॅनिक चपखल बसत होती. समुद्रावरील खलाशांच्या अंधश्रद्धा, टायटॅनिकच्या प्रवाशांनी अपघाताला धैर्याने दिलेले तोंड, अपघातातून वाचलेल्यांचे अनुभव, निसर्गापुढे माणूस थिटा आहे ही श्रद्धावंतांनी केलेली कारणमीमांसा, किंवा श्रीमंत आणि गरीब असे जहाजात वर्ग असले तरी निसर्ग सर्वांना समान वागणूक देतो ही नीतिकथा, अशा अनेक कारणांमुळे इतिहासात टायटॅनिक अजरामर झाली. तिच्यासोबत अनेक कथांना आणि आख्यायिकांनाही प्रसिद्धी लाभली. यापैकी मला आवडणारी कथा/ आख्यायिका टायटॅनिकच्या बँडबद्दल आहे.

--------

टायटॅनिकवर आठजणांचा चमू बँड वाजवून श्रोत्यांचे मनोरंजन करत होता. जहाजाची हिमनगाशी टक्कर होऊन संकटाची वेळ आली तेव्हाही हा चमू लोकांमध्ये घबराट उडू नये आणि त्यांचे चित्त ठिकाणावर राहावे म्हणून वाद्ये वाजवत होता. असं सांगितलं जातं की या बँडचा प्रमुख वॉलेस हार्टली याने जहाजाला झालेला अपघात आणि लाइफबोटवर माणसांना चढवण्याची लगबग लक्षात घेऊन आठजणांच्या आपल्या चमूला जहाजाच्या पहिल्या वर्गाच्या आरामकक्षात (लाउंज) गोळा केले. तेथेच लाइफजॅकेटस घालून अनेक प्रवासी गोळा झाले होते आणि आपला जीव वाचवण्याच्या धडपडीत होते. त्या परिस्थितीत आपला गणवेश घालून आठजणांचा हा चमू शांतपणे वाद्ये वाजवत होता. जहाज जसजसे बुडू लागले तसे हा चमू आरामकक्षातून जहाजाच्या डेकवर पोहोचला आणि तेथे धून आळवू लागला. आणि बुडत्या जहाजाबरोबर समुद्राच्या पोटात गेला. या चमूने शेवटची धून कोणती वाजवली असावी, इतरांची धावपळ बघत असताना त्यांची स्वतःची मन:स्थिती कशी असावी यावर अद्यापही चर्चा झडतात.


सुमारे दोन आठवड्यांनी वॉलेस हार्टलीचा गारठलेला मृतदेह सापडला तेव्हाही वाद्याचा पट्टा त्याच्या शरीराशी बांधलेला होता. टायटॅनिकबद्दल अशा अनेक कथा आणि आख्यायिका प्रसिद्ध आहेत.


--------

आख्यायिकांसोबत हे जहाज बुडण्याची नेमकी कारणे कोणती यावर आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने अद्याप संशोधन होते. हिमनगाशी टक्कर हे मुख्य कारण असले तरी त्या सोबतीने इतर काही कारणे या जहाजाला बुडवण्यात कारणीभूत ठरली असावीत का काय यावर अभ्यास केला जातो. नुकत्याच वाचलेल्या टाइम मासिकातील एका लेखानुसार हिमनगासह चंद्रालाही या अपघाताचा धनी बनवण्यात आले आहे.

टेक्सास युनिवर्सिटीतील काही शास्त्रज्ञांच्या मते १९१२ च्या जानेवारी महिन्यात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला होता. ही घटना सुमारे १४०० वर्षांनी घडत होती. याचा प्रभाव समुद्राची भरती आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटांनी हिमनगाला ग्रीनलॅंडकडून वळवून एप्रिलपर्यंत न्यू फाउंडलंडजवळ; जेथे टायटॅनिकचा अपघात घडला तेथे आणून पोहोचवले असावे.

भविष्यातही टायटॅनिकविषयी असे निष्कर्ष, शंका निघतच राहतील. इतके ग्लॅमर या जहाजाने नक्कीच मिळवले आहे.

-------

टायटॅनिक आणि ग्लॅमरचा विषय निघाला की जेम्स कॅमेरुनचा सुप्रसिद्ध चित्रपट टाळून पुढे जाता येत नाही. १९९७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट हॉलिवूडमधील सर्वांत यशस्वी दहा चित्रपटांतील एक गणला जातो. या चित्रपटाचं यश टायटॅनिकच्या दुर्दैवी अपघातात होतं की प्रणयकथेत हे ठरवायचे झाले तर प्रणयकथेचे पारडे जड होईल असे वाटते. असं म्हटलं जातं की हा चित्रपट यशस्वी होण्याचे एक कारण प्रेक्षकांनी तो पुन्हा पुन्हा येऊन बघितला हे आहे. हा भीषण अपघात असो की प्रणयकथा; टायटॅनिकनेच "आय ऍम फ्लाइंग" ही प्रणय-प्रसिद्ध अदा सिनेजगताला दिली. टायटॅनिकच्या अपघाताच्या शंभरीनिमित्त १९९७ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट या वेळेस त्रिमित तंत्राच्या साहाय्याने पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे.


टायटॅनिकच्या निमित्ताने पुढील काही दिवसांत सर्वत्र चर्चा झडतील. गप्पा होतील. उपक्रमावरही या घटनेची नोंद व्हावी म्हणून हा धागा सुरू करत आहे. टायटॅनिकसंबंधीच्या कथा, आख्यायिका, इतिहास, चित्रपट परीक्षण वगैरेसाठी हा धागा सदस्यांनी वापरावा.


.

.



हे पुस्तक वाचावे असे मी सुचवणार नाही. उत्सुकता असल्यास तासभरात भराभर डोळ्याखालून घातल्यास संदर्भ लागू शकतील.
जीवन संरक्षक होडक्यांत स्त्रिया आणि मुलांनी सर्वप्रथम बसावे अशी सूचना असतानाही अनेक स्त्रिया आणि मुले यांचा समावेश मृतांत आहे यावरून खरी परिस्थिती काय असावी हे लक्षात येते. वाचलेल्या लोकांत गर्भश्रीमंत प्रवाशांचा भरणा होता.



वरील चित्रे विकिपिडीया आणि jamescameronstitanic.wikia.com वरून साभार घेतली आहेत.

Tuesday, January 24, 2012

हिची, तिची कहाणी

'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्‍या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची समजूत घालत बसणं. वेळ असतो कुठे तेवढा?
'ही'चा नवरा मुलांना उठवून तयार करत असतो तेव्हा 'ही' स्वतःची तयारी करता करता मुलांचे डबे भरत असते. मुलांना शाळेत सोडलं की 'ही'सुद्धा ऑफिसच्या दिशेने सुसाट निघते. गडबडीत 'ही'चा ब्रेकफास्ट कधीच होत नाही.

रस्त्यात ट्रॅफिक जॅम नेहमीचाच. बुडाखाली गाडी असली म्हणून वेळेत पोहोचणं शक्य आहे असे थोडेच असते? पण मग गाडीत कोंडलेली हीच काय ती वेळ 'हिची' स्वतःची असते. अचानक आज तिला १५-२० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवतो. हिची नवी पहिली नोकरी आणि वरळीला हिच्या ऑफिसच्या फूटपाथवर बसणारी "ती". पथारी टाकून काहीबाही प्लास्टीकचे कंगवे, फण्या, आरसे विकायला बसलेली. बाजूला तिची ३-४ वर्षांची पोरगी खेळत असायची आणि मांडीत ६-८ महिन्यांचं दुसरं पोर. मध्येच कधीतरी गिर्‍हाईक आलं तर ते बाळ, त्या मुलीच्या मांडीत जाई. तिची मांडी ती केवढी! ते बाळ अर्धवट जमिनीला टेकलेलं. धुळीने माखलेल्या मुठी चोखत असायचं. ते विरलेले कपडे, पिंजारलेले केस, वाहणारी नाकं; पोरांचा अगदी अवतार असे.पोरांच्या नाकातून वाहणारा शेंबूड पुसायलाही आईला उसंत नसायची. उन्हा-तान्हात सुकायला घातल्यागत दिवसभर ती पोरं फुटपाथवर बसलेली असत. राग यायचा तेव्हा. 'सांभाळायला जमत नसेल तर कशाला जन्माला घालतात हे लोक ही पोरं?' असं वाटून जायचं. कधीतरी, रडणार्‍या मुलीला वसावसा ओरडताना आणि फटके देताना पाहिलं की जाऊन 'तिलाच' समज द्यावी असं वाटायचं.

पण मग कधीतरी समोरच्या चहावाल्याकडनं घेतलेला चहा फुंकून पोरीला देणं, दुपारच्या वेळी भाकरी पावाचा तुकडा भरवणं आणि भर रस्त्यावर पदराच्या आडोशाखाली बाळाला घेणं... तिच्यातल्या "आई"ची जाणीव करून द्यायचं. कदाचित इतरवेळेस, ज्यांच्यासाठी कमवतो त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ होत नसावा तिला. प्रत्येकाची अडचण असते. मागून हल्का हॉर्न ऐकू येतो. ही भानावर येते. ट्रॅफिक सुटलं आहे.

इतकं करूनही ऑफिस गाठेपर्यंत उशीर होतो. नेहमीचंच आहे. रोज फक्त कारणं बदलतात. मस्टर वगैरेची भानगड नसली तरी आजूबाजूच्यांचे डोळे बरंच काही बोलून जातात. परवा तर मिटींगमध्ये उशीर झाला तेव्हा बॉसने 'पुढल्यावेळी तुमच्याकडून सर्वप्रथम अपडेट्स घेणार हं!' असा टोमणा मारला.
ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या अर्ध्या तासात शाळेतून फोन येतो. 'मुलीचं अंग गरम आहे. घरी घेऊन जा.' ती नवर्‍याचा नंबर फिरवते पण तो मिटींगमध्ये आहे. फोन बंद. गेल्या आठवड्यात मुलगा घरी राहिला होता. सडकून ताप भरला होता तेव्हाही ऑफिसला दांडी मारावी लागली होती. नवरा टूरवर बाहेरगावी गेला होता. मुलाला शाळेतून 'पिक-अप' केलं, डॉक्टरकडे नेलं आणि पुढले दोन दिवस घरातून काम केलं. सर्व मिटींग्जना डायल-इन केलं. मुलाला हवं नको ते बघत कामही केलं.

मुलाचं डोकं दुखत होतं, तापाने अंग फणफणलं होतं. पाच वर्षांचा तर आहे. त्याला तू एकट्याने खोलीत झोप सांगितलं तर पटत नाही. आई जवळ लागते. 'ही'चा हात अंगावर ठेवलेला असला की शांत राहतो पण त्याला जवळ घेऊन मिटींगला डायल-इन कसं व्हायचं? खूपच पंचाईत झाली होती. शेवटी टीव्ही लावून दिला, कोंडून घातलं त्याला खोलीत आणि फोन लावला. नजरसारखी खोलीकडे जात होती. टीव्हीच्या आवाजात त्याच्या कण्हण्याचा आणि रडण्याचा आवाज पोहोचला नाही तर?

आणि आता पुन्हा मुलीचं आजारपण. 'ही' बॉससमोर उभी राहते. नजर ओशाळवाणी. 'मी घरी जाऊ का? मुलीला बरं नाहीये.' ही हळूच विचारते.
'आजही?? ३ वाजता क्लायंटबरोबर मिटींग आहे. डायल-इन करणं फारसं बरं दिसत नाही.' बॉस नाराजीने म्हणतो.
'मुलीला ताप आहे. शाळेतून फोन आला होता.' सांगताना 'ही'च्या डोळ्यात पाणी तरळतं.
'ठीक! पण ३ वाजता नक्की मिटींगला डायल-इन हो.' बॉसचा आवाज नरमतो पण डोळ्यातली नाराजी कायम राहते.

'ही' पर्स उचलून तडक बाहेर पडते. डोकं भणभणतंय. हे सर्व चाललं आहे ते पोरांसाठीच. त्यांच्या भविष्यासाठी. एकाच्या पगारात नाही भागत. दोन मुलं. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायची ऐपत हवी म्हणून हा खटाटोप. मुलांना चांगलं आयुष्य जगायची सवय झाली आहे. भीती वाटते ती या आयुष्याला त्यांना मुकावं लागलं तर? संसाराची दोन्ही चाकं चालताहेत. एक चाक मोडलं तर? 'ही'ला नोकरी करायलाच हवी. मंदीचे दिवस आहेत. दोघांपैकी कोणाची नोकरी कधी सुटेल याचा नेम नाही. संसाराचं गाडं चालत राहायला हवं.

'ही' मुलीला शाळेतून पिक-अप करते. मुलगी तापाने फणफणली आहे. शाळेतली नर्स विचारते 'मुलीला शाळेत पाठवतानाच ताप असावा. तुम्ही पाठवलीतच कशी?'

'ही'च्याकडे उत्तर नसतं. सकाळच्या घाईत झोपाळलेल्या मुलीला शाळेत पाठवलेलं असतं. ती कुरकुरत होती किंवा तिचं अंग गरम होतं हे पाहिलेलंच नसतं. 'ही' पुन्हा ओशाळवाणी होते.

'ही' मुलीला उचलूनच घरी आणते. घरी आल्यावर तिचा ताप मोजते. १०४ भरतो. मुलीला ग्लानी आल्यासारखीही वाटते आहे. घरात दुसरं कोणी नाही. मुलीला हाका मारते पण ती 'ओ' देत नाही. तिची तब्येत खरंच खूप बिघडली असावी. 'हीला' काय करावं ते क्षणभर कळत नाही. 'ही'ला रडू फुटतं पण रडता येत नाही. सांत्वन करायला कोणी नाही. 'ही' एकटी. या घरात आणि या देशातही. ही नवर्‍याला फोन लावते. तो येतोच म्हणून सांगतो.. तू तिला इमर्जन्सीला ने... तशी 'ही' तडक निघते.
मुलीला उचलते आणि सुसाट गाडी हाकत इमर्जन्सी रूममध्ये पोहोचते. नवराही येतो. दोघे काळजीत. डॉक्टर सांगतात फ्लू आहे. तिला पुढले ४-५ दिवस तरी शाळेत पाठवू नका. 'ही' नवर्‍याकडे बघते. तो नजर फिरवतो. परवा बाहेरगावी जायचं आहे म्हणतो. 'ही' मान हलवते.

आता मुलगी बरी आहे पण डॉक्टरांनी ओव्हरनाइट हॉस्पिटलला राहायला सांगितलं आहे. 'ही'ला आठवतं की मुलगा शाळेतून घरी यायची वेळ झाली.

'ही' पुन्हा सुसाट घरी. नवरा मुलीजवळ थांबतो. 'ही' मुलाला शाळेतून घेऊन येते. त्याला दूध गरम करून देते आणि जरा सोफ्यावर टेकते. सकाळपासून 'ही'च्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही... 'ही'चं डोकं गरगरतं. अचानक नजर घड्याळाकडे जाते. ४ वाजायला आलेले असतात. ३ वाजताची मिटींग चुकलेली असते.... तिला फारसं काही वाटत नाही कारण डोकं आधीच "ज्यांच्यासाठी कमवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो खरा!" या विचाराने भरून गेलेलं असतं.

------------

हा प्रतिसाद मूळ मनस्वी राजन यांच्या ऐलपैलवरील स्फुटाला दिला होता. मूळ लेख मला आतिशय आवडला होता.

Friday, January 20, 2012

गूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स

गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते. ज्या गोष्टी भयोत्पादक आहेत, मग त्या पारलौकिक, अतींद्रिय, परग्रहसंबंधित असोत की मानवी, त्यांना भयकथेमध्ये स्थान दिले जाते. कथेची मांडणीही अशी असते, की त्यातून भयाचीच निर्मिती व्हावी. जगभरच्या वाङमयात अशा उत्तम भयकथा पुष्कळ आहेत, त्यांच्यावर अनेक ग्राफिक नॉव्हेल्स, चित्रपट वगैरेही आलेले आहेत. आपल्याकडे नारायण धारपांनी 'चंद्राची सावली' सारख्या अनेक उत्कृष्ट दीर्घ भयकथा लिहिल्या आहेत.

गूढकथेमध्ये, कधीतरी, अनपेक्षित म्हणून गूढ असलेल्या भीतीचा वापर अवश्य केला जातो; पण तिच्यात अशा इतर अनेक तत्त्वांचा समावेश होतो, जी अनोळखी, नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळी असल्यामुळे अर्तक्य आणि गूढ असतात. उदाहरणार्त्य, मंत्रचळेपणा. कुलूप पक्के लावलेले आहे, हे माहित असताही परत परत ओढून पाहणे, एक जिना उरतल्यावरही परत वर जाऊन पाहण्याचे कष्ट घेणे, हे नेहमीच्या सवयींपैकी दिसणारे आहे. माणूस असे का वागतो? - उत्तर नाही. ते गूढ आहे; पण ते भयप्रद नाही. जे समजण्याच्या पलीकडे आहे, अर्तक्य आहे, ते सार गूढ आहे. नेहमीच्या पाहण्यातले नाही, त्याची कदाचित भीती वाटू शकेलः पण ते मूलतः भीतिदायक नाही, ते गूढ आहे. ते वास्तव असू शकते. तरीही नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे ते वेगळे वाटते, अनाकलनीय वाटते, गूढ वाटते.


- रत्नाकर मतकरी.
प्रस्तावना - अंतर्बाह्य

रत्नाकर मतकरींनी मांडलेले मत; गूढकथा आणि भयकथेतील फरक वाचकांना सहज कळून येत नाही याचा अनुभव मला अनेकदा आला आहे. बर्‍याच वेळा वाचकांना "ही भयकथा नाही, ही गूढकथा आहे." असे स्पष्टपणे सांगावे लागते. त्यानंतरच वाचक त्याकडे गूढकथा म्हणून पाहतात.परंतु तरीही, गूढकथेचा बाज त्यांना कळतो का याविषयी शंका वाटते. वरील परिच्छेदावरून गूढकथा आणि भयकथेतील फरक समजण्यास वाचकांना मदत होईल अशी अपेक्षा करते आणि गूढकथेच्या आणखी एका उदाहरणासाठी माझ्या एका आवडत्या चित्रपटाची ओळख येथे करून देते.

काळ आहे दुसर्‍या महायुद्धाच्या वेळचा. युद्ध जवळ जवळ संपल्यात जमा आहे. ग्रेस स्टेवर्ट या स्त्रीचा नवरा फ्रान्समध्ये लढाईवर होता पण तो अद्याप परतलेला नाही. ग्रेस आणि तिची दोन लहान मुले, ऍनी आणि निकोलस हे एका मोठ्या इस्टेटीवर बांधलेल्या प्रचंड हवेलीत राहतात. ग्रेस अतिशय पापभिरू बाई आहे आणि मुलांनीही तसेच असावे यावर तिचा भर आहे. ऍनी हट्टी आहे. तिचं आणि ग्रेसचं पटत नाही. ग्रेस तिच्यावर कडक बंधने घालून शिस्त लावायचा प्रयत्न करते. निकोलस त्या मानाने खूपच बुजरा आहे. आठवड्याभरापूर्वी मायलेकीत काहीतरी झालं आहे आणि त्यावरून ऍनी ग्रेसवर नाराज आहे. ग्रेसच्या दोन्ही मुलांची कातडी प्रकाश संवेदनशील आहे त्यामुळे सूर्यप्रकाशापासून त्यांना दूर ठेवण्याची धडपड ग्रेस करते. घरातील पडदे सतत ओढलेले असतात आणि मंद दिवे किंवा मेणबत्तीच्या प्रकाशातच घरातले व्यवहार चालतात. ग्रेसला नवीन नोकर हवे आहेत कारण तिचे जुने नोकर नुकतेच काही कारणास्तव नोकरी सोडून गेलेले आहेत.

तिने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीवरून एके दिवशी तीन नोकर तिच्या दाराशी येतात. त्यांत मि.टटल हा म्हातारा माळी, मिसेस मिल्स ही मध्यमवयीन स्त्री, आणि एक मुकी तरुण मुलगी; लिडिया आहे. ग्रेस त्यांना आपल्या मुलांच्या परिस्थितीची ओळख करून देते आणि मुलांना प्रकाशापासून दूर राखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे त्याची कल्पना देते. ग्रेसला नोकर आणि नोकरांना नोकरी पसंत असते.

चित्र विकिपीडियावरून साभार.
परंतु एके दिवशी ग्रेसच्या लक्षात येते की तिने वर्तमानपत्रात दिलेली जाहीरात छापून आलेलीच नाही. ती मिसेस मिल्सकडे विचारणा करते. त्यावर मिसेस मिल्स सांगतात की ग्रेस या घरात राहायला येण्यापूर्वी जुन्या मालकांकडे ते तिघे नोकर कामाला होते पण नंतर नोकरी गेली. तरीही या घरात आणि इस्टेटीवर काम करणे त्यांना आवडत असे. एके दिवशी सहज नोकरी शोधायला म्हणून स्वतःहून त्यांनी येथे येऊन पाहिलं तर नोकरी मिळून गेली. जाहीरातीबद्दल फार उहापोह न झाल्याने त्यांनीही फार भर दिला नाही.

हळूहळू ग्रेसला घरात काहीतरी विचित्र अनुभव येऊ लागतात. ऍनी येऊन तक्रार करते की तिच्या खोलीत तिला व्हिक्टर नावाचा एक मुलगा दिसतो. तिला घरात इतर माणसेही कधीतरी दिसतात पण व्हिक्टर अधिक वेळा दिसतो. घरात कोणीतरी बोलते आहे, कुजबुजते आहे असे भास होतात. कधीतरी काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज येतो. ग्रेसला वाटते की ऍनी तिच्यावर रागावलेली असल्याने खोटे बोलते आहे आणि ऍनीला आणखी कडक शिक्षा होते. परंतु, मिसेस मिल्स ऍनीवर विश्वास ठेवतात आणि एक दिवस तुझ्या आईलाही या प्रकारांची प्रचिती येईल असे सांगून ऍनीची समजूत काढतात. हवेलीच्या आवारात तीन ग्रेव्हस्टोन्स आहेत. मि. टटल त्यावर वाळकी पाने टाकून त्यांना लपवायचा प्रयत्न करतात.

एके दिवशी ग्रेसला खरेच घरात काहीतरी वावगे दिसते. त्या प्रकाराने त्रस्त होऊन ग्रेस घराला ब्लेस करून घ्यायचे ठरवते आणि प्रीस्टच्या शोधासाठी घराबाहेर पडते. मिसेस मिल्स ग्रेसला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ती जुमानत नाही. वाटेत धुकं पडलं आहे. ग्रेसला त्यातून वाट काढताना नाकी नऊ येतात पण त्याच धुक्यातून तिच्यासमोर अचानक तिचा नवरा, चार्ल्स, उभा ठाकतो. ग्रेस आनंदाने नवर्‍याला घरी घेऊन येते पण तिच्या लक्षात येते की तिचा नवरा पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो अबोल झाला आहे ,अतिशय थकलेलाही आहे. त्याचा भ्रमनिरास झाला असावा. "बहुधा तो कोठे आहे हे देखील त्याला माहित नसावे"असे त्याच्याकडे पाहून मिसेस मिल्स म्हणतात.

घरातील विचित्र घटना सुरूच राहतात. ऍनी ग्रेसला व्हिक्टर आणि त्याच्या आईवडिलांचे चित्र काढून दाखवते. चित्रात त्यांच्यासोबत एक आंधळी म्हातारीही दिसते. ते चित्र पाहून ग्रेस चकित होते आणि घरात काही सापडते का हे पाहण्यासाठी घराची तपासणी सुरू करते. तशात तिला मृत्यूसमयी काढलेल्या फोटोंचा एक अल्बम दिसतो. त्यातले काही फोटो गहाळ आहेत.

एके दिवशी ग्रेस आणि ऍनी, ऍनीचा एक ड्रेस शिवत बसलेल्या असतात. काही कारणास्तव ग्रेसला खोलीबाहेर जावे लागते. ती परतते तेव्हा ऍनी तो जवळपास पूर्ण झालेला ड्रेस घालून जमिनीवर बसलेली असते पण ती ऍनी नसते. त्या ड्रेसमध्ये ती आंधळी म्हातारी असते. ग्रेसचा थरकाप उडतो आणि संतापही अनावर होतो. ती त्या मुलीला पकडून बदडून काढते. या झटापटीत ड्रेस फाटतो आणि ग्रेसच्या लक्षात येतो की तिला झाला तो भास होता. प्रत्यक्षात ती ऍनीलाच मारते आहे.

ग्रेस नवर्‍याच्या खोलीत जाते. तो शांतपणे तिला सांगतो की आठवड्याभरापूर्वी तू काय केलेस हे ऍनीने मला सांगितले आहे. हे ऐकल्यावर ग्रेस ढेपाळते आणि आपली चूक नव्हती, भावनेच्या भरात कृत्य झाले असे सांगण्याचा प्रयत्न करते. लवकरच ग्रेसचा नवरा घरातून निघून जातो. ग्रेस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो बधत नाही.


दुसर्‍या दिवशी सकाळी घरातले सर्व पडदे गायब होतात आणि घर प्रकाशाने भरून जाते. ग्रेसची मुलं घाबरून आरडाओरडा करतात. ग्रेस संतापाने वेडीपिशी होते. तिला हे नोकरांचे कारस्थान वाटते. ती त्यांच्यावर बंदूक रोखते. ग्रेसचा हा अवतार पाहून मुले भेदरतात. त्या रात्री ती घरातून पळून जाऊन वडलांचा शोध घेण्याचा बेत आखतात आणि खिडकीतून खाली उरतरात. रागाने वेडीपिशी झालेली ग्रेस घरभर पडदे शोधते आहे. ती पडदे शोधायला नोकरांच्या खोलीत जाते आणि तेथे तिला एक पाकिट सापडते. त्या पाकिटात मृत्यूसमयी मृत शरीरांचे काढलेले तीन फोटो मिळतात. १८९१ साली वारलेल्या माळी, मिसेस मिल्स आणि लिडियाचे.

एव्हाना घराबाहेर पडलेल्या ऍनीला आवारात तीन ग्रेव्हस्टोन्स दिसतात. घरातल्या तीनही नोकरांचे. ऍनीला रहस्याचा उलगडा होतो आणि तेव्हाच मि.टटल, मिसेस मिल्स आणि लिडिया मुलांच्या दिशेने येताना दिसतात. ऍनी आणि निकोलस जीव घेऊन घराच्या दिशेने धावत सुटतात आणि....

त्या हवेलीत नेमकं रहस्य काय असतं? ते तिघे मृत नोकर ग्रेस आणि मुलांपर्यंत पोहोचतात का? व्हिक्टर त्याचे आईवडिल आणि त्या आंधळ्या म्हातारीचं काय रहस्य असतं? ग्रेसचा नवरा कुठे नाहीसा झालेला असतो या अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा चित्रपट वाचकांनी अवश्य पाहावा.

२००१ साली प्रदर्शित झालेल्या "द अदर्स" चित्रपटात निकोल किडमनची प्रमुख भूमिका आहे आणि तिने ती अतिशय ताकदीने पेलली आहे. राग, भीती, कुतूहल या सर्व भावना निकोल आपल्या डोळ्यांतून अतिशय प्रभावीपणे व्यक्त करते. चित्रपट पाहताना कोठेही किळस, ओंगळवाणे काहीतरी पाहिल्याचा प्रत्यय येत नाही. फारशी भीतीही वाटत नाही. किंबहुना, दचकवणारा एकमात्र प्रसंग ड्रेसमध्ये ग्रेसला ऍनीऐवजी म्हातारी दिसते तो असावा. तरीही, समोर जे सुरु आहे ते कुतूहल जागवते. प्रेक्षकांना बांधून ठेवते.

वातावरण निर्मिती, सशक्त रहस्य आणि कलाटणी हे गूढकथेचे मुख्य भाग असायला हवेत. या तीनही विभागांत हा चित्रपट सरस वाटतो. प्रचंड मोठी धुक्यात वेढलेली इस्टेट, प्रकाशाची ऍलर्जी असणारी मुले आणि त्यांची विशेष काळजी घेणारी ग्रेस, अचानक उपटलेले तीन नोकर, घरात वेळी अवेळी दिसणार्‍या व्यक्ती, ग्रेसच्या नवर्‍याचे येणे आणि जाणे आणि अर्थातच कथेला मिळणारी शेवटची कलाटणी.

हा चित्रपट सुमारे १० वर्षांपूर्वीचा असल्याने अनेकांनी पाहिला असावा. चित्रपटाविषयी त्यांचे विचार ऐकायला आवडतील. भय हा मुद्दा गूढकथेमध्ये मुख्य नसतो पण तो हळूच शिरकाव करतो. या चित्रपटातही रहस्याचा पत्ता शेवटपर्यंत प्रेक्षकांना न लागू देण्यात पटकथा यशस्वी ठरते. द अदर्स या चित्रपटावर काही तद्दन टुकार हिंदी चित्रपटही आले आहेत. तरीही, गूढकथेचा अस्सल आणि परिपूर्ण नमुना म्हणून "द अदर्स"चे नाव घेता यावे. या चित्रपटाची शिफारस मी आतापर्यंत अनेकांना केली आहे आणि त्या सर्वांना हा चित्रपट आवडला आहे हे विशेष.
.

Monday, July 18, 2011

एका येडपटाची पत्रे

कोर्‍या चेहर्‍याने विनोद करणार्‍या व्यक्तींची मला नेहमीच गंमत वाटत आली आहे कारण ते विनोद करतात की गांभीर्याने काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात चटकन लक्षात येत नाही आणि असे माझेच का इतरांचेही होत असावे असे वाटते.

माझ्या मुलीला शाळेत इंग्लीशच्या एका गृहपाठासाठी "यडपटाची पत्रे" असा विषय होता. "लेटर्स फ्रॉम ए नट" हे पुस्तक तिने लायब्ररीतून आणले होते त्याचे थोडेफार वाचन केले आणि हसून हसून मुरकुंडी वळणे या वाक्प्रचाराची प्रचिती घेतली.

टेड नॅन्सी हे बॅरी मार्डर या विनोदी नटाचे टोपण नाव. या नावाने त्याने अनेक कंपन्यांना, व्यवसायांना आणि व्यावसायिकांना पत्रे लिहिली. पत्रांची धाटणी गंभीर पण आशय अतिशय बावळट अशा स्वरूपाची ही पत्रे ज्यांना गेली त्यातील काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले तर काहींनी त्याची गांभीर्याने उत्तरेही दिली. ही पत्रे त्याने "लेटर्स फ्रॉम ए नट" आणि इतर पुस्तकांत संकलित केली आहेत. जेरी साईनफेल्डची प्रस्तावना या पुस्तकांना आहे. त्यापैकी काही पत्रांचे संक्षिप्त रूप आणि अनुवाद येथे देते -

टेड नॅन्सीची पत्रे निळ्या रंगात आणि उत्तरे लाल रंगात टाकली आहेत.




पत्र पहिले - नॉर्डस्टॉर्म या प्रसिद्ध दुकानाला लिहिलेले

पत्राचा थोडक्यात आशय असा -


ब्रुस नॉर्डस्टॉर्म,
नॉर्डस्टॉर्म
गेल्यावेळी तुमच्या दुकानात फेरफटका मारताना दुकानात ठेवलेला एक पुतळा (mannequin)दृष्टीस पडला. हा पुतळा मला विकत घेण्याची इच्छा आहे कारण माझ्या दिवंगत मित्राच्या चेहर्‍याशी मिळता जुळता चेहरा मला तिथे सापडला. तो त्याच्या कुटुंबाला भेट देण्याचा मनसुबा आहे.

तरी मला पुतळ्याची किंमत कळवणे.

टेड नॅन्सी.






या पत्राला ब्रुस नॉर्डस्टॉर्मकडून व्यवस्थित उत्तर आले -



टेड नॅन्सी,

तुमची मागणी अतिशय रोचक वाटली. खरे सांगायचे तर, आपल्या जीवलगाच्या मृत्यूनंतर त्याचा पुतळा अशाप्रकारे घरी ठेवण्याची कल्पना त्यांच्या कुटुंबाला रुचेल असे वाटत नाही.

तरीही, आमच्या सर्व गिर्‍हाईकांना सकारात्मक उत्तरे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याने हे कळवू इच्छितो की आम्ही दुकानातले पुतळे जोपर्यंत वापरतो तोपर्यंत ते विकत नाही. परंतु जेव्हा ते बदलायची वेळ येईल तेव्हा ज्या किंमतीला आम्ही ते विकत घेतले त्याच किंमतीला आम्ही ते तुम्हाला विकत देऊ.

अधिक माहितीसाठी आपल्या घराजवळील स्टोर मॅनेजरशी संपर्क साधावा. मी हे पत्र त्यांनाही पाठवतो आहे.
ब्रुस नॉर्डस्टॉर्म





पत्र दुसरे -

प्रशासन,
द कोका कोला कंपनी,
अटलांटा

मी एक नवे पेय शोधले आहे - काएट डोक. हे पेय तुमच्या डाएट कोक या पेयामध्ये हस्तक्षेप करेल का हे जाणून घ्यायचे आहे. अर्थातच माझ्या पेयाची चव कोकसारखी नाही!! (ती पेप्सीसारखी आहे.)

मी हे पेय बांधकाम मजूरांना विकतो आणि त्यातील एकाने मला सांगितलेही होते की ते अजिबात कोकसारखे वाटत नाही.

मी हे पेय राजरोस विकू शकतो का हे मला कृपया कळवावे. सोबत आपण कोका कोलामध्ये कॅरमेल घालता का हे ही कळवावे.

धन्यवाद,
टेड नॅन्सी.






याला कोकाकोलाचे उत्तर (संक्षिप्त)

टेड नॅन्सी,

आपल्या पत्राबद्दल धन्यवाद.

डाएट कोक हा आमचा ट्रेड मार्क असून आम्ही तुम्हाला काएट डोक या नावाने पेयविक्रीची परवानगी देत नाही. काएट डोक हे नाव आमच्या डाएट कोकशी मिळतेजुळते असून ते बाजारात गोंधळ निर्माण करेल अशी आम्हाला शंका वाटते आणि आमच्या गिर्‍हाइकांचा हे कोका कोला कंपनीने मान्यता दिलेले उत्पादन आहे असा गैरसमज होऊ शकतो. यामुळे आपण काएट डोकचे उत्पादन ताबडतोब बंद करावे.

ट्रेडमार्क काउन्सिल,
द कोका कोला कंपनी






याला टेड नॅन्सीनी आणखी विक्षिप्त उत्तर पाठवले.

द कोका कोला कंपनी
अटलांटा,

मी ठरवले आहे की मी काएट डोक या पेयाची विक्री करणार नाही. मी माझे बँकेतले पैसे आणि काएट डोकचे उरलेले ११ कॅन घरी नेले आहेत.

मला कळून चुकले आहेत की ही एक कमजोर कल्पना होती. माझा मूर्खपणा दुसरे काही नाही. म्हणजे असे बघा की तुम्ही ७-११ मध्ये जाऊन डॉ.पेपर, ऑरेंज क्रश, विंक आणि काएट डोक पाहिलेत तर तुम्ही काएट डोक थोडेच विकत घेणार? मला तसे वाटत नाही. माझ्या वाह्यात कल्पनेने मी शरमिंदा झालो आहे. तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल क्षमा मागतो.

तरी तुम्ही माझ्या नव्या पेयाकडे लक्ष ठेवून राहावे - पाएट डेप्सी. त्याचे घोषवाक्य ओळखीचे आहे - 'इट टेस्ट्स नथिंग लाइक कोक!'

बरं, मी ते कोकमध्ये कॅरेमेल असण्याबद्दल विचारले होते त्याला तुम्ही उत्तर दिले नाही. शक्य असल्यास कळवावे.

टेड नॅन्सी.







बॅरी मार्डर ही अशाप्रकारे अनेक पत्रे टेड नॅन्सीच्या "लेटर्स फ्रॉम ए नट", "एक्स्ट्रा लेटर्स फ्रॉम ए नट" या पुस्तकांत आहेत. कधी एखाद्या हॉटेलला पत्र पाठवून माझा दात तुमच्या हॉटेलात पडला होता तो कृपया शोधून मला पार्सल करावा अशी मागणी तर कधी दुसर्‍या हॉटेलला मी अब्राहम लिंकनसारखा दिसत असल्याने माझे संरक्षक दल सोबत घेऊन येऊ शकतो का अशी विचारणा. एका रेस्टॉरंटला या गृहस्थाने मी माझा खाजगी वेटर सोबत घेऊन येऊ का? अशी विचारणा केली होती.

असो. तर याप्रकारचा गृहपाठ करायचा आहे पण टेड नॅन्सीच्याच कल्पना जशाच्या तशा लिहायच्या नाहीत. काल आम्ही तीन कल्पना शोधल्या.

१. द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, एलिस आयलंड फाउंडेशनला एका रंगारी कंपनीकडून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी रंगवून देण्याचे पत्र लिहायचे. त्यात त्यांच्याकडून लिबर्टी देवतेच्या पोशाखाचे रंग कळवावे अशी मागणी करायची.

२. टॅटू पार्लरला मानेवर टॅटू काढून घ्यायचा आहे असे पत्र पाठवायचे. पत्रात टॅटू मानेवर कुठे हवा, किती मोठा हवा, तो काढून घेताना दुखेल का वगैरेची विचारणा करावी. शेवटी मी माझ्या शहामृगाला ठरवलेल्या वेळी घेऊन येतो असे कळवायचे.

३. हे पत्र शहराच्या झू ला पाठवायचे. माझ्या बहिणीचा १६ वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त पार्टी आयोजित केली आहे. पत्रात पार्टीबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आणि बहिणीला लहानपणापासून "टेडी बेअर्स" आवडतात. तिला तिच्या वाढदिवसाला सरप्राईझ द्यायचे आहे त्यासाठी दोन तास एखादे पोलर बेअर भाड्याने मिळेल का? अशी विचारणा करायची.

* चित्र जालावरून साभार

marathi blogs